Skip to main content

बांगड्या आणि गजरा !! ..( Confusing but soooo sweet ! )

लेखक सुहास.. यांनी मंगळवार, 24/07/2012 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वप्रकाशित डिसक्लेमर : समस्या वैयक्तिक पातळीवरून मांडली असली तरी ती जागतिक समस्या आहे असे लेखकाचे मत आहे .शिवाय त्या समस्येचं आजवर कोणीही निवारण केले असण्याची शक्यता अतिशय कमी आहे (जे साक्षात ब्रह्मदेवाला जमलं नाही ते आम्हाला काय कप्पाळ जमणार आहे . शिवाय आमच्या मित्रांना, नवरा-बायकोच्या नात्यातला एक प्रकारचा जो गोडवा(भांडणातही आणि परस्परविरोधी सवयीतही ! ) असतो, त्याचा आंनद कसा लुटायचा हे ही सांगायचा आमचा एक झीण प्रयत्न ! ;) दिनांक : १ ऑगस्ट २००९ स्थळ : निळकंठेश्वर (कात टाकलेला रम्य निसर्ग) वेळ : साधारण सकाळी साडे आठ ती : खुप छान परिसर आहे रे हा. एकदम झकास . मी : काल-परवाच कोणीतरी सुचवला. ती : ती नारदमुनी ची मूर्ती किती क्युट दिसते आहे ना !( आँ !) मी : तुला एक सांगू ? मला मुर्तीच तितकसं महत्त्व वाटत नाही, पण आपण मूर्ती कडे किंवा एखाद्या वस्तूकडे बघताना आपल्या मनात असलेल्या त्याच्या प्रतिमे कडे बघत असतो असे मला वाटते. ती : म्हणजे ? मी : अगं ! तुझ्या हातात बांगड्या आहेत ? ती : नाssssssही !! मला बांगड्या घालायला अजिबात आवडत नाही. एक तर सर्जरी करताना खूप अडचण करतात आणि दुसरं म्हणजे ते स्त्री च्या... , जाऊ दे , तु सांग काय सांगत होतास ते ? मी : ओके बाबा , चल उदाहरणार्थ माझ्या हातातलं कडं घे , हे कडं गेली सहा वर्षे माझ्या मनगटात आहे. माझ्या फायनलच्या वर्षात मला चांगले टक्के मिळावेत म्हणून एका मित्राने आणून दिले होते ते मला शिर्डीवरून . ती : मग ? मी : आता हे बघ मी शिर्डीला कधी ही गेलो नाही. पण हे कडं मी मला फायनलला कमी टक्के पडले असून असूनही घालतो. ती : म्हणजे तुझा साईबाबा वर विश्वास आहे तर . मी : असेल ही बहुतेक , पण माझा माझ्या त्या मित्राच्या विश्वासावर विश्वास आहे हे नक्की . माझा हितचिंतक पॅरलली साई असला तरी , त्याच प्रकारे मूर्ती आणि प्रतिमेच आहे. ती : कधी-कधी तू खूप छान बोलतोस. मी : तुला आवडणार असेल तर असेच मी तुझ्याशी आयुष्यभर बोलू शकतो. (हजरजबाबी बाळ्यासाठी प्रचंड टाळ्या !) ती : हे 'प्रपोजल' आहे का ? मी : होय ! आय लव्ह यू ! लग्न करशील माझ्याशी ? ती : मला विचार करायला वेळ हवा आहे ? मी : दिला ! इथून आपल्याला जी पहिली सि.सि.डी. लागेल, तेथे थांबे पर्यंतचा ! ती : हा खूप कमी वाटत नाही तुला ? मी : मॅडम ! साल दोन हजार नऊ आहे हे ! थिन्क क्विक, अ‍ॅक्ट क्विकचा जमाना आहे हा आणि तेव्हढेच माझे कॉफीचे पैसेही वाचतील (समोरून धबधब्यावरून कोसळणाऱ्या खळाळत्या पाण्यासारखं हास्य !! जीव खल्लास !! हसली म्हणजे...हसली म्हणजे...म्हणजे रेशीमगाठ बसली ! ) ****************************************************************************** दिनांक १५ ऑक्टोबर २००९ स्थळ : माझ्या घरातील स्वयंपाकघर मी : मम्मी, तिला बांगड्या आवडत नाहीत. मम्मी : मग ? तिने घालाव्यात असं काहीही नाही. पण आपलं कर्तव्य म्हणून कराव्याच लागतील. मी : अगं म्हणून काय सोन्याच्या करायच्या ? मम्मी : हे बघ ! एक तर परक्या ची पोरं अशी पळवून आणल्यासारखी आणणार आहेस तु, मग तिचं सर्वकाही आपणच करायला नको का ? मी : अगं आधीच लग्नाचं सगळं काही करताना बँक बॅलन्स ला आग लागली आहे, जर परत रेसेशन मध्ये फसलो ना तर काही धडगत नाही माझी . मम्मी : गप्प बैस ! बापासारखेच कंजूष आहात सारे ! (आतल्या खोलीतून वर्तमानपत्र चुरगळलेला आवाज ! ) थांब, दोन मिनीटे आलेच मी. दोन मिनीट शांतता मम्मी : हे घे ***** , त्या अजुन **** टाक आणि बांगड्या घेउन ये. मी : पण मम्मी मम्मी : जा आता लवकर (आज्ञाधारक बाळ्या !) ****************************************************************************** दिनांक : २० ऑक्टोबर २००९ वेळ : सकाळी १०.