बसंतचं लग्न..१३
II स्वरभास्कर पं भीमसेन जोशी प्रसन्न II
बसंतचं लग्न..१ (ओळख)
बसंतचं लग्न..२ (यमन, यमनकल्याण)
बसंतचं लग्न..३ (भूप)
बसंतचं लग्न..४ (मिया मल्हार)
बसंतचं लग्न..५ (बिहाग)
बसंतचं लग्न..६ (मालकंस)
बसंतचं लग्न..७ (हमीर)
बसंतचं लग्न..८ (भीमपलास)
बसंतचं लग्न..९ (मुलतानी)
बसंतचं लग्न..१० (तोडी)
बसंतचं लग्न..११ (शुद्धसारंग, गौडसारंग)
बसंतचं लग्न..१२ (अहीरभैरव)
राम राम मडळी,
बसंतच्या लग्नाचा सोहळा आता खरंच देखणा होऊ लागला आहे. यमन-भूपासारखी रागमंडळी सर्वांचं प्रेमानं स्वागत करत आहेत, सारंग मंडळी कुणाला काय हवं, नको ते पाहात आहेत, जेवणाची व्यवस्था त्यांच्याकडेच आहे. कोपर्यात कुठेतरी नंद, हमीर, कामोद यांची लग्नातल्या रागिण्यांसोबत माफक टवाळी चालली आहे, मुलतानी, तोडी, दरबारी, पुरिया, मल्हार, झालंच तर आमचे मालकंसबुवा, अहीरभैरव यांसारखी मातब्बर आणि बुजूर्ग मंडळी सर्वात पुढल्या कोचावर स्थानापन्न झाली आहेत. या बुजूर्गांना काय हवं,नको ते इतर खेळकर स्वभावाची राग मंडळी पाहात आहेत! देस सारखा राग यासर्वांची जातीने विचारपूस करतो आहे! एकंदरीत सगळी धमाल सुरू आहे, आनंदोत्सव सुरू आहे! आमच्या बसंतच्या लग्नाचा मंडप म्हणजे भारतीय अभिजात रागसंगीताची ती एक मांदियाळीच आहे!
पण बरं का मंडळी, एका रागाचा उत्साह मात्र अगदी ओसंडून वाहतो आहे. त्याच्या लाडक्या बसंतला कुठे ठेवू अन् कुठे नको असं त्याला झालं आहे! हा सोहळा कधी संपूच नये असंच त्याला वाटतं आहे. अतिशय उत्सवप्रिय व्यक्तिमत्व आहे या रागाचं! नव्हे, तर हा राग म्हणजे स्वरांचाच उत्सव आहे असं मी म्हणेन!
हा राग आहे, केदार! मंडळी, केदार म्हणजे साक्षात स्वरोत्सव, केदार म्हणजे आनंदाचं निधान! केदार म्हणजे रसिकता, केदार म्हणजे तारूण्य, केदार म्हणजे शृंगार! केदार म्हणजे हळवेपणा! अहो किती संपन्न व्यक्तिमत्व असलेला राग आहे हा! विलक्षण जादुई स्वरवेल लाभलेला हा राग अक्षरश: एका क्षणात मैफलीची पकड घेतो असा माझा अनुभव आहे!
केदारचं प्राथमिक स्वरूप, आरोह-अवरोह, पकड, इत्यादी तांत्रिक गोष्टी समजून घेण्यासाठी कृपया हे ऐका. ह्यात आग्रा घराण्याच्या गुणी गायिका शुभ्रा गुहा यांनी 'कंगनवा मोरा..' ही केदारातली पारंपारिक बंदिश किती छान म्हटली आहे पाहा!
केदार रागातलं, मधलं 'हमको मन की शक्ति देना' हे अतिशय लोकप्रिय गाणं इथे ऐका. गुड्डी चित्रपटातील हे फार सुरेख गाणं आहे.
भेदभाव अपने दिल से साफ कर सके
दोस्तोसे भूल हो तो माफ कर सके
झूठसे बचे रहे, सच का दम भरे
दुसरोंके जयसे पेहेले खुद को जय करें!
