॥ नामा म्हणे प्रदक्षिणा ॥

अनिल तापकीर जनातलं, मनातलं
ज्ञानेश्वर माउलींच्या जीवनावरील कादंबरी वाचन श्री पद्माकर गोवईकर यांनी "मुंगी उडाली आकाशी " या ध्वनिफितीत अतिशय सुंदर केले होते. मी ते सतरा अठरा वर्ष्याचा असताना ऐकले होते. आणि वारंवार ऐकत होतो. त्यामध्ये एक प्रसंग होता की आळंदीच्या ब्राम्हणांच्या छळाला कंटाळून विठ्ठल पंत मुलांना घेऊन ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा करायला त्य्रंबकेश्वर येथे जातात व ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा करतात. तेथे असा उल्लेख केलेला ऐकला होता कि ब्रम्हगिरिचि प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य मिळते. कारण ब्रम्हगिरीचा पर्वत म्हणजे साक्षात शंकर आहे. असा पुराणात उल्लेख आहे. तेव्हापासून मनात होते कि आपण सुद्धा एक तरी प्रदक्षिणा करावी पण खूप वर्षे योगच आला नाही. परंतु या वर्षी भगवान शंकराच्या कृपेने योग जुळून आला. श्रावण अनायासे चालूच होता. आणि जायची तारीख ठरविली ३१ आणि १ बरोबर कोणी मिळते का म्हणून बऱ्याच मित्रांना विचारले पण सुरुवातीला होकार भरणारे शेवटी गळले व शेवटी एक चुलत भाऊ आणि मी असे दोघेच निघालो. तसे याअगोदर मी त्य्रंबकेश्वर गेलो होतो. पण प्रदक्षिणेची सविस्तर माहिती नव्हती. नेटवरून थोडी मिळाली पण तिचा फारसा उपयोग झाला नसता. म्हणून एकतीस तारखेला सकाळी लवकरच निघालो म्हणजे लवकर पोहचलो तर अजून माहिती घेत येईल. आणि ठरल्याप्रमाणे तिथे पाच वाजता पोहचलो आळंदीतील कैलास ढगे महाराजांच्या ओळखीने खोली सुद्धा चांगली मिळाली . खोलीवर जाऊन सर्व समान ठेवले आणि लगेच कुशावर्तावर जाऊन हातपाय धुऊन त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला गेलो. अर्ध्या तासात छान दर्शन झाले. दर्शन घेऊन परत येताना सहज एका दुकानात एक पुस्तक चाळत होतो काही पाने पालटया नंतर एक ओवी दिसली "दृष्टी पडता ब्रम्हगिरी । त्यासी नाही यमपुरी ॥ "नामा म्हणे प्रदक्षिणा । त्याच्या पुण्या नाही गणना ।। ओवी मनात घोळवतच खोलीवर आलो आणि खोली मालक सतीश पवार यांची भेट घेतली आणि त्यांना प्रदक्षिणे विषयी माहिती विचारली तेव्हा त्यांनी सविस्तर माहिती सांगितली. प्रदक्षिणा हि दोन प्रकारे असती एक फक्त ब्रम्हगिरी पर्वताला फेरी मारणे ती साधारणता तीस किलोमीटरची आणि दुसरी म्हणजे ब्रम्हगिरी आणि हरिहर पर्वत अशी मोठी साठ किलोमीटरची , तर साठ किलोमीटरची प्रदक्षिणा हि कठीण आहे त्यात सात पर्वत चढावे आणि उतरावे लागतात. शिवाय जंगल आणि निर्जन परिसर आहे. शिवाय वाघाचे देखील भय असते. ती प्रदक्षिणा ग्रुपने केली तर शक्यतो धोका नसतो. सतीश पवार यांनी पूर्ण श्रावण महिनाभर रोज एक अशी प्रदक्षिणा केल्या आहेत त्यात त्यांच्या दोन तीन प्रदक्षिणा ह्या साठ किलोमीटरच्या असतात. सगळी माहिती जमविल्या नंतर आम्ही लगेच झोपी गेलो कारण सकाळी चारला उठायचे उद्धिष्ट ठेवले होते. आणि उठलोही कुशावर्तात स्नान केले कुशावर्ताला एक प्रदक्षिणा घालून पुढे त्र्यंबके श्वराचे दर्शन घेतले. देवाला मनोभावे बेल फुल वाहिले आणि आमची प्रदक्षिणेला सुरुवात झाली. पहाटेची रम्य वेळ आणि त्र्यंब केश्वराच्या मंदिरातून येणारा ओम नमः शिवाय चा मंद स्वर तोच स्वर मनात ठेऊन त्याचाच जप करत आम्ही चालू लागलो. सुरुवातीला रस्त्याची अडचण येईल असे वाटत होते पण आमच्या मागे पुढे खूप प्रदक्षिणा करणारे भाविक होते. त्यामुळे आमचाही उत्साह वाढला. आणि पावलांनी वेग घेतला. साधारणता मंदिरापासून एक किलोमीटरवर एक तले लागते त्या तळ्याला प्रद्क्सिना घालून पुढे निघावे लागते. पहाटेच्या वेळी पाण्याने तुडूंब भरलेले तळे खूपच सुंदर दिसत होते. उगवतीला लालिमा पसरली होती. ***** फोटो या सुंदर तळ्याला प्रदक्षिणा घालून पुढे अतिशय चांगल्या डांबरी रस्त्याला लागलो. माहितीप्रमाणे आता जवळजवळ सात ते आठ किलोमीटर असाच रस्ता होता . चालत होतो त्याच्या डाव्या बाजूला अंजनेरी अतिशय सुंदर दिसत होता. आणि