मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चंद्रकांता - १.१ - नजरकैदेतली राजकन्या

आदूबाळ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
अनेक दिवसांत अद्भुतरम्य असं काही वाचलं नव्हतं. अचानक "चंद्रकांता" ही देवकीनंदन खत्री यांची सुप्रसिद्ध कादंबरी आंजावर मिळाली. त्यावरची टीव्ही मालिका आठवत असेलच. मालिकेने मूळ कादंबरीला न्याय दिला नाही असं (लेखकाच्या नातवासह) अनेकांचं म्हणणं होतं. मिपाच्या वाचकांसाठी ही कादंबरी मराठीत आणण्याचा विचार आहे. ____________________________ विस्तीर्ण अशा सपाट पठारावर एक दगडी उंचवटा होता. मावळत्या संध्याकाळी त्यावर बसून दोन तरूण आपापसांत बोलत होते. बाविशीचा वीरेंद्रसिंह नौगढच्या राजा सुरेंद्रसिंह यांचा एकुलता मुलगा होता. दुसरा तरूण तेजसिंह हा सुरेंद्रसिंहांचे दिवाण जीतसिंह यांचा पुत्र होता. तेजसिंहाचे डोळे विलक्षण चलाख होते. कमरेला खंजीर लटकावलेला होता. हातातली गोफण गोल गोल फिरवत तो चहोंबाजूंकडे सावध नजर ठेवून होता. लहानपणापासून वीरेंद्रसिंह आणि तेजसिंह जिगरी दोस्त. "तेजसिंह", वीरेंद्र म्हणत होता, "तुझ्यासारखा मित्र मला लाभला हे माझं खरंच नशीब आहे. माझे कितीतरी संदेश तू जिवावर खेळून चंद्रकांतापर्यंत पोचावालेस आणि तिचे मला आणून दिलेस. नौगढ आणि विजयगढ मध्ये पाच कोसांचं अंतर आहे, पण या दोन राज्यांची मनं एकमेकांपासून शेकडो योजनं दूर आहेत. या पत्रात चंद्रकांताने काय लिहिलं आहे पहा - 'दिवस मोठे कठीण येत आहेत, राजकुमारा, लवकर ये!' मला तिच्याकडे घेऊन चल तेजसिंह!" "तुम्हाला विजयगढला घेऊन जाणं सहज शक्य आहे. पण मला नुकतीच खबर लागली आहे की चंद्रकांताच्या वडिलांनी, राजा जयसिंहांनी तिच्या महालाभोवती पहारा बसवला आहे." "पहारा? कशामुळे?" "राजे जयसिंह यांचा एक मंत्री आहे. त्याच्या मुलाला - क्रूरसिंहला तुमच्या आणि चंद्रकांताच्या प्रेमाबद्दल कळलं. त्याने बापाकारावी ही बाब जयसिंहांच्या कानावर घातली. क्रूरसिंह चंद्रकांतावर लट्टू झाला आहे. त्याने नाजिम अली आणि अहमद खाँ या आपल्या दोन ऐयारांना चंद्रकांताच्या महालावर पहारे द्यायला बसवलं आहे. त्यांचा बंदोबस्त मी करत नाही तोवर आपण विजयगढमध्ये पाऊल ठेवणंसुद्धा धोक्याचं आहे." गोफणीचा फास खेळवत तेजसिंह म्हणाला. "आता तू काय करणार आहेस?" "मी आता विजयगढला जाऊन चपलाची भेट घेतो. चपला स्वतः ऐयारा आहे. तिचा चंद्रकांतावर भारी जीव आहे. संपूर्ण विजयगढमध्ये तिच्याइतका समर्थ साथीदार मला मिळणार नाही. मी शत्रूच्या हालचालींचा वेध घेतो आणि आपल्याला खबर पोचवतो." "तू यशस्वी होशील याची मला खात्री आहे तेजसिंह. माझा भरवसा माझ्या युद्धकौशल्यावर आहे, पण तू युद्धनिपुण तर आहेसच, पण कुशल ऐयार देखील आहेस." "मला तर अशी बातमी लागली आहे की काही दिवसांपूर्वी क्रूरसिंहाचे ते दोन ऐयार - नाजिम आणि अहमद - नौगढला येऊन महाराजांची भेट घेऊन गेले. काय कपट त्यांच्या मनात होतं कोण जाणे! नेमका मी तिथे नव्हतो…" "तेजसिंह, तुला त्या दोन ऐयारांवर विजय मिळवायचा आहे, आणि त्यांना तुला कैद करायचं आहे. असो. आता तू नीघ , आणि शक्य तितक्या लवकर माझी आणि चंद्रकांताची भेट होईल याची तरतूद कर…" तेजसिंह आपल्या कामगिरीवर पायी रवाना झाला. वीरेंद्रसिंहाने चंद्रकांताच्या विचारात किंचित उसासे सोडत आपल्या किल्ल्याच्या दिशेने घोडं वळवलं. ( वाचकांना आवडलं तर क्रमशः )

