मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रूप परमेशाचे - अध्यात्माच्या परिसरात (भाग एक)

मूकवाचक · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
(पूर्णवाद तत्वज्ञान आणि भगवद्गीता यांचा आधार घेत हे लिखाण केले आहे. 'देव' ही संकल्पना स्पष्ट व्हावी आणि ज्ञान, भक्ती, योग इ. विविध साधना/ उपासना मार्गांची एकांगी, दुराग्रही विचार न करता सांगड घालता यावी असा एक प्रयत्न. या दृष्टीने गीता तत्वज्ञान किती लवचिक आणि व्यापक आहे हे ही लक्षात येईल. प्रामुख्याने अर्वाचीन काळातील काही साक्षात्कारी संत, विभूती यांचा उल्लेखही या ओघात केला आहे. ) गीता तत्वज्ञानानुसार 'देव' ही एक व्यापक आणि सुस्पष्ट पण काहीशी जटील संकल्पना आहे. विश्वाची निर्मिती कुणी केली हे सांगता येत नाही म्हणून उगाच 'देवाने केली' असे ठोकून द्यावे असा तो प्रकार नाही. पुरूषोत्तम परमेश्वराची प्रत्यक्ष प्रचिती अध्यात्मिक (शिवतत्व प्रधान), अधिदैविक (विष्णुतत्व प्रधान) आणि अधिभौतिक (भौतिक जगत - ज्याचा या पुरूषोत्तमाशी 'स्वरूप संबंध' आहे) तिन्ही स्वरूपात वेगवेगळ्या प्रतलावर येऊ शकते व येते. "क्षरातीत मी अक्षराहुनी उत्तम मी त्या अर्थी, पुरुषोत्तम मी वेदी लोकी ऐसी माझी ख्याती" (भावार्थ गीता १५. १८) - पुरुषोत्तम परमेश्वराचे समग्र आकलन होण्याच्या दृष्टीने हा श्लोक आणि भगवदगीतेचा पंधरावा अध्याय महत्त्वाचा आहे. पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने मुळातच प्रत्येक जीवात या तिन्हीचा अंश निसर्गत: असतो. आत्त्मा (जे आपले मूळ अध्यात्मिक स्वरूप आहे), मनबुद्धीचा प्रांत (जो अधिदैविकाशी जोडला जाऊ शकतो) आणि जड देह (जो पंचेंद्रियांच्या माध्यमातून अधिभौतीकाशी संयुक्त असतो) असेच ढोबळमानाने जीवाचे स्वरूप असते. यातील अध्यात्मिक तत्व हे अविकारी, अचल, अपरिवर्तनीय असते. या पातळीवर अद्वैत आहे. आधिभौतिक तत्व स्थूल, बरेचसे बद्ध आणि बहुतांशी कार्यकारण भावाने चालणारे असते. यात पावलापावलावर द्वैत उभे असते. हे नियमबद्ध असल्याने या निसर्गनियमात फारशी ढवळाढवळ करता येत नाही. आधिदैविक हा या दोन्हींना जोडणारा प्रांत आहे. तो मात्र सूक्ष्म, तरल आणि व्यावहारिक द्वैत आणि अध्यात्मिक अद्वैत यांना जोडणारा दुवा ठरू शकेल असा आहे. निर्गुण, निराकार, उपाधीरहित, अविकारी, साक्षी, कूटस्थ असे परमेश्वराचे अध्यात्मिक शिवस्वरूप आहे. रमण महर्षी यालाच 'द सेल्फ' म्हणतात. या अक्षर स्वरूपाची प्रत्यक्ष अनुभूती ज्ञानमार्गी साधकाना तुरियातीत अवस्थेत येते. ती निरंतर तशीच राहाते. एखादा अनुभव आला आणि गेला असे होत नसून हे संपूर्ण आणि आमूलाग्र परिवर्तनाच असते. ही अनुभूती आलेला ज्ञानी पूर्णपणे नि:संग, व्यक्तिगत ईच्छा, वासनांच्या आणि स्थल, काल, देश, वर्ण, आश्रम इ. च्या पलीकडच्या सहज स्थितीत स्वभावतः राहातो. या स्थितीत कुठलीच अधिदैविक साधना, उपासना करण्याची गरज उरत नाही. तसा प्रश्नच उदभवत नाही. अधिभौतिक जगत ही सगळी माया आहे हे प्रत्यक्ष अनुभवल्यावर वैषयिक वासनांचे दमन करणे आणि त्यातून विकृती निर्माण होणे हा प्रश्नच उरत नाही. अत्यंत माफक गरजा असणारे हे ज्ञानी देहधारणेपुरतेच अन्न ग्रहण करून, एखादे कौपीन सारखे वस्त्र धारण करून 'अजगर' वृत्तीने एकाच ठिकाणी स्वस्थ राहतात. हे कसलाही प्रचार, प्रसार, उदघोष, नारेबाजी वगैरे करत नाहीत. अभिनिवेश तर नाममात्रही नसतो. असते फक्त एक शांत, प्रसन्न, कृपापूर्ण सहज अस्तित्व! सामाजिक दृष्टीने अशा पूर्ण संन्यस्त ज्ञानी मुनींना सामाजिक कर्तव्य असे काही नसतेच असे म्हणावे तर वावगे ठरू नये. यांचा समाजाला भारही नसतो. हे फारसे जीवनाभिमुख नसले तरी 'युसलेस', निरर्थकवादी, शून्यवादी मात्र मुळीच नसतात. अशा नैष्कर्म्य सिद्धी साधलेल्या अवस्थेतही यांचे जीवितकार्य थांबत नाही. उलट ते अत्यंत प्रभावीपणे सहज पार पडते. या अनुषंगाने भगवान रमण महर्षी यांचे चरित्र आणि त्यांच्याविषयीचे साहित्य, विकी वगैरे जालावर वाचल्यास हे स्पष्ट होईल. ज्ञानमार्गाची मुख्य साधना मनाची सारी शक्ती एकवटून खरा 'मी कोण' हा शोध घ्यायचा अशी आहे. ही 'सेल्फ इनक्वायरी' साधायची तर चित्त चतुष्ट्य अनुकूल असायला हवे. या ज्ञानमार्गाला एक वेगळाच प्राग्जन्मीच्या साधनेचा अधिकार लागतो, सहज वैराग्य लागते. हे सारे घेऊन जन्माला येणारा लाखो करोडोमध्ये एखादाच. भन्नाट, अफाट, अचाट, लोकविलक्षण अशा कुठल्याच गोष्टीचा सोस ज्ञानमार्गी साधकाना घातकच. चवचाल मनाचे माकडचाळे पूर्णपणे थांबतात, बुद्धीची धाव तोकडी पडते, तर्क पांगळा ठरतो तेव्हा कुठे या मार्गावरची वाटचाल सुरू होते. ज्ञानियाची सहजस्थिती आणि ओशोछाप पाखंडी माणसाचा खुशालचेंडूपणा/ यु. जी. छाप तथाकथित बंडखोरपणा, वायफळ शिवराळपणा यात तर टोकाचा फरक आहे. (क्रमशः)