त्याला लागून असलेला एक खूप उंच पर्वत वरती आभाळातच घुसला होता. निसर्गाचे मनमोहक रूप इतके सुंदर दिसत होते कि चालायचे कष्ट अजिबात जाणवत नव्हते. उजव्या हाताला ब्रम्हगिरी पर्वतावर दोन सुळके आकाशाशी स्पर्धा करत होते. आणि धुक्याने त्यांच्या मध्यभागाला लपेटले होते. पाच सहा किलोमीटर अंतर झाल्यावर रस्ता मोठा वळसा घेणार होता. तिथेच गवतातून जाणारी एक पायवाट दिसली आणि खूप लोक तेथून चालत गेलेल्या खुणा होत्या तेव्हा आम्ही ती पायवाटच पकडली आणि आम्हाला त्याचा फायदा झाला. कारण थोडे पुढे चालून गेल्यानंतर छोटे पण सुंदर राममंदिर लागले. समोर मारुतीराय दर्शन घेतले. एक आदिवासी स्त्री दिवाबत्ती करायला आली होती. मंदिराला उजवी घालून पुढचा रस्ता पकडला आणि थोड्या वेळातच पुन्हा डांबरी रस्त्याला लागलो. काही प्रदक्षिणा करणारे आमच्या पुढे होते ते आता आमच्या मागे पडले. रामंदिर (फोटो) एक साधू आमच्या मागून झपझपा चालत येत होते. त्यांना विचारले कि कुठले तुम्ही तर म्हणाले कि त्र्यंबकेश्वरचाच आहे . त्यावर त्यांना म्हटले कि प्रदक्षिणेसाठी आजचाच दिवस का निवडला तर ते म्हणाले कि , या महिन्यात दररोज एक अशी महिनाभर प्रदक्षिणा करतो. एवढे बोलले आणि त्यांचे पुटपुटणे चालू झाले मनात म्हटले महाराजांचे नामस्मरण चालू आहे. त्यांना व्यत्यय नको म्हणून मीही नामस्मरण करत चालू लागलो . वाटेत मारुतीरायांचे एक छोटे मंदिर लागले तिथे नमस्कार केला आणि निघालो. रस्ता अजूनही डांबरीच होता. वाटेत एक छोटी नदी लागली तिचे नाव माहिती नव्हते पण नंतर खोली मालकाने सांगितले कि ती वैतरणा नदी आहे ब्रम्हगीरीवरच तिचा उगम असल्यामुळे तिचे स्वरूप छोटे होते. पूर्वी गळाभर पाण्यातून तिला पार करावी लागत होती. पण आता तिच्यावर छोटा पूल आहे. आणि पुलाला लागुनच एक गणपतीचे छोटे मंदिर आहे. आता चढ लागला होता. चालता चालता आळंदीतील दोन साधक विध्यार्थी भेटले आमच्यासारखेच अनवाणी पायाने प्रदक्षिणा करत होते. आज त्यांचा दुसरा दिवस होता. काल आज आणि उद्या अश्या तीन प्रदक्षिणा ते करणार होते. त्यांच्यातीलच एकाने सांगितले कि , आळंदीतील ज्ञानेश्वर कदम म्हणून आहे त्यांनी ८० दिवसात १०८ प्रदक्षिणा केल्या आहेत. काही दिवस एका दिवसात दोन दोन प्रदक्षिणा केल्या मनोमन त्या ज्ञानेश्वर कदमला नमस्कार केला. आणि त्यांनी अजून एका साधकाचे कथा सांगितली ते म्हणजे त्र्यंबके श्वरचेच गणपत बुवा त्यांनी दररोज एक अश्या एक हजार प्रदक्षिणा केल्या त्यांना साडेतीन वर्षे लागली धन्य ते गणपत बुवा आणि धन्य ते ज्ञानेश्वर कदम , कारण एकाच प्रदक्षिणा करण्यासाठी आम्हाला एवढा आटापिटा करावा लागला होता. आता खरी दमदार चढण लागली. रस्ताही नव्हता दगड धोंड्यातूनच चालावे लागत होते. बरयाच दमछाकी नंतर खिंडीच्या माथ्यावर आलो आणि आमची अर्धी प्रदक्षिणा पूर्ण झाली. अडीच तासात १५ किलोमीटर अंतर तोडले होते. खिंडीच्या माथ्यावर गौतम आश्रम होता. आश्रम म्हणजे एक छोटे मंदिर होते त्यामध्ये गौतम ऋषी आणि अहिल्या मातेची मूर्ती होती . आश्रम म्हणजे एक छोटे मंदिर होते त्यामध्ये गौतम ऋषी आणि अहिल्या मातेची मूर्ती होती . सर्वजन इथे आले कि विश्रांती घेतात पण आम्ही थांबलो नाही आतापर्यंत न थांबतच आलो होतो. म्हणून आताही थांबलो नाही शक्यतो न थांबतच प्रदक्षिणा पूर्ण करायचा विचार होता . आता निसरडा उतार अगदी हळू उतरावा लागत होता. आमच्यापुढे एक आजोबा साधारणता ७ ५ ते ७ ८ वर्ष्याचे आणि आजी सत्तर बहात्तर वर्ष्याच्या अगदी हळुवारपणे तो निसरडा उतार उतरत होत्या. आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या दहा बारा आणि पंधरा वर्ष्याच्या नाती प्रदक्षिणा करत होत्या. आजोबा आजीचे कौतुक वाटले श्रावणात एक प्रदक्षिणा करायचा त्यांचा नियम होता . उतार उतरल्यानंतर दोन छोट्या नद्यांचा संगम लागला नावे माहिती नव्हती पण त्या छोट्या संगमात स्नानासाठी उतरलेल्या भाविकाने सांगितले कि एक गोदावरी आहे जिच्यासाठी गौतम