Skip to main content

पुन्हा एक पी आय ए अपहरण

पुन्हा एक पी आय ए अपहरण

लेखक लाल टोपी
Published on सोमवार, 08/04/2013 प्रकाशित मुखपृष्ठ
पी आय ए- पी के ३२६ अपहरणाचे प्रकरण आपण काही दिवसांपुर्वी वाचले असेलच आज पुन्हा एकदा पाकिस्तानच्याच आणखी एका विमान अपहरणाची कथा पाहू. पुन्हा एकदा पाकिस्तानच्याच घटनेची चर्चा करण्याचे कारण ही घटना वेगळ्या परीस्थितीत घडते आहे आणि तीला अतिशय वेगळ्या प्रकाराने हाताळले गेले आहे. २५ मे, १९९८ रविवारची संध्याकाळ, सुमारे ५.३० वाजता गदर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पी.के. ५४४ या विमानाने कराचीच्या दिशेने उड्डाण केले. पुढील १० मिनिटांत या विमानीतील तीन अपहरणकर्त्यांनी विमानावर ताबा मिळवला आणि विमान नवी दिल्लीकडे घेऊन जाण्यास फर्मावले. मात्र पुरेसे ईंधन नसल्याचे कारण सांगून वैमानिकाने तसे करण्यास स्पष्टपणे नकार दिला. अशा परिस्थितीत भारताच्या कोणत्याही विमानतळावर हे विमान उतरवण्याचा आदेश त्यांनी वैमानिकाला दिला. या तणावाच्या स्थितीतही वैमानिकाने प्रसंगावधान राखून पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील हैदराबाद विमानतळाशी संपर्क साधला आणि भारतातील भोज विमानतळाशी (कदाचित हे भोपाळचे विमानतळ असावे कारण त्या विमानतळाचे नांव राजा भोज विमानतळ आहे) संपर्क साधत आहोत असे भासवले. विमानतळाच्या व्यवस्थापकाने देखील हे भोज विमानतळ असून आम्ही आपले विमान उतरवून घेण्याची व्यवस्था करीत आहोत असा संदेश दिला. या संदेशामुळे आपण पाकिस्तानची हद्द पार करून भारतीय हवाई हद्दीत प्रवेश केला आहे याची त्यांना खात्री पटली. येथूनच या अपहरणाला नाट्यपूर्ण वळण मिळते. पाकिस्तान पोलिसांनी हवाई दलाल सूचित केल्या प्रमाणे हवाई दलाच्या एफ -१६ विमानांच्या संरक्षणाखाली हे विमान हैदराबाद (सिंध, पाकिस्तान) येथे जबरदस्तीने उतरवण्यात येते. मात्र वैमानिक आणि हैदराबादच्या विमानतळावरील व्यवस्थापक यांच्या संभाषाणावरुन हे विमान भारतातील भोज विमानतळावर उतरले आहे असाच समज अपहरणकर्त्यांचा झाला. हे तीन अपहरणकर्ते बलुचीस्तानाचे असल्याचे उघड झाले. त्यांची मागणी विचित्रच वाटावी अशी होती. भारताने नुकत्याच अणुस्फोटाच्या चाचण्या केल्या होत्या. पाकिस्तानही अशा चाचण्या करण्याच्या तयारीत होता त्या चाचण्या बलुचिस्तान या आपल्या प्रांतात करू नयेत अशी त्यांची मागणी होती. हे विमान चातुर्याने आपल्याच भूमीत उतरवण्यात पाकिस्तानच्या अधिका-यांना यश मिळाले होते. या सर्व घडामोडी होईपर्यंत रात्र झाली होती. विमान उतरताच विमानतळावरील दिवे बंद करण्यात आले प्रामुख्याने हैदराबाद विमानतळ असा उल्लेख असणारे सर्व विद्युत फलक बंद करण्यात आले. थोड्याच वेळात अपहरणकर्त्यांनी दिल्ली पर्यंतच्या प्रवासासाठी ईंधन भरून देण्याची मागणी करण्यासाठी विमानाच्या अभियंत्याला मुक्त केले. संपूर्ण विमानतळाला लष्कराने वेढा घातला होता. विमान तळाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. विशेष कारवाई पथकाला कोणत्याही क्षणी विमानात घुसून अंतीम कारवाई करण्यासाठी सज्ज ठेवले होते. विमानतळावर काय चालले आहे याची कल्पना येवू नये म्हणून सर्व दिवे बंद करण्यात आले होते. कोणालाही विमानाच्या जवळपासही फिरकू दिले जात नव्हते. स्थानिक पोलिसांनी जवळपासच्या सर्व मशिदिंचा विद्युत पुरवठा बंद करण्याचा आदेश वीज कंपनीला दिला होता कारण त्या मशिदीमधील आजानचा