Skip to main content

आजच्या स्त्रीची अशीही एक प्रतिमा " वंदना मॅडम " - अंतिम

लेखक सुहास..
बुधवार, 11/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मग इतक्या रात्री तिच्या रुममध्ये दोन व्यक्ती? त्या पुरुष आहेत की स्त्रिया? की दोघेही? विचारात मी ट्रॉली सजवायला सुरुवात केली... साधारण १२.१५ च्या सुमारास, ती जेवण आणि खंब्याने सजलेली ट्रॉली घेऊन मी लिफ्टपाशी थांबलो. दुसर्‍या मजल्यावर, एक स्वीट, एक सेमी स्वीट, सहा एक्झीक्युटीव्ह आणि सहा क्लासीक्स अश्या मिळुन एकूण चौदा रुम्स आहेत. त्यातलाच स्वीट वंदना-मॅडमचा. दरवाजाची बेल वाजवून 'रुम सर्व्हीस' असे बोंबलावे लागते. मी नित्याच्या सवयीनुसार केले. पण रुम उघडली गेली नाही. रुमचा दरवाजा पहिल्या बेलला न उघडल्यास साधारण दोन-एक मिनिटे थांबायचा नियम आहे. मीही तसेच केले. तीन वेळा बेल दाबली; पण दरवाजा ऊघडला गेला नाही. अशा परिस्थितीत लॉबीतल्या फोनवरून 'रुम सर्व्हीस केबीन' वा 'रिसेप्शन' ला कळवायचे असते. मी फोन करण्याकरता वळणारच, इतक्यात दरवाजा उघडला गेला. एखादी व्यक्ती दरवाजातून नको असलेल्या पाहुण्याकडे जसे पाहते तसे वंदना मॅडम दरवाज्यातच उभी राहून माझ्याकडे बघत होती. उघडा खांदा, केस अस्ताव्यस्त, कपाळावर घामाचे थेंब, अंगाभोवती पांढरा-शुभ्र टॉवेल, अत्तराचा घमघमाट... "गुड ईव्हीनिंग!! मॅडम." "गुड ईव्हीनिंग, यु मे किप द ट्रॉली आऊट-साईड, आय विल टेक ईट ईन." "ओके मॅम, वुड यु लाईक टु साईन द बिल नाऊ, ऑर साईन ईन द मॉर्नींग?" (स्वार्थ! दुसरं काय? ट्युशनची फी बाकी होती, टीप तर हवीच ना.) "ओके, आय विल साईन नाऊ." मी कोटावरच्या खिशातलं पेन काढलं. ट्रॉलीवरचं बिलाचं फोल्डर तिच्या हातात दिलं. तिनं साईन करण्यासाठी पेन बिलावर घासलं, पण नेमकी रिफील संपली. "वेट हियर." ती पेन शोधण्यासाठी आत गेली. जाताना हाय हिल्सचा "टॉक-टॉक- टॉक-टॉक" असा आवाज आला. टॉवेलवर हाय हिल्स? आणि तेही रुम मध्ये? मला आश्चर्य वाटले. कारण स्वीट-रुममध्ये घरात घालायची कापडी आणि बाथरुमसाठी प्लास्टीक अश्या दोन स्लिपर्स पुरविण्यात येतात. पण त्यामुळे दरवाजा थोडासा सरकला गेला. उत्सुकतेपोटी मी ही आत पाहिले. समोरच्या उजव्या भिंतीवरील आरश्यात मला त्या दोन व्यक्ती स्पष्ट दिसल्या. दोन पुरुष! दोघांनीही कमरेभोवती टॉवेल गुंडाळलेला होता. एक शांतपणे कोचावर बसून सिगरेट पित होता. आडदांड असावा, कारण त्या कोचावर तो एकटाच बसल्यासारखा दिसत होता. दुसरा उभा होता, घामघूम झालेला, पोटावर 'सिक्स-पॅक्स'. त्याच्या कमरेभोवती गुंडाळलेल्या टॉवेलला दोन्ही मांड्याच्या मध्ये आलेला उभार लपून रहात नव्हता. मी चक्रावलो. तेवढ्यात वंदना मॅडमच्या हाय-हिल्सचा आवाज आला. मी मान खाली घातली. कस्टमरला माहित नको व्हायला की आपण रुममध्ये काय पाहिले? एक कारण म्हणजे 'प्रायव्हसी ऑफ कस्टमर' आणि दुसरं म्हणजे कस्टमरने 'तक्रार' केली तर...! वंदना मॅडमनी दिलेले फोल्डर घेऊन, मी रुम सर्व्हीस केबीनपर्यंत येईपर्यंत, विचारात गढून गेलो. देह स्त्रीचा असो वा पुरुषाचा, त्याला भूक लागतेच. ती शमवण्यासाठी वंदना मॅडमने व्याभिचार केला असे म्हणावे का? काय नैतिक व काय अनैतिक? माझी बौध्दीक पातळी तेव्हा (आणि आताही) हा प्रकार नीटसा समजून घेण्याइतपत नाही. "ए, टेक युवर टिप्स मॅन." कॅशियरच्या आवाजाने मी भानावर आलो. त्यादिवशी बिलाच्या फोल्डरमध्ये नोटाच नोटा होत्या, गुंडाळलेल्या. मी त्या मोजल्या. बाराशे-चाळीस रुपये होते. घाई-घाईत वंदनामॅडमने जे हातात आलं ते फोल्डरमध्ये टाकलं होतं. ते दोघे कोण होते? त्याचा विचार मनात आल्यावर मी केबीनमधूनच 'रिसेप्शन'ला फोन लावला. फोनवर जेम्स, आपलाच माणूस. "अरे, व्हु आर दोज गाईज ईन वंदनामॅडम्ज रुम?" "दोज आर दि लेडीज क्लब मेंबर्सं, डोन्ट यु नो?" मी लेडीज क्लबविषयी ऐकून होतो. मेल स्ट्रिपर्स म्हणा किंवा आताच्या भाषेत जिगेलोज म्हणा. गप फोन ठेवला. खाली आलो. ड्रेस बदलला. सायकलला टांग मारली. मला वाटलं, "चला आज दिवस मावळला', उद्या ट्युशनची फी भरुया, मम्मीला घरखर्चाला थोडेफार पैसै देऊयात." विचारातच सायकल चालवत होतो. सायकल पुढे जात होती. मन तसे अजून मागं त्या खोलीतच अडकलं होतं. खोलीत म्हणण्यापेक्षा त्या अनुभवाच्या विचारचक्रात. स्त्यावर तुरळक गर्दी होती. एखाद-दुसरी कार, माझ्यासारखा एखादा हॉटेलमधून परतणारा सायकलवाला दिसत होता. संगम ब्रिज क्रॉस करुन, आरटीओपाशी आलो. आरटीओ समोरचा पेट्रोल-पंप रात्रभर उघडा असतो आणि आरटीओ शेजारी एक चहावाला रात्रपाळी करतो. मी थांबलो, सिगरेट घेतली, चहा व्हायला वेळ होता म्हणून एका सिगरेटच्या तीन झाल्या. वेळ गेला. घड्याळात पावणे-दोन झाले. पुढे निघालो. पूर्वाश्रमीच्या 'राजाबहादुर मिल्स'चा डोलारा संभाळणारी इमारत ढळून, नव्याने होऊ घातलेल्या 'ला मेरिडियन'च्या अंडर-कंस्ट्रक्शन इमारतीच्या जरासं पुढं आल्यावर मला २०-२५ फुटांवर फुटपाथच्या किनारी काहीतरी हालताना दिसलं. सायकल जवळ जाऊ लागली तसं ते चित्र स्पष्ट होऊ लागलं. इमारत अजून पूर्ण न झाल्याने काही मजुरांच्या झोपड्या तिथेच होत्या. त्यातल्या काही अगदी रस्त्याच्या कडेला होत्या. आणि त्यातल्याच एका कडेला असलेल्या झोपडीशेजारी, रस्त्यावर दिवे आणि रहदारी नसल्याचा फायदा घेत एक मजुराचं जोडपं कामक्रीडा करत होतं. माझ्या ऊजव्या बाजूने एक ट्रक गेल्याने मला सायकल डाव्या बाजूला दाबावी लागली, सायकल त्या जोडप्याच्या अगदी जवळून गेली. दोघांचं अंग झाकावं म्हणून तिनं चादरीच्या खालचा भाग पायानं घट्ट धरला असावा, कारण वरचे दोन्ही हात त्याच चादरीच वरची टो़कं धरण्यात गुंतलेले मला दिसले आणि त्याच चादरीचा मध्यभाग खाली-वर होत होता. ट्रकच्या प्रकाशाने तिची एकरुपता तुटली. माझं तिच्या चेहर्‍याकडे लक्ष गेल आणि तिचं माझ्याकडं. गळ्यापाशी घाम एकवटला होता, गळ्यातलं मंगळसूत्र फाशी बसावी असं जखडलं होतं. तिच्या मानेशेजारून पाठमोरं मस्तक. पुरूषाचं. हालचालीत गर्क. अंगावर येत होते ते तिच्या चेहर्‍यावरचे भाव, त्यावर एखाद्या नवतरुणीची लज्जा नव्हती. तेथे होते लाचारीचे, तिच्या गरिबीचे, मजबुरीचे, नवर्‍याला सुख बहाल करताना होणार्‍या यातनांचे नृत्य. माझ डोकं हललं, मी सायकल फिरवली. तिथून थेट 'दुर्गा'त सटकलो. काऊंटरवरून योग्याला फोन लावला. त्याला 'दुर्गा'त बोलवून घेतलं. बियरचा पहिला ग्लास रिता केल्यावर सहज त्या दिवशीच्या वर्तमानपत्राकडे लक्ष गेलं. दोन बातम्या लक्ष वेधून घेत होत्या, पहिली बातमी होती एका पंधरा वर्षाच्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येची. कारण होते, तिचा तोकडा पडलेला स्कर्ट! होय, तिचा तोकडा पडलेला स्कर्ट. ताडीवाला रोडच्या मनपाच्या शाळेत कुठल्याश्या तरी योजने-अंर्तगत, गरीब विद्यार्थ्यांना 'फुकट गणवेष' वाटप झाल़ं होतं, त्याच योजनेतून तिला मिळालेला हा स्कर्ट तोकडा पडला आणि मास्तरीणबाईने भर वर्गात तिला झापले, विषय गावभर झाला. बाहेर छेडछाड आणी घरात हाड-हि़ड झाली. अवमानाने संतापलेल्या या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली. दुसरी बातमी होती आपल्या गृहमंत्र्यांच्या निवेदनाची, ते निवेदन असं होतं. "घाई-घाईत कपडे बदल्यामुळे, रॅम्पवर चालताना, मॉडेल्सचे कपडे पडतात"...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 25278
प्रतिक्रिया 61

