Skip to main content

ग्रेट मुंबई पोर्ट एक्स्प्लोजन भाग तीन

ग्रेट मुंबई पोर्ट एक्स्प्लोजन भाग तीन

लेखक लाल टोपी
Published on गुरुवार, 18/04/2013 प्रकाशित मुखपृष्ठ
ग्रेट मुंबई पोर्ट एक्स्प्लोजन भाग एक ग्रेट मुंबई पोर्ट एक्स्प्लोजन भाग दोन  स्फोटा नंतर अतिशय गोंधळाची परीस्थिती होती. अग्निशमनचे सर्व बंब, जवळपास सर्व यंत्रसामुग्री नष्ट झाली होती. त्याचवेळेस या स्फोटामुळे गोदीत, समुद्रात जहाजांवर, आजूबाजूच्या घरांना, झोपडपट्टीला सर्वत्र आगीने थैमान चालू होते. १४ एप्रिल चा दिवस मावळला आणि शहरातील आगी दूरवरून दिसून येत होत्या. संपूर्ण शहर केविलवाण्या आणि घाबरलेल्या अवस्थेत पुढचा दिवस उगवण्याची वाट पहात होते. या भयंकर विस्फोटानंतर लागलेल्या आगी जवळपास तीन दिवस धुमसत होत्या. अखेर जळण्यासारखे काहीही शिल्लक न राहिल्यामुळे त्या तीन दिवसांनंतर हळूहळू शमल्या. मात्र अनेक ठिकाणी लहान सहान आगी दोन आठवडे जळत होत्या . या दिवशी मुंबई अग्निशमन दलाने आपल्या क्षमतेप्रमाणे प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. युद्धभूमीत शौर्य गाजवणा-या वीरांप्राणे लढत दिली होती. समोर विनाश दिसत असतांनाही जिवाची पर्वा न करतां कर्तव्य पार पाडले होते. या दलाचे ६६ अधिकारी, कर्मचारी मृत्युमुखी पडले होते. ८४ गंभीर स्वरूपात जखमी झाले होते केवळ ६८ जण काम करण्याच्या परीस्थितीत होते पण त्यांच्याकडे काहिही साधने शिल्लक राहिली नव्हती. मुंबई सारख्या शहराच्या अग्निशमन दलाची ही अवस्था झाली होती. म्हणुनच या विरांना आणि त्यांच्या सारख्याच आपले प्राण पणाला लाऊन काम करणा-या अग्निशमन दलाच्या विरांना आदरांजली म्हणून १४ एप्रिल हा दैवास अग्निसुरक्षा दिन म्हणून साजरा करतो. त्यावेळी युध्द काळामुळे बातम्यांच्या प्रसारणावर अनेक बंधने होती. या भयंकर स्फोटाची बातमी स्थानिक इंग्रजी वर्तमानपत्रात तिस-या पानावर साधारण अपघात अशा स्वरूपात प्रसिद्ध झाली होती. त्या दिवशी जर्मनीच्या युध्दातील पराक्रमाच्या बातम्यांना जास्त महत्व दिले गेले होते. या घटेनेची सर्वप्रथम बातमी १५ एप्रिलला जपानी मालकीच्या 'रेडिओ सेईगून' ने बाहेरील जगापर्यंत पोहोचवली त्यावेळी देखील लोकप्रिय असलेल्या बी.बी.सी. रेडिओने नव्हे. ब्रिटिश सरकारच्या बातम्यांचे नियंत्रण करणा-या मंडळाने मे, १९४४ च्या दुस-या आठवड्यात या घटनेची बातमी देण्यास परवानगी दिली त्यानंतर टाईम मासिकाने २२ मे, १९४४ ला या घटनेचा वृतांत प्रसिध्द केला तेव्हा देखील बाहेरच्या जगासाठी ही 'नवीन बातमी' होती. या स्फोटामुळे झालेल्या हानी चे आकडे भयंकर आहेत. या स्फोटाच्या वेळी कुलाबा वेधशाळेतील भूकंप मापन यंत्रावर भूकंपाची नोंद झालीच पण १७०० कि.