मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुकडा तुकडा चंद्र... (अंतीम)

परिकथेतील राजकुमार · · जनातलं, मनातलं
पुर्वार्ध "तुम्ही मला फसवलत कुलकर्णी ! मी तुम्हाला आसावरीच्या नाराजीचे कारण स्पष्ट विचारले होते, तुम्ही माझ्याशी खोटे बोललात. तुम्ही आणी तुमची मुलगी दोघे माझ्याशी खेळलात ! हे लग्न करुन मी सुखी होणार नाही हे जेवढे खरे आहे तेवढेच हे लग्न मोडल्याने माझे आयुष्य उध्वस्त होणार आहे, हे देखील खरे आहे. मग काहीही घडले तरी मला शिक्षाच मिळणार असेल, तर ती मी एकट्याने का भोगायची कुलकर्णी ?? हे लग्न होणार कुलकर्णी, आज संध्याकाळी साखरपुडा आणी त्यानंतर दोन दिवसात हे लग्न लागेल. तयारीला लागा... कुलकर्ण्यांच्या घरातुन रागारागाने मी बाहेर पडलो खरा पण पुढचा एक तास मी कुठल्या रस्त्याने आणी का फिरत आहे तेच माझ्या लक्षात येत न्हवते. शेवटी एका गाडीला टेकुन १० मिनीटं शांतपणे उभा राहिलो. मागल्या काही वेळात घडलेल्या घटनांची मनात पुन्हा एकदा उजळणी झाली. माझा संताप अजुनही कमी झालेला न्हवताच, तसाच मी घराच्या दिशेन निघालो. घरात पोचलो आणी बघतो तर समोरच आसावरीची धाकटी बहिण अनघा बसली होती, तीच्याच शेजारी डोळ्याला पदर लावुन आई देखील माझीच वाट पाहात बसली असावी. अनघाला एकदम माझ्या घरात पाहुन मी आश्चर्यचकीतच झालो. बहुदा आईला तीने घडलेला सर्व प्रकार सांगीतला असावा. मी पटकन आतमध्ये बाबांच्या खोलीकडे वळून पाहिले. "आत्ताच आत गेलेत ते" आई म्हणाली. म्हणजे नक्की काय घडले आहे, ते दोघांनाही कळले होते तर. "मला तुमच्याशी थोडे बोलायचे होते" अनघा अस्पष्ट स्वरात म्हणाली. आई समजुतदारपणे उठुन बाबांच्या खोलीत निघुन गेली. "आता बोलण्यासारखे काही उरले आहे?" "तुमची अवस्था काय झाली असेल हे मी समजु शकते. पण ह्या लग्नामुळे तुमच्या दोघांचेच नाही तर ताईचे ज्या मुलावर प्रेम आहे त्याचे, माझ्या आई बाबांचे, तुमच्या घरच्यांचे सर्वांचेच आयुष्य दु:खाच्या खाईत लोटले जाणार आहे. तुम्ही हे का लक्षात घेत नाहिये ? आपली मुले एकमेकांना शिक्षा देण्यासाठी एकत्र नांदत आहेत हे बघुन कोणते आई वडील सुखी होतील ?" "माझा निर्णय मी घेतलाया अनघा, आणी तो बदलणे शक्य नाही !" "मी तुमचा निर्णय बदला म्हणुन सांगायला आलेच नाहिये ! फक्त त्यात थोडा बदल करा अशी विनंती करायला आलीये." "म्हणजे ??" "तुम्ही घेतलेला निर्णय म्हणजे, ताई आणी बाबांनी तुमची जी फसवणुक केली त्याचा घेतलेला बदलाच आहे ना ? मी बरोबर बोलते आहे ना ? तुम्हाला त्यांना शिक्षाच द्यायची आहे ना, मग ती मला द्या ! मी तुमच्याशी लग्नाला तयार आहे. आपल्या लग्नामुळे हे सर्वच प्रश्न सहजपणे सुटतील, नाही ? तुमच्या आई वडलांवर देखील दु:खाचा डोंगर कोसळणार नाही आणी तुम्हाला देखील आमच्या घरच्यांना शिक्षा दिल्याचे समाधान मिळेल..." "अनघा, तु काय बोलतीयेस तुला कळतय ??" "मी पुर्ण विचार केलाय संग्राम. मी तुम्हाला वचन देते तुमची बायको म्हणुन मी कुठेही कमी पडणार नाही. एक सुन म्हणुन देखील मी माझ्या कुठल्याही कर्तव्यात कमी पडणार नाही. फक्त मला माझ्या ताईच्या सुखाचे