ऋषींनी ताप केले ती दुसर्याही नदीचे नाव त्यांनी सांगितले. आम्ही फक्त हातपाय धुवून नमस्कार करून पुढे निघालो. संगम फोटो *** पुढे आल्यानंतर आदिवासी मुली आडव्या आल्या 'काका खाऊ द्या ना , म्हणू लागल्या पण आमच्याकडे त्यांना खायला द्यायला काहीच नव्हते. मी त्यांचा फोटो काढला तर म्हणू लागल्या आमचा फोटो काढला आता काहीतरी द्या असे म्हणू लागल्या मग त्या प्रत्येकीला एक एक रुपया दिला . पुढे आल्यानंतर एके ठिकाणी खूप प्रदक्षिणा करणारे विश्रांतीसाठी थांबले होते. पण आम्ही न थांबता पुढे निघालो आता खरी कसोटी होती कारण रस्ता खडीचा होता वीस एक किलोमीटर अनवाणी चालल्यामुळे पाय हुळ हुळ करत होते. दगड टोचालकी भरपूर वेदना व्हायच्या पण तरीही आमची प्रदक्षिणा अगदी आनंदात नामस्मरण करत चालू होति. काही वेळाने माझी गती मंदावली पाय खुब्यात चमकू लागला. प्रत्येक पावलागणिक चमकायचा भाऊ म्हणाला काय रे काय झाले म्हटलं तू चल तुझ्या वेगाने माझा पाय दुखतोय आणि मग आमच्या दोघातले अंतर वाढत चालले पाय जरी दुखत होता तरी निसर्गाच्या सुंदर रूपाचे अवलोकन करत आणि ओम नमः शिवाय जप करत असल्यामुळे काहीच वाटत नव्हते. जवळचे पाणी संपून बराच वेळ झाला होता पुन्हा तहान लागली होती. पण पाणी मिळण्याचे चिन्ह नव्हते. तसाच चाललो होतो . भाऊ बराच पुढे होता. आणि हाताने काहीतरी खुणावत होता. जवळ गेल्यावर कळले कि त्याने पुन्हा एकदा पाय वाटेचा रस्ता पकडला होता. गवतातून जाणारी पायवाट खूपच सुखद वाटली कारण पाय खूपच भाजत होते पायांना गारवा लागताच बराचसा शिण कमी झाला. पुढे गेल्यानंतर भाऊ थांबलेला दिसला तिथे अजूनही एक प्रदक्षिणा करणारे कुटुंब थांबले होते . त्यांना पाणी मागितले तर म्हणाले हा डबा घ्या आणि ते वाहतंय तिथले पाणी प्या हे असले पाणी प्यायचे ? अहो डब्यात घेऊन तर पहा स्वच्छ दिसले तर प्या मी ते डब्यात घेतले तर इतके स्वच्छ पाणी होते कि ते छोटे तीन डबे पाणी पिलो चवीलाही छान लागत होते. पाणी प्यायल्या नंतर लगेच निघालो आणि थोड्या वेळात पुन्हा मुख्य रस्त्याला लागलो. आणि पुढे बोर्ड दिसला त्र्यंबके श्वर १ किलोमीटर आनंद झाला. तसा बोर्ड किलोमीटर दाखवत होता पण कुशावर्त अजून तीन किलोमीटर होते . पण हरकत नाही प्रदक्षिणा तर पूर्ण होत आली. प्रदक्षिणा पूर्ण होत आली पण पाय खूपच दुखू लागला होता. शिवाय आता डांबरी वरचा बारीक खडाही पायाला टोचलेला सहन होत नव्हता . मग नामस्मरणाचा जोर वाढविला आणि त्य नादातच राहिलेले अंतर पूर्ण केले. कुशावर्तावर आलो हातपाय धवून प्रदक्षिणा घातली त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. नि आमची प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि ती सुद्धा काहीही न खाता व अनवाणी पायाने. तीस किलोमीटर ला वेळगला सहा तास. शेवटी एक मुद्दा सांगायचा राहिला आम्ही ज्यांच्याकडे होतो. ते सतीश पवार आणि आळंदीतील कैलास ढगे महाराजांचा चांगला परिचय होता. सगळे उरकल्यानंतर आम्ही ढगे महाराजांबरोबर सतीश पवारांच्या घरी गेलो आणि सोप्यावर बसलो तेवढ्यात सतीश यांची छोटी मुलगी वय फक्त (अडीच ते तीन वर्षे ) जवळ आली आणि ओळीने अगदी पायावर डोके ठेवून आमच्या तिघांच्याही पाया पडली. तिला पाया पड म्हणून कोणीही सांगितले नव्हते.त्यानंतर तीने आम्हा तिघांनाही प्रसाद दिला म्हणजे हातात काहीही नव्हते . पण नुसता द्यायचा अभिनय केला. आम्हाला खुपच कौतुक वाटले. त्यानंतर आम्हाला तिच्या आईने चहा दिला तेव्हा तर त्या मुलीने कळसच केला ती आमच्या जवळ आली नि आपल्या बोबड्या बोलीत म्हणालीथांबा काका मी तुम्हाला चहा फुकून देते. गरम आहे. आणि अक्षरशा तिने तिघांच्याही कप फुंकून दिले. आम्हाला त्यामुलीवरील संस्कार पाहून अक्षरशा मन भरून आले. आणि मनोमन जाणवले कि हि मुलगी सामान्य नाही. ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय (फोटो टाकायचे होते पण मला जमले नाही ) anilbtapkir.blogspot.in या लिंकवर काही आहेत
वर्गीकरण
लेखनप्रकार