मंडळी, इथे संगीतकार वसंत देसायाना दाद द्यायला हवी! केदार हा बहुरंगी व्यक्तिमत्वाने नटलेला राग आहे त्यामुळे या गाण्यातल्या अर्थालाही हा राग साजेसाच ठरतो. कुणाबद्दलही मनामध्ये भेदभाव नसलेल्या केदारकडे क्षमाशील वृत्ती मात्र पुरेशी आहे!
"जाओ, साला तुम्हे माफ किया!" असं खुल्या दिल्याने म्हणण्याचा स्वभाव आहे आमच्या केदारचा! :)
वसंत देसायांनी 'दुसरोंके जयसे पेहेले खुद को जय करें!' या अवघ्या एका ओळीत केदारचं एक संपूर्ण सारांशरूप किती छान ठेवलंय बघा! मध्य षड्जापासून ते तार षड्जापर्यंत केदार किती सहजतेने बागडतो बघा. वाटेतल्या प्रत्येक स्वरावर अगदी मनमुराद प्रेम करत करत याच्या आरोहा-अवरोहाची यात्रा सुरू असते!
जयपूर घराण्याच्या तरूण, गुणी गयिका सौ अश्विनी भिडे यांनी गायलेली केदारातली 'चतर सुगर बलमा' ही बंदिश इथे ऐका. यातल्या केदाराचं सौंदर्य किती मोहक आहे पाहा! 'साला अपनेही मस्तीमे कोई जा रहा है' असं वाटतं! ज्याला खर्या अर्थाने 'Rich!' म्हणता येईल असं या बंदिशीचं स्वरूप आहे.
वसंतरावांनी केदारकडे कसं बघितलंय त्याची झलक इथे ऐका. वसंतरावांसारख्या बुद्धीमान गवयाला केदाराने भुरळ घातली नसती तरच नवल होतं! वसंतरावांचा स्वभावही तसाच होता, केदार सारखाच दिलदार आणि अवलिया!
बापुराव पलुसकर! घराणेदार गायकीतल्या ग्वाल्हेर परंपरेतलं एक मोठं नांव. अवघ्या ३३-३४ वर्षांच्या आयुष्यात बापुरावांनी गाण्यात जे काम करून ठेवलं आहे ते पाहिलं की मन थक्क होतं! खडीसाखरेसारखा सुमधूर आवाज, तालासुरालयीवर विलक्षण हुकुमत असलेल्या बापुरावांच्या गायकीत सदाबहार ग्वाल्हेर परंपरेतली सगळी वैशिष्ठ्य अगदी पुरेपूर होती. दुर्दैवाने बापुरावांना फारसं आयुष्य लाभलं नाही! असो, बापुरावांनी गायलेली 'कान्हा रे..' ही केदारातली पारंपारिक बंदिश इथे ऐका!
धमाल करा, मजा करा, उत्सव साजरे करा! पण,
Whatsoever, but no guilty at all ! असा आहे आपला केदार!
मी धर्माचे केले पालन
वाली वध ना, खलनिर्दालन!
हे सांगतांना बाबूजींनी किती मुक्तपणे केदारच्या रंगाची उधळण केली आहे! आहाहा, क्या बात है. अहो गीतरामायणातलं हे किती सुंदर गाणं आहे केदरातलं! मरत्या वालीला राम सांगतोय,
"हो, मी मारलं तुला झाडाआडून! काय म्हणणं आहे तुझं? अरे तुझ्या बाबतीत कसली आल्ये निती आणि अनिती?"
तू तर पुतळा मूर्त मदाचा
सुयोग्य तुज हा दंड वधाचा
अंत असा हा विषयांधाचा!
असं उघडपणे सांगायला केदारचेच सूर हवेत मंडळी! आणि बाबूजींसारखा असामान्य प्रतिभावानच त्या रागाची निवड करू जाणे! मी जेव्हा या गाण्यातील केदाराशी आणि माझ्या मनातल्या केदाराशी तुलना करू लागलो आणि एकिकडे गाण्याचा अर्थही लक्षात घेऊ लागलो, तेव्हा बाबूजी माझ्या मनातला केदार मलाच अधिक स्पष्ट करून सांगताहेत असं वाटलं, समोर बसवून शिकवताहेत असं वाटलं!
दिधले होते वचन सुग्रिवा,
जीवही देईन तुझिया जीवा!