दान द्या. मी हात जोडते तुमच्यापुढे..." मी सुन्न होऊन तिच्याकडे पाहातच राहिलो. अरे आत्ता आत्ता स्त्रीत्वाची जाणीव व्हायला लागलेली हि मुलगी येवढा परिपुर्ण विचार कसा काय करु शकते ? दुसर्‍या कोणाच्या सुखासाठी माणुस येवढा त्याग करायला तयारच कसा होऊ शकतो ? अनघाच्या विचारांपुढे मला मी फारच खुजा वाटू लागलो. "अनघा, माझ्याबद्दल तुझे काय मत झाले आहे ते मला खरच माहित नाही. तु म्हणतीस तसे मी माझ्याबरोबरच सगळ्यांनाच शिक्षा द्यायला निघालो होतो हे मात्र खरे आहे. मी फार मोठी चूक करत होतो हे मला मान्य आहे. मी संतापी आहे पण राक्षस नाहिये ग. माझ्या समाधानासाठी तुझ्या ताईचे अथवा तुझे आयुष्य असे फरफटवण्याचा मला काय अधिकार ? जा अनघा.. तुझ्या ताईचे लग्न तीच्या आवडीच्या मुलाशीच होईल, हा माझा शब्द आहे. तुझ्या ताईच्या नक्कीच नाही पण तुझ्या लग्नात मात्र मी यायचा नक्की प्रयत्न करीन, येवढ्या विचारी मुलीने निवडलेल्या नवर्‍याला भेटायला मला नक्की आवडेल." अनघा गेल्यानंतर आईच्या चेहर्‍यावरचे समाधानचे हसु मला बरेच काही सांगुन गेले. त्या दिवसानंतर माझे नेहमीचे आयुष्य पुन्हा चालु करायला मल थोडे जडच गेले पण काळ हा सर्व रोगांवरचा रामबाण उपाय आहे आहे हेच खरे. हळुहळु मी स्वतःला सावरायला लागलो, आई बाबांनी हे नक्की मनाला लावून घेतले असणार पण वरवर तरी ते तसे काही दाखवत न्हवते. त्या घटनेपासून आमच्या घरात 'माझे लग्न' हा विषय मात्र बंदच झाला. आत्ता आत्ता सावरायला लागलेल्या मला पुन्हा डिचवायचा प्रयत्न घरच्यांनी देखील केला नाही हे मात्र खरे. काही काही माणसांच्या आयुष्यात जखमा भरुन येण्याचा योग नसतोच, आणी तो ओढुन ताणुन आणताही येत नाही. आसावरी प्रकरणामुळे झालेली जखम हळुहळु भरत आली असतानाच दोन वर्षात आसावरी नावाचे वादळ पुन्हा एकद माझ्या आयुष्यात प्रवेशकर्ते झाले.... आमच्या कंपनीतर्फे फॅशन डिझायनींगच्या कामात मदत करु शकणारे नविन सॉफ्टवेअर विकसीत करण्याचे प्रयत्न चालु होते. त्या संदर्भातच काही नविन उमेदवारांची भरती आवश्यक होती. इंटरव्ह्युजच्या दिवशी मी नेहमीसारखाच माझ्या केबिन मध्ये निघालो होतो आणी अचानक रिसेप्शन शेजारी जमा झालेल्या उमेदवारांमध्ये एकदम गोंधळ चालु झालेला दिसला. मुलाखती साठी आलेली कोणी एक मुलगी चक्कर येउन पडली होती. तीला थोडा मोकळा वारा मिळावा म्हणुन आसपासची गर्दी दुर झाली आणी मला तिचा चेहरा दिसला. "आसावरी.." मी झटकन पुढे झालो. "सर तुम्ही ह्यांना ओळखता ??" "अं ? हो म्हणजे.. माझ्या वडिलांच्या मित्राची मुलगी आहे ही" रिसेप्शनिस्टच्या मदतीने मी आसावरीला माझ्या केबीनमध्ये आणून बसवले. पाणी वगैरे पिल्यानंतर आसावरी थोडी सावरल्यासारखी वाटायला लागली. माझी नजर चुकवत ती मान खाली घाललुन बसली होती. दोन वर्षापुर्वीची रसरसलेली, सौंदर्यावान आसावरी जणु कुठेतरी हरवुन गेली होती. माझ्यापुढे बसली होती एक खंगलेली, अकाली वयात आलेली प्रौढ स्त्री. "आसावरी, यु ओके ?" "बरं वाटतय आता. मी निघते.." "थांब मी कोणाला तरी तुला सोडायला सांगतो घरापर्यंत. एकटी नको जाऊस." "थँक्स. पण खरच त्याची