बरेचदा नशीबवान समजतो मी स्वताला जे भाऊच्या धक्क्याजवळ राहतो. मर्जी आली की बाईकला किक मारताच पाचच मिनिटांत त्या थंडगार लालगुलाबी सुकट खार्या मतलई सुरमई वार्यांना थेट आरपार जाऊन भिडू शकतो. कधी मूड बदलायचा झालाच, तर गेटवे ऑफ ईंडियापासून मरीनलाईन्स, तर वरळी सीफेस पासून बॅंडस्टॅंड तर कधी दादर, गिरगाव अन जुहू चौपाट्या, सार्या जणू आपल्याच बापाच्या. रोजच्या प्रवासात वाशीच्या खाडीवरील एक पुर्णांक आठ किलोमीटर लांबीच्या पूलावरून सकाळ-संध्याकाळ जाणे म्हणजे निसर्गासोबत केलेली एक राइडच असते. जेमतेम दोन ट्रॅकचा ब्रिज आणि त्या भोवताली दोन्ही बाजूने गोलाकार पसरलेला अथांग समुद्र अन थैमान वारा. भरीस भर म्हणून माझ्या वेळी ट्रेनही अशी रिकामी असते की दारात उभे राहून बाह्या फडफडवून त्या निसर्गाच्या रौद्र पण तितकेच आपलेसे वाटणार्या रुपात मिसळून जावे आणि त्यालाही आपल्यात सामाऊन घ्यावे, म्हटलं तर स्सालं सुख सुख म्हणजे आणखी काय असते !
पण समुद्र म्हटले की पहिला आठवते ते लहानपणी आईबरोबर दादर चौपाटीला खाल्लेली ओली भेळ. देवाचे हार विसर्जित करायला म्हणून दोनतीन महिन्यातून एकदा जाणे व्हायचे. पुढची भेळ पुन्हा दोनतीन महिन्यांनीच नशिबी आहे हे माहीत असल्याने कागदाला चिकटलेले शेव कुरमुरेही नाही सुटायचे. पुढे भाऊच्या धक्क्यालाच हार विसर्जित करायला सुरुवात केली आणि सुटली ती भेळ. पण विस्मरणात नाही गेली. तीच भेळ पुढे एकदा त्याच चौपाटीवर अन त्याच समुद्राच्या साक्षीने प्रेयसीबरोबर खाउन पाहिली. पण लहानपणीची मजा नाही आली. कदाचित ठरवून केल्याने तसे झाले असावे, वा त्याक्षणी माझ्या मजेची परिमाणे वेगळी असावीत. आता त्या प्रेयसीची बायको झाली आहे, पण त्या भेळेची मजा अजूनही येत नाहीच. आता वाट पाहतोय ती मला मुले झाल्यावर त्यांना कधीतरी घेऊन जावे आणि बापाच्या भुमिकेतून ती मजा अनुभवून बघावी.
समुद्र आला की किनारा आला आणि किनारा आला की वाळू आलीच. पण मला त्या वाळूचे किल्ले करणे कधीच आवडायचे नाही, कदाचित काही बांधणे वगैरे मला जमत नाही, हे देखील कारण असावे. पण मी त्या वाळूत खड्डा करायचो. करताना नखांच्या फटी वाळूने बुजायच्या मात्र मी त्याकडे दुर्लक्ष करून अगदी चार वीत खोल आणि दोन पाय जवळ घेऊन उभा राहू शकेन किमान इतक्या क्षेत्रफळाची वाळू उकरून काढायचो. किनार्याच्या शक्य तितक्या जवळच. अन मग एका मोठ्या लाटेची वाट बघत बसायचो. ती आपल्या मर्जीने यायची आणि परत जायची. मात्र माझा खड्डा पाण्याने भरून जायची. त्या खड्ड्यावर फेस जमा व्हायचा, जो विरायच्या आधी मी धावत जाऊन त्यात उभा राहायचो. विठ्ठलासारखा कंबरेवर हात ठेऊन, एका छोटेखानी समुद्राचा मालक असल्याच्या थाटात. पुढे आणखी दोनचार लाटा आल्या की त्या आपल्याबरोबर वाळू घेऊन यायच्या आणि खड्डा भरून टाकायच्या. मग पुन्हा ती वाळू उपसण्याचा खेळ सुरू व्हायचा, पुढची लाट यायच्या आधी वाळू जास्तीत जास्त उपसायची असायची. काही काळाने लाटा तिथवर येऊन भिडण्याची वारंवारता वाढायची आणि बघताबघता माझ्या खड्ड्याला समुद्र आपल्या पोटात सामावून घ्यायचा.
