मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

देह

संजय क्षीरसागर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मृत्यू या लेखावर बरीच चर्चा झाल्यानं हा लेख इथे देतोय. बिफोर वी स्टार्ट दोन गोष्टी क्लिअर करतो; पहिली गोष्ट, हा शरीराचा विश्लेषणात्मक अभ्यास नाही तर विदेहत्व समजलेल्या व्यक्तीचं रोजच्या जगण्याला उपयोगी व्हावं असं शरीराचं आकलन आहे आणि दोन, "आपण कधीही शरीर होत नाही, आपल्याला शरीराची जाणीव असते" या वस्तुस्थितीचं सतत भान असणं तुमच्या जवळजवळ सर्व शंकांचं निरसन करेल. अस्तित्वातलं सर्व प्रकटीकरण शून्यातनं (किंवा अवकाशातनं ) होतं त्यामुळे ते निराकार आणि सर्वव्यापी अवकाश सतत प्रत्येक आकार अंतर्बाह्य व्यापून आहे, म्हणजे आपल्याला आपण शरीर झालो (किंवा शरीर आहोत) असं वाटत असलं तरी मूळात आपण निराकार आहोत हा सर्व आध्यात्माचा केंद्रिय सिद्धांत आहे. थोडक्यात शून्य हे आपलं स्वरुप आहे आणि आपण शरीर आहोत असं वाटणं हे स्वरुपाचं विस्मरण आहे. विस्मरण अस्वास्थ्य निर्माण करतं पण स्वरुप बदलू शकत नाही हा पहिल्या सिद्धांताचा पर्यायनं येणारा उपसिद्धांत आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण सर्वजण शरीर भासत असलो आणि तसेच जगत असलो तरी मूळात आपण शून्य आहोत आणि राहतो त्यामुळे हा उलगडा होणं प्रत्येकाला सहज शक्य आहे. ते रहस्य नाही, आता या क्षणी असलेली वस्तुस्थिती आहे. लेखनचा हेतू - शरीराबरोबर मजेत कसं जगावं, शरीराविषयी नक्की काय दृष्टिकोन असावा आणि शरीर ही कशी कमालीची साधी आणि अफलातून रचना आहे हे समजावं असा आहे. ______________________________ पहिली गोष्ट, आपण शरीराच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे आहोत. आपल्याला आपण केवळ शरीराच्या आत आहोत असं वाटतं पण वस्तुस्थिती तशी नाही, हे शरीर समजून घ्यायला अत्यंत उपयोगी आहे. थोडक्यात शरीर कार सारखं आहे, कार आपल्याला इकडून तिकडे नेते खुद्द आपण हालत नाही आणि आपण कारच्या आत काय आणि बाहेर काय सारखेच असतो तसा फिनॉमिना आहे. फक्त सतत कारमधेच बसलेल्यामुळे आणि कार हीच आपली ओळख झाल्यामुळे आपल्याला आपण कार आहोत असं वाटतय. मूल जन्मल्यावर त्याचं पहिल्यांदा जेव्हा लक्ष वेधलं जातं तेव्हा त्याला `आपण आहोत' ही जाणीव होते आणि मग कुठे आहोत? तर शरीरात! अशी जी सुरुवात होते ती मग शेवटापर्यंत तशीच राहते. म्हणजे शरीर चाललं की आपणच चालतोय असं वाटतं, शरीराला भूक लागली की आपल्यालाच भूक लागली असं वाटतं आणि मृत्यूपर्यंत तर हे तादात्म्य इतकं गहन झालेलं असतं की आपणच मरतोय असं वाटतं. आपण शरीराच्या आत आहोत म्हणून बंदी झालोत असं वाटतं आणि शरीराचं ओझं वाटतं. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी आपण शरीराच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे आहोत याची नुसती दखल घेणं जगण्याचा सगळा रंग बदलतं, तुमचा मूड दिवसभर एकदम लाइट राहतो. _____________________________ दुसरी गोष्ट, शरीर हे केवळ तीन मूलभूत प्रक्रियांनी सक्रिय आहे: श्वसन, अभिसरण आणि उत्सर्जन. या तीन प्रक्रिया जर सक्षम असतील तर पूर्ण शरीर आरोग्यदायी राहतं. श्वसन उत्तम राहण्यासाठी दोन अत्यंत सोपे उपाय आहेत एक : प्राणायाम (भस्त्रिका, कपालभाती आणि अनुलोमविलोम) आणि दोन खेळ (टेबलटेनीस सर्वोत्तम). सर्वात सोपा प्राणायाम म्हणजे पाठ टेकून कुठेही शांत बसा आणि तोंडानं श्वास पूर्णपणे सोडा. जेव्हा श्वास