आवश्यकता नाही, मी जाईन व्यवस्थीत." "इंटरव्ह्यु साठी आली होतीस?" "हो. पण तुम्हाला बघितले आणी एकदम मी कुठल्या कंपनीत आले आहे ते ध्यानात आले. उठुन निघालेच होते, तेवढ्यात हे असे..." आसावरी बोलत असताना मी लक्षपुर्वक तिच्याकडे बघत होतो. आसावरी बर्‍याच कठिण प्रसंगातुन गेली होती हे तिचा चेहराच बोलत होता. सर्वात डाचणारी गोष्ट म्हणजे गळ्यात मंगळसुत्र दिसत न्हवते. "मी माझ्या कंपनीतील लोकांना गुलांमांसारखे राबवुन घेतो असे कानावर आलेले दिसते आहे तुझ्या" मी हसत हसत म्हणालो. आसावरी माफक हसली पण बोलली काहीच नाही. "आसावरी, माझे वैयक्तिक आयुष्य आणी व्यवसाय ह्यात मी कधिच गल्लत करत नाही. तुझ्या माझ्यात जे काही घडले तो एक भूतकाळ होता. त्या सर्व घटनेबद्दल माझ्या मनात आता काहीच रोष नाही, विश्वास ठेव. तु निर्धास्त मनानी मुलाखत दे." आसावरी माझ्याकडे बघुन कृतज्ञतेनी हसली. आसावरी बाहेर जाताच मी आसावरीचा बायोडेटा मागवुन घेतला. मॅरिटल स्टेटस मधले 'विडो' बरेच काही सांगुन गेले. खरेतर मी अस्वस्थ झालो होतो, आपण नक्की काय केले पाहिजे हे न कळुन गोंधळलो होतो. आसावरीला मदत करावी असे राहून राहून वाटत होते, तर दुसर्‍या बाजुला तीला पाहिल्या पासून जुनी जखम पुन्हा ठसठसायला लागली होती. शेवटी नेहमीप्रमाणेच हृदयाने बुद्धीवर मात केली आणी मी आसावरीची नोकरी पक्की केली. नव्या तंत्रज्ञानाशी जुळवुन घ्यायला आसावरीला थोडा वेळ लागला पण लवकरच ती रुळुन गेली. माझी निवड चुकली न्हवती हे तिच्या कामाच्या प्रगतीवरुन लक्षात येतच होते. ऑफिसमध्ये जाता येता आसावरी बर्‍याचदा समोर यायची एक छोटेसे हास्य किंवा गुड मॉर्नींग , इव्हिनींग येवढी देवाण घेवाण होउन आम्ही पुन्हा आपापल्या जगात मागे फिरायचो. "सर तुम्हाला भेटायला कुणी मिसेस अनघा आल्या आहेत " फोनवरुन रिसेप्शनिस्ट सांगत होती. "मी ओळखतो त्यांना ? काय संदर्भात भेटायचे आहे ?" "सर त्या तसे काही बोलल्या नाहीत, फक्त म्हणाल्या सरांना सांगा अनघा कुलकर्णी आल्या आहेत." "आत पाठवुन दे त्यांना" मी शक्यतो आवाजातला उत्साह लपवत म्हणालो. काही क्षणातच केबीनचे दार उघडून अनघा आत आली. दोन वर्षात तीच्या सौंदर्याला एक वेगळीच झळाली आली होती, बुद्धीमत्तेचे तेज देखील चांगलेच डोकावत होते. "या ! एकदम मिसेस वगैरे ??" ""हो मग. तुम्ही नकार दिला म्हणुन काय कोणी लग्नच करणार न्हवते का काय माझ्याशी ??" अनघा खदखदुन हसत म्हणाली. मी सुद्धा खुप दिवसांनी खळखळून हसलो, खुप बरे वाटले. "आज एकदम इकडे स्वारी ?" "खरतर खुप आधीच येणार होते, तुमचे मनापासून आभार मानायला." मी सर्व समजल्यासारखी मान डोलावली. अनघाशी बोलता बोलता मी आसावरी विषयी शक्यतो सर्व जाणून घ्यायचा प्रयत्न केला. लग्ना नंतर एका वर्षातच आसावरी एका गोंडस मुलाची आई झाली होती, आसावरीचा नवरा देखील चांगल्या कंपनीत नोकरीला लागला होता. असाच एकदा ऑफिसच्या सहकार्‍यांबरोबर ट्रिपला म्हणुन गोव्याला गेला आणी परत आला तो त्याचा निष्प्राण देहच. सासरचा काहीच आधार नसलेली आसावरी आता माहेरी परत आली होती. ह्या धक्क्याने आसावरीच्या वडिलांनी हायच