वाचने 9909 वाचनखूण प्रतिक्रिया 23

In reply to by इरसाल

भारतात हेराला आपल्या अष्टप्रधान मंडळात सामाऊन घेणारा जाणता राजा होता. आपल्या परी कथांच्या मध्ये सुद्धा एय्यार ह्या जमातीचा उल्लेख आढळतो , हेर खाते म्हणजे राज्यांचा तिसरा डोळा , पण एय्यार म्हणजे प्रशिक्षित सैनिक जणू वन मेन आर्मी जो शस्त्र, जिव्हा वेळप्रसंगी चालवू शकतो , ज्याचे वागणे बोलणे , एकूण वर्तन हे त्यांच्या राज्याच्या धोरणाशी सुसंगत असते , आणि जो वेश पालटून आपला कार्यभाग साधू शकतो , एकप्रकारचा डू आयडीच असायचा तो चाणक्यांच्या काळापासून अगदी महाभारतात सुद्धा हेरांचे उल्लेख आढळतो. हेरांची महान प्रथा व परंपरा असणाऱ्या खात्याकडे स्वातंत्र्यानंतर भोंगळ आदर्शवादाची प्रशासनावर पुटे चढल्याने अक्षम्य दुर्लक्ष झाले. १९४८ भारताला केंद्रस्थानी ठेवून पाकिस्तान ने आय एस आय ची निर्मिती सी आय ए किंवा के जी बी च्या धर्तीवर केली , आम्ही मात्र ब्रिटीश कालीन आय बी वर अवलंबून होतो ,आणि गंमत म्हणजे ह्याच आय बी चा अर्धा भाग आपल्या फौजेसारखा पाकिस्तान मध्ये विभागाला गेला त्यामुळे त्यांना आपल्या एकमेव हेरखात्याची कार्यपद्धती ठावूक होती. पुढे १९६५ च्या अपयशापासून धडा घेत इंदिरा गांधी ह्यांनी १९६८ साली रॉ ची स्थापना केली त्यासाठी जगातील सर्वोत्तम अश्या सी आय ए व मोसाद ची मदत घेण्यात आली. जरी तिच्या वडिलांना व गांधींना ज्यू राष्ट्रांशी संबंध नको होते. आज नेहरू व गांधी आजकालच्या नेत्याच्या प्रमाणे ८० वर्षापर्यंत जगले असते तर आहे तो भारताचे चीन व पाकिस्तानने लचके तोडले असते. भारतीय सैन्याला सीमेपार कारवाई करायला लावणारे शास्त्री किंवा इंदिरा विरळेच होते. वाजपेयी ह्यांना सुद्धा हे जमले नसते. आधुनिक काळातील एय्यार डेविस वर मी मिपावर एक लेख लिहिला होता.ज्याला ब्लड मनी देऊन अमेरिकेने सोडवला.