पूर्ण बाहेर जाईल तेव्हा पोट पाठीकडे ओढलं जाईल मग फक्त तोंड बंद करा की नाकानं श्वास आत येईल. ही क्रिया तुम्ही खाल्यानंतरचे दोन तास सोडून केव्हाही आणि कुठेही करू शकता. श्वासाचा जोम कमी होण्याच एकमेव कारण म्हणजे उत्छ्वासाची प्रक्रिया शिथिल होणं आहे. तुम्ही उत्छ्वास जितका जाणीवपूर्वक आणि संपूर्ण कराल तितका श्वास सखोल होईल. केवळ दहा मिनीटात तुम्हाला उत्साह वाटायला लागेल. या प्रक्रियेत श्वास रोखणं नसल्यानं ती कुणीही निर्धास्तपणे करू शकतं. खेळणं व्यायामापेक्षा जास्त उपयोगी आहे कारण व्यायाम बंधन वाटतो, खेळाचं तसं नाही आणि चांगला ग्रुप असेल तर खेळणं दिवसाची धमाल सुरुवात करतं. प्राणायाम आणि खेळ श्वसन उत्तम ठेवतात. टेबलटेनीस मन आणि शरीर (विशेषतः डोळे) यांचा सहज समन्वय साधून देणारा हलका आणि वर्षभर, कोणत्याही वेळी आणि ऋतूत खेळता येणारा खेळ आहे. टेबलटेनीस इच्छा असेल तर कोणत्याही वयात शिकता येतं. अभिसरणासाठी योगासनाला पर्याय नाही. (१) पोटावर दाब येईल अशी आसनं (वज्रासनात हाताच्या मुठी पोटाशी ठेवून कपाळ समोर जमिनीला टेकवणं), (२) मांडी घालून बसून शरीराच्या वरच्या भागाचं रोटेशन (पिंगा), (३) त्याच स्थितीत मानेचं रोटेशन, (४) त्याच स्थितीत पावलांचं रोटेशन (५) खांद्यांचं रोटेशन आणि (६) बसून किंवा उभ्यानं पायाचे अंगठे धरणे या सहा प्रक्रियांनी संपूर्ण शरीर लवचीक ठेवून अभिसरण उत्तम ठेवता येतं आणि ते उत्सर्जनाला अत्यंत उपयोगी ठरतं. उत्सर्जन ही क्रिया सर्वस्वी: (१) शरीराची लवचीकता, (२) भरपूर आणि अनेकवेळा पाणी पिणं (३) श्वसनाचा जोम आणि (३) शरीराला रुचेल असा पूर्ण समाधान देणारा आहार यावर अवलंबून आहे. श्वसन, अभिसरण आणि उत्सर्जन या तीन प्रक्रिया उत्तम असतील तर पूर्ण मानसिकता विधायक होऊन इंडोक्राईन सिस्टिम (ग्रंथीस्त्रावाची प्रक्रिया) सक्षम राहते आणि कायम उत्साह वाटतो. उत्साह हा आरोग्याचा एकमेव मानदंड आहे. _________________________ संपूर्ण शरीर हे अन्नाचं रूपांतरण असल्यामुळे अत्यंत मनस्वी आहार हा जीवनातला फार मोठा आनंद आणि आरोग्याचा आधार आहे. आहार या प्रक्रियेचा सर्वात महत्त्वाचा आणि संपूर्ण दुर्लक्षित घटक भूक आहे. एक गोष्ट मी अत्यंत निश्चिंतपणे सांगू शकतो की भूके ऐवजी ` वेळ' हा भोजनाचा निर्णायक घटक केल्यानं आणि `चव' या नैसर्गिक संवेदनेएवजी `घटक पदार्थांचं विश्लेषण' करत बसल्यानं भोजनातली मजा संपली आहे. ______________________________________ विश्रांतीचं मुख्य सूत्र मानसिक प्रक्रिया जवळजवळ थांबणं हे आहे, झोपण्यापूर्वी सर्व कामं होताहोईल तो संपवणं हा मानसिक प्रक्रिया चालू न राहण्याचा एकमेव मार्ग आहे; न झालेली कामं माणूस मनानं करत राहतो आणि ते विश्रांती न मिळण्याचं कारण आहे. ___________________________ प्रत्येकाची व्यक्तीगत ध्येय निरनिराळी असली तरी निसर्गाचा एकमेव उद्देश पुनर्निर्मीती आहे (to proliferate itself) त्यामुळे सक्षम शरीरात प्रणयाची शक्यता नेहेमी जागृत असते. प्रणयाची क्षमता किंवा उर्जा माणूस सृजनासाठी वापरू शकतो मग ते गाणं असेल, कविता असेल, गद्य लेखन असेल किंवा चित्रकला असेल, ज्यात तुम्हाला गती आणि रूची आहे अशा कोणत्याही प्रकारचं सृजन तुम्ही करू शकता. आपण शरीर झालो नाही किंवा होत नाही, आपल्याला `शरीर आहे' ही संवेदना आहे. निसर्गानी शरीर हे आपल्याला दिलेलं साधन आहे त्याचा सृजनासाठी, अभिव्यक्तीसाठी आणि मजेत जगण्यासाठी उपयोग करा.