खाल्ली, थोड्याच दिवसात त्यांचेही निधन झाले. आसावरीचे दुर्दैवाचे दशावतार चालु झाले होते, अनघा होईल ती मदत करतच होती. काळ हळुहळु पुढे सरकत होता, वर्षभरात आसावरी आता चांगलीच तयार झाली होती. ऑफिसचे बरेचसे काम तिच्यावर सोपवुन मी निर्धास्त राहायला लागलो होतो. मधल्या काळात मी कधी अनघाच्या नवर्‍याच्या प्रमोशनची पार्टी तर कधी आसावरीचा मुलगा चिन्मयच्या वाढदिवसची पार्टी अशा ह्या ना त्या कारणाने आसावरीच्या वर्तुळात प्रवेशकर्ता झालोच होतो. ऑफिस बरोबरच अध्ये मध्ये घरच्या अडचणी देखील डिस्कस करायला लागलो होतो. एक वेगळ्याच प्रकारच्या नात्यात आम्ही गुरफटत चाललो आहोत असे मला राहुन राहुन वाटत होते. मनाला हे सगळे सुखावणारे वाटत होते हे का नाकारावे ? असाच एक दिवस घरी आलो तर समोर अनघा बसलेली. तीन वर्षापुर्वीचा प्रसंग झटकना माझ्या डोळ्यासमोरुन तरळून गेला आणी मी उगाचच अस्वस्थ झालो. तेवढ्यात आई देखील बाहेर आली. आईच्या चेहर्‍यावर बर्‍याच दिवसांनी एक आनंदाची झालर पाहायला मिळत होती. फ्रेश होउन मी बाहेर आलो. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर अनघा खुबीने मुळ विषयाकडे वळली. "संग्राम, तुम्हाला आठवत असेल ३ वर्षापुर्वी मी इथेच तुमच्याकडे माझ्या ताईचे सुख मागायला आले होते." मी कसनुसा हसलो. "आज मी पुन्हा त्याचसाठी तुम्हाला विनंती करायला आले आहे. तुम्ही कदाचीत मला स्वार्थी म्हणाल, लोभी समजाल. मी ते नाकारणार देखील नाही. संग्राम.. माझ्या ताईशी लग्न कराला ? तीला पुन्हा एकदा मायेच्या घरट्याचा आधार द्याल ??" "अनघा.. असे एकदम... मला थोडा वेळ दे. मला एकदा आसावरीशी बोलु दे, मला तीचे मन जाणुन घेउ दे. प्रामाणीकपणे सांगायचे तर हे असे कधी ना कधी घडणार मला वाटतच होते, रादर असे घडावे असेही वाटत होते. पण अचानक ती वेळ अशी समोर येईल असे वाटले न्हवते." "हरकत नाही, मी काका काकुंशी पण बोलले, त्यांची काहीच हरकत नाहीये. उद्या अनासाये रविवारच आहे. तुम्ही आमच्या घरीच का येत नाही ? मी ह्यांना पाठवुन ताईला देखील माझ्याकडेच बोलावुन घेते." "तुम्ही लोकं ठरवाल तसे..." . . . . . . . . "डॉक्टर आसावरी कशी आहे ? आणी अनघाचे मिस्टर ??" "आय एक सॉरी संग्राम ! अपघात येवढा भिषण होता की दोघेही जागीच ठार झालेत...." ताईचे घरटे बसवता बसवता अनघा स्वतःचे आकाशच हरवुन बसली होती. मी मटकन खुर्चीतच कोसळलो. . . . . . "उद्या मी येऊ शकणार नाही, वर्षश्राध्द आहे ना." "अं ? हो आहे लक्षात माझ्या. मी पण येउन जाईन नमस्काराला." मान डोलावुन अनघा केबिन मधुन बाहेर पडली. मी विमनस्कपणे डोळे बंद करुन मागे रेललो.... वर्ष झाले त्या दुर्दैवी घटनेला ! चित्रात रंग भरता भरता जणु नियंत्याने अचानक सगळे रंगच चित्रावर भिरकाटुन दिले. आसावरीची जागा आता अनघाने घेतली होती, चुनुच्या आयुष्यातली आणी माझ्या कंपनीतली देखील. "संग्राम, अनघाशी बोललास ??" "नाही आई ! आणी बोलणारही नाही. जे चालु आहे ते तसेच सुरळीत चालु दे... पुन्हा एकदा पोर्णिमेच्या प्रकाशाचा हट्ट धरुन मला आता चंद्रकोरीच्या प्रकाशाला गमवायचे नाहिये. (समाप्त)

