मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रारंग ढांग पोरका झाला..

डॉ.प्रसाद दाढे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
ज्येष्ठ चित्रपट निर्माते- दिग्दर्शक व श्रेष्ठ साहित्यिक श्री. प्रभाकर पेंढारकर यांचे पुण्यात काल दि. ७ ऑक्टोबर रोजी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. चित्रपट महर्षी भालजी पेंढारकरांचे ते सुपुत्र होते त्यामुळे कलेचे बाळकडू त्यांना घरातच मिळाले होते. 'बाल शिवाजी' , 'शाबास सुनबाई' इ चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. 'बालशिवाजीचे' कथा-पटकथा-संवादही त्यांनी लिहिले होते. चित्रपट सेन्सॉर बोर्डावरही ते काही काळ कार्यरत होते. तसेच भारतीय फिल्म डिव्हिजनच्या माध्यमातूनही अनेक डॉक्यूमेंटरीज त्यांनी तयार केल्या होत्या. भारतीय सैन्याच्या अभियांत्रिकी विभागाची एक शाखा म्हणजे 'बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन' जे भारताच्या सीमावर्ती भागांमध्ये रस्ते बांधण्याचे बिकट काम करते. त्यांच्यावर डॉक्यूमेंटरी बनवतांना पेंढारकरांना 'रारंग ढांग' ह्या कादंबरीची कल्पना सुचली आणि मराठी साहित्यातलं एक मंत्रमुग्ध करणारं लेणं त्यांनी घडवलं. स्वतः लेखकच चित्रपट दिग्दर्शक व पटकथा लेखक असल्याने रारंग ढांग वाचतांना एखादा सुंदर चित्रपट पाहतो आहोत असंच वाटत राहातं. स्वतःच्या मनाला, आतल्या आवाजाला न पटणार्‍या गोष्टीसाठी तडजोड न करता प्रसंगी आपले करीयर पणाला लावणार्‍या अन लष्करी अधिकार्‍यांच्या इगोपुढे न झुकणार्‍या 'ब्लडी सिव्हिलियन' विश्वनाथची गोष्ट वाचतांना वाचक अंतर्मुख होतो अन स्वतःलाच प्रश्न विचारू लागतो.. उद्या जर माझ्यावर अशी वेळ आली तर मी असे करू शकेन..? खरोखरंच प्रत्येक तरूणाने वाचलीच पाहिजे अशी ही अजोड कादंबरी लिहिणारे पेंढारकर व्यक्तिशः अतिशय मृदू आणि मितभाषी होते. पाच वर्षांपूर्वी बराच शोध घेतल्यावर मला त्यांचा पत्ता सापडला व मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटलो. डोक्यावर केस विरळ असले तरी निळे डोळे अन लख्ख गोरा रंग त्यांच्या देखण्या व्यक्तिमत्वाला शोभा देत होता. तेव्हा त्यांचे दाक्षिणात्य व्याही 'रारंग ढांगचे' इंग्लीश रुपांतर करण्याच्या प्रयत्नात होते. मला रारंग ढांग कादंबरीने एव्हढे वेड लावले होते की मी तिची पारायणे तर केली होतीच पण त्याशिवाय भारतीय लष्करात; विशेषतः हिमालयात काम केलेल्या प्रत्येक अधिकार्‍यास मी रारंग ढांग व बॉर्डर रोड्स बद्दल माहीती विचारत असे. आता मला पेंढारकरांना भेटून काही गोष्टींची, घटनांची पडताळणी करायची होती. रारंग ढांग नावाचा उत्तुंग पहाड हिमालयात खरोखरंच आहे पण कादंबरीतलीकथावस्तूही बर्‍याच प्रमाणात सत्यघटनांशी मिळतीजुळती आहे अश्या निष्कर्षास मी आलो होतो. मी कादंबरीतल्यासुभेदार मेजर प्रतापसिंह ह्या पात्राचा फोटोच मी जेंव्हा पेढारकरांना दाखविला तेव्हा ते खूप चकीत झाले व माझ्यावर खूप खुषही झाले. अमोल पालेकरने रारंग ढांगवर चित्रपट बनविण्याचा प्रयत्न केला होता पण संरक्षण खात्याने परवानगी नाकारली होती. (ज्याने कोणी ही कादंबरी वाचली असेल त्याला ह्या मागचे कारण सहज उमजेल) पेढारकरांनी सुनामी संकटावर 'चक्रीवादळ', काश्मीरच्या धगधगत्या पार्श्वभूमीवरची 'आणि चिनार लाल झाला' अश्या इतरही चांगल्या कादंबर्‍या लिहिल्या आहेत. नुकतेच त्यांनी 'एका स्टुडिओचे आत्मवृत्त' लिहिले होते; ते वाचल्यावर त्यांना परत भेटण्याचे एक निमित्त मला मिळाले असते, पण योग नव्हता. त्यांना 'मायलोडिस्प्लास्टीक सिंड्रोम' नावाची एक दुर्मिळ व दुर्धर व्याधी जडली होती त्यामुळे तब्येत त्यांना साथ देत नव्हती. तरीसुद्धा त्यांच्या चेहर्‍यावरचे खेळकर स्मित आणि ऋजू स्वभाव मात्र शेवटपर्यंत सतेज होते. रारंग ढांगमधलेच भरतवाक्य प्रभाकर पेंढारकरांबद्दलही सार्थ ठरते आहे..'जब आदमी मर जाता हैं तो क्या रह जाता है..' आज पेंढारकर आपल्यात नसले तरी त्यांच्या अमर कलाकृतींनी ते सदैव स्मरणात राहतीलच..

वाचन 15292 प्रतिक्रिया 0