३० स्थळ : आळंदीतील 'पवार' मंगल कार्यालयाचा स्टेज (समोर हवन ! मंत्र चालू ! समोर ३०-४० जणांचा गोतावळा ! ) ब्राम्हण : हम्म ! टाका . ती : इतक्या महाग बांगड्या आणायची काय गरज होती का ? मी : श्शsss ! आपण लग्न करतो आहे ना !! ब्राम्हण : हम्म ! टाका. मी : हार कुठे गेले ? ती : मम्मीकडे आहेत . अरे, सन दोन हजार नऊ आहे हे ! मॉर्डनायजेशनचा जमाना आहे हा . (न्युटनचा तिसरा नियम.) आज नंतर मी नाही घालणार . मी : घालू नकोस, पण किमान आजच्या पूर्ती तरी राहू देत. मम्मी : गप्प बसा दोघेही जरा ! लग्न लागतयं तुमचं. ब्राम्हण : हम्म ! टाका . ****************************************************************************** दिनांक : १८ नोव्हेंबर २००९ वेळ : सकाळी ७ स्थळ : माझ्या लोहगावातल्या घराचं किचन. ती : अय्या ! सोड , डॅडी उठतील ना ! मी : तुला सुट्टी असताना इतक्या लवकर का उठली आहेस ? ती : डँडी साठी साबुदाणे भिजवायला विसरले रात्री , म्हटल आता भिजवले की किमान अकरा पर्यंत तरी बनविता येतील . मी : मी बाहेरून आणतो ना ! ती : काही नको ! त्या पेक्षा एक काम कर , केळी घेउन ये. दुपारपर्यंत डॅडीं साठी वेफर्स आणि केळी तरी असतील.अरे पण तु काल उशीरापर्यंत काय ते स्क्रिप्टींग का काय तरी (बसला ना टोला सकाळी सकाळी !)करत होतास ना ? तु कसा काय लवकर उठलास ? मी : खरं सांगू ? तुझ्या हातातल्या बांगड्यांची किन-किन कानावर पडली आणि जाग आली.तुझ्या नाजूक गोऱ्यापान हातात हिरव्या-लाल आणि त्या सोन्याच्या बांगड्या छान दिसतात. ती : .......अरे मम्मीने एव्हढ्या प्रेमाने दिल्या आहेत म्हणून पंधरा-एक दिवस घातल्या. आता सवय झाली. ****************************************************************************** दिनांक : १४ मार्च २०१० वेळ : रात्री ११.५० स्थळ : माझं लोहगावातलं घर. (फोनवर , ती अमरावतीवरून ! ) मी : हां ! बोल गं ! ती : ........ मी : हॅलो ! माझा आवाज येतोय ना ! ती : (केवळ स्फुंदण्याचा आवाज ) मी : काय गं काय झालं रडायला. ती : ........... मी : अगं सांग की मला असे बेचैन करू नकोस. ती : त्या बांगड्या हो त्या ना !! त्या हरवल्या ? (हुंदके चालूच !) मी : अरे रे (कसं सावरायचं आता.) ती : माझ्या किती आठवणी होत्या त्यात (?) .मम्मी ने माझ्यासाठी आणल्या होत्या. मी : जाऊ देत . कधी हरवल्या ? ती : दोन दिवस झाले, सर्जरीला जाताना काढून ठेवल्या होत्या कप्बर्डमध्ये . नंतर येउन पहाते तर गायब. मी : म्हणजे चोरीला गेल्या असतील .आता एक काम कर, मी सोनाराशी बोलतो. त्याला पैसै पाठवितो आणि जशाच्या तश्श्या बांगड्या बनवायला सांगतो. मम्मीला आत्ताच काही सांगू नकोस. ती : आणि सोनाराने सांगीतले तर... मी : मी सांगतो त्याला काय सांगायच ते ! तू रडू नकोस. सर्वकाही ठीक होईल. ती : हम्म ! मी : जेवलीस ....................... ****************************************************************************** दिनांक : काल-परवा स्थळ : बैंगलोरच्या ऑफिसातली माझी खुर्ची वेळ : ऑफिस भरगच्च असल्याची .(तिचा फोन..) ती : हाय मी : हाय (दिल खूष !) , काय गं करमत नाही का माझ्याशिवाय ? आता दहा मिनिटांपूर्वी तर फोन केला होतास. ती : करमत नाही ते खरं आहे, पण डॅडींचा फोन आला होत आत्ता. ***** पाहिजेत म्हणाले . काय करू ? माझ्याकडे आहेत देऊ का ? मी : नको ! मी लगेच ट्रान्सफर करतो आहे. ती : मी दिले तर काय वाईट आहे. हे म्हणजे माझे ते माझे आणि तुझे तेही माझेच असे होते आहे. मी : तसे काही नाही गं ! वेळ पडल्यावर घेईन तुझ्याकडून. ती : ट्रान्सफर वरून आठवले. तु पुण्याला ट्रान्सफरचे काय केले आहेस ? मी : नाही गं अजुन. थोडा वेळ लागेल. ती : तुझं ना माझ्यावर प्रेमच नाही. मी : अस्सं कशा वरुन ? ती : तु आजपर्यंत मला कधी गजरा आणून दिलास का ? मी : क्काय ? (खुर्चीवरून पडल्याचा आवाज !! ) आयच्या गावात या मॉडर्नायजेशनच्या !!!!!!!!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6053
प्रतिक्रिया 34