प्रतिक्रिया

...किती तफावत आहे ना दोन्ही दृश्यांमध्ये.! दोन्ही मध्ये एक गोष्ट कॉमन आहे... निसर्गनियम्...पण परिस्थिती?...कमालीची वेगळी! छान स्केच केलय.. तीन दा वाचला लेख... पुनः तीच विषण्णता..

समाजव्यवस्थेतली विषमता आणि नैतिकतेच्या बुरख्या आडून चाललेले सगळेच उद्योग जर असे समजले तर वेड लागेल. तुम्ही टोकदार अनुभव प्रामाणिकपणे लिहिला आहे.

ग्लोबलाय्झेशन म्हण्ट्ल की हे आलच.. जास्त कही बोलन्याची इछा नाही .... नाहीतर नविन वाद.... पण अस ऐकुन वाइट वट्त हो... लीखान उत्तम...

In reply to by डी.प्रासाद

ह्यात वाईट वाटण्या सारखे काही नाही आनादी काला पासून हे चालू आहे आणि चालूच राहणार

थेऊर, डोणजे, बुधवार पेठ... सगळीकडं पकडलं गेल्यावर सर्वांग शक्य नसले तरी किमान तोंड झाकुन घेण्याची गरज नक्की काय असते ते आता जरा उमगल्यासारखं वाटतंय!

In reply to by प्रसन्न केसकर

थेऊर, डोणजे, बुधवार पेठ... सगळीकडं पकडलं गेल्यावर सर्वांग शक्य नसले तरी किमान तोंड झाकुन घेण्याची गरज नक्की काय असते ते आता जरा उमगल्यासारखं वाटतंय! >>> काय बोलु ? कर्दळेसर होते तोवर चांगल होतं (मी चांगल म्हणतोय, ठीक नाही ) !! कोणीतरी आमच्यासारखंही होतं (राजकारणापलीकडचं) आता मात्र .......न् लिहीलेच बरं

In reply to by प्रसन्न केसकर

अदितीशी सहमत..
सगळीकडं पकडलं गेल्यावर सर्वांग शक्य नसले तरी किमान तोंड झाकुन घेण्याची गरज नक्की काय असते
अशा मुलींचे समर्थन करत नाही, पण पकडलेल्या एखाद्या बलात्कार्‍याला, अतिरेक्याला किंवा गुन्हेगाराला देखिल टीव्हीवर दाखवताना बुरखा घालूनच दाखवतात. मग या मुलींचेच चेहरे दाखवण्याच्या मिडियाच्या उत्साहाला एवढं उधाण का येतं? या मुलींचा अपराध नक्कीच एवढा मोठा नसेल. हो ना?

In reply to by मस्त कलंदर

मीडीयाकडं त्या दिवशी अन तश्या पार्ट्यात दाखवण्याकरता एव्हढं असत की चेहरे दाखवणे अनाठाई ठरेल. हवं तर एकदा चार तास वेळ काढा थेऊरमधे काय होतं ते दाखवतो (तुम्हाला बघवणार असेल तर.) उगीच नको तिथं मुक्तीवादी बाजु घेऊ नका प्लीज. मुक्तीचं स्वरुप किळसवाणं पण असु शकतं.

In reply to by प्रसन्न केसकर

निदान माझी तर ही असली मुक्तीची संकल्पना नाही, ज्यांची असेल ते जाणोत. मी मुळात त्या मुलींनी काही केलं त्याचे समर्थन करत नाही. माझा आक्षेप हा त्या मुलींनी चेहरे झाकण्याच्या घेतलेल्या आक्षेपला आहे. एकीकडून समाजात मोठे मोठे गुन्हे करणार्‍यांचे चेहरे आपणच झाकायचे, आणि दुसरीकडे फक्त स्वतःचे वाटॉळं करणार्‍याचे चेहरे दाखवायचे अशा प्रवृत्तीला आक्षेप आहे. जर माझ्या प्रतिसादात स्त्रीमुक्तीचा वास येत असेल तर मी उदाहरण बदलते. अंमली पदार्थाचे सेवन करणार्‍या मुलांना पकडल्यावर त्यांनी चेहरे झाकले तर मिडियावाल्यांना आक्षेप असू शकतो आणि तोच आक्षेप बलात्कारी, अतिरेकी आणि इतर गुन्हेगार बुरख्यात दाखवतात त्याला का नाही? कारणं वेगळी असू शकतात. माझा मुद्दा, गुन्हा कुणाचा जास्त गंभीर आहे हा आहे.. स्त्री किंवा पुरूष कोण चूक हा नाही.
मुक्तीचं स्वरुप किळसवाणं पण असु शकतं.
हे स्त्रीमुक्तीचे रूप नाही. दोन्ही बाजूंत आलेल्या तथाकथित विचारांच्या मुक्तीचा परिणाम आहे. त्यामुळे संस्कृती फक्त मुलींच्या वेशभूषेपर्यंत मर्यादित ठेवू नका.. आणि जे बघवणार नाही, ते माझ्या अल्प ज्ञानाप्रमाणे स्त्री आणि पुरूष दोघे मिळून करतात त्यामुळे फक्त स्त्रीच हे करते हा साधारण एक ग्रह इथे दिसतो.. तो नसावा. बाकी, खालच्या कालिन्दी मिधोळकरच्या मताशी सहमत!

In reply to by मस्त कलंदर

ज्याची नंतर लाज वाटते, ज्याचे परिणाम भोगण्याची मनाची तयारीच नाही ते कृत्य आधी करायचेच कश्याला? एखादी गोष्ट करायचीच तर नंतर होणार्‍या परिणामांना पण तयार रहावे. ते परिणाम होतात तेव्हा गळे काढु नयेत.

