Skip to main content

शनी मंगळ युती

लेखक धोंडोपंत यांनी सोमवार, 12/05/2008 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, ज्योतिष्यातील अत्यंत वाईट समजल्या गेलेल्या शनी मंगळ युतीवर आम्ही आज भाष्य करीत आहोत. ही युती दिनांक २१ जून रोजी होणार आहे. युतीचे दिप्तांश १० अंश आहेत. म्हणजे मंगळ हा शनीजवळ १० अंश आल्यापासून ते शनीपासून १० अंश जाईपर्यंत या युतीचे परिणाम जाणवतील. दिनांक २१ जून रोजी मंगळ कर्केत २९ अंश ४३ कलांवर असेल व त्या दिवशी शनी सिंहेत ०९ अंश ४२ कलांवर असेल. त्या दिवसापासून ही युती सुरु होईल. दिनांक १० जुलै रोजी ही युती एका अंशात म्हणजे अंशात्मक असेल. त्यानंतर मंगळ पुढे निघून जाईल व दिनांक ३१ जुलै रोजी ही युती पूर्णपणे तुटेल. Mars- Saturn conjunction हा सर्व पद्धतीच्या ज्योतिर्विदांनी एक जबरदस्त कुयोग मानलेला आहे. अत्यंत वाईट फळे देणारी ही युती आहे. या फळात मोठे अपघात, ज्यात अनेक माणसे मृत्युमुखी पडतात अशी नैसर्गिक अरिष्टे, वादळे, घातपाती कारवाया, रक्तपात, दहशतवाद, इमारती कोसळणे, बॉम्बस्फोट, भूकंप, मोठमोठ्या आगी, रसायन आणि वायुगळती अशा प्रकारची फळे मिळतात. तसेच व्यक्तिगत पातळीवर कुंडलीत ज्या स्थानात ही युती पडते, त्या स्थानाने दर्शविलेल्या बाबतीत एखादे जबरदस्त अशुभ फळ मिळते. सध्या कर्क, सिंह आणि कन्या या राशी साडेसातीत आहेत. त्या राशीच्या लोकांनी फार सावध रहावे. खरे तर सर्वांनीच सतर्क रहावे. मागील वेळी जेव्हा ही युती झाली होती तो दिवस अजूनही आम्ही विसरलेलो नाही. तेव्हा गुरूपौर्णिमेच्या दिवशी मुंबईमध्ये लोकल गाड्यात बॉम्बस्फोट झाले होते. १२ जुलै २००६. त्या दिवशी गुरूपौर्णिमा होती. आम्ही गुहागरला होतो. दुपारी गुहागरहून गुरूपौर्णिमेनिमीत्त चिपळूणला आलो. आमच्या गुरूंच्या घरी दूरदर्शनच्या बातम्या लावल्या तेव्हा त्या भीषण बॉम्बस्फोटाची दृष्ये पाहून हबकलो. जसजसा मंगळ शनीच्या जवळ येतो तसतसा वातावरणात फरक पडतो. ब्रह्मदेशात येऊ घातलेले चक्रीवादळ याचीच सूचना देते आहे काय? या दिवसांत सर्वांनी सतर्क आणि सावध रहावे. कोणताही अनुचित प्रकार दिसल्यास किंवा कोणी संशयास्पद रितीने वावरतांना दिसल्यास संबंधित शासकीय अधिकार्‍यांना त्याची त्वरीत सूचना द्यावी. अफवांवर विश्वास ठेऊ नये. रात्रीचे प्रवास शक्य असल्यास टाळावेत. रेल्वे स्थानके, बस स्थानके, सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, बगीचे, चित्रपटगृहे येथे वावरतांना आजूबाजूस बारीक लक्ष ठेवावे व जबाबदार नागरिकाचे कर्तव्य पार पाडावे. आपला, (सावध) धोंडोपंत
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7660
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

