स्मशानानुभव - एक
त्या दिवशी अमावस्या होती. सलग तीन दिवस निर्जळी उपासाचा तिसरा दिवस. आजची स्मशानसाधना अतिशय महत्त्वाची. दीक्षा घेऊन दहा वर्षे झाली. अजून तरी गुरुकृपेने साधना कधी चुकलेली नव्हती. पण आज जरा बिकटच प्रसंग होता. गेले दोन महिने सतत फिरतीवर होतो. मला दिलेल्या अंचलातल्या गावांमध्ये शाळांची काय अवस्था आहे याचा सर्व्हे जवळजवळ पूर्ण होत आला होता. आचार्य त्रिनेत्रानंदांच्या निवासी शाळेची इमारत जवळजवळ उभी रहात आली होती. गावागावात फिरुन माणसं आणि मुलं गोळा करण्याचं काम फारशा अडचणींविना पार पडत होतं. अमावस्या-पौर्णिमेला एखाद्या ठिकाणी तरी एखाद्या देवळात किंवा संघ बंधूकडे मुक्काम पडलेला असायचा. तिथले स्मशान जवळ करणे अवघड नसायचे. कुणीतरी संघ बंधू वाट दाखवायला मिळेच. संध्याकाळी आंघोळ करुन ताजेतवाने व्हायचे, कीर्तन करायचे, कुणी मंडळी भेटायला आली तर त्यांच्याशी गुरुचर्चा करायची, आणि अंधार पडल्यावर ध्यान लाऊन बसायचे. अर्ध्या रात्री साधनेची उपकरणे घेऊन स्मशानाची वाट चालू लागायची. पण त्या दिवशी मात्र रात्र होत आली तरी मी रेल्वेतच होतो. अनपेक्षितपणे वेळेचे सगळेच गणित सकाळपासून कोलमडले होते. रात्रीचे नऊ वाजत आले होते. कसली परीक्षा घेताय असे गुरुंना मनाशी विचारत मी सरळ आल्या स्टेशनला खाली उतरलो.
स्टेशन छोटेच होते. लखनौच्या जरा अलीकडले स्टेशन होते. त्या रात्रीची साधना याच ठिकाणी व्हायची होती असे मला वाटून गेले. स्मशानाचा पत्ता शोधण्याच्या कामाला लागलो. एका नवख्या दीक्षिताने एकदा विचारले होते, दादा, अनोळखी गावात स्मशान कसे शोधता? लोक संशय घेत नाहीत? मी त्याला हसून उत्तर दिले होते, तू हाच प्रश्न एखाद्या दारुड्याला विचार: अनोळखी गावात गुत्ता कसा शोधतोस!
अर्ध्या एक तासाने मला माझा वाटाड्या मिळाला. हो नाही करत मला रस्ता दाखवायला तो कसाबसा तयार झाला. मात्र त्याने मला सावधगिरीची सूचना दिली – त्या स्मशानात एक सिद्ध अविद्या तांत्रिक साधना करण्यासाठी अधूनमधून येत असे. गुरुंना माझी आज खरेच परीक्षा घ्यायची आहे असे मला वाटून गेले. भरीस भर म्हणून आजची अमावस्या सिद्धी प्राप्त करण्यासाठी सुयोग्य वेळ होती. माझे लर्नेड फ्रेंड आज नक्कीच स्मशानात असणार हे मी ताडले. माझ्या अनुत्सुक वाटाड्याला बोलण्यात गुंतवत माझा कार्यभाग उरकायच्या मागे लागलो.
गाव मागे पडले आणि अंधार दाट झाला. या प्रदेशातील स्पंदने मला स्पष्ट जाणवू लागली. कोणे एके काळी नक्कीच हे एक तंत्रपीठ असणार. माझा वाटाड्या मित्र मात्र पुरता भ्याला होता. दबल्या आवाजात त्याने मला सांगितले हे असेच सरळ पुढे गेले की स्मशान सुरु होते. एवढे बोलून तिथून सटकायचा त्याचा विचार असावा. पण बोलण्याच्या नादात आम्ही तिथवर पोचलोच होतो.
अचानक ती भयाण शांतता कापत एक आरोळी ऐकू आली – तिथेच थांब!
(अपूर्ण)
वाचने
7970
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
येऊ द्या.. येऊ द्या..
(स्मशानात धुनी पेटवून चिलीम पिणारा) यशवंत
पुढे?? काय झालं?
जरा मोठे भाग लिहा कि आ. रा.
हे लेखन उत्सुकता वाढवणारे आहे.
In reply to जरा मोठे भाग लिहा कि आ. by रेवती
असंच म्हणते ...पुढील भागांच्या प्रतिक्षेत
च्यायला... प्रांत रस्ता चुकला की काय! ;) की आता एकदम 'खाकी'त शिरलाय? ;)
लेखन उत्सुकता वाढवणारे आहे. पण भाग छोटा झाला. वाट पाहतोय...
वाचतोय.
मी पण वाचतेय.
जरा तुमच ( नायकाच ) वर्णन पण येउ दे . कुठ कफनी, दाढी?
आत्ता पासुनच भिती वाटतेय. जरा वरच्या हेडलायनीत अन क्रमशः मधल अंतर वाढवा राव! किती ताणायच ते? लवकर लवकर सांगा.
वाटच पहात होतो
अशा लेखाची लवकर
येउ ध्या वो पडले
भाग
लवकर येउ द्या पुढचे भाग
वाचत आहे, छोटा भाग झालाय पण मस्त रंगलाय.
लिहा पटापट.
वाट बघतोय
मोठा तुकडा पाडा की मालक.
अजून धनंजय पण वाचून पुरा व्हायचाय ;)
पुढे?
हा भाग तर सुरु होण्याच्या आधीच संपला की! पुढे काय???
पूढला भाग मोठा लिहिणे... वाटल्यास पंचमकार साधना करुन या आणि मग लिहा !!
कथा रंगणार निश्चित!!!