Skip to main content

२०१०: एक उत्तम वर्ष

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 31/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
२०१० ला बाय बाय करायची वेळ आली आहे. अश्यावेळी वाटेवर थांबून जरा मागे सरलेल्या २०१०कडे बघताना काय वाटतं? मला तरी हे सरतं वर्ष भारताच्या दृष्टीकोनातून एक उत्तम वर्ष वाटतं. एक धावता आढावा: क्रिडा: क्रिडा क्षेत्राकडे बघता हे वर्ष भारतासाठी अप्रतिम गेलं यात वादच नाही. राष्ट्रकुल खेळांच्या (शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखायला लाऊन नंतर) केलेल्या दैदिप्यमान प्रदर्शनाबरोबरच त्यात भारतीय खेळाडूंनी केलेली पदकांची लयलूट, मिळवलेलं दुसरं स्थान सारंच स्वप्नवत होतं. आशियायी खेळातही आतापर्यंत सर्वाधिक मिळालेली पदके क्रिडाक्षेत्रातील भारताच्या वाढत्या परिघाची ग्वाही देत होती. केवळ याच खेळांत नाही तर क्रिकेटमधील अव्वल कसोटी संघ बनणे, डेव्हिस कपात विश्व गटात खेळणे वगैरे सांघिक यश मिळवतानाच सचिन, सायना, मेरी, अखिलकुमार वगैरे नेहमीच्या यशस्वी कलाकारांपासून ते सोमदेव किंवा अनिशा सय्यद सारख्या दोन सुवर्ण पटकावणार्‍या तरीही काहिशा अपरिचित असणार्‍या गुणी खेळाडूंसाठी हे वर्ष भरभराटीचं ठरलं आंतरराष्ट्रीय राजकारणः यशस्वी राष्ट्रकूल आयोजन तर भारताने केलंच पण याच वर्षी जागतिक रंगमंचावर भारताने दमदार पावले टाकली. संयुक्त राष्ट्रांमधले पाचही स्थायी सदस्य यावर्षी भारताला भेट देऊन गेले व त्यातील चौघांनी भारताच्या स्थायी सदस्यत्त्वाला जाहिर पाठिंबा दर्शवला हे भारतासाठी यावर्षाने दिलेलं आशादायक फळ आहे. त्याच बरोबर जपानसारख्या अणुबाँम्बचे थेट परिणाम भोगलेल्या देशाने अणूस्फोटानंतर लावलेले निर्बंध उठवणे, दक्षिणध्रूवावर भारताने वेधशाळा उभारणे, जागतिक वित्तपरिषद, पर्यावरण परिषदेत भारताने आपली भुमिका ठामपणे मांडणे, अमेरिकेने ड्युएल तंत्रज्ञानाच्या भारतात होणार्‍या निर्यातीवरील बंदी उठवणे, चीनच्या नाकावर टिच्चुन नोबेल पारितोषिकास उपस्थिती तसेच जाहिरनाम्यात तिबेटचा उल्लेख टाळण्याचे धैर्य दाखवणे या व अश्या अनेक प्रसंगांतून भारताची जागतिक राजकारणातील प्रबळ उपस्थितीची जाणिव या वर्षाने करून दिली आहे. भ्रष्टाचारः आदर्श, राष्ट्रकूल, २जी वगैरे भ्रष्टाचाराने देशाला दणाणून सोडले. मात्र हे भ्रष्टाचार झाल्याचे याच वर्षी उघड झाले. भ्रष्टाचार गेले अनेकवर्ष चालु होता आणि लोकही तो सहन करत होते मात्र भ्रष्टाचार विरोधी जनमत तयार होणे हे यावर्षाचे मोठे क्रेडीट आहे असे मला वाटते. इतरः राजकारणः बिहार निवडणूकीने प्रगतीचे राजकारण करणे अनिवार्य