पटवुन घ्यायचा खुप प्रयत्न केला, पण छ्या.जमलं नाही. त्याच त्या फल-ज्योतिषाबद्दलच्या शंका डोक्यात येउ लागल्या. पण ते काही असो, आपली सल्ला देण्यामागची भावना,आपुलकी पोचली. त्याबद्दल धन्यवाद. आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

७.८रिश्टर स्केलचा भूकंप झालाय. म्यानमार मधे नुकतेच भयावह चक्रीवादळ येऊन गेले. अशा मोठ्या नैसर्गिक आपत्ती आणि शनि-मंगळा सारख्या युती ह्यांचा कार्यकारण संबंध दाखवायचा झाल्यास अशा आपत्ती युती काळात किती आलेल्या आहेत, त्यांची संख्या, तीव्रता, वारंवारता आणि सर्वसाधारण परिस्थितीत (अशी युती) नसताना आलेल्या आपत्ती त्यांची संख्या, तीव्रता, वारंवारता ह्याचा सांख्यिकी अभ्यास झाला तर ह्या दिशेने अधिक संशोधन व्हावे ह्याला पुष्टी मिळेल किंवा त्यात तथ्य नाही असे नक्की होईल. चतुरंग

In reply to by चतुरंग

या ठिकाणी पहा.थोडाफार तुम्हाला अपेक्षित असलेला प्रयोगच चालु आहे. आपल्या मि.पा आणि उपक्रमावरचे प्रकाशकाकांचं सुद्धा ह्यात नाव आहे. पाहुयात काय होतय ते. आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

"तसेच व्यक्तिगत पातळीवर कुंडलीत ज्या स्थानात ही युती पडते, त्या स्थानाने दर्शविलेल्या बाबतीत एखादे जबरदस्त अशुभ फळ मिळते..." हे स्थान गोचरी चा शनि ज्या स्थानात आहे ते धरायचं का मुळ पत्रिकेत ज्या स्थानात आहे ते धरायचं? (धनू राशीला बहुतेक नववा शनी आहे.. म्हणजे नवव्या स्थानात युती चं फळ मिळणार का?)

अजुन एक प्रश्न विचारायचा होता तो म्हणजे माया इंका संस्कृतीचे पचांग १२/१२/२०१२ पर्यतच कालगणना दाखवते. म्हणजे २०१२ नंतर काय होणार ? वेताळ

सावध केल्याबद्दल धन्यवाद रे तुला! :) आपला, (मराठी संस्थळांवरचा शनि!) तात्या.

मास्तर घाबरले...( म्हणजे आम्हीच..) ... ( भित्रा साडेसातीग्रस्त )मास्तर

"तसेच व्यक्तिगत पातळीवर कुंडलीत ज्या स्थानात ही युती पडते, त्या स्थानाने दर्शविलेल्या बाबतीत एखादे जबरदस्त अशुभ फळ मिळते..." हे कसं समजायचं... (१) कोणतं स्थान कशाशी निगडीत आहे. (२) कोणत्या स्थानात युती पडतीये.

पंत, शनी मंगळ पासून सावध केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. खरं तर नेहमीप्रमाणे अशा गोष्टींवर आमचा विश्वास आहे, आणि नाहीही :) पंत, म्यानमारमधील चक्रीवादळाने हजारो लोक मरण पावले आणि ते जुंटा सरकार जीवंत असलेल्या लोकांपर्यंत मदत पोहचवु देत नाही. त्या सरकारच्या धोरणात बदल संभवतो का ?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जुंटा सरकार माजोरडे आहे, लष्करी कारवाई करुन चेचायला पाहिजे साल्यांना. अवांतरः निलकांत ने Aung San Suu Kyi यांच्यावर एखादा फर्मास लेख लिहावा अशी या निमित्ताने विनंती.

In reply to by आनंदयात्री

अवांतरः निलकांत ने Aung San Suu Kyi यांच्यावर एखादा फर्मास लेख लिहावा अशी या निमित्ताने विनंती. मलाही वाचायला आवडेल या विषयावर.... (मिपा वाचक) मदनबाण.....