In reply to by मस्त कलंदर

एकीकडून समाजात मोठे मोठे गुन्हे करणार्‍यांचे चेहरे आपणच झाकायचे, आणि दुसरीकडे फक्त स्वतःचे वाटॉळं करणार्‍याचे चेहरे दाखवायचे अशा प्रवृत्तीला आक्षेप आहे. मोठ्या गुन्हेगारांना साक्षीदारांपुढे ओळख पटवण्यासाठी हजर करावे लागते. जर त्यांचे चेहरे टीव्हीवर / वृत्तपत्रात दाखवले तर ओळख परेडला काहीच अर्थ उरणार नाही. तसाही न्यायदानाच्या प्रक्रियेलाच काही अर्थ उरला नाहीये; मोठ्या माशांना कधीच शिक्षा होत नाही हा भाग वेगळा. आता मोठ्या गुन्हेगारांपेक्षा या पार्टीतल्या किंवा तत्सम लोकांशी आपला संबंध येण्याची शक्यता जास्त आहे. तसेच मोठ्या गुन्हेगारांचे आपण काहीच वाकडे करू शकत नाही पण हे लोक ओळखू आले तर सज्जन लोक त्यांच्या मनाप्रमाणे योग्य भूमिका घेउ शकतील. ( काही जण घेत नाहीत, उदा राहुल महाजन प्रकरण )

In reply to by प्रसन्न केसकर

_पकडले_ गेल्यावर????? तथाकथित संस्क्रुतीरक्षक मिडीयावाल्यांच्या समोर दुसरं काय करणार?

In reply to by कालिन्दि मुधोळ्कर

कुठल्या संस्कृतीरक्षकांबाबत बोलताय तुम्ही? ज्यांना त्रास झाला अन तरीही त्यांनी कायदा पाळला त्यांच्याबद्दल? ज्यांनी अस्तित्वात असलेले सर्व कायदे मोडले, वर शिरजोरपणे कायद्याच्या अंमलबजावणीला विरोध केला, त्यांचे तेव्हढे स्वातंत्र्य अन ज्यांनी कायद्याची अंमलबजावणी केली, ज्यांनी कायद्याचे सर्वार्थाने पालन केले त्यांच्याचवर चिखलफेक? हे म्हणजे कसाबसारख्या दहशतवाद्यांनाच फक्त मानवी हक्क असतात अन त्यांचे बळी म्हणजे सगळे अजापुत्र असे म्हणण्यासारखेच झाले. ५०० जणांच्या मौजमजेसाठी हजारो लोकांच्या पोटावर पाय? किळस येते या विचारसरणीची! मौजमजा करण्याला किंवा व्यक्तीस्वातंत्र्याला माझा विरोध नव्हता, नाही अन असणार पण नाही. पण मौजमजा याचा अर्थ कायदा मोडणे, सगळ्या समाजाला वेठीस धरणे अन समाजावर आक्रमण, अन्याय करणे असेल तर त्याला माझा विरोध सततच असेल. माझ्या दृष्टीने समाज सगळ्यात मोठा अन तो सुरळीत चालावा म्हणुन कायदे आवश्यक. जर ते कायदे अयोग्य वाटत असतील, तेव्हढी हिम्म्त असेल तर बदलुन घ्यावेत खुशाल.

अशा गोष्टी आजच्याच काळात घडत आहेत यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. शीर्षक खटकले. आजच्या स्त्रीची प्रतिमा लेखकाच्या डोळ्यासमोर अशी आहे का? दिसतं ते सगळंच आवडतं, मनावर कोरलं जातं असं नव्हे. निदान अशा स्त्रिया माझ्या मनावर (चांगला) परिणाम करत नाहीत, त्यामुळे शीर्षक खटकले.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आजच्या स्त्रीची प्रतिमा लेखकाच्या डोळ्यासमोर अशी आहे का? कदाचित नसावी, कारण शिर्षकात "..अशीही एक.." असं आलंय. तरीसुद्धा शिर्षक खटकलं कारण सामान्यीकरण झाल्या सारखं वाटलं. लेखाची मांडणी आवडली. समाजात अस्तित्वात असलेली विषमता चोख मांडली आहे, परंतू "आजच्या स्त्रीची..." वरून ही विषमता जणू अलिकडेच निर्माण झाली असा भास होतो. पुर्वी असेच प्रकार पडद्या आड होत असतील, आता पडदा नाहीसा झालायं एवढंच! दिसतं ते सगळंच आवडतं, मनावर कोरलं जातं असं नव्हे. निदान अशा स्त्रिया माझ्या मनावर (चांगला) परिणाम करत नाहीत. ह्या अदितीच्या मताशी सहमत.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

शीर्षक खटकले नाही. कारण त्यात 'अशीही' असे म्हटलेले आहे 'अशीच' असे म्हटलेले नाही. जसे एखादी चांगली गोष्ट मनावर कोरली जाते तशी वाईट गोष्टही मनावर कोरली जाऊ शकते. त्यामुळे शीर्षकात काही गैर वाटले नाही.

कथा आवडली. कथेची मांडणीदेखिल चांगली आहे. वर अदिती यांनी म्हटल्याप्रमाणे, शीर्षकामुळे आजच्या स्त्रीचे सामान्यीकरण होते आहे. अवांतर - स्वीटच्या आतदेखिल हील्सचा टॉक्-टॉ़क आवाज येत होता? स्वीटमध्ये कार्पेट नव्हता काय? हे निरीक्षण अर्थातच गौण!

In reply to by सुनील

चालायचेच हो. असे सामान्यीकरण (म्हणजे generalization ना?) सगळेच करतात. परवाच नाही का कुणीतरी एका आंजा मित्राच्या अनुभवावरून अख्खे शहर, तो संपूर्ण प्रांत आणि त्यातील यच्चयावत पुरुष यांचे सामान्यीकरण केले होते. असे करण्याचे समर्थन नाही करत आहे. पण अनवधानाने होते असे बऱ्याचदा. तसेही चांगल्या प्रकारचे सामान्यीकरण पण करतोच की आपण. इथे फक्त दाखला देण्याचा उद्देश आहे, वाद घालण्याचा नाही :-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

इथे फक्त दाखला देण्याचा उद्देश आहे, वाद घालण्याचा नाही हे लिहिलंत ते बरं केलंत पण दाखला आवडला :) :) :) अनुभवाचे सादरीकरण उत्तम...

समाज हा विषमतेवरच आधारलेला आहे.गरीब श्रीमंत उच्चभ्रु मध्यम वर्गीय शिक्षित अशि़क्षित व्यभिचारी असे अनेक लोक सामावलेले आहेत. चालायचच. पण अदिती म्हणाली तस आजची स्त्री हा उल्लेख खटकला. हे म्हणजे शितावरुन भाताची परीक्षा केल्यासारख झाल. बाकी अनुभव सुरेख कथन केला आहे.

In reply to by Dhananjay Borgaonkar

समाज हा विषमतेवरच आधारलेला आहे.गरीब श्रीमंत उच्चभ्रु मध्यम वर्गीय शिक्षित अशि़क्षित व्यभिचारी असे अनेक लोक सामावलेले आहेत. चालायचच. या विधानाशी पुर्णता असहमत. समाजात विषमता असु नये यासाठीच कायदे असतात, किमान भारतात तरी. विषमतेचे कुठल्याच प्रकारे समर्थन किंवा स्वीकार होऊ शकत नाही.