असल्याचे अधोरेखित केले. बिहार सरकार आणू पाहात असलेला "राईट टू सर्विस" कायदा देशातील भ्रष्टाचारावर आळा घालेल हा आशावाद याच वर्षात जागवला गेला. अवकाशः केवळ स्वतःचेच नाहि तर इतर अनेक देशांचे उपग्रह हवेत सोडून या क्षेत्रातील मास्टरी सिद्ध केलीच पण बक्कळ पैसाही कमावला. आरोग्यः मागच्या वर्षीच्या H1N1 नंतर यावर्षी त्यावरील लस शोधणे, विंचुदंशावर औषधाचा शोध व पेटंट वगैरे घडामोडी याच वर्षातील. शिवाय मेडिकल टुरीझम मधे प्रचंड वाढ. थोडक्यात काय तर हे वर्ष परफेक्ट होतं आणि यात फक्त चांगल्याच गोष्टी घडल्यात असं नाही. मात्र वाईट गोष्टी सतत होतच असतात. यंदा गेल्या अनेक वर्षांशी तुलना केली तर या वर्षीच्या जमाखर्चात जमेच्या बाजुला अनेक घटना वाढल्या होत्या हे निश्चित. १-१-११ अश्या वैशिष्ट्यपूर्ण तारखेने सुरू होणारे येते वर्ष भारतासाठी व पर्यायाने तुमच्यामाझ्यासाठी अनेक चांगले बदल घडवणारे असो हीच सदिच्छा!! HAPPY NEW YEAR!!! नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4348
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुम्हालाही ऋषिकेश....आणि या आढावा धाग्याबद्दलही ! क्रिडा, अर्थकारण, राजकारण, समाज, करमणूक क्षेत्र, पर्यावरण या समाजाला स्पर्शून जाणार्‍या घटना प्रत्ययी दरवर्षी घडत असतातच...कमी जास्त फरकाने....तिच बाब भ्रष्टाचाराची...एक जातो, तर दुसरा उपटतो...हा दुसरा पहिल्याला मागे टाकतो, तो पर्यंत तिसरा वाकुल्या दाखवतच असतो. देशातील ही कीड माशा आणि डास यांच्यासारखीच सर्वसामान्य लोकांना त्रस्त करून सोडणारी आहे, आणि तिच्यावर कुठलाही जालीम उपाय उपलब्ध होणार नाही हे डास निर्मूलनासारखेच किचकट आहे. असे असले तरी २०१० मधील 'एकमेव ठळक घटना' असा केबीसी धर्तीचा प्रश्न मला विचारला तर मी 'बिहार निकाल' असे कोणत्याही विकल्पाशिवाय उत्तर देईन. भारतीय लोकशाहीच्या परंपरेतील (जिच्याबद्दल युरोपमध्ये आश्चर्यमिश्रीत कौतुक असते) हा एक विलक्षण असा विजय श्री.नितिशकुमार यानी करून दाखविला आहे. पक्ष परंपरा, घराणेशाही, जात, धर्म, उच्चनीच, समान-असमान, पैसा आदी सार्‍या 'एनकॅश' करणार्‍या बाबीना दूर सारून तेथील जनतेने 'विकासासाठी मतदान' या जादुई घोषणेवर मतांचा जो भरभरून पाऊस पाडला त्याच्यामुळे देशातील (राज्य पातळीवरील) राजकारणाचे संकेत बदलून जाण्याची जी शक्यता निर्माण झाली आहे, ती स्वागतार्ह आहे. २०१० ने हे स्पष्ट केले आहे की देशाला मुख्य मंत्री पदाच्या खुर्चीवर काम करण्यासाठी श्री.नरेन्द्र मोदी आणि श्री.नितिशकुमार यांच्यासारखे 'सीईओ' हवेत. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

माननिय लालूजींनी शक्यता वर्तवली आहे त्याप्रमाणे काहीतरी गडबड असणारच. भाजपा ची मदत घेउन झालेली निवडणूकीतील सरशी म्हणजे विजय समजू नये.गुजरातचे मुख्यमन्त्र्यांचे उल्लेख आल्याबद्दल जाहीर निषेध. जातीयवादी राजकारणाबाहेर जाउन उल्लेख करावेत.

In reply to by कापूसकोन्ड्या

>>जातीयवादी राजकारणाबाहेर जाउन उल्लेख करावेत. त्यांनी मोदींचा उल्लेख हा त्यानी केलेल्या विकासासाठी केला होता, "जातीयवादी राजकारणा" साठी नव्हे. आता तुम्हीच "जातीयवादी राजकारणा"चा विषय उकरून काढला आहे. तरी ईथेच थांबूया आपण..नाही का????

In reply to by नन्दादीप

मा. राहूल गांधी यांचा पाण उतार करण्यासाठीच बिहार निवडणुकीचा उल्लेख आहे. वास्तविक पाहता इतर निवडणुकीसारखीच ही एक निवड्णूक पण बिजेपीचा उदो उदो करण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. उल्लेख करायचाच असेल तर एक दुर्दैवी घटना म्हणुन करावा.

चांगला आढावा घेतलात... खरच तुमचे धन्यवाद... आणि नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा सुद्धा....

गतवर्षाचा चांगला आढावा घेतलात. एक अजुन जोड द्यावीशी वाटते. ........... ओळखीतील अनेकांची लग्ने जमली आणि अनेकांची ठरलेली मोडली, एका अर्थाने सगळेच सुखी झाले म्हणायचे ;)

नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा मस्त आढावा .. माझ्यासाठी २०१० हे वर्ष एका महिन्याप्रमाणेच झटकन संपुन गेले ...

चांगला आहे. विशेषतः आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण नेहमीपेक्षा थोडे आक्रमक झालो आहोत, हे लक्षणीय आहे.
चीनच्या नाकावर टिच्चुन नोबेल पारितोषिकास उपस्थिती तसेच जाहिरनाम्यात तिबेटचा उल्लेख टाळण्याचे धैर्य दाखवणे ...
हे निश्चीत नोंद घेण्यासारखे आहे, (चीनने नेहमीप्रमाणे तैवानविषयी आग्रह धरला नाही, कारण आपण मग काश्मिरावीषयक त्यांनी जे नवे धोरण पत्करले आहे, त्याविषयी धरू शकलो असतो). न्यू यॉर्क टाईम्सनेही आपल्या ह्या किंचीत आक्रमक भूमिकेची दखल घेतली आहे. मात्र हा आढावा अजूनही समतोल असावयास हवा होता असे वाटते. कदाचित नव्या वर्षाच्या सुरूवातीस कटुता नको, अशा भावनेने काही अगदी ठळक उणिवांचा उल्लेख टाळला असावा, उदा. आशियाई स्पर्धेच्या वेळची झलेली नाचक्की. तसेच काही उल्लेख हाईप्ड आहेत असे वाटले:
जागतिक वित्तपरिषद, पर्यावरण परिषदेत भारताने आपली भुमिका ठामपणे मांडणे,
वित्तपरिषदेत आपण नक्की कसली ठाम भूमिका मांडली? आणि पर्यावरणासंबंधी परिषदेत खरे तर आपण आश्चर्यकारकरित्या आपल्या पूर्वीच्या भूमिकेस मुरड घातली असा सूर सर्वत्र (निदान भारताबाहेर तरी) आहे.
अवकाशः केवळ स्वतःचेच नाहि तर इतर अनेक देशांचे उपग्रह हवेत सोडून या क्षेत्रातील मास्टरी सिद्ध केलीच पण बक्कळ पैसाही कमावला.
जी. एस. ल.व्ही. चे अपयश अनुल्लेखाने मारता येण्यासारखे नाही. त्याबद्दल दोषारोप नकोत, पण अगदी तसे काही झालेच नाही, असेही नको. भ्रष्टाचाराच्या अगदी नवीन केसमध्ये आपण आता बहुधा नवा उच्चांक निर्माण केला असावा का? खाद्यवस्तूंची भाववाढ ह्या आठवड्यात १४ % च्या वर गेली आहे असेही आजच वाचनात आले. हे आपणापुढे एक मोठे आव्हान नव्या वर्षाच्या सुरूवातीस आहे. तरीही अनेक आघाड्यांवर आपण प्रगती केली आहे, हे सुखकारक आहे.