वाचने 5474 वाचनखूण प्रतिक्रिया 16

शुचि 16/10/2010 - 04:42
मूकवाचक, लेख आवडला. या लेखात आपण ज्ञान योगाचा थोडाफार आढावा घेतला आहे असं दिसतं. यावरून आठवलं -
http://www.rkmissiondel.org/ या साईटचा लोगो सुंदर आहे. त्यांनी या लोगोमध्ये ४ ही मार्ग - ज्ञान, कर्म, भक्ती आणि राजयोग एकत्र आणले आहेत. आणि त्याचं स्पष्टीकरण तर खूप सुंदर दिलं आहे. त्याचे थोडेसे भाषांतर पुढीलप्रमाणे - कर्म म्हणजे सतत स्थित्यंतर/घडामोड म्हणून त्यांनी लाटांनी कर्मयोग दर्शविला आहे. कर्म हे सतत घडत असतं, नवीनतम आकार घेत असतं म्हणून वार्‍याने उचंबळणार्‍या लाटा , पाणी हे एक प्रकारे झालं कर्माचं निदर्शक. आता त्याच पाण्यातून उमललेलं कमळ हे भक्तीयोगाचं प्रतीक दाखवलं आहे. करण कमळ हे चिखलातही अलिप्त असतं तसं भक्तीमुळे आत्म्याला कर्म लिंपूच शकत नाही. या लोगोमध्ये उगवता सूर्य हे ज्ञानयोगाचे प्रतीक आहे. कारण ज्ञान हे अज्ञानरूपी तीमीराचा नाश करते. तसच ज्ञान म्हणजे सतत शोध म्हणून देखील सूर्य हे चपखल प्रतीक आहे. नागाचा वेढा, कुंडल हा राजयोगाचे प्रतीक दाखविला आहे. इथे कुंडलिनी चा संदर्भ येतो. तर हंस परमात्म्याचे. कारण केवळ हंसरूपी परमात्मा सत्य आणि माया यामधील नीर-क्षीर विवेक करू शकतो. तसच उपनिषदांमधील हंस गायत्री मंत्र देखील पूजेच्या वेळी म्हटला जातो - हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो हंस: प्रचोदयात| मूळातूनच हे सगळं वाचण्यासारखं आहे. हे वाचायचे असल्यास, या इथे सापडेल- http://www.rkmissiondel.org/inside/Emblem.htm

In reply to by शुचि

मिसळभोक्ता 16/10/2010 - 05:07
हंस हे आत्म्याचे प्रतीक. आणि परमहंस परमात्म्याचे.