वाचने 6487 वाचनखूण प्रतिक्रिया 28

पुंडलीकवर्दाहारीविठ्ठल श्रीज्ञानदेवतुकाराम >> शरीर ही कशी कमालीची साधी आणि अफलातून रचना आहे ... माझ्या समजाप्रमाणे शरीर ही एक कमाल गुंतागुंतीची गोष्ट आहे. साध्या एकपेशीय प्राण्यापासून मानव, इतर प्राणीमात्रांमध्ये जे काही कार्य शरीर करते त्याला तोड नाही. त्या शरीरातील/ पेशीतील प्रत्येक गोष्ट दुसर्‍या गोष्टीशी निगडीत आहे. अर्थातच शरीर ही साधीसुधी रचना तर नाहीच नाही. बाकी लेखातील दुसरा भाग समजण्यासाठी सुसह्य झाला आहे. (अर्थात हा आमच्या बुद्धीचा आवाका आहे.)

तथापि सुरुवातीचा बराच भाग हा डोक्यावरून गेला. मात्र नंतरचा भाग कळायला सोपा गेला. असे मार्गदर्शन इतक्या सहजपणे मिळणे माझ्यासारख्यांसाठी भाग्याची गोष्ट आहे.

मराठे 07/06/2012 - 04:26
कारप्रमाणे शरिराचीही व्यवस्थित काळजी घेण्याची गरज आहे.. वगैरे दुसरा भाग बर्‍यापैकी समजला. पण जर शरीर म्हणजे कार असेल तर 'डायवर कोन हाय?'

निराकार, अवकाश किंवा स्पेस (अध्यात्मिक परिभाषेत - सत्य, आत्मा, शून्य, उपस्थिती, साक्षी, सनातन वर्तमान, अव्यक्त, परम शांती इत्यादी) ही काय वास्तविकता आहे आणि ती प्रत्येक प्रकटीकरणाचा आधार कसा आहे हे असं समजू शकेल : स्वर ही अभिव्यक्ती आहे, प्रत्येक स्वराचा स्त्रोत शांतता आहे; शांतता निराकार, अनिर्मीत आणि सर्वव्यापी आहे, निराकाराचा वेध घेण्याचं ते आणखी एक परिमाण आहे. प्रत्येक स्वर शांततेत निर्माण होतो, शांततेवरच स्थिर असतो आणि शांततेतच विलीन होतो. स्वर निर्माण झाल्यावर शांतता हरवली असं वाटतं पण शांतता कशी हरवेल? तीनंच तर स्वर धारण केलेला असतो. अशा तर्‍हेनं स्वर हा `आकार' शांतता या `निराकार' परिमाणावर व्यक्त, काही क्षण श्राव्य आणि नंतर विलीन होतो. याच प्रमाणे प्रत्येक आकाराची (किंवा प्रकटीकरणाची) उत्पत्ती, स्थिती आणि लय निराकारात होत असते. हा निराकार सतत उपस्थित असतो आणि तो प्रत्येक आकार अंतर्बाह्य व्यापून असतो. सर्व अस्तित्व या निराकाराचं बनलंय त्यामुळे देहानं आपण प्रकट झालो असलो तरी मूळात आपण निराकार आहोत. देहरुपी कारला आपण अंतर्बाह्य व्यापून आहोत आणि चालणं, बोलणं अशा ऐच्छिक क्रियात आपण तिचे ड्रायवर आहोत, रुधिराभिसरण, श्वसन, उत्सर्ग, जनन, मरण वगैरे अनैच्छिक क्रिया निसर्गाकडून नियंत्रित आहेत