आवाज ऐकून काही संशय निर्माण होऊ नये. प्रवाशांना अन्न आणि पाणी देण्याच्या बहाण्याने जेष्ठ पोलिस अधिक्षक आणि सहाय्यक पोलिस अधिक्षक स्वयंसेवकाच्या स्वरूपात विमानात पोहोचले. आपली ओळख त्यांनी भोज विमानतळाचे व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक राम आणि अशोक अशी करून दिली होती. पाण्याच्या बाटल्या, अन्नाची पाकीटे, ज्यूस घेऊन जातांना ती बाहेरच्या देशातून आयात केलेली आहेत, पाकिस्तानातील नाहीत याची खात्री करून घेतली गेली होती. अशा प्रकारे नि:शस्त्र असले तरी पोलिस त्या विमानात दाखल झाले. हे दोन्ही अधिकारी आपापसात हिंदीतून बोलत होते. उर्दूमध्ये बोलणे त्यांनी कटाक्षाने टाळले. मुख्य कारवाईच्या तयारीला वेळ मिळावा आणि अपहरणकर्त्यांचा त्यांच्या मागण्यांसंबंधी सकारात्मक विचार होत आहे यावर विश्वास बसावा म्हणुन त्यांनी सांगितले की भारतातील पाकिस्तानच्या दूतावासाला या अपहरणा संबंधी कळवले असून त्यांना पाकिस्तान सरकारच्या वतीने बोलणी करण्यासाठी आमंत्रीत करण्यात येत आहे. मात्र तोपर्यंत कोणताही कठोर निर्णय घेऊ नका आणि लाहान मुले, स्त्रीयांना मुक्त करण्याची विनंती या अधिका-यांनी केली. थोड्याच वेळात विमानातील विद्युत यंत्रणेच्या दुरुस्तीच्या बहाण्याने लष्करतील एक अधिकारी देखील विमानात दाखल झाले. राजस्थान चे सहाय्यक पोलिस कमिशनर म्हणून आणखी एक व्यक्ती चर्चा करण्यासाठी विमानात दाखल झाली. अशा प्रकारे आता चार व्यक्ती अपहरणकर्त्यांच्या विरोधासाठी विमानात दाखल झाल्या होत्या. हे सर्वजण एकमेकांशी शुध्द हिंदित बोलत होते. शेवटी मुले आणि स्त्रियांना मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांना बाहेर जाऊ देताच या चौघांनी स्वत: नि:शस्त्र असूनही अपहरणकर्त्यांना ताब्यात घेण्याची निर्णायक कारवाई सुरु केली . एका अधिका-याने कारवाई सुरु करतांना 'अल्ला हो अकबर' चा जोरदार घोष केला. दोघांच्या हातातील शस्त्रे चपळाईने काढून घेतली गेली. परंतू 'अल्ला हो अकबर' या घोषणेमुळे सावध झालेल्या एकाने घाईघाईत एक गोळी झाडली, पण आता बहुधा त्यांचे ग्रह फिरले होते. हि गोळी अपहरणकर्त्यांपैकीच एकाला लागून तो जखमी झाला. त्यांच्या कडीले पिस्तुले, गोळ्या ही शस्त्रे काढून घेण्यात आली. इतर स्फोटके शरीरावर बांधली आहेत त्याच्याद्वारे विमान उडवून देऊ ही धमकी पोकळ होती कारण कोणतीही स्फोटके त्यांच्याकडे सापडली नाहीत. कारवाई केवळ दोन मिनिटात पार पडली सर्व अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतले गेले. मात्र पाकिस्तानी अधिकारी जवळपास स ७ तास त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवण्यात यशस्वी झाले या सात तासात त्यांच्या क्षमतेचा अंदाज घेतला. २६ मे, पहाटे ३.०० वाजता सर्व ओलिसांची सुखरूप सुटका करण्यात आली. यानंतर तीनही अपहरणकर्त्यांवर खटला दाखले होऊन मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. या शिक्षेची अमलबजावणी १९९९ मध्ये करण्यात आली. ज्या कारणासाठी हे अपहरण करण्यात आले होते त्या पाक आण्विक चाचण्या दोनच दिवसांनी २८ मे, १९९८ ला त्याच बलुचिस्तान मध्ये घेण्यात आल्या. वरील लेख विकी जालावरील इतर लेखांच्या माहितीवर आधारीत आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3555
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

ह्या किश्श्याबद्दल ठाउक नव्हते. त्यांची मागणी तशी का असावी हे समजले नाही.

