Skip to main content

शांताराम - ग्रेगरी डेव्हीड रॉबर्ट्स

लेखक शुचि
मंगळवार, 17/07/2012 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या "ग्रेगरी डेव्हीड रॉबर्ट्स" या लेखकाचे "शांताराम" हे आत्मचरीत्रात्मक पुस्तक वाचते आहे, अर्धे झाले आहे. पहीली काही प्रकरणे, भारतातील अनुभवांबद्दल एखादी पाश्चात्य व्यक्ती इतके सकारात्मक लिहू शकते हे वाचून, आश्चर्यमिश्रीत आनंदाचा धक्का बसला. हातातून पुस्तक खाली ठेववेना. विशेषतः पुस्तकातील मराठी संवाद आणि मराठी पात्रांनी भुरळ घातली. लेखकाची नीरीक्षणशक्ती देखील अफाट, खरच अफाट आहे हे जाणवले. पण पुढे पुढे लेखकाची जीवनशैली, चरस, हशीश घेणे आदि सवयी बघता, मुंबईचे अतिरेकी कौतुक, लोकांची स्तुती सर्व अतिरंजित वाटू लागले. खरं तर पुस्तक काही काळ दूरच ठेवले. झोपडपट्टीच्या दादाशी अध्यात्मिक गप्पा करणे, शिवसेनेच्या राजकीय बळाचा उल्लेख, थोड्या पानांनंतर मुस्लीम समाजातील काही गुंड लोकांना दिलेला "लाईमलाईट" (प्रकाशझोत)- त्यांचे झोपडपट्टीची आग विझवण्याचे काम व त्या कामाची तोंड भरभरून स्तुती, वगैरे गोष्टी अगदी अगदी निखालस पेरलेल्या वाटू लागल्या. एकंदर "फर्स्ट इम्प्रेशन" जबरदस्त होते पण ते हळूहळू मावळत चालले आहे. प्रसंग अतिरंजीत, काल्पनिक आणि मीठमसाला - फोडणी घालून "पेश" केल्यासारखे वाटत आहेत. तसे करायला काही हरकत नाही पण मग आत्मानुभावाचा आव कशाला? बाकी काल्पनिक जॉनर मधील म्हणून वाचावयास उत्तम पुस्तक आहे. विशेषतः जीवनविषयक बर्‍याच टीप्पण्या मार्मीक आहेत. जसे - लेखक आणि लेखकाची मैत्रिण कार्ला गप्पा मारत असतात आणि विषय निघतो की "आत्ता या क्षणी तुम्हाला जर एखादा वर मिळाला तर काय मागाल?" कार्ला म्हणते "सत्ता (पॉवर) कारण सत्ता ही सर्वोत्तम गोष्ट आहे" त्यावर शब्दाने शब्द वाढत जाऊन वाचकाला तिचे म्हणणे कळते की "सेक्स हा मुख्यत्वे करून पॉवरगेम असतो." तर याउलट "प्रेम हे शरणागतीचे दुसरे रूप असते आणि म्हणून प्रेमात पडण्यास आख्खे जग घाबरते" वगैरे. अन्य टीप्पण्या मधेमधे पेरलेल्या आहेत आणि वाचण्याजोग्या आहेत. "प्रबाकर खरे" हे पात्र लेखकाचा मित्र आहे. आणि या पात्राचे व्यक्तीचित्रणदेखील उत्तम झाले आहे. प्रबाकरचे तोंडभर , निखळ, निष्कपट स्मितहास्य या पुस्तकात वाचकाला वारंवार भेटत राहते. सर्वच पात्रे छान रंगवली आहेत. पण एक सूचना - लेखक भारतीयांच्या हृदयास हात घालू पहातो आणि पहीली बरीच प्रकरणे त्याला यशही मिळते, पण ती एक "कॅल्क्युलेटेड" (धूर्त) लेखकी चाल असावी. तेव्हा थोडे डोके शाबूत ठेऊन हे पुस्तक वाचा. मुंबईत राहूनही , मला काही माहीत नसलेल्या डार्क (अंधार्‍या) गोष्टी या पुस्तकरुपाने माहीत झाल्या उदाहरणार्थ - (१) मरणोन्मुख पण बेघर लोकांना आसरा देऊन त्यांच्या अवयवांचा चालणारा व्यापार (२) सतत उभे राहून चरस पीणारे साधू. उपयोग न केल्याने त्यांचे सडणारे पाय आणि त्यांचे चरसी भक्तगण. या अर्धवट वाचलेल्या पुस्तकात भारतीयांबद्दल खूप चांगल्या गोष्टी वाचल्या. भारतीय असल्याचा परत एकदा खूप अभिमानदेखील वाटला. एकंदर पुस्तक वाचण्याजोगे आहे. थोड्या दिवसात परत वाचायला सुरुवात करेन. ज्यांनी कोणी वाचले असेल त्यांनी आपापले मत जरूर या धाग्यावर नोंदवावे. धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3396
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