व्यक्ती, तितक्या प्रकृती !! हि आजच्या स्रीची अशीही प्रतिमा सरसकट होऊ शकत नाही Was there no wamp ever existed in earlier era ? जशी त्या काळी पूजनिय स्त्री सीता होती तशी कैकई ही देखील स्त्री होती हिडिंबा पण राकक्षिण जरी होती पण स्त्री च होती जिचे नंतर भिमाशी लग्न नंतर झाले विदर्भाजवळच्या काही गावात तर तिची पूजा पण करतात का ते मात्र माहीत नाही. मग आजच्या स्त्री बद्ध् ल असे सरसकट लिहणे थोडे अयोग्य वाटते. आजचे Page3 High Profile LifeStyle हे स्त्री पुरुष या दोघांच्या बाबतीत घृणास्पद असू शकते. पण फक्त स्त्री बध्दलच असे हे शिर्षक थोडेसे खटकले. काही High Profile पुरुषांचेही वागणे फारसे वंदनीय नाही. त्यामुळे जिथे पैसा आहे पण संस्कार नाहीत तेथे हे असे प्रकार सर्रास बघायला मिळतात. They all come into same Disgusting Category and can never be proved to be Ideal for any generation. सुहास अगदी वरच्या पट्टीचे लेखक आहेत कारण वाचकाला खिळवून ठेवण्याचे कसब त्यांच्यात नक्कीच आहे. पण कळत-नकळत वाचक, लेखकाने लिहलेल्या मजकुराला सहमत होत जातो. तेव्हा लेखकास नम्र विनंती, अशी वाक्ये जपून वापरावीत. बाकी सुहास च्या लिखाणाला तोड नाही ! लेख आवडला हे आधीच सांगितले आहे .

"अशीही एक" हे महत्त्वाचे. त्यापलीकडे अर्थाचे एम्बॉसिंग इथे होऊ नये. कारण, इथं केवळ ती वंदना नाही. त्यापलीकडंही काही स्त्रिया आहेत. त्यामुळं अर्थ लावायचेच झाले तर तेही संदर्भ घ्यावे लागतीलच. हा विषय दोन्ही बाजूंनी असाच असतो. म्हणूनच शिवराय एकच असतात. अफझलखानही एकच असतो. बाकी बिन-चेहऱ्याची, मातीच्या पायाचीच माणसं असतात. त्यांच्यातून प्रतिमा निर्माण होत नाहीत. प्रतिमा निर्माण होतात ती माणसं बिन-चेहऱ्याची असत नाहीत, त्यांचे पाय मातीचे असतात हे सांगून चालत नाही. इतका ग्रेनेस स्वीकारला तर हीही एक प्रतिमा असू शकते आणि अशाच प्रतिमा पुरूषांच्याही असतात हे स्वीकारणं अवघड जाऊ नये.

तुमची वर्णन करण्याची हातोटी आवडली. बाकी, अशा स्त्रिया "आजच्या" च आहेत असे नाही. असे प्रकार पूर्वीही होत असावेत असा अंदाज आहे. :)

सुहासशेठ, बेंगलोर तुमच्या लिखाणाला चांगलेच मानवलेले दिसते.. जबरदस्त स्टोरी टेलिंग.. अफलातून पकड..अभिनंदन.. (वाचक)केशवसुमार आणिक्रमश: असून दोन्ही भाग एकत्र दिले त्याबद्दल आभार.. (आभारी)केशवसुमार बाकी आजची वगैरे वाद चालू दे.. (दुर्लक्ष)केशवसुमार

सुहास अतिशय प्रभावी लेखन करतो. मागे एका लेखात/प्रतिसादात सुहासने उल्लेख केल्याप्रमाणे बिका ज्यांनी सुहासला लिहायला उद्युक्त केले त्याबद्दल धन्यु! शीर्षकात "अशीही" शब्द असल्याने निदान मला तरी त्यात काही आक्षेपार्ह वाटत नाही. थेउरचे काय ते एकदा सगळे बाहेर येउ द्या. असे समजत होतो की उत्साही तरुणांची पार्टी , आवाज, गोंधळ, ट्रॅफीकजाम इ. मुळे थेउरकरांना त्रास व म्हणुन पोलीस कारवाई. पण आता थेउरला बुधवारपेठेच्या बाजुला नेल्याने एकदा काय ते सांगाच. नवरात्रीत गरबा खेळायला बाहेर पडता येते पण मग नंतरच्या दिवसात गर्भपाताचे प्रमाण वाढते असे गेली काही वर्षे ऐकतोय तर २०-२२ वर्षाच्या मुलांनी पार्टी केली व त्यात असे काहीसे घडले तर ते वेगळे कसे? २०-२२ वर्षाच्या / सज्ञान लोकांनी कसे वागावे हे कोण ठरवणार? जे कळले आहे त्याप्रमाणे ही पार्टी एका खाजगी स्थळी झाली. आपल्या समाजात जिथे नैतिकतेच्या व्याख्या, संस्कृती यावर इतके बोलले जाते तिथे सगळ्यांच्या नजरेत भरेल व आपलीच पार्टी संपेल, पैसे व संधी वाया जाईल असे वर्तन ही मुले कसे काय करतील? निदान आम्ही मुले जेव्हा ओली पार्टी गच्चीत करायचो तेव्हा आजुबाजुला त्रास होणार नाही व कोणी तक्रार करुन आपले तीर्थप्राशन अडकवू नये व पुन्हा गच्चीत पार्टी करता यावी याची खबरदारी घ्यायचो ते आठवले. म्हणुन असे म्हणतोय हो. बाकी आवाजाचा त्रास ह्या मुलांच्या पार्टीचा वेगळा कसा? थेउरमधे सर्व लग्न, उत्सव अत्यंत शांततेत होतात का? लाउड स्पीकर, धिंगाणा हे शब्द थेउरमधे कधीच नव्हते का? थेउरकरांना लग्नसिझन मधे कोल्हापूरला पाठवले पाहीजे :-) अर्थात इथे हे नमूद करु इच्छितो की आवाजाचा त्रास मला आक्षेपार्ह आहे त्याबद्दल मी तिथे असतो तर मीच पोलीसांना बोलावले असते पण त्या मुला मुलींनी काय कपडे घातले आहे व त्यांचे नक्की काय चालले आहे याच्याशी मला सोयरसुतक नाही. पण इथे तसाच सुर निघतोय असे वाटल्याने हे लिहावेसे वाटले. >ताडीवाला रोडच्या मनपाच्या शाळेत कुठल्याश्या तरी योजने-अंर्तगत, गरीब विद्यार्थ्यांना 'फुकट गणवेष' वाटप झाल़ं होतं, त्याच योजनेतून तिला मिळालेला हा स्कर्ट तोकडा पडला आणि मास्तरीणबाईने भर वर्गात तिला झापले, विषय गावभर झाला. बाहेर छेडछाड आणी घरात हाड-हि़ड झाली. अवमानाने संतापलेल्या या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली. ही बाब अतिशय गंभीर. १) तोकडा स्कर्ट मुळात घालून शाळेत जाताना घरात कोणी हाड-हिड कशी केली नाही? २) १५ वर्षाची मुलगी तिला गणवेश घातल्यावर शाळेत असे चालणार नाही हे लक्षात येणार नाही हे पचायला कठीण आहे. ३) बर शाळेत नक्की बाईंनी कसे झापले? खाजगीत सुनवायला हरकत नव्हती पण कदाचित तो सगळा वर्ग मुलींचा असेल व इतर मुलींनाही हे कळावे म्हणुन बाईंनी हा विषय वर्गात काढलाही असेल. म्हणा जर त्या नेहमीच्या शिक्षीका असतील तर आत्महत्या करु शकणारी, संवेदनाशील विद्यार्थीनी ओळखता यायला हवी ३) बर जर स्कर्ट तोकडा असेल तर लगेच छेडछाड करणारे असले कसले गावकरी, महान संस्कृतीचे वारसदार द ग्रेट भारतीय नागरीक ना? (अरेरे बहुदा सगळे महान भारतीय संस्कृती विसरुन पाश्चात्य माध्यमांच्या प्रभावाखाली गेलेले असावेत नै?) व सगळ्यात दुर्दैव म्हणजे जिथुन आधार मिळावा असे घरातुन हाड-हिड का झाली? इतकी की मुलीने आत्महत्या करावी? अरेरे! असो दोन चार ओळीच्या बातम्यातुन स्पष्ट चित्र निदान मला तरी नाही दिसत :-( पण जर खरच असे असेल अतिशय दुर्दैवी घटना. याला जबाबदार कोण?