यकु 07/06/2012 - 10:07
'डायवर कोन हाय?'
आणि लायसन? लायसन बगू? शिवराम गोविंद नाव सांगा. हे बगा सायेब आमाला आमच्या लायनी परमानं जाऊ द्या. आधीच जास्त झालीय. ;-)

In reply to by यकु

मदनबाण 07/06/2012 - 19:16
आधीच जास्त झालीय. यकु हे इथल्या सगळ्यांनाच आता कळलयं रे ! पुढच्या वेळी इंदुरात आलो ना की सरळ तुलाच भेटतो कसा ! कशाला ? बम भोले करायला ! ;) (मदन प्रेमीनाथ ) ;)

In reply to by कवितानागेश

ओ ताई, ते सोडा, आधी मूळ वाक्याचा अर्थ लावायचे धाडस असणारा कुणीतरी शोधा !!! "उपरोक्त लेखाचे निरुपण करुन आधुनिक ज्ञानेश्वर धाडस आहे का कुणाच्यात?" म्हणजे नक्की काय ? अवांतर :- गोट्या (भाग ३) मधली दिवाळीची कविता आठवली.

In reply to by ऋषिकेश

बॅटमॅन 07/06/2012 - 17:28
'देहा' वरच्या धाग्याशी आपल्या प्रतिसादाचा 'यॉन' संबंध पाहून एक मिपाकर म्हणून * रम वाटावी असा बेत आहे. *कै नै हो तिकडे पांढर्‍या शैने लिहिलेले. बस्ले शोधत ;)