50 टिप्पण्या 14,994 दृश्ये

Comments

संजय क्षीरसागर नवीन

मुल्ला नसिरुद्दिनचा एक ज्योक आठवला! एकदा मुल्ला लंगडत चाललेला असतो तर पाठीमागून त्याचा मित्र येतो आणि विचारतो, ‘काय झालंय लंगडायला?’ तर मुल्ला म्हणतो, एक बूट नऊ नंबर आहे आणि दुसरा दहाचा त्यामुळे प्रॉब्लम आहे’ ‘आयला मग दोन्ही दहा नंबरचे का नाही घेतले?’ ‘मुद्दामहून’! मुल्ला म्हणतो. `मी दोन पेअर घेतो आणि मग मिसमॅच करून वापरतो’ ‘आयला, मजाचंय, असं केल्यानं काय होतं?’ ‘घरी जाऊन बूट एकदा काढून फेकले की एकदम झकास वाटतं!’ मुल्ला त्याच्या सुखाचं रहस्य उलगडतो. या प्रदक्षिणा (आणि परिक्रमांच) असं आहे! इतका छ्ळ करून घ्यायचा जीवाचा की किरकोळ गोष्टी सुद्धा मस्त वाटायला लागतातं.

प्रसाद गोडबोले नवीन

In reply to by निराकार गाढव

संजय क्षीरसागर हे(च) निराकार गाढव आहेत ....असा एक अंदाज आहे

संजय क्षीरसागर नवीन

In reply to by प्रसाद गोडबोले

आयडी घेतला म्हणून बाप्याची बायडी होत नाही. तद्वत गाढवानं स्वतःला निराकार म्हटलं तरी ते गाढवंच राहातं... आता हे मी तुम्हाला सांगायला नको.

अग्निकोल्हा नवीन

In reply to by संजय क्षीरसागर

किरकोळ गोष्टी सुद्धा मस्त वाटायला लागतातं.
किरकोळ गोष्टी मस्त वाटणे एकवेळ परवडले हो, पण सगळेचकाही किरकोळ वाटणे हे जास्त धोकादायक नाहि काय ? आपण शक्य झाल्यास विचार करा खरी अनैसर्गिकता कशामधे आहे... की अतिश्रम झाल्याने लिंबुपाणीही अम्रुत वाटण्यात ? कि अमृतही लिंबुपाणिच वाटण्यात ?