In reply to by सहज

ही बाब अतिशय गंभीर. १) तोकडा स्कर्ट मुळात घालून शाळेत जाताना घरात कोणी हाड-हिड कशी केली नाही? २) १५ वर्षाची मुलगी तिला गणवेश घातल्यावर शाळेत असे चालणार नाही हे लक्षात येणार नाही हे पचायला कठीण आहे. ३) बर शाळेत नक्की बाईंनी कसे झापले? खाजगीत सुनवायला हरकत नव्हती पण कदाचित तो सगळा वर्ग मुलींचा असेल व इतर मुलींनाही हे कळावे म्हणुन बाईंनी हा विषय वर्गात काढलाही असेल. म्हणा जर त्या नेहमीच्या शिक्षीका असतील तर आत्महत्या करु शकणारी, संवेदनाशील विद्यार्थीनी ओळखता यायला हवी ३) बर जर स्कर्ट तोकडा असेल तर लगेच छेडछाड करणारे असले कसले गावकरी, महान संस्कृतीचे वारसदार द ग्रेट भारतीय नागरीक ना? (अरेरे बहुदा सगळे महान भारतीय संस्कृती विसरुन पाश्चात्य माध्यमांच्या प्रभावाखाली गेलेले असावेत नै?) व सगळ्यात दुर्दैव म्हणजे जिथुन आधार मिळावा असे घरातुन हाड-हिड का झाली? इतकी की मुलीने आत्महत्या करावी? अरेरे! >>> धन्यवाद सहज !! हा विषय घेतलात , जे मला आठवत ते अस आहे . भारत वि.INDIA काय बरोबर काय चुक ?? एका बाजुला... ह्या सर्व प्रकरणाची सुरुवात झाली हो,ती कॅम्पातल्या एका कॉन्वेन्ट शाळेतुन,तिथल्या स्त्री प्रिन्सिपल ने फतवाच काढला होता की विध्यार्थीनींचा स्कर्ट गुडघ्याच्या वर असावा (ईतरही काही फतवे होते , मेंहदी लावायची नाही,हेयर क्लिप्स लावायच्या नाही ,केस छोटे असावेत आणी हेयर बॅण्ड लावायचा, बांगड्या,ईतर दागदागिने घालायचे नाहीत.एका मुलीने हातावर मेंहदी काढली म्हणुन शिक्षीकीने हातावर छड्या मारल्याच प्रकरण ताजंच आहे.) पालकांनी ह्या बाबींवर आक्षेप घेतला होतो आणी पिन्सिपल आपल्या निर्णयावर ठाम होती. हे चालु असताना... दुसर्‍या बाजुला... (माझ त्यावेळी ताडीवाला रोड झोपडपट्टीला,झोपडपट्टी सुरक्षा दल च्या निमीत्ताने 'कनेक्शन होत,ईतके घट्ट नव्हतं, पण लोकसेवा नावाच जे तिथल तरूण मंडळ आहे, त्यातली काही अजुनही मित्र आहेत.) त्या मुलीबद्दल थोडसं.... ढोले पाटील रोडच्या गणेश मंदीरापासुन. सरळ गेल्या वर, अक्षय कॉम्प्लेक्ष्स क्रॉस केल की, मेनलॅण्ड चायना.तिथुन लेफ्ट घेतला की ५ मिनीटाच्या अंतरावर ही मुलगी रहात असे. १०*१२ चं पत्र्याच शेड,वडील पेंटर,आई ढोले पाटील रोडवरच्या ऊच्चभ्रु वस्तीत मोलकरीण, भाऊ दहावी नापास आणी स्टेशनला डायर्‍या,पेन्स वगैरैचा फिरता विक्रेता.मुलीची शाळा दुपारची १२ते५, घरापासुन शाळा, चालत वीस मिनीटांच्या अंतरावर. घरातुन निघताना ही घराची चावी शेजारी देऊन निघायची, संध्याकाळी घरी गेली की सर्वांचा स्वंयपाक आवरुन आई वडिंलाची वाट बघत बसायची.दिसायला नीट-नेटकी, शिकवणी वगैरै प्रकार नाही. गणवेशाविषयी.. मनपाने आधी सर्वांची मापे घेतली होती, पण गणवेष शाळेच्या ताब्यात येईपर्यंत व, ओंगळ कारभारामुळे, आठ-नऊ महिन्यांचा,वेळ लागला.त्या दरम्यान ही मुलं मोठी झाली.स्कर्ट तिला एकटीलाच तोकडा पडला नव्हता जवळपास सर्वच मुलींना पडला होता, हिला जरा जास्तच तोकडा पडला. नंतर काय झाल ? तिच्या आत्महत्येनंतर कार्यकर्त्यांनी बोबांबोब केली,पेपरवाल्यांनी मुद्दा ऊचलुन धरला. त्यानंतर 'स्त्री महापौर' त्या शाळेत परिस्थिती बघायला गेल्या.तिच्या समोर ज्या मुली ऊभ्या राहिल्या होत्या , त्यांना स्वता लज्जारक्षणार्थ नीट ऊभे देखील रहात येत नव्हत. हे फक्त माहीती देण्याकरता... आज सर्व प्रतिसाद वाचल्यानंतर मला पडलेला एक प्रश्न . ईथे कॉस्मोपॉलिटिन सिटी म्हणुन प्रसिध्द असलेल्या, बंगळुरात,तीन प्रकारच्या बसेस आहेत, त्याच वर्गीकरण आपण अस करू शकतो. सामान्य : खरोखर साध्या ,जुण्या घाटणीच्या बसेस, दरवाजा नाही (माझ्या रुमपासुन ऑफीसपर्यंतच तिकीट ३ रू.) सेमी-कोच : मध्यमवर्गीय थोड्या सुटसुटीत, आपोआप बंद होणारा दरवाजा (माझ्या रुमपासुन ऑफीसपर्यंतच तिकीट ५ रू) कोच : एसी,रेडियो वगैरै असणार्‍या व्होल्वो एकदम हाय-फाय , दरवाचा चालु-बंद होताना आवाच देखील होत नाही (माझ्या रुमपासुन ऑफीसपर्यंतच तिकीट १० रू.) मला पडलेला प्रश्न ... सामान्य आणी सेमी-कोच मध्ये स्त्रियांसाठी काही आसने राखीव आहेत,तशी कोचमध्ये का नाहीत ???? सहसा स्वताच्या धाग्यावर लिहीत नाही मी..पण कधीतरी बदल स्विकारावा ब्वा माणसाने

In reply to by सुहास..

सामान्य आणी सेमी-कोच मध्ये स्त्रियांसाठी काही आसने राखीव आहेत,तशी कोचमध्ये का नाहीत ?
मुंबईच्या लोकल ट्रेनमधे लेडीज डबे राखीव आहेत, हे 'आरक्षण' काढण्याचा विचार असेल तर मी त्याचा विरोध करेन. पुणे-मुंबै या बस-ट्रेन सेवांमधे तिकिट, सीट आधीच राखून ठेवता येते, आरक्षित जागेवर व्यवस्थित बसायला मिळतं, तिथे स्त्रियांसाठी विशेष आरक्षणाची काहीही गरज नाही. उच्चभ्रू कॉन्व्हेंटमधले तोकड्या स्कर्टाचे नियम आणि महाग बसमधे नसलेलं आरक्षण ही तुलना पटली नाही. (वस्तुत: आमच्या मराठी माध्यमाच्या शाळेत मुलींनी टिकली लावायचीच, बांगड्या घालायच्याच असे नियम होते, ते मला कधीही आवडले नाहीत. सर्वांनी नखं नीट कापलेलीच हवीत, मुलींचे केस व्यवस्थित बांधलेले हवे, (मुलांच्या झिपर्‍या नकोत) हे नियम मला जाचक वाटले/वाटत नाहीत.)

In reply to by सुहास..