मी. दूर सिमला येथील भूकंप मापकावर देखील धरणीकंपाची नोंद झाली. स्फोटाच्या केंद्रस्थानापासून ९०० यार्ड पर्यंतचा परीसर पूर्णत; भस्मसात झाला. संपूर्ण व्हिक्टोरीया गोदी, शेजारची प्रिन्सेस गोदी, पश्चिमेला असलेली माल साठवण्याची गोदामे, उत्तरेला बर्मा ओइल इन्स्टालेशन, दक्षिणेला असलेला तांदळाचा बाजार यासर्व भागात भीषण आगी लागल्या होत्या. पश्चिमेला असलेल्या गोदामांतून आग शेजारच्या नागरी वस्तीत पसरली होती. . . . १३७६ ज्ञात जीवितहानी अज्ञात यापेक्षा कितीतरी जास्त असावी असे अनेक जण मानतात कारण आजूबाजूच्या झोपडपट्टीतील अनेक व्यक्ती जळत्या कापसाच्या गासड्या, जळते तेलाचे पिंप, विस्फोटकांचे स्फोट यामुळे मरण पावल्या होत्या अगणित लोक जखमी झाले होते. यांची काहीच नोंद सरकारी कागदपत्रात झाली नाही. हजारो लोक जखमी झाले. गोदीवर वाहतुकी साठी असलेला ३४,६३९ टन माल नष्ट झाला. ५५००० टन खाद्यान्न नष्ट झाले त्यामुळे महागाई आणि साठेबाजी मोठ्या प्रमाणात वाढली. ६००० अस्थापनातील ५०००० लोकांच्या नोक-या गेल्या. ३००० लोक बेघर झाले. अनेकांचे नातेवाईक सकाळी घरून निघाले होते ते कधीच घरी परतले नाही. ३१ पेट्यांमध्ये बंद असलेल्या सोन्याच्या विटा या स्फोटात गहाळ झाल्या त्यावेळी दिल्या गेलेल्या माहितीनुसार जवळपास सर्व सोन्याच्या विटा पुन्हा हस्तगत करण्यात आल्या. काहींनी या सोन्याच्या विटा प्रामाणिकपणे परत केल्या तर काही विटा पोलिसांनी धाडी टाकून परत मिळवल्या मात्र १९६०, २००९, २०११ मध्ये देखील मुंबईतील काही ठिकाणी या विटा सापडल्या त्या ब्रिटिश सरकारला हस्तांतरीत करण्यात आल्या. बंदर जवळपास नष्ट होऊन तेथे पडलेली इमारती, जळालेला माल, आणि इतर स्वरुपाचा पाच लाख टन कच-याचा ढीग तयार झाला. पुन:र्निर्माणाचे काम अवघड होते. बुलडोझर तोडक्या मोडक्या गोदामांवरुन फिरवले गेले. दुरुस्त करण्या पलिकडच्या जहाजांना बुडवण्यात आले. काहिंची दुरुस्ती करण्यात आली. सर्वात शेवटी व्हीक्टोरिया गोदीच्या भिंतीची दुरुस्ती करण्यात आली. ८००० व्यक्ती ७ महिने अहोरात्र हे काम करीत होत्या हे फक्त गोदीच्या बाबतीत बाहेरही अशाच प्रकारे जीवन पुन्हा वेग घेत होते. सात महिन्यांनंतर बंदर पुन्हा सुरु झाले. या घटनेची चौकशी करणा-या आयोगाचा अहवाल यथावकाश आला. कापासाच्या गासड्या स्फोटकांच्या बरोबर साठवणे, जहाजात स्फोटके आहेत असे दर्शवणारा लाल बावटा न लावणे, बंदरात जहाज पोहोचल्या नंतर स्फोटके वेळेत न उतरवणे मुंबईने या नंतरच्या काळातही अनेक संकटांना तोंड दिले. १९९३ चे बॉम्बस्फोट, मुंबई लोकल मधील साखळी बॉम्ब स्फोट, २००५ चा महाप्रलय परंतु या संकटांमध्ये कारस्थान किंवा नैसर्गीक आपत्ती होती. मात्र गोदीतील स्फोट मात्र एकामागून एक मानवी चुकांच्या साखळीचा परिणाम होता. अनेकांना या घटनांपैकी एखादी घटना मोठे संकट वाटेल ज्याने ज्या प्रमाणात ज्या घटनेत परिस्थितीचे चटके सहन केले त्या प्रमाणात त्याला ते संकट मोठे वाटेल यात शंका नाही. स्मारक . समाप्त
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 7610
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