अपर्णा वेलणकरांनी मराठी अनुवाद केलेले 'शांताराम' वाचलेले आहे. अनुवाद अतिशय उत्कृष्ट झालाय. झोपडपट्टीतले आणि तुरुंगातले प्रसंग तर वाचनीय आहेतच. पुस्तक नंतर मात्र उगीचच लांबवल्यासारखे झालेय. अफगाणिस्तानातील प्रसंग तर उगाच ओढूनताणून घुसवल्यासारखे झाले आहेत. पण निदान एकदातरी वाचण्यासारखे खासच आहे.

मी हे पुस्तक इंग्लिशमध्ये काही वर्षापूर्वी वाचले आहे. त्यातील अफघानिस्तान मधील सध्याच्या वातावरणावर प्रकाश टाकणारी माहिती आठवते ती अशी- ''रशिया ने आफ्घानिस्तानावर कबजा मिळवल्यानंतर त्यांच्या सैन्याविरुद्ध लढणार्या आफघानी स्वातंत्र्य सैनिकांना अमेरीकेने खूप मदद केली आणि गुरीला युद्धाचे शिक्षण दिले. त्या दुर्गम प्रदेशात रशिअन फौजेची मुख्य मदार helicopter mounted तोफावर होती. अमेरिकेने आफ्घानी स्वातंत्र्य सैनिकांना shoulder fired missiles दिली व ती वापरण्याचे शिक्षण दिले.missiles मुळे Helicopters चा मोठ्या संख्येने नाश झाल्य्यावर रशिया ने काढता पाय घेतला." आता हेच शिक्षण नाटो सैन्याबरोबर लढण्यासाठी आफ्घान तालिबानी वापरत आहेत. गुरूची विद्या गुरूलाच फलभूत होते याचे हे एक छान उदाहरण आहे.

इथे याबद्दल याआधी चर्चा झाली आहे... पूर्ण लेख पुन्हा इथंच चिकटवणं स्तुत्य नाही त्यामुळे फक्त शेवटचा परिच्छेद इथे देतेय.
पुस्तकाच्या एकूण प्रभावाबद्दल सांगायचं तर, मी पहिल्यांदाच वाचलं, त्यामुळे मला हे पुस्तक आवडलं. आवडलं यासाठी कारण त्यात एक परदेशी माणूस भारतात येतो. खुशाल इथे राहतो, जिथे पाऊल ठेवण्याची मी स्वप्नातही कल्पना करणार नाही अशा झोपडपट्टीत राहतो, भारतातल्या भारतातच आपण स्वत:भोवती भाषा-प्रदेशाची बंधने घालून घेतो.. तर हा बिन्धास्त त्या आत्मसात करतो. मला स्वत:ला हे कथन म्हणजे काही स्वत:ला रॉबिनहूड समजून केलेले लेखन असे नाही वाटले. एकंदरीत सगळे अनुभव त्याने चांगले मांडले आहेत. आणि सगळंच खरं नाही, काही काल्पनिकता आहे असंही धडधडीतपणे(इतरत्र) मान्य केलं आहे. मात्र पुढच्या वेळेस वाचायला पुस्तक तितकेच इंटरेस्टिंग वाटणार नाही. त्यामुळे वन टाईम रीडींगसाठी ठीक आहे.. आणि स्वत: खरेदी करून तर अगदी नो नो कॅटेगरीमध्ये.