वाचने 6300 वाचनखूण प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

मेघवेडा 05/05/2010 - 17:12
>> पुन्हा एकदा पोर्णिमेच्या प्रकाशाचा हट्ट धरुन मला आता चंद्रकोरीच्या प्रकाशाला गमवायचे नाहिये. जब्बर!! वाट पाहायला लावली पण दॅट वॉज वर्थ इट!! :) अ प्र ति म!! =D> =D> -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
>>>पुन्हा एकदा पोर्णिमेच्या प्रकाशाचा हट्ट धरुन मला आता चंद्रकोरीच्या प्रकाशाला गमवायचे नाहिये. लई भारी.. एकदम चाबुकच की हा.. -भाग्येश यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधौ || समेत्य च व्यपेयातां तद्वत् भूतसमागमः ||
>>>पुन्हा एकदा पोर्णिमेच्या प्रकाशाचा हट्ट धरुन मला आता चंद्रकोरीच्या प्रकाशाला गमवायचे नाहिये. लई भारी.. एकदम चाबुकच की हा.. सहमत.पण केवळ ह्या वाक्याच्या प्रयोजनासाठी कथेला शेवटी फार नाट्यमय वळण दिले आहे असे वाटते. शेवट काही पटला नाही. स्पष्ट अभिप्राय दिल्याबद्दल क्षमस्व.! --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

चतुरंग 05/05/2010 - 18:53
हे तर एकदम 'बिखरा बिखरा चांद' झालं की रे! :( (सूरजचाचा)चतुरंग