आदिजोशी 07/06/2012 - 20:10
वैचारिक बोळा - हा सर्वात भयानक बोळा. ह्या माणसांना आंतरजालीय मराठीत 'उच्चभॄ' म्हटले जाते. हा बोळा ज्याच्यात अडकला तो माणूस म्हणून जगणं बंद करून वैचारिक पातळीवर जगू लागतो. अशा लोकांना शरीर म्हणजे अडचण वाटू लागते. शरीर हा विचारांना जखडून ठेवणार पिंजरा वाटू लागतो. बिर्याणी चापणे ह्या क्रियेला शरीराचे भोग असं म्हटलं जातं. प्रत्येक गोष्टीत विचार, त्या गोष्टीच्या आधीचा-मागचा विचार सुरू होतो. त्यामुळे होतं काय की कृती करणं बंद पडतं. एखादी गोष्ट करण्याचा विचार करण्यापुढे ह्यांची गाडी जातच नाही. विचार संपले की माणूस संपला, विचारमग्न मन म्हणजे म्हणजे जिवंतपणाची खूण, अशी वाक्य फेकली जातात. अती विचाराने ह्यांना नको नको ते भ्रम होऊ लागतात. शब्दांमधले शब्द दिसू लागतात. सूर्याला 'रवी' हे नाव दिलं कारण सूर्योदयाबरोबर पृथ्वीवर पोचणारा त्याचा प्रकाश चराचर घुसळून काढतो अशा कल्पना सुचू लागतात. ही लोकं सर्वसाधारणपणे कायम अगम्य बडबडतात आणि उर्वरित जगाला निर्बुद्ध समजतात. मुख्यतः आपलं बोलणं कुणाला समजू नये ह्या पातळीवर ते नेऊन ठेवतात. आपले विचार हे काळाच्या पुढे असून ते समजण्यासाठी लागणारी विचारांची प्रगल्भता आपल्याकडेच आहे ह्या विचारावर ते विचारपूर्वक शिक्कामोर्तब करतात. हा बोळा अडकलेल्या व्यक्ती कायम अस्वस्थ असतात. सतत तगमग सुरू असते. ही तगमग आपल्याला दूध देण्यासाठी भैय्याला इतक्या पहाटे उठावं लागतं इथपासून ते जे पाणी रिसायकल करायला निसर्गाला ८ महिने लागतात ते आपण ८ मिनिटाच्या अंघोळीत वाया घालवतो इथपर्यंतही असू शकते. हा बोळा काढण्याचा एकमेव उपाय म्हणजे अशा लोकांना बैठकीला घेऊन बसणं आणि सांगणं की 'बाबा रे, असं काही नसतं. ते तुझ्या आणि फक्त तुझ्याच विचारांचे खेळ आहेत'. २-३ ऑन द रॉक्स पोटात गेले की मग विचार आणि कृती ह्यांच्यातील सीमारेषा विरळ होऊ लागून हळू हळू दोन्ही एक होऊन जातात आणि वैचारिक बोळा सहजपणे निघतो, पाणी वाहतं होतं. ---------------------------- मानसिक बोळा - हा बोळा अडकलेल्या लोकांचं मन मुसळधार पावसानंतर उसळणार्‍या झर्‍याप्रमाणे असतं. म्हणजे आनंदी, उत्साही नव्हे, तर वेडं-वाकडं धावणारं. ह्यांचं मन कुणाचं ऐकत नाही. अगदी ह्यांचंही नाही. मन एकीकडे आणि चित्त एकीकडे अशी अवस्था होऊन बसते. मनावर कंट्रोल राहत नाही. मनाला प्रश्न पडू लागतात. मन विचार करू लागतं. पण हे सगळं ह्यांच्या अपरोक्ष. मग हळू हळू अशा मनाची भीती वाटू लागते. मन कधी कुठला विचार करील हे माहिती नसल्याने मनाला वार्‍यावर सोडलं जातं. मन मनास उमगत नाही अशी परिस्थिती उद्भवते. मन आणि हे स्वतः अशा दोन पूर्णपणे वेगळ्या व्यक्ती एकाच शरीरात नांदू लागता. मग सुरू होतो मनाशी झगडा. स्वत:च्या मनाला प्रश्न विचारणं. त्यात बर्‍याचदा मनाची सरशी होते. ही लोकं कधीही एक व्यक्ती म्हणून वावरत नाहीत. आतला मी, बाहेरचा मी, आतल्या-बाहेरच्या मधला मी, ऑफिसातला मी, घरातला मी, गुत्त्यावरचा मी असे वेगवेगळे 'मी' ह्यांच्यात असतात. प्रत्येक 'मी'चं मनही वेगळं असतं आणि ते स्वतंत्र विचार करतं. बरीच वर्ष हा बोळा अडकून राहिला की मग अशा दुभंगलेल्या वागण्याची पुढची पायरी येते. मी नाही माझं मन म्हणतं इथून सुरुवात होते. मनाचा वेगळा विचार केला जातो, ऐकला जातो. पुढे सगळे अवयव स्वतःला हवं तसं वागू लागतात. मी लिहीत नाही, माझा हात लिहितो. मी चालत नाही, मनाची हाक ऐकून पायच चालू लागतात अशा भयाण अवस्थेपर्यंत हा बोळा नेऊ शकतो. 'रे पोटा तुला भूक लागली तर गुरगुरून मला का त्रास देतोस? हात आणि तोंडाला सांगून तुझी काय ती व्यवस्था लाव' अशी आज्ञा मन देतं. हा बोळा काढण्याचा एकमेव उपाय म्हणजे अशा लोकांना बैठकीला घेऊन बसणं आणि सांगणं की 'बाबा रे, असं काही नसतं. ते तुझ्या आणि फक्त तुझ्याच मनाचे खेळ आहेत'. २-३ ऑन द रॉक्स पोटात गेले की मग मन आणि चित्त ह्यांच्यातील सीमारेषा विरळ होऊ लागून हळू हळू दोन्ही एक होऊन जातात आणि मानसिक बोळा सहजपणे निघतो, पाणी वाहतं होतं.

In reply to by आदिजोशी

आणि दुसरी गोष्ट तुम्हाला काही समजावून घ्यायची इच्छाही नाही, त्यामुळे प्रतिसादाला पास देतो

In reply to by आदिजोशी

अर्धवटराव 08/06/2012 - 00:52
मानसोपचार शिकायला डिग्री वगैरे कशाला घ्या म्हणतो मी. दोन परिच्छेदात सगळं कोळुन पिलं तुम्ही कि वो... शिवाय उपाय अगदी स्वस्त-मस्त... दोन पॅग ऑन द रॉक्स, बस्स्स्स !! अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

तर उपनिषदं वगैरे झक मारत गेली असती, आला प्रश्न की लाव पेग, हाय काय आणि नाय काय!

