Skip to main content

काही प्रश्न

लेखक जिप्सी
Published on मंगळवार, 27/07/2010
काही प्रश्न वेळ :- सकाळचे १०वा.काही मिनिटे स्थळ :- टिळक रोड वार्ड ऑफिस पुणे. खिडकी क्रं. ७ जन्म मृत्यू नोंदणी. मी :- नमस्कार,मला जन्म नोंदणी करायची आहे,फॉर्म द्या. कर्मचारी :- हा घ्या फॉर्म पण आज नोंदणी नाही होणार,आज आमचा कॉम्प्युटर बंद आहे. मी :- कधी होईल चालू ??? कर्मचारी :- काही सांगता येत नाही. मी :- अहो, एक तर तुमच ऑफिस २रा आणि ४था,शनिवार बंद,मी परवाच्या मंगळवारी आलो तर सकाळी १०:५० ला सुद्धा तुमच्या खिडकीत कोणीच नाही. आणि आज कॉम्प्युटर बंद आहे. मी धायरीतन इथ येतो १२ किमी यायला लागतंय मला फक्त एका कामासाठी आणि जर इथ आल्यावर तुमचा कॉम्प्युटर बंद असेल तर माझी फेरी वाया नाही काय गेली? मी आज तिसरेंदा इथ आलो त्यापैकी २ वेळा तुमचा कॉम्प्युटर बंदच होता. (कर्मचारी अतिशय थंडपणे मन डोलावतो.) मी :- ठीक आहे ,मी वार्ड ऑफिसरच्या नावे अर्ज करतो आणि हे सगळ त्यात लिहितो. मी त्यानंतर एक अर्ज लिहिला त्यात या सगळ्या गोष्टी लिहिल्या,त्याची एक xerox काढली आणि जिथ अर्ज जमा करतात त्या खिडकीवर जाऊन जमा केला आणि म्हणालो या xerox वर मला पोच द्या. कर्मचारी :- नाही साहेब अशी पोच नाही देता येत. मी :- अहो नियमाप्रमाण मला अर्जाची पोच द्यायलाच पायजे तुम्ही. कर्मचारी(तुसडेपणान) :- नाही देता येणार. शेजारचा कर्मचारी :- अरे देऊन टाक की, काय फरक पडणार आहे आपल्याला? मग पहिल्या कर्मचाऱ्यांन अतिशय मोठा उपकार केल्यासारखा चेहरा करून त्या xerox शिक्का मारून सही केली. आणि मग दुसर काहीच काम नसल्यान मी घरी परत निघालो.जाता जाता रस्त्यात माझ्या लक्षात आल की पुण्याचे उपमहापौर आणि टिळक रोड वॉर्ड कमिटीचे अध्यक्ष प्रसन्न उर्फ दादा जगताप यांच ऑफिस सिंहगड रोडवरच आहे. मग बघू काय मदत होती काय त्यांची म्हणून मी त्यांच्या ऑफिसात गेलो. ऑफिसात जायच्या आधीच ज्या xerox वर मी पोच घेतलेली होती,त्याचीच अजून १ xerox केली आणि त्याच्यावर लिहील कि " कृपया यात लक्ष घालावे हि नम्र विनंती". साहेब ऑफिसातच होते. मी गेलो नमस्कार वगेरे झाल आणि त्यांच्या समोर कागद ठेऊन मी म्हणालो कि साहेब मी आज तिसरेंदा गेलो वार्ड ऑफिसात पण तरीही नाव नोंदणी होत नाही, तर या बाबतीत आपली मदत पाहिजे. साहेबांनी पहिल्यांदा तो अर्ज परत माझ्या हातात दिला आणि म्हणले याचा काहीच उपयोग नाही व्हायचा,असं म्हणून त्यांनी स्वतःचच १ व्हिजिटिंग कार्ड घेतलं आणि त्याच्या मागच्या बाजूला एका माणसाचं नाव लिहील आणि मजकूर लिहिला कि "...... हे माझे जवळचे मित्र असून त्यांना जन्म दाखला मिळवून देण्यास मदत करावी" त्याच बरोबर त्या माणसाचा मोबाईल नंबरहि लिहिला. ते कार्ड माझ्या हातात देत म्हणाले हा जो मनुष्य आहे तो जरी शिपाई असला तरी सगळी काम करून देतो त्याला हे दाखवा आणि मग तो तुमच काम करून देईल. आणि त्याला १०० एक रुपये देउन टाका काम झाल्यावर! मी त्यांना म्हणालो दादा एक विचारू? जर १०० रुपये देऊनच जर काम करायचं होत तर मी तुमच्याकड कशाला आलो असतो? माझ मी सुद्धा केलंच असत कि ते? यावर अतिशय उग्र चेहरा करून साहेब म्हणाले " मी तुम्हाला रस्ता सुचवला आहे आता काय करायचं ते तुमचं तुम्ही बघा "! मग मी तिथून सरळ निघालो. या नंतर मला पडलेले काही प्रश्न पडले :- १) उपमहापौर या सारख्या महत्वाच्या पदावर काम करणारा माणूस असे सल्ले कसे काय देऊ शकतो? २) जन्म नोंदणी सारख्या बेसिक कामासाठी जर १०० रु. द्यायला लागत असतील तर मोठ्या कामांसाठी किती पैसे खर्च करावे लागतात? ३) मला मुळातच असे पैसे वैगेरे देऊन काम करून घ्यायला आवडत नाही मी आजपर्यंत पैसे देऊन कोणतेही काम करून घेतलेले नाही,पासपोर्ट,रेशन कार्ड काहीच नाही तर हे चुकीच आहे काय? ४) सगळ्यानी (यात सासू सासरे सुद्धा आले) मला असा सल्ला दिला की द्यायचे होते १०० रु आणि करायच होत काम पण अजूनही मी हट्ट सोडलेला नाही, मग बरोबर कोण मी काय बाकीचे सगळे? अवांतर :- अजूनही मला मुलाच्या जन्माची नोंदणी करून घ्यायला जमलेल नाही या शनिवारी परत जाणार आहे.(ही ७ वी खेप असेल)
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3461
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