क्लिंटन नवीन

In reply to by संजय क्षीरसागर

प्रत्येक वेळी इतरांच्या श्रध्देची टर उडवायलाच हवी का? अशा प्रदक्षिणेतून इतरांना काही त्रास दिला जात नसेल तरीही इतरांच्या श्रध्देवर प्रहार करून आपण किती मोठे विज्ञाननिष्ठ हे दाखवायचा क्षीण प्रयत्न वाटला. असो. असल्या प्रदक्षिणा वगैरे करणे या जन्मी तरी जमेल असे वाटत नाही आणि त्याची इच्छाही नाही. तरीही असे निर्धाराने करणार्‍यांविषयी कौतुक वाटतेच.

स्पंदना नवीन

चला एखादा उपक्रम ठरवला, तसा संकल्प सोडला की तो पूर्ण केल्याशिवाय चैन ना पडणे हे मनःशक्तीचे उदाहरण म्हणता येइल. काय असत; काही माणस संकल्प सोडतात, पहिल्या दिवशीचा पहिला शो बघणारच, काही म्हणतात एव्हढी दारु पिऊन दाखवणारच काही म्हणतात मी ध्यान लाउन बसणार काही ठरवतात,काही ठरवतात दुसर्‍याला शहाणपणा शिकवणारच (स्वतः शहाणं व्हायच राहिलं बाजुला)त्यामानाने तुमच्या मनात बरीच सात्विक भावना आहे. त्रास झाला तरी तुम्हा एकट्यालाच, विनाकारण दुसर्‍यांना त्रासवण्यापेक्षा हे फारच छान.अन मनाला शांती मिळत असेल, समाधान मिळत असेल, तर काय हरकत आहे?.

उद्दाम नवीन

वा छान. (स्वगतः हायला, इतका मोक्ष मिळाल्यागत आनंद असल्या परिक्रमेतून मिळतो, तर लोक तिथेच कायमचे का रहात नाहीत? )

दादा कोंडके नवीन

एक निरागस (की बाळबोध) प्रवासवर्णन म्हणून ठिक पण प्रदक्षिणा-परिक्रमा यावर एक पिंक टाकायची म्हणून, "चालता चालता आळंदीतील दोन साधक विध्यार्थी भेटले आमच्यासारखेच अनवाणी पायाने प्रदक्षिणा करत होते." प्रदक्षिणा अनवाणीच का घालायची बरं? मग कपडे तरी का घालायचे? झेपतील तेव्हडेच आत्मक्लेश करून घेउन अध्यत्मिक तृप्तीची घाणेरडी ढेकर देणं काही पटत नाही.

अनिरुद्ध प नवीन

In reply to by दादा कोंडके

दादा, कपडे हे लोक लाजेस्तव घालतात, कपडे न घालायला त्यानी काही सर्वसंग परित्याग अथवा सन्यास घेतला नाही आहे. खूपच छान माहिती (फोटू दिसत नाही आहेत.)

डॉ सुहास म्हात्रे नवीन

In reply to by दादा कोंडके

सगळ्यात गोष्टींत काहीना काही कमी असतेच. या जगात १००% सफेद अथवा काळे असे काहीच नाही... सगळ्या करड्या रंगाच्या छटा असतात. ज्या गोष्टीने आपल्याला अथवा समाजाला त्रास होत नाही अश्या गोष्टीने दुसर्‍याला होणार्‍या आनंदावर विरजण घालणे म्हणजे त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर आक्रमण नाही काय? कमीत कमी जे स्वतःला नि:पक्षपाती, भौतीक न्यायवादी किंवा सडेतोड (अथवा अजून काही...) म्हणवतात त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. कोणत्याही बाजूने टोकाची भूमिका घेणे ह्यालाच अतिरेक म्हणतात याचा नेहमीच "माझे म्हणणे किती चांगले/खरे आहे" असा पक्का ग्रह झालेल्या मंडळींना विसर पडतो :) ;)

संजय क्षीरसागर नवीन

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ज्यांची मतं पक्की आहेत त्यांच्यासाठी मी लिहीत नाही. जे विचार करु शकतात त्यांच्यासाठी लिहीतो. जर आनंद झाला असेल तर विरजण कसं लागेल? ते पुढच्या प्रदक्षिणेची तयारी करतील. पण ज्यांना "ब्रम्हगिरिचि प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य मिळते. कारण ब्रम्हगिरीचा पर्वत म्हणजे साक्षात शंकर आहे.".... यावर विचार करता येतो त्यांना माझं म्हणणं पटू शकतं. आणि मतं व्यक्त करण्यासाठी तर संकेतस्थळ आहे. ज्यांच्या मनात द्वंद्व आहे त्यांना तो व्यक्तीस्वातंत्र्यावर हल्ला वाटू शकतो.