संगणकाने असहकार पुकारल्यामुळे हा भाग जरा उशीरा आला त्याबद्द्ल माफि असावी.

भारतावर युद्धकाळात सीमभाग सोडल्यास विमानांद्वारे बाँबफेक वगैरे झाल्याचे कधी वाचले नाही. पण या अपघातामुळे झालेले नुकसान पर्ल हार्बर वरील हल्ल्यासारख्या हल्ल्यानेच झाले असते हे नक्की.
मात्र १९६०, २००९, २०११ मध्ये देखील मुंबईतील काही ठिकाणी या विटा सापडल्या त्या ब्रिटिश सरकारला हस्तांतरीत करण्यात आल्या.
भारतीय व्यवस्थेच्या प्रामाणिकपणाचे कौतुक वाटते. बरेचदा बातम्या येत असतात की अमुक अमुक पुलाला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत अन त्या पुलाचे बांधकाम करणार्‍या ब्रिटीश कंपनीने संबंधीतांना पूलाचा विश्वासार्ह काळ संपल्याचे पत्र पाठवले. वरील बातमी वाचून (तिकडे प्रसिद्ध झाली असल्यास) इंग्लिश लोकांनाही भारतीय व्यवस्थेचे कौतुक वाटले असावे.

In reply to by श्रीरंग_जोशी

हा अपघात झाला त्यावेळी जपानची सेना बर्मा च्या सीमेवर पोहोचली होती आणि लवकरच भारतावर आक्रमण करणार अशा बातम्या येत होत्या. त्यामुळे या अपघाताच्या वेळी जपान चा हल्ला झाला अशा अफवा पसरल्या होत्या.

In reply to by उपास

या विषयी वेगवेगवेगळी माहीती मिळ्ते. काही व्यक्तींच्या मते ही तलवार ब्रिटिश राजघराण्याच्या संग्रहात आहे. मात्र त्या संग्राहलयाच्या अधिका-यांनी ही माहिती चुकिची असल्याचे वेळोवेळी सांगीतले आहे. काही व्यक्ती १९७० च्या आसपास ही तलवार सदर संग्राह्लयात पाहिल्याचे सांगतात. काहिंच्या मते ही तलवार साता-याच्या उदयन राजे भोसले यांच्या तब्यात असल्याचा दावा करतात मात्र या विषयी निश्चित माहिती कोठेही मिळ्त नाही.

पहिल्या आणि दुसर्‍या भागाचे दुवे लेखात जोडले आहेत. हा ही भाग आवडला. तुम्हाला सवड मिळेल त्या प्रमाणे छायाचित्र ईथे प्रतिसादात द्या वा संपादकांना व्यनी करा ते लेख अपडेट करुन देतील.

सुंदर मालिका!! पण एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, एवढ्या मोठ्या अपघाताबद्दल आधि कधीच कुठेच कसं वाचलं नाही. कदाचित लेखामध्ये म्हणल्याप्रमाणे युध्दकाळातील प्रसारमाध्यमांवरील निर्बंधामुळे या घटनेस जास्त प्रसिध्दी मिळाली नसावी.

काही समस्यांमुळे फोटो डकवता येत नव्हते. गणपा यांनी ते डकऊन दिले त्यासाठी विशेष आभार...

लेखमाला वाचून प्रतिसाद देण्या-या सर्वांचे मनःपूर्वक आभार!

या दलाचे ६६ अधिकारी, कर्मचारी मृत्युमुखी पडले होते. ८४ गंभीर स्वरूपात जखमी झाले होते केवळ ६८ जण काम करण्याच्या परीस्थितीत होते पण त्यांच्याकडे काहिही साधने शिल्लक राहिली नव्हती. मुंबई सारख्या शहराच्या अग्निशमन दलाची ही अवस्था झाली होती.
खरेच त्यांना सलाम!!

वेगळ्या विषयावरचा लेख आवडला. सहसुंदर लेखन

वडील अग्नीशमन दलात असल्यामुळे लहानपणापासून ही कथा ऐकतच मोठा झालो. अजूनही १४ एप्रिल हा दीवस भारतातील सर्व अग्निशमन दले स्मुर्तीदीन म्हणून पाळतात.

या घटनेत जे ब्रीटीश आणि भारतीय अग्नीशामक जवान धारातीर्थी पडले त्यांची नावे भायखळा येथील मुख्यालयाच्या आवारात एका ठीकाणी वाचलेली आठवतात. कधी गेलो तर फोटो काढून आणेन.

हा जुना धागा वर आणल्यामुळे अनपेक्षितपणे वाचला, अतिशय आवडला. माझ्या आजोबांनी हि घटना अनुभवली आहे. त्यांचे कार्यालय फोर्ट भागातच होते. त्यामुळे त्यांच्या ऑफिस मध्ये स्फोटाचा आवाज ऐकू आला होता, आणि धाग्यात वर्णन केल्याप्रमाणे लोखंडाचे पिंप हे दिवाळीच्या rocket प्रमाणे उडत होते आणि मोठमोठाले धुराचे लोट खिडकीतून दिसत होते , सर्वजण अतिशय घाबरले होते ,आणि काही वेळाने मुंबईच्या रस्त्यावर कर्फ्यू लागल्यासारखी शांतता निर्माण झाली होती. माझे आजोबा आणि त्यांचे ऑफिस मधील एक सहकारी खान घाबरत घाबरतच CST (त्याकाळचे VT स्टेशन ला ) पोहोचले. त्यानंतर काही दिवसांनी बर्याच लोकांनी मुंबई सोडून गेल्याच्या घटना ऐकल्या होत्या आणि मुंबईत स्वस्तात घरे मिळत होती, याचा फायदा घेऊन काहींनी घरे विकत घेण्याचा सपाटा लावला होता आणि नंतर भाव वाढल्यावर विकून चंगळ केली असेही आजोबांकडून ऐकले होते.

लेखमालिका पुन्हा वाचली. अप्रतिम असे म्हणवत नाही. मुंबई अग्निशमन दलास सलाम! या लेखमालेवरून दै. सकाळच्या एका दिवाळी अंकात आलेली जयंत नारळीकरांची 'एका महानगराचा मृत्यू' ही कथा आठवली.