यातील मजकूराने संकेतस्थळाच्या चालकांना कटकटी उत्पन्न होऊ शकतात. सबब हा धागा अप्रकाशित करावा. (चिंतित) नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

राजकिय नेत्याचे नाव असल्याने कटकटी होऊ शकतात. लोकसत्ता कार्यालयाच्या वॉचमनला अशाच एका स्थानिक राजकिय नेत्याने मारहाण केल्याची घटना ताजी आहे. भ्रष्टाचाराला तोंड फुटावे असा येथे काही सदस्यांचा आग्रह दिसतो जो योग्यच आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर मर्यादा घालण्यास सुरूवात केल्यास अशा समस्यांनाही वाचा फोडणे कठीण होत जाते. पण उगाच कटकटी नकोतच. संकेतस्थळावर चार घटका करमणुक करायला यावे तर असे पोटेन्शियली स्फोटक धागे समोर येतात.

In reply to by नितिन थत्ते

श्री. नितिन थत्ते, माफ करा पण आपल्यासारख्या भित्र्या व्यक्तीची कीव करावीशी वाटते. आपल्याबद्दल वैयक्तिक आकस वगैरे काही नाही, मी तुम्हाला ओळखतही नाही. एखाद्या स्त्री सदस्याने जरी हा प्रतिसाद दिला असता तरीमाझा प्रतिसाद हाच असता. लेखकाच्या निर्भयपणाचे कौतुक वाटते. आपण असेच रहावे अशी अपेक्षा. संपादक महोदय, हा लेख अप्रकाशित करण्यास माझा विरोध असेल. समजु द्या की लोकांना वस्तुस्थिती.