डॉ सुहास म्हात्रे नवीन

In reply to by संजय क्षीरसागर

कोणी एखादा पर्वतारोही एव्हरेस्ट किंवा दुसरे एखादे शिखर चढून जातो... किंवा अगदी जे कोणी ट्रेकिंगला जातात आणि ते कष्ट करण्यात त्यांना आनद वाटतो, यात काही वाईट आहे काय ?

संजय क्षीरसागर नवीन

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

लेखकाला प्रदक्षिणेतनं पुण्य मिळवायचं आहे
"दृष्टी पडता ब्रम्हगिरी । त्यासी नाही यमपुरी ॥ "नामा म्हणे प्रदक्षिणा । त्याच्या पुण्या नाही गणना ।।
...आणि माझं म्हणणं इतकंच आहे की प्रदक्षिणेनं कोणत्याही प्रकारची मुक्ती (त्यासी नाही यमपुरी) किंवा पुण्य मिळत नाही. टाईमपास कुणी काय करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे (त्याला आक्षेप असू शकत नाही). माझं मत साधना आणि फलप्राप्तीविषयी आहे. आय थिंक यू हॅव गॉट द पॉइंट.

डॉ सुहास म्हात्रे नवीन

In reply to by संजय क्षीरसागर

ह्या वेगळ्या भासणार्‍या गोष्टी कश्या वेगळ्या नाहीत यावर एक धागा लिहीण्याचा मानस आहे... तेव्हा तेथे विस्ताराने लिहीन. शिवाय, हा धागा जास्त भरकटवायला नको असे वाटते आहे.

संजय क्षीरसागर नवीन

In reply to by प्रचेतस

इस्पीकचा एक्का, मुक्ती ही सर्वस्वी भिन्न डिरेक्शन आहे. टाईमपास आणि साधना यात फरक आहे. तरीही तुमच्या लेखाची प्रतिक्षा आहे. पोस्ट भरकटण्याची शक्यता नाही कारण खुद्द लेखकानंच म्हटलंय :
संजयजी, मला तुमच्या प्रतिसादाचे कहीही वाटले नाही कारण माझे जे विचार बनले आहेत ते अगदी लहान पणापासुन वाचलेले जे ग्रंथ आहेत त्याचेच सार आहेत कोणी काहिही म्हटले तरी मला जे योग्य वाटते ते मि करतोच,

संपादक मंडळ नवीन

In reply to by संजय क्षीरसागर

कृपया आयडींची खरी नावे लिहिणे टाळावे. हा मुक्त असा फोरम आहे, आणि सगळ्यांनाच आपली खरी ओळख कोणी उघड करावी हे आवडणारे नसते.

संजय क्षीरसागर नवीन

In reply to by संपादक मंडळ

खर्‍या नांवानं त्यांनी मनोगतवर लिहीलं होतं आणि मला व्यक्तिगत उल्लेख जास्त जवळचा वाटतो. तरी इथून पुढे आयडीचा उल्लेख केला जाईल.

चित्रगुप्त नवीन

In reply to by संजय क्षीरसागर

हल्लीच्या शुद्ध मराठीत 'यमपुरी' म्हणजे 'बोर होणे' आणि 'पुण्य' म्हणजे 'टाईमपास' असे म्हणायचे असेल नामदेवांना.

संजय क्षीरसागर नवीन

In reply to by चित्रगुप्त

"दृष्टी पडता लावण्यपरि । त्यासी नाही बोअरगिरी ॥ "चित्रगुप्त म्हणे काढा चखणा । पेगांची आता नाही गणना ।।

अग्निकोल्हा नवीन

In reply to by दादा कोंडके

झेपतील तेव्हडेच आत्मक्लेश करून घेउन अध्यत्मिक तृप्तीची घाणेरडी ढेकर देणं काही पटत नाही.
कडक!

प्रचेतस नवीन

वर्णन आवडले. बाकी वर ब्रह्मगिरीला जाउन आलात का नाही? सर्व बाजूंनी खडे कातळकडे असलेला ब्रह्मगिरी अतिशय सुंदर दिसतो. त्याचे ते कातळातून कोरून काढलेले दरवाजे, तसेच एका बाजूला माचीवर असणारा भंडारदुर्ग अफाट आहे. पलीकडे होणारे हरीहरचे दर्शन तर लाजवाब. हा घ्या तुमच्यासाठी ब्रह्मगिरीचा एका वेगळ्याच बाजूने फ़ोटू. a

संजय क्षीरसागर नवीन

In reply to by क्लिंटन

तरी अर्थ बदलत नाही. आणि माझ्या (इतरांना दिलेल्या) प्रतिसादावर (दरवेळी) उपप्रतिसाद देण्याचे कष्ट कशाला घ्यायचे? मग पुन्हा विषय वाढला की....