अणू चाचणी ज्या भागात घेतली जाते त्या प्रदेशमधील लोकावर त्याचे प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते. पोखरण मध्ये पण हे मोठ्या प्रमाणावर झाले आहेत. या विषयावर आनंद पटवर्धन आणि त्यांची डॉक्युमेंट्री यानी जनजागृतीचे बरेच कार्य केले आहे. अणुचाचणी च्या प्रतिकूल परिनामामुळे प्रगत देश संगणकीय अणू चाचण्या घेतात. पण राष्ट्रवादाचे ढोल वाजवण्यासाठी भारत, पाकिस्तान, उत्तर कोरीया या देशांमध्ये या चाचण्या घेतल्या जातात जेणेकरून लोकन्माद निर्माण होऊन राज्यकर्त्याना त्यांच्या रोट्या भाजता येतात. लेखात उल्लेख केलेला विरोध याच कारणामुळे असावा त्याचप्रमाणे बलुचिस्तन मध्ये असणार्‍या पाकिस्तान विरोधाचा पण तो परिपाक असु शकतो

In reply to by पिंपातला उंदीर

९० च्या दशकाच्या पूर्वार्धात व मध्यात फ्रान्स व चीन यांनी देखील प्रत्यक्ष अणुचाचण्या घेतल्या होत्या. दूरदर्शनवरील बातम्यांमध्ये फ्रान्सच्या समुद्रातील अणुचाचणीचे व्हिडीयो पाहिल्याचे स्मरते. अधिक माहितीसाठी विकीवरील हा तक्ता बघा.

विमान अपहरणाविरोधात उत्तमरीत्या पार पडलेली कारवाई! मात्र असा मशिदींचा वीज पुरवठा बंद करणे वगैरे भारतात होणे अशक्य दिसते. ताज हॉटेलवर चाललेल्या कारवाईचे थेट प्रक्षेपण चालू होते हे आपल्याकडचे उदाहरण. :(

In reply to by पैसा

हो खरं आहे कारण अशा प्रक्षेपणामुळे होणारे दुष्परीणाम कारगील युध्दाच्या वेळी दिसले होते तरी आपण काहीही शिकलो नाही आणि ताज वरील कारवाईचे प्रक्षेपण करतचं राहिलो.

सदर विमानाच्या वैमानिकाचे व विमानवाहतूक नियंत्रकाचे प्रसंगावधान व कल्पकता यामुळे पहिलीच चाल जोरदार यशस्वी झाली. अन त्यानंतर एकूणच सुरक्षा व्यवस्थेतील अधिकार्‍यांच्या चातुर्यपूर्ण योजनेच्या परिणामकारक अंमलबजावणीमुळे कुठल्याही अपहृताचा जीव न जाता व गंभीर इजा न होता हे नाट्य संपुष्टात आले. अर्थात अपहरणकर्ते देखील या कामासाठी फारच कुचकामी होते हाही एक पदर आहेच. या अपहरणाच्या घटनेबद्दल प्रथमच वाचायला मिळाले. लाल टोपी यांचे अनेक आभार.

In reply to by श्रीरंग_जोशी

सहमत.. हे अपहरण भावनेच्या भरात केल्याचे जाणवते. त्याचबरोबर तेथील वेगवेगळ्या सुरक्षा यंत्रणांनी सामंजस्याने केलेली कारवाई देखील नजरेत भरण्यासारखी आहे

छान लेख.
यानंतर तीनही अपहरणकर्त्यांवर खटला दाखले होऊन मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. या शिक्षेची अमलबजावणी १९९९ मध्ये करण्यात आली.
तिथे अरूंधती रॉय, नंदिता हस्कर यासारखे अत्यंत कनवाळू मानवतावादी नव्हते वाटतं?

In reply to by क्लिंटन

असते तर त्यांनाही तुरुंगात टाकलं असतं..नैतर राष्ट्रीय सुरक्षेत बाधा आणताहेत म्हणुन लटकवलं असतं. कदाचित म्हणुनच असे लोकं तिथं नैत.

हे प्रकरण घडल्याच्या बरोबर १९ महिन्यांनी आय सी ८१४ चे अपहरण घडले. आय सी ८१४ च्या अपहरण प्रकरणाच्या सुत्रधारांनी सदर अपहरणातील घडामोडींचा अभ्यास करून त्या प्रकारच्या चुका होऊ न देण्याची पूर्ण काळजी घेतली असावी.