अकरावी-बारावीला किर्ती कॉलेजला होतो, दोन वर्षे. खरे तर एक फुकट गेल्याने दोनाची तीन वर्षे झाली. फुकट जाणारे वर्ष शैक्षणिक कारकिर्दीतले असावे, आयुष्यातले गेले असे कधीच वाटले नाही. किर्ती कॉलेज म्हणजे दादर चौपाटीला अगदी लागूनच. दिवसभर समुद्राचा वारा कानात घोंघावत असला तरीही रोज संध्याकाळी तो मला भुरळ घालायाचा. घरी पाय लवकर उचलला जायचा नाही. माझेच नाही तर असे कित्येकांचे व्हायचे. लहर आली की कंपांऊंडवरून मारलेली उडी थेट वाळूत पडायची. पण मला मात्र बाहेरून वळसा घालून जायला आवडायचे. समुद्राला शॉर्टकटने जाऊन भेटण्यापेक्षा दुरहून त्याच्या जवळ जाताना त्याचे हळूहळू वाढणारे विशाल रूप पाहण्यात मजा वाटायची. समुद्राकडे जाणार्या रस्त्यावर पसरलेले वाळूचे कण हळूहळू आपली घनता वाढवत रस्ता कसे व्यापत जातात, वार्याचा वाढता वेग आणि तो आपल्या सोबतीला घेऊन येणारा खारा गंध कसा दाट होत जातो, हे अनुभवणे म्हणजे समुद्राला जाऊन भेटणे. मग पाण्यात उतरले नाही तरी चालायचे. लाटांशी नजरेनेच खेळून झालेले असायचे. वाळूने माखलेले सुके पाय घरी घेऊन जातानाही मन चिंब भिजल्यासारखे वाटायचे. पण हे नेहमीच व्हायचे असे नाही. कधीतरी तो बोलवायचा, साद घालायचा. तेव्हा कपडे काढण्याची वेळही जीवावर यायची. हे असे व्हायचे जेव्हा आम्ही मित्र सहलीला जायचो..
कधी अलिबाग तर कधी केळवा. मुद्दाम आठवड्याचा असा वार पकडून जायचो जेव्हा गर्दी कमी असेल, त्यातही असाच एखादा किनारा पकडायचो जिथे कोणीच नसेल. सुरुवात क्रिकेट वा फूटबॉलने व्हायची. अगदी शिस्तीत. जोपर्यंत एखादा चेंडू लाटांवर तटवला जात नाही तोपर्यंत. पण एकदा का तसे झाले आणि पाण्याचा स्पर्श पायाला झाला की लागलीच सारे तूफान वेगाने समुद्राच्या ओढीने पळत सुटायचे. गल्ली क्रिकेटमध्ये ज्याची बॅटींग चालू असते त्याची अश्यावेळेस दिसणारी ओरड इथे कधीच नसायची, कारण त्यालाही समुद्राचे वेध लागलेले असायचे. बरेचदा मग पाण्यातच खेळ चालायचे, पण त्यात खेळाचे स्थान दुय्यमच असायचे.
पावसावर कित्येक कविता बनतात, कारण पावसाकडे पाहून त्या सुचतात. पण समुद्र हा बरेचदा तत्वज्ञान शिकवून जातो. एक असेच कायमचे मनावर कोरले गेलेले तत्वज्ञान म्हणजे निसर्ग हा आपला मित्र असतो, पण जोपर्यंत आपण त्याचा मान ठेऊ तोपर्यंतच. पट्टीचे पोहणारेच कित्येकदा बुडतात, कारण ते पोहायला एखादया तलावात शिकतात आणि नाद समुद्राशी करायला जातात. एक जवळचा मित्र असाच गेला. जेवढे मी त्याच्या पोहण्याबद्दल जाणून होतो, माझा या बातमीवर विश्वासच बसत नव्हता. एका सहलीचेच निमित्त झाले, पण तो समुद्र आमच्या ओळखीचा नव्हता. मागाहून कळले चूक त्याचीच होती, तेव्हा समुद्रावर धरलेला राग सोडला. मी त्यावेळी तिथे नसणे हे चांगले झाले कि वाईट आजवर समजू शकलो नाही. तिथे असूनही त्याला वाचवता आले नसते तर ती खंत मनावर जास्त आघात करून गेली असती. पण आजही खवळलेला समुद्र पाहताना कित्येकदा त्याची आठवण दाटून येते. अश्यावेळी दूर किनार्यावरच उभे राहणे पसंद करतो. आपला किनारा काय असावा हे देखील त्या समुद्रालाच ठरवू देतो. यातच जास्त सुरक्षित वाटते. पण म्हणून कायम तिथेच उभा राहत नाही. जेव्हा तो समुद्र शांत होऊन मला साद घालतो तेव्हा मात्र त्याच्याकडे जातो. त्याच्या हाकेला ओ द्यायला.. त्याच्या अस्तित्वाला मान द्यायला.. !