क्लिंटन नवीन

In reply to by संजय क्षीरसागर

माझ्या (इतरांना दिलेल्या) प्रतिसादावर (दरवेळी) उपप्रतिसाद देण्याचे कष्ट कशाला घ्यायचे?
:) काय करणार.तो किल्ला गेले काही महिने इतर अनेकांनी लढविला पण त्यातले बरेचसे खंदे वीर आता कंटाळलेले दिसत आहेत. निराकार गाढव यांचा सन्माननीय अपवाद वगळता.तेव्हा मधल्या काळात मी त्यांना साथ देतो आहे. काय करणार एकेकाची बुध्दीमत्ता.दुसरे काय.

बॅटमॅन नवीन

In reply to by संजय क्षीरसागर

अहर्निश नलिकाप्रयोग करूनही डिफॉल्ट वक्रावस्थेत येणार्‍या सारमेयपुच्छाची आठवण झाली.

पैसा नवीन

वर्णन आवडले. वेगळं काहीतरी करणार्‍यांना सतत नावे ठेवली पाहिजेत असे काही नाही. ज्यांना अशा प्रदक्षिणा करायची नाही त्यांच्यावर कोणी सक्ती केलेली नाही. सवय नसताना निव्वळ इच्छाशक्तीच्या जोरावर ३० किमि चालणे याचेही कौतुक करता येते. गणपतीपुळ्याला जायला पूल झाले नव्हते तेव्हा आम्हीही दर वर्षी आरे वारे नेवरे असे ३ डोंगर पार करत जवळपास २० किमि चे अंतर चालत जाऊन परत येत असू म्हणजे (४० किमि एका दिवसात) त्याची आठवण झाली.

चित्रगुप्त नवीन

निश्चयाने एकादी कठीण कामगिरी - तसा त्यात काही भौतिक फायदा नसताही- ती पार पाडणे ही फार समाधानाची आणि आनंदाची बाब. अशी एक कामगिरी पार पाडून लेखाद्वारे सर्वांपर्यंत पोहोचवणे, हे आणखी विशेष.
दुसरी म्हणजे ब्रम्हगिरी आणि हरिहर पर्वत अशी मोठी साठ किलोमीटरची प्रदक्षिणा
ही मोठी प्रदक्षिणाही तुम्ही करावीत यासाठी शुभेच्छा. जीएंच्या ज्या 'प्रवासी' कथा आहेत, त्या तर अश्या परिक्रमाप्रेमींचा कळसच.

पाषाणभेद नवीन

In reply to by चित्रगुप्त

फारच छान लेख. ज्यांनी ही प्रदक्षिणा केली त्यांना या प्रदक्षिणेचे महत्व अन आनंद समजेल. उगाच टिका करण्यात काही हशील नाही. एक निरिक्षण नोंदवतो: आताच्या काळातील प्रदक्षिणा (फेरी) ही मिडीयाने केलेल्या हाईपमुळे वाढली आहे. हौशे गवशे नवशे या फेरीत मोडतात. भक्तिभाव कमी झाला आहे. गुटखा, नशिले पदार्थ खाऊन धांगडधींगा करत जाणार्‍यांचे कंबरडे मोडले पाहीजे. परिसरातील शेतांमधून सरळ लोकं चालत जावून पिकांचे नुकसान करतात. गर्दीच्या लोढ्यांत अपघात संभवतो. नाउमेद होवू नका. खरोखर आयुष्यात त्रंबकेश्वराच्या ब्रम्हगीरीची फेरी एकदातरी केलीच पाहीजे. नितांतसुंदर अनुभव असतो निसर्गसौंदर्याचा. शेवटी निसर्ग हाच खरा देव. एका फेरीत मला आलेला अनुभवः रस्त्यावर आदिवासी विक्रेता काठ्या विकत होता. एका टोळक्यातील एका मवाल्याने त्याला त्या काठ्यांची किंमत विचारत गुंतवून ठेवले. त्यानंतर त्या टोळक्यांतील इतर जणांनी मागून पळत येवून त्या आदिवासीच्या सगळ्या काठ्या पळवल्या. तो आदिवासी काय त्या टोळक्याला पकडू शकला? त्याने तक्रार केली? तक्रार तरी कुणाकडे करणार? पहाटेचे तीन साडेतीन वाजत होते, वरतून धुंवाधार पाऊस पडत होता.

शिल्पा ब नवीन

आवडेश. बाकी स्वतः काही न करता कसही करून मिपा प्रसिद्ध होण्याकडे लक्ष देणार्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करा. असो, बाकी आम्हाला फोटू कै दिसले नैत बॉ !