प्यारे१ Sun, 04/14/2013 - 19:12
माझ्या माहितीप्रमाणे चंद्रकांता अनुवादित झाली आहे. पूर्वी वाचल्यासारखं धूसर आठवतंय. आपल्यालाही शुभेच्छा. मोठे भाग येऊ द्या.

पैसा Sun, 04/14/2013 - 19:39
ही मालिका पहायला मोठी मजेशीर वाटायची. आणखी जरा मोठे भाग येऊ द्या.

सस्नेह Sun, 04/14/2013 - 21:44
शशी भागवतांच्या 'रन्तप्रतिमा' आणि 'मर्मभेद'ची आठवण झाली.

मृत्युन्जय Mon, 04/15/2013 - 10:32
चंद्रकांता काही काळ खुप आवडायची. मूळ कादंबरीचा अनुवाद वाचायची इच्छा आहेच. तुमच्या कृपेने ते आपसूक जुळुन येते आहे. अनुवाद शब्दशः न करता शक्य असल्यास भावानुवाद करावा ही विनंती. नौगढ च्या ऐवजी नवगड लिहु शकता. ऐयार म्हणजे काय ते ही स्पष्ट करा. बहुरुपी हा शब्द योग्य राहिल काय?

इशा१२३ Mon, 04/15/2013 - 15:13
चंद्रकांता मालीका आवडायची पण नंतर कंटाळवाणी झाली त्यामुळे सगळी कथा समजलीच नाही.आता वाचायला मिळेल. हा भाग आवडला.पु.भा.प्र.

गणपा Mon, 04/15/2013 - 15:51
मिपाच्या वाचकांसाठी ही कादंबरी मराठीत आणण्याचा विचार आहे.
सोन्याहुन पिवळं. :)

आदूबाळ Wed, 04/17/2013 - 21:07
प्रतिसादांसाठी सर्वांना धन्यवाद! कॉपीराईटसंबंधीची सूचना रास्त आहे. पुढच्या भागापासून तळाशी त्यासंबंधी एक ओळ टाकण्याचा विचार करत आहे. लहान भागांसंबंधीची तक्रारही योग्यच आहे. परंतु या कादंबरीची मजा घुटक्याघुटक्याने घ्यायची आहे. वाढत्या वयाबरोबर आलेली दुनियादारी विसरून पुन्हा बारा-तेरा वर्षांचं होऊनच ही कादंबरी वाचायची आहे. शिवाय, मूळ कादंबरी देवकीनंदन खत्री यांनी चार अध्यायांत विभागली आहे. प्रत्येक अध्याय प्रकरणांत विभागला आहे. एक प्रकरण हा साधारणपणे एक प्रसंग आहे. या रचनेशी इमान राखण्याचा प्रयत्न आहे. [ अजून एक कारण: गो. ना. दातारशास्त्री, नाथमाधव वगैरेंची ष्टाईल मारायला मला जरा वेळ लागतो आहे ;) ] येत्या शुक्रवारी एका नवीन उत्कंठावर्धक भागासह (आणि एका सरप्राईजसह) भेटूच!

श्रीरंग_जोशी Wed, 04/17/2013 - 21:19
दोन दशकांपूर्वीच्या मालिकेपेक्षाही या लेखनातली कथा रोचक वाटत आहे. शाळेत असताना रविवारी सकाळची शिकवणी (परिक्षा जवळ आल्यावर) चंद्रकांताच्या वेळेपासून लांबची असावी हा वर्गभगिंनींचा विरोध असे. 'त्या टुकार मालिकेत एवढे काय असते' असे म्हणून आमचा त्या विरोधाला विरोध होत असे ;-).. असो त्यानिमित्त त्या मालिकेचे सुमधूर शीर्षकगीत इथे टाकण्याचा मोह आवरत नाहीये...