मोठे अपघात, ज्यात अनेक माणसे मृत्युमुखी पडतात अशी नैसर्गिक अरिष्टे, वादळे, घातपाती कारवाया, रक्तपात, दहशतवाद, इमारती कोसळणे, बॉम्बस्फोट, भूकंप, मोठमोठ्या आगी, रसायन आणि वायुगळती अशा प्रकारची फळे मिळतात. ह्या मध्ये नेमके आपल्या आवडीचे संकेत स्थळ बंद होणे., त्याला तांत्रिक अडचणी येउन त्यातील सगळ्यांचे छान छान लेख खड्ड्यात जाणे., असले योग पण घडतात का हो? आता थोडे व्यक्तिगत दुष्परीणामांबद्दल:- सर्वांचे लेख जरी शाबुत आणि ठणठणीत राहिले, तरी सरपंचाची एखाद्या लेखावर (उगिचच) नाराजी होउन ते उडवुन देतील काय हो? का शनीची एखाद्यावर दृष्टी वक्री असल्याने,तो लिहिल ते सर्व मान्य होइल.(म्हण्जे कितीही प्रयत्न केला तरी त्याच्याकडुन चांगला झकास वाद घाल्ता येइल ,असं काही लिहिलच जाणार नाहि.आणि वाद नाही,प्रतिसाद नाही म्हंजे लेखाची पॉप्युल्यारिटी ग्येलीच की चुलित.)हे सगळं ,किंवा ह्यातील काही होइल का हो? आता थोडं समुह्-मती-भ्रष्ट योगा बद्दलः- त्या भैय्यांच्या डोक्यावर परिणाम होउन ते चक्क चांगले वागु लागतील काय हो? माझा म्यानेजर वेड्यासारखं वागुन, मी केलेल्या कामचं श्रेय घेणं सोडुन देइल काय हो? हे मराठी खेकडे इतर मराठी माणसांचे पाय ओढण्याचा स्वभाव सोडतील काय हो? तो बुश डोक्याचे नियंत्रण गेल्यामुळे चक्क चांगला वागेल काय हो?तो भारताला खोटी दूषणे देणे सोडील काय हो? ह्या नेते लोकांची मती फिरुन ते गरीब्,जनसामान्यांचे(आणि पर्यायाने देशाचे) वाटोळे करणे थांबव्तील काय हो? ह्या शेवटच्या परिच्छेदातील काही गोष्टी होणार असतील(लोकांची डोकी फिरुन क असेना) तर काय हरकत आहे? मी तर म्हणतो मग शनी-मंगळच शनी आणि इतर सार्‍या ग्रहांची अशी युती सदैव होउ दे....... (माझ्या कुंडलीत चं-बु का चं-गु युती असल्याने दिलेल्या विषयाचे विषयांतर करण्याचे कसब आहे. शिवाय हर्शल का नेपच्युन म्हणतात तो,गुढ विद्येचा कारक उच्चीचा आहे.पण गुढ विद्या तर सोडाच, साध्या अभ्यासातही,विद्येतही "ढ गोळा" हीच आमची ख्याती आहे. (किमान दहा ज्योतिष्यांनी आजवर हे ऐकवलय कि "गुढ विद्या" मला प्राप्त आहे.पण च्यामारी, माझ्या आअधी त्यांनाच ह्याचा पत्ता कसा लागला?) ) आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

धोंडोपंत, नेहमी प्रमाणे चर्चा/लेख टाकुन पसार झालात. वाचकांच्या प्रश्नांना उत्तरे द्या की. -नंदा

धोंडोपंतानी सावध गिरीचा सल्ला दिला होता आणि कालच जयपुर मध्ये बॉम्बस्फोट झाले. अवकाशातल्या ग्रहाचां आणि आपला खरच काही संबध असतो कि काय या विचारात पडलो आहे. का अतेरेकी आजकाल ग्रहांची स्थिती बघुन कारवाया करतात. ---आनंद.