@ वल्ली, अनुप ढेरे, रमेश आठवले - सर्वांचे प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. @मकी - पुवि वरचा तुझा लेख वाचला. छान परीक्षण लिहीले आहेस. पण मला "शांताराम" पुस्तक तितकेसे (एकदा वाचावे एवढे) देखील आवडत नाहीये. टण्ण्या यांनी पुवि वर मांडलेल्या मताशी मी सहमत आहे की लेखकाची फिलॉसॉफी आवडते.

या पुस्तकाबद्दल बरंच वाचून-ऐकून आहे पण त्याचा आकार बघता ते वाचायला घेतले जात नाही. कधितरी उत्फूर्तपणे वाचावेसे वाटले तर वाचेन.

मी हे पुस्तक दोनेक वर्षांपूर्वी वाचलं आहे. मला आवडलं नाही.... आवडलं नाही म्हणण्यापेक्षा जितकी त्याच्याबद्दल बोंबाबोंब केली गेली होती त्यामानाने अ‍ॅक्च्युअल पुस्तक फुस्स वाटलं.... मूळ पुस्तक वाचलेलं असल्यामुळे मराठी अनुवाद वाचला नाही.

याच पुस्तकाच्या प्रभावाखाली असतांना मी मिपावर एक लेख टाकला होता. तिथेही उत्तम चर्चा झाली आहे. लिंक- http://www.misalpav.com/node/19026 आताच पाहिले, शुचि यांचा प्रतिसादही आहे तिथे. :)

खुप बोलबाला झाला आहे ह्या पुस्तकाचा आणि प्रत्येक दुकानाच्या शेल्फ वर दिसतच पण तथाकथीत बेस्ट सेलर आणि प्र॑कशकाची जाहीरातबाजी माहीत असल्यामुळे ह्या पुस्तकाच्या वाटेला न जाता त्याच किमतीत जास्तीत जास्त वेगवेगगळी पुस्तके विकत घेतो. एकंदर "फर्स्ट इम्प्रेशन" जबरदस्त होते पण ते हळूहळू मावळत चालले आहे. प्रसंग अतिरंजीत, काल्पनिक आणि मीठमसाला - फोडणी घालून "पेश" केल्यासारखे वाटत आहेत. तसे करायला काही हरकत नाही पण मग आत्मानुभावाचा आव कशाला?>>>> तुमच्या अनुभव बरोबर आहे. इतकच म्हणील की तथाकथीत बेस्ट सेलर पुस्तकांच्या बाबतीत हाच अनुभव येतो. ज्या विश्वात प्रकाशन अन लिखाण हे धंदा म्हणुन केला जातं तिथे अजुन वेगळे काय होणार? तुमचा अनुभव तुम्ही सगळ्यां सोबत वाटला हे मात्र खुप छान केलं.

विख्यात अमेरिकन टीवी शो होस्ट ओप्रा विनफ्रे या बाईंनी नुकताच भारताचा दौरा केला. त्यांनी या दौऱ्यात त्यांना मार्गदर्शक म्हणून शान्तारामचे लेखक gregory david roberts याना घेतले होते असे वाचनात आले.

In reply to by परिकथेतील राजकुमार

छान सूचना आहे. आपण सुचवलेल्या नावामुळे प्रेक्षक संख्येत उगीचच वाढ होईल. हे नाव नायर बाईंना कळवावे.