In reply to by संजय क्षीरसागर

अर्धवटराव 08/06/2012 - 03:50
संजयजी, आदि ज्या प्रश्नांसंबंधी बोलतोय त्याला पेग हे प्रातिनिधीक सोल्युशन आहे. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

एक तर अध्यात्म हरक्षणी येणारा आणि जीवनातल्या प्रत्येक विषयाशी संबंधित (मग ते मन असो, की नाती, की शरीर, की पैसा, मृत्यू, संगीत सृजन, की प्रत्येकाला हवासा वाटणारा स्वच्छंद) पैलू आहे. आदिनं बहुदा माझा प्रोफाइल, इतर लेखन, प्रतिसाद वगैरे काहीही न पाहता सरळ त्याच्या पूर्वप्रकशित लेखातला भाग इथे पेस्ट केलाय, त्यानी ते पाहिलं असतं तर असा प्रतिसाद दिला नसता. इतर तिरकस प्रतिसाद देखील असेच लेख शांतपणे न वाचता दिलेले आहेत कारण मृत्यू या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माझ्या प्रतिसादाचं (http://www.misalpav.com/comment/reply/21852/402067) सर्वांना उपयोगी व्हावं असं सहज आणि अत्यंत मूलभूत विवेचन म्हणजे हा लेख आहे. जे मन:पूर्वक वाचतील त्यांना नक्की उपयोग होईल अशी आशा आहे, सर्व प्रामाणिक प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत या उप्पर आता तुम्हा सर्वांची मर्जी!

In reply to by संजय क्षीरसागर

अर्धवटराव 08/06/2012 - 19:48
>>एक तर अध्यात्म हरक्षणी येणारा आणि जीवनातल्या प्रत्येक विषयाशी संबंधित (मग ते मन असो, की नाती, की शरीर, की पैसा, मृत्यू, संगीत सृजन, की प्रत्येकाला हवासा वाटणारा स्वच्छंद) पैलू आहे. -- असावा. तसा अनुभव गवसला तर फार फार आनंद होईल. >>आदिनं बहुदा माझा प्रोफाइल, इतर लेखन, प्रतिसाद वगैरे काहीही न पाहता सरळ त्याच्या पूर्वप्रकशित लेखातला भाग इथे पेस्ट केलाय, त्यानी ते पाहिलं असतं तर असा प्रतिसाद दिला नसता. -- शक्य आहे. पणा ते आदिच जाणे. मला त्याचा प्रतिसाद (तुमच्या मुळ लेखाचा काँटेक्स्ट न लावता) फार मौलीक वाटला. >>इतर तिरकस प्रतिसाद देखील असेच लेख शांतपणे न वाचता दिलेले आहेत... -- हे मिपाच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक आहे. >>...कारण मृत्यू या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माझ्या प्रतिसादाचं (http://www.misalpav.com/comment/reply/21852/402067) सर्वांना उपयोगी व्हावं असं सहज आणि अत्यंत मूलभूत विवेचन म्हणजे हा लेख आहे. जे मन:पूर्वक वाचतील त्यांना नक्की उपयोग होईल अशी आशा आहे, सर्व प्रामाणिक प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत या उप्पर आता तुम्हा सर्वांची मर्जी! -- तरी तुम्ही नशीबवान आहात साहेब... तुम्हाला कोणि अजुन पुरावे मागितले नाहित... मिपावर पुराव्यांसंबंधी प्रचंड गोंधळलेले असे अनेक संमंध वावरतात, मानेवर बसतात, डोक्यात जातात. बाकी तुम्ही वयाने (बहुतेक) आणि ज्ञानाने (निश्चित) माझ्यापेक्षा जेष्ठ आहात. पण तरिही माझ्या गुरुंचे, भाईकाका देशपांड्यांचे एक तत्वज्ञान ऐकवतो... "पुराणीक बुवाने पुराण सांगत जावे". अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

का समजला नसावा याची मला कल्पना आली त्यामुळे हा प्रतिसाद: त्याचं थोडक्यात म्हणणं असय : >देहाच्या हार्डवेअरला निराकारासंबंधी विचारांचे सॉफ्टवेअर शह देतय, अगदी चेक मेट. इथे निराकाराचं अस्तित्व स्विकारा वा स्विकारु नका असं बायनरी ओप्शन आहे. अधेमधे विचारांना श्वास घ्यायला मोकळी जागाच नाहि. अशा परिस्थितीत गुदमरल्या सारखं होतं पब्लीकला. मग ते येण्याचं-प्रतिसाद देण्याचं-लॉजीकल कम्युनीकेशन करण्याचं टाळतात. >लेखात शरीर आणि निराकाराच्या सहचर्येवर म्हणावा तितका एम्फसीस नाहि. लोकं शरिराला निराकाराच्या निवार्‍यापुरती सोय, इतक्या साध्या दृष्टीकोनातुन बघु शकत नाहि. शरिराचं ममत्व आड येतं. >शिवाय तुम्ही म्हणताय तसं आकलनातल्या द्वंद्वात देखील सफोकेशन आहे, निराकार शरिरामार्फत कळायला हवा या आग्रहात देखील आहे... आपण शरीर आहोत या धारणेतला इनर्शीया इतका जबरदस्त आहे कि निराकार वगैरे कन्सेप्टला तो मनाच्या तळाशी उतरुच देत नाहि. पाण्याची भिती वाटणार्‍याला तुम्ही पोहोण्याचा आनंद कितीही पटवुन द्या, तो अगदी ३ फूट पाण्यात देखील उतरणार नाहि. = यावर माझं म्हणणं सारांशानं देतोय : माझ्या मनातलं द्वंद संपल्यामुळे तसं झालंय पण, इथे सांगितलेला खालील भाग मला प्रत्येक वेळी वेगवेगळ्या अँगलनं मांडायला हवा आणि वाचकांच्या मनात द्वंद्व आहे हे भान ठेवून मला लिहायला हवं - निराकार आणि आकार यात द्वैत किंवा विरोध नाहीये. द्वंद्व आपल्या आकलनात आहे कारण निराकर श्रेष्ठ आणि आकार दुय्यम ही धारणा आपल्या मनत पूर्वापार रुजवली गेलीये. नाही, ... शरीर आहे तोपर्यंत आपण निराकार आणि आकार दोन्ही आहोत आणि आगदी आनंदानं, समन्वयानं आहोत कारण ती वस्तुस्थिती आहे. आपण घर (किंवा कार) नसलो तरी आपला निवास आणि वावर त्यात आहे. जाणीव आपल्याला होतेय आणि मेंदू हे साधन आहे. आता कुठे शह आणि मात असा प्रश्न येतो? सफोकेशन हे अनाकलानामुळे आहे आणि काय आहे तो गैरसमज? तर हाच की जाणीव म्हणजे काही तरी `पर' आहे आणि नियंत्रण सुटणार आहे, नाही जाणीव आपण खुद्द आहोत आणि आपल्याला शरीराची (त्या बरोबर मेंदूची, त्यातल्या संवेदनांची, विचारांची) जाणीव आहे. आणि लेखात मी हे स्वानुभवानं आगदी सहज आणि सोप्या भाषेत मांडलय. वेळोवेळी दिलेल्या सविस्तर प्रतिसादांबद्दल अराचे आभार !

In reply to by आदिजोशी

. बोळा काढण्याचा एकमेव उपाय म्हणजे अशा लोकांना बैठकीला घेऊन बसणं .
मस्तच !! पण कुणाकुणाला दोन-तीन पेग नंतर आत्मा, परमात्मा, शून्य , अवकाश वगैरेवर बोलायला आणखीणच उर्जा मिळत असेल तर जरा जपून हं...नाहीतर तुम्हालाच चढायची नाही आणि पेग वाया जायचे.

आवडले. उत्साह हा आरोग्याचा मानदंड - हे विशेष आवडले. भुकेऐवजी वेळ हा खाण्याचा क्रायटेरिया ठरवणे अयोग्य आहे - हे पटले.

अस्तित्वातलं सर्व प्रकटीकरण शून्यातनं (किंवा अवकाशातनं ) होतं त्यामुळे ते निराकार आणि सर्वव्यापी अवकाश सतत प्रत्येक आकार अंतर्बाह्य व्यापून आहे म्हंजि काय ? आस्मादिका काहिहि झेपले नाहि.

In reply to by ईश्वरसर्वसाक्षी

संदीप डांगे 20/01/2016 - 14:44
हे समजून घेणे फारच सोपे आहे. आकलनाच्या कक्षेत अनुभूतीचे परिपेक्ष संतुलित केले की जाणिवांच्या गाभार्‍यात अंतर्बाह्य अभिव्यक्ती दाटून येते. तीचे उमाळे सहजसोप्या शब्दात मांडले की झाले.