भारत वि इंडीया, अमीर वि गरीब....ते शेवटी वैयक्तिक सज्जन वि दुर्जन, शहाणे वि मूर्ख असे अनादी कालापासुन होत आले आहे मला त्यात अडकायचे नाही. असो मुलीचा विषय. काहीही कारण सरकारी अनागोंदी असो, केवळ गणवेशाच्या निमित्तामुळे एक जीव गेला हे अजिबात पटत नाही. याला दोष केवळ मनपा दिरंगाई, राजकीय भ्रष्टाचार नसुन १) तोडका पडल्याने ठीक आहे तोवर दुसरा कपडा घाल ही शाळा प्रशासनाची जबाबदारी त्यांनी पाळली नाही. यात मुलीचा जाहीर अपमान वगैरे कशाला करायला पाहीजे होता? यावरुन आठवले गेल्या काही महीन्यात अश्या दोन तीन तरी घटना वाचल्या आहेत फी भरली नाही म्हणुन अपमान करुन पाठवले व मुलांनी आत्महत्या केल्या. हे देखील अतिशय दुर्दैवी आहे. अर्थात मुलाने उलट उत्तर दिले म्हणुन घरी जा सांगीतले असे शाळा प्रशासन सांगू शकते पण पुन्हा परत त्याचे पर्यवसान त्या मुलाच्या मृत्यु मधे झाले हे अतिशय वाईट परत यात शाळाप्रशासना बरोबरच आई वडलांचा दोष २) घरुन देखील आइ-वडलांनी शाळेत एक चिठ्ठी द्यायला हवी होती की गणवेश तोकडा आहे कारणाने गणवेश न घालता साध्या कपड्यात पाठवत आहे ३) तोकडे कपडे होते म्हणुन ज्यांनी छेडछाड केले ते भारताचे नौजवान. अर्थात ज्यांचे भरपूर कपडे आहेत त्यांना देखील हे भारतीय मर्द छेडत नसतील यावर विश्वास ठेवणे जड आहे. ४) व अतिशय वाईट म्हणजे तिचा गणवेष छोटा झाल्याचा तिचा काही दोष नसताना तिच्याच घरच्यांकडून झालेली हाड-हाड. इकडे तिकडे बोट दाखवून दुषणे देता येतात. पण ह्या घटनेत ज्यांना 'सामान्य नागरीक' म्हणले जाते त्यातला एकही घटक जबाबदारीने वागला नाही हेच दिसते. यात आता 'भारत' कोण व 'इंडीया' कोण? भले इंडीयाला संस्कृती नाही पण भारताला आहे ना? तारतम्याने वागायला का जमले नाही? शब्दातुन शब्द वाढत जातो त्यामुळे ते बंद आवाज न करणारी बसची दारे, त्यात स्त्रियांना आरक्षण नसणे, बदल स्वीकारणे इ. हा मुद्दा ह्या चर्चेत घेत नाही.

In reply to by सहज

बर जर स्कर्ट तोकडा असेल तर लगेच छेडछाड करणारे असले कसले गावकरी, महान संस्कृतीचे वारसदार द ग्रेट भारतीय नागरीक ना? (अरेरे बहुदा सगळे महान भारतीय संस्कृती विसरुन पाश्चात्य माध्यमांच्या प्रभावाखाली गेलेले असावेत नै?) १. हो हेही भारताचे नागरीक आणि मोलकरणींवर बलात्कार करणारेही भारताचे नागरीकच. २. साधारपणे समाजात राहताना समाजातल्या इतर घटकांवर आपल्या वागण्याचा काय परिणाम होतो हे बघूनच आपण वागायचे असते यालाच सुसंस्कृत पणा म्हणतात असे जालावरच कुठेतरी वाचले होते. म्हणूनच एखाद्या स्त्रीने कमी कपडे घालून रस्त्याने फिरल्यामुळे तीला फार मोकळे मोकळे वाटले असेल पण तिच्या या मोकळेपणाचा बळी इतर कोणी पडली असेल तर? मध्यंतरी सीएनएन आयबीएन वरच्या एका मुलाखतीत सिंधुताई सपकाळ यांनी असे म्हटल्याचे आठवते आहे की तोकड्या कपड्यातल्या मुली रस्त्याने फिराताना बघून, किंवा अन्यत्र चाळे करताना बघून उच्चभ्रू वर्गातल्याना काही फरक पडत नाही पण त्याच समाजात असलेल्या रिक्षावाले, ट्रकवाले झालंच तर फेरीवाले, हातगाडी वाले व कमी उप्तन्न व जीवनशैली गटातील अन्य लोकांच्या भावना उद्दीपीत होतात पण तो आवेग तिथे बाहेर पडत नाही तर तो बाहेर पडतो त्यांच्याच वस्तीतल्या (झोपडपट्टीतल्या) अन्य महीलांवर म्हणूनच बलात्काराच्या अनेक घटना या अशा वस्त्यांमधे सर्वाधिक होतात उच्चभ्रू सोसायट्यांमधे नाही.अनेक अत्याचार असे असतात की वर्षानुवर्ष होऊन गेली तरी इज्जत वाचवण्यासाठी म्हणून बाहेर पडत नाहीत. " (कदाचित प्रसन्नदांकडे अधिक डेटा असेल)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

याची जाणीव असुनही वाईट कृत्य करणारा हा नराधमच. इतर कुठल्याही कारणाने त्याचे समर्थन होउ शकत नाही. गेले तीस चाळीस वर्षे बॉलीवूडमधुन घडणारे अंगप्रदर्शन अजुनही अंगवळणी पडले नाही? आजच्या जमान्यात ही अशी भूक बघावे तिथुन लागणारच त्याकरता उपाय म्हणून बुरखासंस्कृती देखील अपूरी आहे. सिनेमा नाटक, वाहीन्या, छापील काहीही सगळ्यावर बंदी आणुन मगच फरक पडेल काय? जय तालीबान!

In reply to by सहज

गेले तीस चाळीस वर्षे बॉलीवूडमधुन घडणारे अंगप्रदर्शन अजुनही अंगवळणी पडले नाही? आजच्या जमान्यात ही अशी भूक बघावे तिथुन लागणारच त्याकरता उपाय म्हणून बुरखासंस्कृती देखील अपूरी आहे. सिनेमा नाटक, वाहीन्या, छापील काहीही सगळ्यावर बंदी आणुन मगच फरक पडेल काय? नग्नता बघूनही जितकी उत्तेजना येत नाही तितकी कदाचित प्रत्यक्षात फार थोडी झलक बघूनही येते. म्हणूनच बंदी आपण उल्लेखलेल्या माध्यमांवर आणण्यात काहीच अर्थ नाहीये कारण कदाचित त्याने फारसा फरक पडणार नाही. गरज आहे ती मूळातून संस्कार करण्याची आणि त्याहूनही संस्कार करण्याची गरज आहे हे मानण्याची.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

गरज आहे ती मूळातून संस्कार करण्याची आणि त्याहूनही संस्कार करण्याची गरज आहे हे मानण्याची.
कोणावर संस्कार? पिडीतांवर का पिडण्यार्‍यांवर??

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पिडीतांवर का पिडण्यार्‍यांवर दोन्हींवर. करण दोन्ही सर्व समाजात आहेत.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पिडीताची चूक नसते असे बलात्कार, छेडछाड इत्यादी किती गुन्हे प्रमाणात आहेत, असतील? संस्कार कोणावर कमी पडत आहेत?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

एखादा गुन्हा घडण्याआधी पिडीत किंवा कंटक हे कोण हे माहीत असते का ? नाही . ती घटना घडल्यानंतर शोषित आणि शोषक अशा बाजू निर्माण होतात. म्हणून अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून संस्कार सर्व समाजघटकांवर करणे आवश्यक आहे. जेणे करुन अशा घटना घडू नयेत.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

बलात्कार, छेडछाड इत्यादी गुन्ह्यांमधे पिडीत नेहेमीच समाजातल्या एका हिश्श्यातल्या असतात आणि कंटक दुसर्‍या! हे बहुदा जगजाहीर सत्य असावं.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

समाजाच्या सगळ्याच हिश्श्यात पीडीत आणि कंटक, शोषक आणि शोषित असतात. ते त्या क्षणी कोण किती शिरजोर, मुजोर आहे त्याच्यावर ठरते.

In reply to by प्रसन्न केसकर

बलात्कार आणि छेडछाडीमुळे पिडीत पुरूष माझ्यातरी माहितीत नाही; तुम्हाला कोणाला माहित आहे का?

In reply to by llपुण्याचे पेशवेll

>नग्नता बघूनही जितकी उत्तेजना येत नाही तितकी कदाचित प्रत्यक्षात फार थोडी झलक बघूनही येते. तर अजुन एक प्रसंग ह्या लेखमालेत शेवटून दुसरा परिच्छेद आहेच. बहुतेक ते वास्तव जोवर आहे तोवर हे असेच चालणार असा अर्थ निघतो. अजुन एक अर्थ त्याकरता भारताने इंडीयाकडे पाहीले पाहीजेच असे नाही.

