स्त्रीप्रधान संस्कृती
स्त्रीप्रधान अथवा मातृसत्ताक पद्धती:
आपल्याकडे बर्याच काळापासुन पितृसत्ताक पद्धती आणि त्याच्या अनुषंगाने पुरुषप्रधान संस्कृती चालत आलेली आहे. गेल्या काही वर्षांपासुन मात्र स्त्रिया विविध क्षेत्रांमधे पुरुषांच्या बरोबरीने वाटचाल करीत आहेत. भविष्यकाळात कदाचित त्या पुरुषांच्या दोन पावले पुढे जाऊन प्रगती करतील. असे जर झाले तर मातृसत्ताक पद्धती (आणि त्या अनुषंगाने महिला/स्त्रीप्रधान संस्कृती) यायला वेळ लागणार नाही. त्यावेळची परिस्थिती कशी असेल ह्याचे कल्पनाचित्र रेखाटण्याचा प्रयत्न करत आहे.
मुल वडिलांच्या नावाएवजी आईचे नाव लावेल. वडिलांनी अर्थातच त्यांच्या लग्नापासुन बायकोचे अडनाव लावायला सुरुवात केली असेल. संजय लीला भन्सालीची द्रष्टा पुरुष म्हणून गणना केली जाईल.
लग्न ठरविताना मुलाच्या आई-वडिलांना मुलींच्या घरचे उंबरठे झिजवावे लागतील. मुलाला दाखवून (म्हणजेच "कांदा-पोहे" कार्यक्रम करून) मुलीकडच्यांची पसंती मिळवावी लागेल. मुलगा विविध कलांमधे कसा पारंगत आहे हे त्याचे वडिल ठासुन सांगतील. विविध कला म्हणजे उदाहरणार्थ- अ) रोजच्या रोज ताजी आणि स्वस्त भाजी आणणं ब) झणझणीत आणि चवदार असा स्वयंपाक करता येणं. (दोन-पाच पाहुणे इकडे-तिकडे झाले तरी चव अजिबात न बिघडणं !!!) , इत्यादि.
मुलगा कामाहुन घरी परतल्यावर जर निवांत बसुन टीव्ही पहात बसला तर त्याचे वडिल त्याला दटावतील "घरी आल्यावर निवांत पाय पसरुन बसायचं सुवर्णयुग गेलं आता. लग्न झाल्यावर सासरी असं चालेल का? ऊठ पटकन आणि मला स्वयंपाकात मदत कर."
लग्नाचा खर्च अर्थातच मुलाकडचे करतील. सद्यस्थितीत वरमाईला जसे महत्व आहे तसेच महत्व वधुच्या आईला येईल. वधुला नटुन थटुन मांडवात यायला कितीही वेळ लागला तरी भटजी आणि वराकडच्या मंडळींना शांत बसावं लागेल. वराकडची पुरुष मंडळी वधुचे पाय धुतील.
वरपक्ष रुखवतात मुलाने पाककलेत मिळवलेले प्रशस्तिपत्रक, शाळा-महाविद्यालयात मिळवलेली बक्षिसे मांडुन ठेवेल. शेवटी अर्थातच मुलाला मुलीच्या घरी (म्हणजे सासरी) रहायला जावं लागेल.
मुलाचं अडनाव (आणि मुलीला वाटलं तर नावही) बदलेल. घर आणि कार्यालय अशा दोन्ही आघाड्या कदाचित त्याला सांभाळाव्या लागतील. माहेरी दीर्घ कालावधीसाठी जाण्यासाठी मात्र त्याला प्रबळ कारण मिळणार नाही.
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांतदेखील स्त्रियांचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढेल. पतीला तुरुंगात जावं लागल्यामुळे पत्नीला मुख्यमंत्रीपद मिळण्याचे दिवस जातील. स्त्रिया स्वत: निवडणुका लढवून विविध पद भुषवतील. स्त्रियांवरचे अत्याचार, हुंडाबळी बंद होईल. मुलींना शिक्षण मिळण्यात अडचण येणार नाही.
चित्रपटांमधे नायिकांना नगण्य भुमिका देणं बंद होईल. पुरुषांच्या वाट्याला हिरॉईनला तिच्या ध्येयात मदत करणारा मित्र, आघाडीच्या उद्योजिकेचा वाहनचालक, घरगडी, ऑफिस-बॉय अशा फुटकळ भुमिका येतील.
अर्थातच, पुरुष फार काळ अशा समाजव्यवस्थेला सहन करु शकणार नाहीत आणि परत पुरुषप्रधान संस्कृती उदयास येईल.
वाचने
3446
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
चांगलंच आहे!
अर्थातच,
लेखन समाधानकारक वाटले नाही
तात्या आणि
वा!