प्रसाद गोडबोले नवीन

खुपच सुंदर लिहिले आहे ! ( टीकात्मक प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करावे ... सगलेच लोक समान अध्यात्मिक / भावनिक पातळीवर नसतात ... || अंतर्स्थितीचिया खुणा | अंतर्निष्ठचि जाणती || )

प्यारे१ नवीन

मनोनिग्रह होणं ही कुठल्याही ध्येयप्रवासाची एक महत्त्वाची पायरी आहे. ते एक साधन आहे साध्य मिळवण्यासाठी. मात्र प्रत्येक साधनाच्या मूल्य नि मर्यादा असतात त्यानुसार यात्रा, तीर्थाटनं ह्यांचं एक मूल्य नि एक मर्यादा असं दोन्ही आहे. एखादं व्रत करणं, उपासतापास करणं हे एका ठराविक मर्यादेपर्यंत आवश्यक आहे. सकाळी पूजा केल्याशिवाय अन्न ग्रहण करणार नाही हा नियम मनाला वळण लावायला उपयुक्त आहे मात्र कालच रात्री चक्कर येऊन पडलाय नि अन्नाचा कण पोटात नाही मग आधी जेवायला हरकत नसावी. अन्यथा कर्मठपणा शिवाय हातात काहीही येत नाही. व्रताचा अभिमान, अहंकार वाढीला लागतो नि त्या त्या कर्माचा उपयोग ज्या दिशेला जाण्यासाठी करायचा ते राहूनच जाऊन गाडी भलतीकडे वळते. शाळेत जायला लागल्यावर दप्तराचं स्वरुप खराब करेल म्हणून चड्डी, नाक पुसायचा रुमाल, पाण्याची बाटली, खाऊच्या डब्यापासून सुरु होऊन कुठंतरी एक पेन नि एक वही असं होऊन पुढं काहीच नाही हातात मात्र सगळं डोक्यात तयार असं व्हायला हवं. अन्यथा दप्तराच्या रंगात, नि मुख्य म्हणजे आपण शाळेतच असं होऊन बसतं... मात्र पुन्हा एकदा सांगावं लागेल की शंभरातल्या ९६ ना तरी (हल्ली कदाचित संख्या कमी झाली आहे) शाळेत सुरुवात अशीच करावी लागते. सो शाळेत जावंच.

सुमीत भातखंडे नवीन

छान वर्णन. आता मोठी प्रदक्षिणासुद्धा लवकरच पूर्ण करा. आमच्या शुभेछा आहेतच.

अनिल तापकीर नवीन

संजयजी, मला तुमच्या प्रतिसादाचे कहीही वाटले नाही कारण माझे जे विचार बनले आहेत ते अगदी लहान पणापासुन वाचलेले जे ग्रंथ आहेत त्याचेच सार आहेत कोणी काहिही म्हटले तरी मला जे योग्य वाटते ते मि करतोच, आणि आपण जि क्रूती करतो त्या पासुन जर आत्मिक समाधान क्रुती करणाराला मिळ्त असेल तर काय हरकत आहे. आणि प्रत्येक चांगल्या क्रुतीमधुन चांगले शिकायला मिळ्त असेल तर मला वाटते जे जे चांगले आहे ते ते नेहमिच करावे

संजय क्षीरसागर नवीन

In reply to by अनिल तापकीर

तेच तर सांगतोयं इतके दिवस. ज्यांचे विचार पक्के आहेत त्यांना काही फरक पडत नाहीत. तुमचे विचार पक्के आहेत त्यामुळे तुम्ही प्रदक्षिणा करत राहणार. आणि शोध स्थिरत्वाचा आहे याची मलाही खात्री आहे त्यामुळे मी देखिल लिहीत राहणार. ज्याला पटेल त्यानी ते घ्यावं. तुम्हाला जे समजलंय ते इतरांच्या लक्षात आलं की सगळे वाद संपतील.

अग्निकोल्हा नवीन

In reply to by संजय क्षीरसागर

तुम्हाला जे समजलंय ते इतरांच्या लक्षात आलं की सगळे वाद संपतील.
हे तुम्हाला समजुन वाद संपले ? नाही ना ? मग ते इतरांच्या लक्षात येउन वाद संपतिल कशाच्या जोरावर म्हणताय ?

बॅटमॅन नवीन

In reply to by अनिल तापकीर

स्वतःला योग्य वाटेल ते अवश्य करावे. चार खवट अन रिकामी टाळकी काहीबाही बोलतील म्हणून उगा दाबून ठेवू नये. प्रदक्षिणेने समाधान मिळते किंवा नाही हा कुणालेखी वादाचा मुद्दा असेलही, तुम्हाला समाधान मिळाले हे सर्वांत महत्त्वाचे.

अनिल तापकीर नवीन

खुप जणांनी या लेखाविषयी आपली मते मांडली काहींना प्रदक्षीणा चांगली वाटली तर काहींना रिकामटेकडा उद्योग वाटला कुणी कशिही प्रतिक्रिया दिली तरी मला तरी मला त्याचे काहिही वाट्ले नाही कारण प्रतेकाचे विचार वेगळे असतात. सर्वांनी विचार व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद