भक्तीची शक्ती?

चिगो जनातलं, मनातलं
परवाचा दिवसच साला सुरु झाला तोच बेक्कारपणे.. ऑफीसला जायला निघणार तेवढ्यात फोन आला, " सर, इथून जवळच एक अपघात झालाय. एक बस पलटलीय.." म्हटलं, बोंबला ! आधी किती जखमी, मृत असतील ह्याची भिती. त्यातून मृत असतील तर बॉडीज हलवायला लागतात पटकन, नाहीतर जनक्षोभ, लॉ & ऑर्डर प्रॉब्लम नी काय काय.. मनात हे टेंशन असतांनाच हॉस्पिटलला फोन लावला, उपचारादींची तयारी करुन ठेवा म्हणून. ह्या धाकधूकीत स्पॉटवर पोचलो. बस घसरुन उलटली होती तो गड्डा जेमेतेम ६-७ फुटांचा असल्याने, सुदैवाने जिवीतहानी झालेली नव्हती. तोपर्यंत लोकांनीही जखमींना इस्पितळात हलवलेले होते. म्हणून मग तिथल्या फॉर्मॅलिटीत न अडकता मी इस्पितळाकडे धाव घेतली.. २०-२५ जणं जखमी होते. काही किरकोळ जखमी होते, त्यांना मलमपट्टी करुन झाली होती. दोघांना जिल्ह्याच्या जागी हलवणे गरजेचे होते, त्यांना १०८च्या अ‍ॅम्बुलन्सने रवाना केले जिल्हा रुग्णालयाकडे.. नंतर डॉक्टर बोलली, "सर, एकदोन बाया अंडर ऑबझर्व्हेशन आहेत. उद्या सुट्टी देऊ शकतो. भेटणार का?" मी म्हटलं, चला.. वॉर्डात दोन-तीन बायका होत्या त्यांना भेटलो, बोललो.. तेवढ्यात एका बेडजवळ गर्दी दिसली. मी काय झालं ते विचारायला गेलो तिथे.. एक ४-५ वर्षाची चिंटूकली मलूलपणे बेडवर पडलेली होती, आणि तिच्या आजूबाजूला तिचे नातेवाईक बेडवर डोकं ठेवून रडत होते.. मी विचारलं, "काय झालंय हिला?" डॉक्टर बोलली, "ही अपघातात नव्हती. हिला सकाळी अ‍ॅडमिट केलंय. आम्हाला शंका आहे की तिला सिव्हीअर मेनिंनजाईटीस आहे. जिल्हा रुग्णालायात हलवायला पाहीजे.." मी म्हटलं, " हलवा की मग.." ती बोलली की आम्ही तिच्या आईवडीलांना, नातेवाईकांना सांगतोय, पण ते ऐकतच नाहीयेत.. मी हबकलो. मी तिच्या आईवडीलांना विचारलं. ते म्हणाले, "सर, आम्ही तिला इथे आणलंय. आता तिच्या नशिबात असेल आणि देवाच्या मनात असेल तर वाचेल ती.." मला कळेचना, काय बोलावं ते.. वर म्हणे, तुराला (जिल्हा) नेतांना काही झालं तर? त्यापेक्षा आम्ही इथेच प्रार्थना करु आणि वाट पाहू. माझी सरकलीच.. च्यायला, मुर्ख आहेत का काय हे लोक? मी बोललो त्यांना, "बाबारे, तिच्या नशीबात असेल ते होईल हे मान्य.. पण तुम्ही प्रयत्न तर करा. जिल्ह्याला नेतांना काही झालंच तर कमीत कमी प्रयत्न केल्याचं तर बरं वाटेल.. God helps them, who help themselves.." सीन होता तो ! नातेवाईक रडताहेत काय, तिच्या अंगावरुन हात काय फिरवताहेत, तिला पाणी पाजताहेत, प्रार्थना करताहेत.. पण तिच्यासाठी प्रयत्न न करता, देवावर हवाला टाकून बसलेत.. शेवटी थोड्याफार कनव्हिंसींग नंतर तयार झाले , तर तोपर्यंत १०८ निघून गेलेली.. (१०८ सेवा फुकट आहे, बाकीच्या रुग्णवाहीकांचे भाडे द्यावे लागते.) आता त्यांच्याकडे पैसे नव्हते. जुळवाजुळव करतो म्हणे, पण वेळ लागला असता. आधीच त्या पोरीला अ‍ॅडमिट करुन ५-६ तास झालेले.. मी डॉक्टरला विचारलं, "किती लागतील?" ती म्हणाली, दिड हजार.. माझा हात धर्मादाय कधी खिशात जात नाही. क्षणभर चलबिचल झाली. मग मी खिशातून पैसे काढले. त्या नातेवाईकाला म्हणालो, "आता नीघ. जेव्हा जमतील तेव्हा परत कर." (हो, नाहीतर एस डी ओ साहेब पैसे वाटतो म्हणून उद्यापासून गर्दी व्हायची माझ्याकडे.. ;-)) त्यांना अ‍ॅम्बुलन्समधे बसवून रवाना केलं, आणि लक्षात आलं की मी त्यांच्यापैकी कुणालाच नाव-पत्ता विचारला नव्हता ! गेले पंधराशे बुडीत खात्यात :-( !! ऑफीसला परतलो.. डोक्यात हाच प्रसंग फिरत होता.. म्हटलं, काहीतरी केलं पाहीजे! पण काय, ते कळेना. शेवटी त्याच दिवशी संध्याकाळी ४ वाजता चर्च लिडर्स सोबत बैठक केली. त्यांना बोललो, की श्रद्धा आणि प्रार्थना ह्यावरील प्रत्येकाचा विश्वास, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण प्रयत्नांचे महत्त्वही समजवा लोकांना.. त्यांच्यापुढे कबूल केलं, की ह्याबाबतीत माझ्यापेक्षा तूमची ऑथॉरीटी जास्त महत्त्वाची आणि पॉवरबाज आहे. लोकांना सांगा की, प्रार्थनेत शक्ती असते पण तिला प्रयत्नांची जोड असेल तरच! कबूल तर केलं बुवा त्यांनी.. प्रार्थना, देव आणि धर्माबद्दल असलेल्या लोकांच्या चुकीच्या कल्पना दुर करायचा प्रयत्न करणार म्हणून.. बघू. त्या पोरीला वाचव रे, देवा !
वर्गीकरण
लेखनप्रकार

25 टिप्पण्या 4,427 दृश्ये

Comments

चिगो नवीन

In reply to by इरसाल

बाकी पैश्यांचे म्हणाल तर हॉस्पीटल मधे अ‍ॅडमिट केल्याचे डिटेल तर मिळतीलच तुम्हाला.
हे मी करु शकतो, पण खरं सांगायचं झालं तर तसं काही करायची इच्छा नाही.. उगाच तगादा लावल्यासारखं वाटेल मला स्वतःलाच. छोडो.. पोरगी वाचली तरी पावलो, ब्बास.

स्मिता. नवीन

शाळेत अभ्यासाला टाळाटाळ केली की 'असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी' असं म्हणून आमचे एक सर आम्हाला खडसावत असत. हा प्रसंग वाचून त्याच म्हणीची आठवण झाली. आपल्याकडे अजूनही अश्याच केवळ दैववादी विचारसरणीचे लोक बहुसंख्येने आहेत ही शरमेची बाब आहे. वरचा प्रसंग खरोखर संतापजनक आहे. एक वेळ पैसा नसल्याने अगतिक होवून प्रयत्न खुंटले असते तर परिस्थितीला दोष देता आला असता पण इथे तर पैश्यासोबत इच्छाशक्तीचाही अभावच दिसला. असो. त्या लोकांच्या प्रार्थनेला तुमच्या प्रयत्नांची जोड लाभल्याने ती मुलगी नक्की बरी होईल. अनुभवातून शहाणे होवून आणि गांभिर्य लक्षात घेवून तुम्ही केलेला प्रयत्नही प्रशंसनीय आहे. त्या दृष्टीने आणखी उपक्रम राबवण्याकरता शुभेच्छा!

यकु नवीन

नुसती फुकटची श्रद्धा असून उपयोग नाहीच - बूड हलविणे मस्ट. चर्चवाल्यांना बोलायला लावणं तर लैच भारी. लगे रहो एसडीओ साब..

आत्मशून्य नवीन

साक्षात मृत्युशी गाठ पडलेली असताना व इतर पर्यायही हाताशी असताना केवळ प्रार्थनेवर विश्वास होता म्हणजे लोकं मनातुन अत्यंत धास्तावलेले व परीस्थीतीनेही प्रचंड गांजलेले असणार असं वाटतयं. तुमच्या मदतीला फळ येओ हिच इच्छा. बाकी भक्तीकेली तर(च) शक्तीयेणार अशा मानवी व्यवहारवादी गिव-टेक सिस्टीमवर भिस्त ठेवण्यात अर्थ नाही.