In reply to by प्रसन्न केसकर

असे देश नसावेत किमान मला माहीत नाही. बाकी ह्या तक्त्यानुसार हे प्रमाण सौदी अरेबीयात कमी आहे. तिथे स्त्रियांवर त्यांच्या सार्वजनीक ठिकाणी वावरण्यावर प्रतिबंध आहेत हे आपण जाणतोच. तसेच तिथे असे आरोप सिद्ध करण्याकरता जी पद्धत आहे ती देखील काय आहे याचा अंदाज आपल्यापैकी बर्‍याच जणांना असेलच. महाराष्ट्रात लैंगीक अत्याचाराचे प्रमाण वाढले की कमी याचा खात्रीलायक विदा तुम्हीच सांगू शकाल.

In reply to by सहज

तक्त्याबद्दल धन्यावाद सहजकाका. तिथे आरोप सिद्ध करण्यासाठी काय पद्धत आहे? मागे एका ब्रिटीश जोडप्यातील महीलेवर एका हॉटेलात बलात्कार झाला होता. तेव्हा त्या महीलेवर पोलिसांनी सार्वजनिक ठीकाणी दारू पिऊन फिरण्याचा गुन्हा दाखल केला होता. मग ब्रिटनने दबाव आणून त्या जोडप्याला सोडवून नेले होते असेही वाचल्याचे आठवत आहे बाकी तिथल्या न्याय पद्धतीबद्दल अधिक माहीती नाही.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

सिंधुताई सपकाळ यांनी असे म्हटल्याचे आठवते आहे की तोकड्या कपड्यातल्या मुली रस्त्याने फिराताना बघून, किंवा अन्यत्र चाळे करताना बघून उच्चभ्रू वर्गातल्याना काही फरक पडत नाही पण त्याच समाजात असलेल्या रिक्षावाले, ट्रकवाले झालंच तर फेरीवाले, हातगाडी वाले व कमी उप्तन्न व जीवनशैली गटातील अन्य लोकांच्या भावना उद्दीपीत होतात पण तो आवेग तिथे बाहेर पडत नाही तर तो बाहेर पडतो त्यांच्याच वस्तीतल्या (झोपडपट्टीतल्या) अन्य महीलांवर म्हणूनच बलात्काराच्या अनेक घटना या अशा वस्त्यांमधे सर्वाधिक होतात उच्चभ्रू सोसायट्यांमधे नाही.
सिंधुताई सपकाळांविषयी अनादर नाही, पण उत्तान वेशभूषा/आविर्भाव करणार्‍या उच्चभ्रूच असतात आणि मुलीच असतात याला आज फारसा आधार नाही. अगदी भाऊ पाध्यांच्या साहित्यापासून ते आजच्या गणपती/गरबा यांसारख्या सार्वजनिक प्रसंगांद्वारे दिसणारं निम्न आर्थिक वर्गातल्या मुलांचं आणि मुलींचं स्वच्छंद, मोकळंढाकळं वर्तन या मुद्द्यातला पोकळपणा दाखवेल. त्यामुळे उगाच उच्चभ्रू मुलींवर समाजातल्या स्खलनशील पुरुषांची जबाबदारी टाकणं योग्य नाही. शिवाय, प्रसाधनं वापरून गुळगुळीत, चकाचक केलेल्या चेहेर्‍यांचे, तंग-तोकडे शर्ट आणि कंबरेखाली घसरणार्‍या पँट यांद्वारे आपले पार्श्वभाग वगैरे दाखवत फिरणारे मुलगे/पुरुष समाजाच्या सर्व थरांत आता दिसतात. रिक्षावाल्यांना आपले आवेग आवरता येत नाहीत, पण मोलकरणींना आपले आवेग आवरता येतात; म्हणून पुरुषांनी उत्तानपणा करावा, पण स्त्रियांनी तो करू नये, असा अर्थ मग यातून काढावा लागेल (चिंतातुर जंताची शंका: पण मग त्यामुळे रिक्षावाले समलिंगी होऊ लागले तर? ह. घ्या.) थोडक्यात: सहज यांनी म्हटल्याप्रमाणे प्रौढ माणसाला आपले आवेग आवरता आलेच पाहिजेत; अन्यथा होणार्‍या शिक्षेची तयारी ठेवावी. (आणि याचा अर्थ रस्त्यात नागडं फिरायला मुभा असावी असा नाही, कारण आपल्या कायद्याद्वारे तो दंडनीय गुन्हा आहे.)

In reply to by चिंतातुर जंतू

तुमचे उदाहरण चुकले आहे सिंधुताई सपकाळांविषयी अनादर नाही, पण उत्तान वेशभूषा/आविर्भाव करणार्‍या उच्चभ्रूच असतात आणि मुलीच असतात याला आज फारसा आधार नाही. अगदी भाऊ पाध्यांच्या साहित्यापासून ते आजच्या गणपती/गरबा यांसारख्या सार्वजनिक प्रसंगांद्वारे दिसणारं निम्न आर्थिक वर्गातल्या मुलांचं आणि मुलींचं स्वच्छंद, मोकळंढाकळं वर्तन या मुद्द्यातला पोकळपणा दाखवेल. त्यामुळे उगाच उच्चभ्रू मुलींवर समाजातल्या स्खलनशील पुरुषांची जबाबदारी टाकणं योग्य नाही. शिवाय, प्रसाधनं वापरून गुळगुळीत, चकाचक केलेल्या चेहेर्‍यांचे, तंग-तोकडे शर्ट आणि कंबरेखाली घसरणार्‍या पँट यांद्वारे आपले पार्श्वभाग वगैरे दाखवत फिरणारे मुलगे/पुरुष समाजाच्या सर्व थरांत आता दिसतात सर्व स्थरात नक्कीच दिसत नाहीत. मी तर आजपर्यंत असा एकही पाहिला नाहीये. आणि समजा आहेत/ तुम्हाला दिसले असे गृहीत धरू. अशांना बघून कुठली स्त्री यांच्यावर किंवा इतर पुरुषांवर बलात्कार करणार आहे? आजपर्यंत कधी केला आहे का ? तुम्ही समलिंगी होउ शकणार्‍या पुरुषांचा मुद्दा उपस्थित केला आहे. तसे असलेले पुरुष किती ? नसलेले आणि होउ शकणारे किती (नगण्य)? उगाच आपल काहीच्या काही. पुरुष ---> स्त्री या दिशेत चर्चा चालू आहे, वस्तुस्थितीही तशीच आहे. गरज नसताना कल्पनाविश्वातील उदाहरणे देउन फाटे फोडू नका. चिंतातुर जंताची शंका जंतू आणि जंत यात फरक आहे. तुम्हाला नक्की कोण अभिप्रेत आहे ?

काही वैश्विक सत्यं लक्षात घ्यायला हवीतः
  • लैंगिक इच्छा ही मूलभूत प्रवृत्ती आहे. त्यामुळे ती सर्व काळांतल्या सर्व परिस्थितींतल्या स्त्री-पुरुषांमध्ये आढळते. तसंच तिचं विरेचन केल्यानं मिळणारं सुख हेदेखील मूलभूत आहे.
  • वर्ण, धन, राजसत्ता अशा अनेक कारणांमुळे मनुष्याला उपभोगाच्या अधिक संधी उपलब्ध होतात. उपभोग अनेक गोष्टींचा असतो. लैंगिक उपभोग हा त्यापैकी एक आहे.
  • पुरुषप्रधान संस्कृतीत इतकी वर्षं स्त्रियांना उपलब्ध असणार्‍या (विविध प्रकारच्या) उपभोगांच्या संधींवर मर्यादा होत्या. अजूनही अनेक स्त्रियांवर त्या आहेत. पण आता काही स्त्रियांना उपभोगाच्या संधी उपलब्ध होत आहेत.
रोलेक्स घड्याळ, आयफोन, मर्सिडीझ गाडी यांसारख्या गोष्टी ज्यांना परवडतात, त्या वर्गाकडे नाकं मुरडून पाहण्याची प्रवृत्ती एकेकाळी भारतीय समाजात होती. स्वातंत्र्यलढा, गांधी, समाजवाद अशा अनेक गोष्टींचे पदर त्या प्रवृत्तीला होते. आता तसं राहिलं नाही. साधी राहणी, उच्च विचारसरणी हा आता समाजाचा आदर्श नाही. अशा परिस्थितीत एकंदर उपभोगाचं प्रमाण वाढलं, तसंच ते लैंगिक उपभोगाच्या बाबतीतही होणार. इथून मागे जाणं आता शक्य नाही. (केवळ तालिबानीच ते करू धजतात. आणि आपण तसे नाही. आपल्याला तसं व्हायचंही नाही.) मग वंदना मॅडमसारख्या व्यक्तींविषयी त्रागा करणं अवास्तव आहे असं वाटतं. अभय बंगांना कदाचित ते करण्याचा नैतिक हक्क आहे, पण शॉपिंग मॉल, ब्रँडेड कपडे, शांपू, सनस्क्रीन, कोक, मॅकडोनाल्ड, 'लेज' चिप्स, मिनरल वॉटरच्या बाटल्या, २४ तास गळत राहणार्‍या टी.व्ही. वरच्या शेकडो वाहिन्या अशा विविध उपभोगाच्या गोष्टींचा आनंद घेणार्‍या, राज्यभर वीजकपात चालू असताना घरात इन्व्हर्टर बसवून स्वतःच्या उपभोगसाधनांत खंड पडू न देणार्‍या, 'ग्लोबल वॉर्मिंग'च्या काळात नवनवी गाड्यांची मॉडेल्स रस्त्यावर आणून मग होणार्‍या ट्रॅफिक जॅममध्ये 'फार पोल्यूशन आहे' म्हणून गाडीत ए.सी. लावणार्‍या मध्यमवर्गीय समाजाला हा नैतिक हक्क नाही, असं वाटतं.

In reply to by चिंतातुर जंतू

सहमत. माझ्यालेखी ह्या लेखमालेत वंदनामॅडमपेक्षाही प्रचंड महत्वाची घटना म्हणजे त्या १५ वर्षाच्या मुलीचा केवळ एकदा तोकडा गणवेष घातल्यामुळे आत्महत्या करायला लागली. इतक्या गंभीर घटनेवर चर्चा करायची सोडून परत परत चर्चा कुठे जात आहे यातच लोकांचा विचार राहून राहून कशात अडकला आहे हे स्पष्ट दिसते आहेच. स्वतंत्र भारतातील झुंडशाहीची नैतीकता / न्यायनिवाडा एक बर्‍यापैकी ताजी घटना

In reply to by चिंतातुर जंतू

पण शॉपिंग मॉल, ब्रँडेड कपडे, शांपू, सनस्क्रीन, मिनरल वॉटरच्या बाटल्या यात काय चूक आहे ? राज्यभर वीजकपात चालू असताना ही राजकारण्यांची देणगी आहे. सामान्य लोकांची काही चूक नाही. घरात इन्व्हर्टर बसवून नसलेल्या चुकांची शिक्षा त्यांनी का भोगावी ? 'ग्लोबल वॉर्मिंग'च्या काळात ग्लोबल वॉर्मिंगचा फुगा आता फुटला आहे असे नुकतेच वाचनात आले. नवनवी गाड्यांची मॉडेल्स रस्त्यावर आणून मग होणार्‍या ट्रॅफिक जॅममध्ये 'फार पोल्यूशन आहे' म्हणून गाडीत ए.सी. लावणार्‍या पुन्हा तेच. राजकारण्यांची चूक. मध्यमवर्गीय समाजाला हा नैतिक हक्क नाही, असं वाटतं. तुम्ही अनेक निरुपद्रवी गोष्टींनादेखील अपराधांच्या माळेत आणून बसवले आहेत. असो. या सर्व गोष्टी आणि मोठे गुन्हे यात पातळीचा फरक आहे. जे ते करत नाहीत ( बहुसंख्य मध्यमवर्गीय) ते करणार्‍यांना नक्कीच बोलू शकतात.

In reply to by Pain

तुम्ही अनेक निरुपद्रवी गोष्टींनादेखील अपराधांच्या माळेत आणून बसवले आहेत. असो. या सर्व गोष्टी आणि मोठे गुन्हे यात पातळीचा फरक आहे. जे ते करत नाहीत ( बहुसंख्य मध्यमवर्गीय) ते करणार्‍यांना नक्कीच बोलू शकतात.
या गोष्टींचा उपभोग घेणं गैर आहे असं मी म्हटलेलं नाही, तर या गोष्टींचा उपभोग घेणं आणि वरच्या प्रकटनातल्या 'वंदना मॅडम'नी घेतलेला पुरुषाचा लैंगिक उपभोग यामध्ये फार डावं-उजवं करता येत नाही, असं म्हटलेलं आहे. जुन्या पिढीतले गांधीवादी किंवा समाजवादी दोन्हींना गैर मानतील. आजच्या चंगळवादी तरुण पिढीला कदाचित उपभोगाच्या या विविध प्रकारांमध्ये काही गैर वाटणार नाही. त्याउलट मी दिलेल्या उदाहरणांतल्या गोष्टी निरुपद्रवी आहेत, पण वरच्या प्रकटनातल्या 'वंदना मॅडम' यांनी काहीतरी गैर केलेलं आहे, असं तुम्हाला वाटत असेल, तर ते कसं हे जरा समजावून सांगा.

In reply to by चिंतातुर जंतू

उपभोग घेणे गैर असते का? मला तसे वाटत नाही. उपभोग घेणे गैर नसतेच मुळी. पण हा उपभोग घेताना घेणार्‍याला अनेक बंधने असतात आणि ती पाळण्यातच समाजस्वास्थ्य असते असे माझे मत आहे. यातील बरीचशी बंधने नैतिक असतात परंतु चंगळवादी समाजात आणि विषेशतः त्यातल्या आहे रे वर्गात मोठ्या प्रमाणात स्वच्छंदीपणा, आत्मकेंद्रीतता, ननैतिकता येऊ शकते नव्हे बहुतेकदा येतेच. त्यातुनच अनैतिकतेचा जन्म होतो. परंतु नाहीरे वर्गाची परिस्थिती विचित्र असते. आहे रे वर्गाचा उपभोग तर खुणावतो पण परवडत नाही. अश्यावेळी नैतिकता काम करेलच असे नाही. इथे रोल येतो सामाजिक नियम/ कायद्याचा. हे दोन्हीपण अनेकदा निकामी ठरतात कारण आहे रे वर्गाकडे समाजाला मोडीत काढण्याएव्हढी आणि कायदेभंग करण्याएव्हढी ननैतिकता/ अनैतिकता तर असतेच पण स्वतःचे कृत्य समर्थनिय आणि सगळा विरोध असमर्थनिय ठरवण्यासाठी लागणारी विद्वत्ता देखील असते. परंतु या आहे रे वर्गातल्या लोकांवर देखील नैतिकतेचा दबाव बर्‍याचदा येतो. त्यामुळे कृत्य करुन झाल्यावर आणि ते जाहीर झाल्यावर त्यांना लाज वाटते आणि तोंड लपवावेसे वाटते. अर्थातच तो दबाव अगदी थोडा असतो आणि त्याचा परिणामपण क्षणभंगुर असतो. सुहासच्या धाग्यातील तीन्ही स्त्रियांबाबत हेच थोड्याफार फरकाने म्हणता येईल. वंदना मॅडमचे नेहमीचे बेअरिंग बेअराने आपल्याला नको तसे पाहिले म्हणुन बिघडते, असहाय्यपणे रस्त्यावर झोपलेल्या मजुर बाईला आपले अंग चादरीने झाकावेसे वाटते आणि कुण्या मुलीला तोकडे कपडे घातल्याची शरम जीवघेणी ठरते.

लेख आणि लिखाण दोन्ही अप्रतिम. बाकी चालु असलेल्या चर्चेबद्दल काहीच बोलु शकत नाही, कारण हा लेख मी एका अज्ञात वाचकाच्या दृष्टीने वाचला.

.