भारतात लोकशाही नसुन नोकरशाही आहे... कोणीपण माईचा लाल हे सुधरु शकत नाही... जे प्रथम स्वच्छ असतात ते पण लवकरच बिघडतात... निशीगंध (अजुनतरी स्वच्छ नोकरशहा)

नितिन थत्तेंशी असहमत. हा वैयक्तिक अनुभव सार्वत्रिक आहे. http://www.punecorporation.org/gen_comp/reg_complaint.asp इथे तक्रार नोंदवा. महापालिकेच्या वेबसाईटवर सर्व अधिकार्‍यांचे मोबाईल नंबर, कामाचे स्वरुप, अधिकार या विषयी सविस्तर माहिती आहे. त्याचा पाठपुरावा करा. हाच लेख वर्तमानपत्राला पाठवा.

थत्त्यांशी पुर्णपणे असहमत. हव तर तेवढ त्या लाचखोरीला उत्तेजन देणार्‍या उपमहापौराचं नाव काढा.(तेही गरज असलीच तर.) या धाग्यात गैर अस काहीच नाही की ज्यासाठी हा धागाच अप्रकाशीत करावा. एका सामान्य माणसाला जो लाच देउन काम करु इच्छीत नाही त्याला एका साध्या कामासाठी किती त्रास सहन करावा लागतोय ते येउदेत की लोकांपुढे.

लाच जेव्हा द्यावी लागेल तेंव्हा द्या आणि जेंव्हा जेंव्हा घेता येईल तेंव्हा तेंव्हा घ्या की राव................

सगळीकडे असेच चाललेय....पण पैसे देउ नका.तक्रार करा थोडासा त्रास होइल पण काम होइलच. मलाहि इन्क्मटॅक्स रीफन्ड साठी १० % मागितले होते.सिनिअर कडे तक्रार केली ..थोडा वेळ लागला ...पैसे न देता काम झाले.

माझा वैयक्तिक अनुभव असा आहे कि जर काम होत नसेल तर त्याच ऑफिसच्या वरिष्ठ अधिकार्याकडे नावानिशी तक्रार करावी (लेखी किंवा तोंडी - त्रासावर अवलंबून) ...काम होतेच...पैसे न देता... अशा तक्रारी करणार्यांना तक्रारखोर म्हणतात पण त्यामुळेच लाचखोरी कमी होऊ शकते...उगाच परदेशातील उदा देऊन आपल्या देशात मात्र स्वतः लाच द्यायची आणि घ्यायची असा दुटप्पीपणा कशाला? थत्तेंशी पूर्णपणे असहमत....केवळ त्या महापौराचे नाव आहे म्हणून धागा काढायचा? त्यापेक्षा लाच देऊन टाकलेली काय वाईट? काम तरी होईल .

हेच का हो ते लोकसत्ताच्या वॉचमनला मारहाण करणारे? बाकी प्रसंग संतापजनक आहेच मात्र आश्चर्य वाटले नाहि

भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवावा का, त्यासाठी मिपा हे माध्यम वापरावं का हे विचार करण्यासारखे प्रश्न आहेत. एकमेकांत मारलेल्या व हवेत विरून गेलेल्या गप्पा यांपेक्षा जगासमोर प्रसिद्ध होणारं, व बराच काळ टिकून राहाणारं लेखन एक विशिष्ट जबाबदारीची मर्यादा पाळणारं हवं असा सगळ्यांचाच (रास्त) आग्रह आहे. फक्त ती जबाबदारीची मर्यादा म्हणजे काय, हे अद्यापही अनिश्चित आहे असं थत्ते यांचं मत वाटतं. शहराचं व पदाचं नाव घेऊन त्यांवर जवळपास लाचलुचपतीचा आरोप ठेवणारं लेखन राहू देणं हे संस्थळाला कायदेशीरदृष्ट्या मारक नाही का?

In reply to by राजेश घासकडवी

मला घासकडवी यांचं म्हणणं पटतं. मर्यादा या पाळाव्याच लागणार. व्यक्तीचे नाव घेऊन आरोप करणे म्हणजे चिखल्फेक होते. आरोप सिद्ध होईपर्यंत आरोपी हा गुन्हेगार नसतो. विशेषतः पब्लीक पर्सोना असलेल्या माणसांना अशा चिखलफेकीचा त्रास होतो. मिपा ने का म्हणून या चिखलफेकीला आपली वर्च्युअल स्पेस द्यावी?

लेख आहे तसाच असू द्यावा. लेखकाकडे असे सगळे झाल्याचा पुरावा आहे. अशा हरामखोरांची जितकी बदनामी होईल तितकी काहीतरी सकारात्मक होण्याची शक्यता अधिक. शेवटी तुमचा प्रश्नःसगळ्यानी (यात सासू सासरे सुद्धा आले) मला असा सल्ला दिला की द्यायचे होते १०० रु आणि करायच होत काम पण अजूनही मी हट्ट सोडलेला नाही, मग बरोबर कोण मी काय बाकीचे सगळे? निर्विवादपणे तुमचेच बरोबर आहे.

मिसळपावाच्या डिस्क्लेमर मधली पहिली ओळ वाचा: All information made available as part of this website and any opinions, advice, statements or other information contained in any messages posted or transmitted by users or any third party are the responsibility of the author of that message and not of Misalpav management (unless Misalpav management is specifically identified as the author of the message). माझ्या माहितीप्रमाणे जिप्सी हे मिसळपाव व्यवस्थापनात नाहीत. मग सदर लेख हा जिप्सींनी स्वतःच्या जिम्मेदारीवर टाकला आहे, आणि त्याचे सगळे परिणाम (चांगले / वाईट) हे त्यांनाच भोगावे लागणार आहेत. असे असताना, लेख काढण्याचा सल्ला अप्रस्तुत वाटतो.

In reply to by मिसळभोक्ता

हा डिस्क्लेमर संपादक मंडळास माहिती नसावा असे वाटते. माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. नितिन थत्ते

जिप्सी: तुमच्याकडे आवश्यक ते सर्व पुरावे आहेत असं वाटतं. महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री. आबा पाटील यांचा हा स्वतःचा अधिकृत ब्लॉग असल्याची वार्ता वर्तमानपत्रात आणि इथे मिपावरही वाचली होती. तो जर खरोखरीच त्यांचा ब्लॉग असेल तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना जाहीरपणे माहिती पुरवा आणि उत्तर मागा. आबा पाटलांनी स्वतःच म्हंटल्याप्रमाणे: "महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या अत्यंत छोट्या कर्मचार्यापासून ते सर्वोच्च्य पोलीस अधिकारयापर्यंत कुणीही आपल्याशी सौजन्याने वागत नसेल आणि कायदाबाह्य वर्तणूक करत असेल तर या ठिकाणी आपण मला (अर्थातच पुराव्यानीशी) कळवू शकता. आपली तक्रार दूर करण्याचा जास्तीत-जास्त प्रयत्न मी करीन अशी ग्वाही मी देतो …. माझा इमेल : patilrr@hotmail.com माझ्या कार्यालयाचा पत्ता : गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय , पहिला मजला , रूम नंबर - १०८, विस्तारित इमारत , मंत्रालय - मुंबई – ३२. माझ्या कार्यालयाचे दूरध्वनी: ०२२ - २२०२७१७४ माझ्या घराचा पत्ता: ’चित्रकुट’, रतिलाल ठक्कर मार्ग , मलबार हिल, मुंबई. माझ्या घराचे दूरध्वनी: ०२२ – २३६३१५०५"

मंडळी तुमच्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद. आणि अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे शेवटी मी जन्मनोंदणी करण्यात यशस्वी झालोच. शनिवारी मी सरकारी दरानुसार रु. ३० भरून दाखला मिळवलाच (आता त्यासाठी माझा पेट्रोलचा खर्च १०० रु पेक्षा जास्त झाला हि गोष्ट वेगळी)

पुढची खेप केंव्हा? मी अशा प्रकाराला कंटाळुन एका वरच समाधान मानले.

आपण सरकारी नियमानुसार जाणारी माणस, दुसंर पहिलं शाळेत जाईल तेंव्हाच ! ;-)