चिगो नवीन

In reply to by आत्मशून्य

केवळ प्रार्थनेवर विश्वास होता म्हणजे लोकं मनातुन अत्यंत धास्तावलेले व परीस्थीतीनेही प्रचंड गांजलेले असणार असं वाटतयं.
ते लोक धास्तावलेले होते, हे मान्य.. मात्र गांजलेले होते, असं तरी वाटत नव्हतं. तसेही इथे सरकारी रुग्णालयात स्त्रीया आणि मुलांना ओपीडी/ आयपीडी सुविधा मोफत आहे. तसेच १०८ची रुग्णवाहीका सेवा मोफत आहे. ह्या केसमध्ये मला इच्छाशक्तीचा अभाव किंवा देवावर भार टाकायची वृत्ती जाणवली.. माझ्या कलेक्टरनी आधीपण एकदा सांगितले होते, की गारो हिल्समधे काही खेडी अशी आहेत जी अतिशय कट्टर आहेत. ते लोक "आम्ही देवाने जसे ठेवलेय तसेच राहू, तसेच जगू.." म्हणत सरकारी हस्तक्षेपाला विरोध करतात. चर्च लिडर्सशी झालेल्या बैठकीत त्यांनी हे मान्य केले, की इथे असे बरेच लोक आहेत जे डॉक्टर, इस्पीतळ करत बसण्यापेक्षा " त्याच्या नशीबात असेल ते होईल" म्हणून गप बसतात. ह्यामुळे बर्‍यापैकी लोक उपचाराअभावी दगावतातही. कदाचित ह्याला ह्या भागाची दुर्गमता, रुग्णालयापर्यंत पोचण्याच्या सुविधा आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा अभाव, तसेच आधी एकूणच स्वास्थ्य-सेवांचा अभाव हेही कारणीभूत असेल. पुर्वी प्रयत्नांना आलेल्या अपयशांमुळे आलेली उदासिनता, आणि त्यातून देवावर आणि दैवावर पुर्ण भरवसा टाकण्याची वृत्ती जोपासली गेली असेल. पण बदलत्या परीस्थितीत ही वृत्ती बदलण्याची गरज आहे.. ही वृत्ती बदलली तर कदाचित केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल, आणि यश मिळतेय हे बघून प्रयत्नांवरील विश्वास वाढेल, अशी सायकल असावी ती.. धन्यवाद..

सहज नवीन

माना तूफ़ाँ के आगे, नहीं चलता ज़ोर किसीका मौजों का दोष नहीं है, ये दोष है और किसी का मजधार में नैया डोले, तो माझी पार लगाये माझी जो नाव डुबोये, उसे कौन बचाये ओ... उसे कौन बचाये राजेश खन्नाचे गाणे आठवले.

अर्धवटराव नवीन

आपल्या संकटाचं निवारण आपोआप होऊन जावं ही भावना असल्या भक्तीचा/बुवाबाजीचा आसरा शोधते... अवांतरः त्या लोकांची प्रार्थना फळाला आली म्हणायची... नाहि तर तुम्ही असे अच्यानक कसे पोचला असता तिथे ;) अर्धवटराव

चिगो नवीन

In reply to by शिल्पा ब

अहो ताई, तुरा हे माझ्या इथल्या जिल्ह्याचं नाव आहे. तिथे नेतांना, घेऊन जातांना काही झालं तर, असं म्हणत होते ते लोकं..

चिगो नवीन

In reply to by स्पंदना

मुलगी म्हणून गप्प बसणे अशक्य वाटते.. मेघालय आहे ताई हा.. इथे प्राॅपर्टी मुलीला मिळते आणि लग्नानंतर मुलाची विदाई होते.. :-)

चिगो नवीन

प्रतिसादाचे कारण की तपशिलातली चुक सुधारायची आहे.. पेशंट मुलगा आहे. आज काही कामासाठी ती डाॅक्टर भेटल्यावर तिला सदर पेशंटबद्दल विचारले तेव्हा तीने सांगितले.. मी 'काय बरा झाला का तो?' म्हणून विचारलं. उत्तर ऎकल्यावर मीच गचकलो..;-) ती म्हणे, 'वाचला असेल, सर.. नाहीतर डेथ सर्टीफिकेट घ्यायला आले असते त्याच्या घरचे !'..

चिगो नवीन

In reply to by नितिन थत्ते

त्याखालचा प्रतिसादही वाचा की.. आता मुलगा होता म्हणून हलगर्जीपणा केला, असं बोलणार असाल तर माका नाय ठाव..;-)