In reply to by प्रदीप

आजच प्रस्तुत झालेल्या बातमीनुसार आपल्या रिझर्व बँकेने ए. सी. यू. ह्या क्लियरींग हाऊसच्या माध्यमातून कसल्याही पैश्याच्या देवाणघेवाणी करायची नाहीत असा नवा निर्बंध लावला आहे. ए. सी. यू. (आशियन क्लियरींग हाऊस) यूनोने स्थापन केले होते व आपण इराणकडून क्रूड तेल घेतल्यावर पैसे ह्या क्लिअरींअग हाऊसतर्फे इराणला देत होतो. आता अचानक आलेल्या ह्या आदेशाने आपल्या तेल कंपन्या इराणला तेलाचे पैसे देऊ शकणार नाहीत. अर्थात आपण इराणकडून तेल घेऊ शकणार नाही. आपल्या क्रूड तेलाच्या आयातीपैकी १५% इराणकडून होते. एका बड्या सुप्परपॉवरचा, एका 'होऊ घातलेल्या सुप्पर पॉवर'वर आलेल्या दबावाचा हा परिणाम आहे असे म्हटले जाते. त्या सुपरपॉवरच्या अधिकृत प्रवक्त्याने ह्या निर्णयाचे स्वाग्त केले आहे, असेही आज बातम्यात वाचले. आज ह्या संबंधी भारत व इराणच्या संबंधित अधिकार्‍यांची बैठ़क होणार होती. तेव्हा ह्याचा परिणाम दूरगामी असेल किंवा नाही, हे आत्ताच सांगता येणे अवघड आहे. तेव्हा आम्ही मिपाकर आमच्या किंचीत आक्रमक परकीय धोरणाचे कौतुक करतो न करतो तोच हा 'घालीन लोटांगण, वंदीन चरण'चा प्रयोग सादर केला जात आहे हे थोडे निराशाजनक आहे.

In reply to by प्रदीप

अरेरे! तुमची प्रतिक्रीया वाचून बातम्या धुंडाळल्य तर हा निर्णय वाचून आश्चर्य वाटले. :( खरच किंचीत आक्रमक परकीय धोरणाचे कौतुक करताना घाई केली का? ;) बाकी, होय, लेख थोडा एकांगी होता आणि तसे बरेचसे जाणिवपूर्वकच होते. तुम्ही म्हणता तश्या घटना (भ्रष्टाचार, लाचखोरी वगैरे वगैरे) अनेक वर्षे चालुच होते. यावर्षी ते सारे घडलेच मात्र त्याच बरोबर काहि चांगल्या घटनाही घडल्या ज्या कलेक्टीव्हली इतर अनेक वर्षांपेक्षा जास्त ठळक वाटल्या. दर वर्ष संपताना त्या त्या वर्षी जेजे वाईट घडले / गाजले त्याची सामान्यतः उजळणी प्रसार माध्यमे करतातच मात्र यावर्षी अश्या घटनांबरोबरच एक राष्ट्र म्हणून घडलेल्या चांगल्या घटनांकडे लक्ष वेधण्याचा मानस होता. जीएसएल्व्ही ह्या प्रगतीशील तंत्रामधे अजून अपयश येत असले तरी पीएसएल्व्हीने २०१०मधल्या जुलैमधे (चुभुदेघे) एकावेळी ५ उपग्रह भुस्थिर कक्षेत सोडले होते हे अधोरेखीत करायचे होते.

ऋ, चांगला आढावा! सर्वांना येणार्‍या नवीन वर्षाच्या शुभेच्छा! स्वाती

बाबरी मशिदबाबत निकाल ह्याच वर्षी लागला, नाही का? कोणताही गैरप्रकार न झाल्याबद्दल सर्व जनतेचे (ह्यात राजकारणी, धार्मिक नेते सुद्धा आले) आभार मानायला हवे.