- तुमचा अभिषेक
वाचने
15589
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह
बरेचदा नशीबवान समजतो मी
प्रत्येकाकडे आपल्या वाटणीचा
In reply to बरेचदा नशीबवान समजतो मी by वडापाव
मरीन लाईन्सवर तरी रोज कुठे
In reply to प्रत्येकाकडे आपल्या वाटणीचा by तुमचा अभिषेक
अगदी अगदी!!!
In reply to मरीन लाईन्सवर तरी रोज कुठे by वडापाव
माझ्या दहिसरची तुळशी नदी.
In reply to अगदी अगदी!!! by सानिकास्वप्निल
तुळशी नदी आणि दहिसर
In reply to माझ्या दहिसरची तुळशी नदी. by प्रभाकर पेठकर
रम्य ते बालपण....
In reply to तुळशी नदी आणि दहिसर by राही
या लेखाच्या निमित्ताने
In reply to रम्य ते बालपण.... by प्रभाकर पेठकर
दहिसर म्हटलं की दादरकरांची
In reply to या लेखाच्या निमित्ताने by परिंदा
अनेकांच्या मते माहिमच्या पुढे
In reply to दहिसर म्हटलं की दादरकरांची by वडापाव
आताशे जग जवळ आलेय, दिवसेंदिवस
In reply to दहिसर म्हटलं की दादरकरांची by वडापाव
माझ्या सासूबाईंकडून
In reply to माझ्या दहिसरची तुळशी नदी. by प्रभाकर पेठकर
आवडला लेख
खूपच आवडला.
जर मराठी मुख्यभूमीशी
In reply to खूपच आवडला. by राही
वाटलेच होते...
In reply to जर मराठी मुख्यभूमीशी by बॅटमॅन
सहमत.
In reply to वाटलेच होते... by राही
धन्यवाद
In reply to सहमत. by बॅटमॅन
नक्कीच.
In reply to धन्यवाद by राही
हम्म
In reply to जर मराठी मुख्यभूमीशी by बॅटमॅन
अर्थातच, सहमत आहेच. फक्त
In reply to हम्म by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खरच खूपच छान
In reply to खूपच आवडला. by राही
>>>आपला किनारा काय असावा हे
एक मात्र खरंय, मुंबईच्या
In reply to >>>आपला किनारा काय असावा हे by प्यारे१
वरळी सी फेस
In reply to >>>आपला किनारा काय असावा हे by प्यारे१
कधी गेट वे च्या खाली
गेट वे मला वैयक्तिकरीत्या कधी
In reply to कधी गेट वे च्या खाली by स्पंदना
कधी गेट वे च्या खाली
In reply to कधी गेट वे च्या खाली by स्पंदना
छान लेख
सुंदर.
अप्रतिम लेख मित्रा
कीर्ती कॉलेजचा उल्लेख करुनही
अशोकचा वडापाव
In reply to कीर्ती कॉलेजचा उल्लेख करुनही by गवि
सुरेख लिहिलंय
छान लिहिलय
'गाज'णारा लेख
आज हि मन उदास असेल कि यांना
आँ..
In reply to आज हि मन उदास असेल कि यांना by भावना कल्लोळ
!
In reply to आँ.. by प्रभाकर पेठकर
चुक लक्षात आणुन दिल्याबद्दल
बरं वाटलं वाचून.
In reply to चुक लक्षात आणुन दिल्याबद्दल by भावना कल्लोळ
बरोबर..
मुंबईचे दोन भाग आहेत. १) बृहन
In reply to बरोबर.. by उपास
थोssडी अधिक माहिती.
In reply to मुंबईचे दोन भाग आहेत. १) बृहन by प्रभाकर पेठकर
लेख मस्तच..
म्हणणार होतो की फोटो कुठे
फोटो मी मिपावर आजवर कधी टाकले
In reply to म्हणणार होतो की फोटो कुठे by सुहास..
खुप छान आठवण
^^^^^^^^^^^^^
हा लेख वाचायचा राहूनच गेला