प्रतिक्रिया

पूर्वीही वाचले होते, तेव्हाही आवडले होते.

आवडले. वाचुन मन प्रसन्न झाले. छान

......... च्यायच्चं....! काय बोलू रे! :( ह्या 'मम्म्यां'नी पोरींच्या संसारातलं लक्ष कमी करायला पायजे राव. पोरी नि त्याहून जास्त जावई सुखी होतील. (सॉरी रे!)

क्रिस्प अँड क्विक ! एक्दम झकास ! जे पी

कितीही वेळा वाचलं तरी तेवढीच मजा येतेय!

आवडेश. -दिलीप बिरुटे

लै भारी भाऊ.. एकदम आवड्या..:-)

क्युट आहे. :) फक्त गजराच नाय बे बर्‍याच गोष्टीनी अस होत. तु मला साधी एक सोन्याची अंगठी सुद्धा नाही दिलीस. तुझं माझ्यावर प्रेमच नाही हा डायलॉग ऐकुन बसलोय मी.. (साखरपुड्याची वेगळी बरं... )

मजा आ़ली! बायकोचं असं म्हणणं असेल की आईला वाईट वाटू नये (बांगडया हरवल्या एवढ्या प्रेमाने केलेल्या ) म्हणून बांगड्याना खर्च केला जरी बांगड्या ती घालणार असली तरी! माझ्यासाठी खास असा साधा गजरा तरी आणलास का?

In reply to by स्पंदना

बांगड्या गजरा या गोष्टी पुरुष कधीही शेअर करु शकत नाहित त्यावर मक्तेदारी फक्त आमची.
ओ पण शेअर करायला बांगड्या गजरा पुरुष वापरतीलच कशाला नै का ;)

च्यायला भारीच की........... :) आवडले..... फ्लो मस्त जमला आहे अगदी..........

:)

एकदम मस्त! :) - (नेहमीच खुर्चीवरून पडणारा*) सोकाजी * लग्नाला १२ होऊनसुद्धा ;)