In reply to by शुचि

स्वानन्द 16/10/2010 - 15:27
पहा... अध्यात्मावर एवढं आवडीने वाचताय.... सवडीने लिहीताय... आणि परत स्वतःच कौल काढून विचारताय की अध्यात्मावर फार लेख यायला लागले आहेत का म्हणून!

मिसळभोक्ता 16/10/2010 - 05:06
कार्बन, हायड्रोजन, आणि ऑक्सिजन हे तिन्ही जीवनासाठी महत्त्वाचे. त्यांचे २:६:१ प्रमाण असेल तर नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते असा अनुभव आहे.

In reply to by मिसळभोक्ता

मूकवाचक 16/10/2010 - 08:57
ते १:६:२ असेल तर 'विरजण सिद्धी 'प्राप्त होते असे निरीक्षण आहे. -- मूकवाचक

In reply to by मिसळभोक्ता

नितिन थत्ते 16/10/2010 - 15:41
१:४:१ प्रमान झाल्यास भवसागरातून (नवसागरातून नव्हे) मुक्ती मिळते असे ऐकले आहे.

In reply to by नितिन थत्ते

मूकवाचक 16/10/2010 - 22:21
ऐकीव माहिती माझी पण बरीच आहे. ४:१:४ प्रमाण झाल्यास पवनमुक्तासन व्यवस्थित साधून महाव्याधीतून ( ) क्रममुक्ती मिळते असे ऐकले आहे. सुदैवाने मला तशी व्याधीच नसली तरी तुमची प्रतिक्रिया वाचून माहिती 'शेअर' करायची अनावर ईच्छा झाली. असो.

नगरीनिरंजन 16/10/2010 - 09:34
मला हा लेख आवडला. ज्याला ज्ञानप्राप्ती झाली आहे असा मनुष्य खरोखरच अलिप्त होत असेल असे वाटते आणि केवळ कशातच ढवळाढवळ नको म्हणून आपले अधिभौतिक स्वरूप टिकवून ठेवत असेल. तुम्ही छान लिहीलंय. दुसर्‍या एका मराठी संस्थळावर असलेल्या एका स्वघोषित सर्वज्ञानी अध्यात्मज्वरपीडित व्यक्तिच्या लेखनामुळे आणि मला सत्य समजलंय हे सांगण्याच्या किळसवाण्या धडपडीमुळे अध्यात्मविषयक लेखांची जी शिसारी बसली होती ती तुमच्या लेखामुळे बरीच कमी झाली. पुढच्या भागाची वाट पाहत आहे.
परमेश्वराची नक्की व्याख्या काय हा खरंच चर्चेसाठी सुंदर विषय आहे. लेखन वाचतो आहे. प्रश्न आता विचारु की पुर्ण मालिका संपल्यावर विचारु असा विचार करतो आहे.

स्वानन्द 16/10/2010 - 15:32
लेख आवडला.... ज्ञानमार्ग म्हणजे काय हे विचारणारच होतो... पण खाली तुम्हीच स्प्ष्ट केलं, त्यामुळे बरं झालं. ज्ञानमार्गाबद्दल अधिक जाणून घेण्यास उत्सुक. एक शंका: ज्ञानेश्वर हे राजयोगी की ज्ञानयोगी?

पाषाणभेद 16/10/2010 - 19:21
लेख आवडला. वाचनखुण करायची आता सोय राहीली नाही. म्हणून प्रतिसादावरूनतरी नंतर सापडू शकेल. अवा: संपादक माऊली वाचनखुणेकडे लक्ष देतील काय?

राघव 17/10/2010 - 20:21
वाचत आहे. अवांतरः श्रीरमण महर्षींचा उल्लेख आल्यावरून पॉल ब्रँटनच्या पुस्तकाची आठवण झाली. वाचायला पाहिजे परत एकदा!

In reply to by राघव

मूकवाचक 18/10/2010 - 21:41
राघव जी, "श्री. रमण महर्षी - चरित्र आणि तत्वज्ञान" हे पुस्तक पण अप्रतिम आहे. (डॉ. मोघे यानी अनुवादित केलेले, मूळ लेखकः आर्थर ऑसबोर्न)