या ओळीतलं मैत्र केदारपेक्षा कोण अधिक चांगल्याप्रकारे व्यक्त करू शकणार?!
अंत्य घडी तुज ठरो मोक्षदा
सांभाळीन मी तुझ्या अंगदा
राज्य तुझे हे, ही किष्किंधा
सुग्रीवाच्या करी समर्पण!
आणि एवढं होऊनही केदारच्या मनाची श्रीमंती जराही कुठे कमी झाली नाही, त्यात जराही कुठे कोतेपणा नाही, की जराही कुठे दुराभिमान नाही, की अहंपणचा, जेतेपणाचा स्पर्श नाही! राम वालीला सांगतो की मी तुला मारला खरा, पण तुलाही मोक्षच मिळो लेका! आणि काळजी करू नको, तुझ्या पुत्राला, अंगदालाही मी सांभाळीन, तुझे राज्य तुझ्याच घराण्याच्या सुग्रीवाच्या हवाली करीन. मी खाणार नाही!
वैर, वैराच्या जागी आणि नितीमत्ता, नितिमत्तेच्या जागी! मंडळी, हे उघडपणे, खुल्या दिलाने सांगायला केदारच हवा! आपल्याला काय वाटतं?
असो...!
मी जेव्हा एक व्यक्ति म्हणून केदारकडे बघतो तेव्हा मला असं जाणवतं की मी मोठ्या उदार मनाच्या व्यक्तिकडे पहात आहे. छोटेपणाचा, अशुभतेचा कधी स्पर्शच झालेला नाही या व्यक्तिला! प्रत्येक माणसाच्या आयुष्यात केदरासारखा एखादा तरी सखा असावा असं वाटतं! अगदी सखा नाही, तरी केदाराइतकी मोठ्या मनाची एखादी तरी वडीलधारी व्यक्ति अगदी प्रत्येकाला लाभावी, जिच्याकडे अगदी खुलेपणानं मनातलं बोलता यावं, आपले सगळे लाड पुरवून घेता यावेत, अणि प्रसंगी जिच्या मांडीवर डोकं ठेवून मनमोकळं रडताही यावं!
कारण एकदा मनमोकळं रडून घेतलं की मन अगदी स्वच्छ होतं, आकाश पुन्हा एकदा निळं, निरभ्रं होतं आणि माणूस पुन्हा एकदा केदारासोबत त्याच्या त्या उत्सवप्रिय, मंगलदायी वातावरणात केदारच्या सुरात न्हाऊन निघतो, केदारच्या रंगात गाऊ लागतो!
आणि कुणी सांगितलं की माणसं फक्त दु:खातच रडतात? अहो दु:खाश्रू तर नैसर्गिकच असतात परंतु आनंदाश्रूंचंच कित्येकदा अधिक ओझं वाटतं! दु:खी मनाला आवरण्यापेक्षा हळव्या मनाला आवरणं अधिक मुश्कील! माणसाच्या मनातील या सगळ्या भावभावना समजून घेणारा आणि त्याला सतत पुढे जात रहायला शिकवणारा केदारसारखा दुसरा सखा नाही मंडळी!
-- तात्या अभ्यंकर.
वाचने
16933
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
काही
In reply to काही by विजुभाऊ
अनेक..
सुरेख..
सुंदर .......
वा तात्या! वा!
एक शंका.
In reply to एक शंका. by llपुण्याचे पेशवेll
तौबा तौबा!
In reply to तौबा तौबा! by चतुरंग
वाटलेच होते ते वसंतखां असणार...
वा तात्या, रागदारी लेखनाची ही मेजवानी अनोखी आहे!
In reply to वा तात्या, रागदारी लेखनाची ही मेजवानी अनोखी आहे! by चतुरंग
नाही,
वाचत आहे
In reply to वाचत आहे by बेसनलाडू
असेच म्हणतो
In reply to वाचत आहे by बेसनलाडू
हेच म्हणतो..
In reply to हेच म्हणतो.. by केशवसुमार
अगदी हेच..
In reply to हेच म्हणतो.. by केशवसुमार
+१ +१
In reply to +१ +१ by ऋषिकेश
+१ +१ +१
वसन्तराव
क्या बात है !!!
सुंदरच.....
छान
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
आभार/उत्तरे..
मस्त
सर्व लेख