वाचक 05/05/2010 - 19:32
माणसं माराल रे एका गोष्टीत ? :) परा तुझ्यात लेखनाचे बीज आहे, लिहायची हौस आहे आणि त्यासाठी लागणारे (टंकन, सुधारणा) कष्ट घ्यायची तयारी आहे आणि त्याचप्रमाणे 'नेटकॅफे' च्या व्यवसायातून मिळणारा वेगवेगळा अनुभवही आहे, ह्या सगळ्याचा उपयोग करुन तू काही तरी वेगळे लिहावेस असे मला वाटते, तुझ्यात नक्कीच ती क्षमता आहे, तिचा योग्य तो उपयोग करुन घे.

शानबा५१२ 05/05/2010 - 19:52
असावरी बरोबर जो राहतो मरतोय. बर झाल सर्वच नाही गेले तिला आणयला नाही तर सर्वांचा नंबर लागला असता व समाप्त आधीच लिहाव लागल असत. बाकी कथेत सस्पेन्स्,रुची वाढवणार अस काहीच नव्हत. शेवट तर महापकाउ होता. जे खर आहे ते लिहलय,ते मान्य करा. शेवट वाचुन अस वाटल की तुम्ही लिहायचा कंटाळा आला म्हणुन 'अकाली' शेवट केलात की काय! ************************************************* देवाने सर्व गोष्टींची एक वेळ ठरवलेय हेच सर्वात मोठ सत्य आहे! ते आज मला "ओर्कुत" व "फचेबूक" वर जे सापडल्/भेटल्/मिळाल त्यावरुन पुन्हा एकदा कळल. The worst feeling is that someone,to whom you love from heart,ignores you

अनिल हटेला 05/05/2010 - 19:52
एकता कपूरांशी काँट्रॅक्ट का करत नाहीस रे? ईतकी उलथापालथ..? असो.... लिहीण्याची स्टाईल आणी थीम आवडली.... शेवट हरवल्यासारखा वाटला.... :) (कलेकलेने (किलोकिलोने) वाढणारा) बैलोबा चायनीजकर !!!उर्फ.. АНИЛ ХАТЕЛА :D

विंजिनेर 06/05/2010 - 04:35
?? घाऊक प्रमाणात मारकाट चालू हाये की. पण शेवट अंमळ गडबडीत उरकलास का?

In reply to by बिपिन कार्यकर्ते

टारझन 06/05/2010 - 10:41
दोन्ही भाग एकसाथ वाचले :) शेवटाविषयी बिपीण शी सहमत - परेश बासशेवटी

चिरोटा 06/05/2010 - 10:25
"पुन्हा एकदा पोर्णिमेच्या प्रकाशाचा हट्ट धरुन मला आता चंद्रकोरीच्या प्रकाशाला गमवायचे नाहिये. " भारी. शेवट जरा वेगळा व्हायला हवा होता असे वाटते. भेंडी P = NP

राघव 07/05/2010 - 17:06
खरे तर मी आत्ता शिव्याच घालायला आलो होतो. पण आधी बघून घेतले की पुढचा भाग टाकलाय की नाही ते.. बरे झाले आधीच नाय झाडला.. :) छान लिहिलेयस. शेवट मात्र मान्य होत नाही. असो. पु. क. शु. राघव

वारा 07/05/2010 - 22:48
तुमची रास मकर वगैरे आहे कि काय..... म्हणजे नायकाची

१. कथा चांगलीच आहे, पण शेवटी इतकी कत्तल झालेली पाहून वाईट वाटलं.. पण अस काही वास्तव जीवनात ही घडू शकत हे देखील तितकेच खरे! २. "चित्रात रंग भरता भरता जणु नियंत्याने अचानक सगळे रंगच चित्रावर भिरकाटुन दिले. " क्या बात है! मनापासुन दाद दिली या वाक्याला. -- लघुकथेतला यमराजकुमार B) (इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया)

शिल्पा ब 21/05/2010 - 02:48
कथा आवडली ...शेवट वेगळा केला आहे...typical नाही त्यामुळे आवडला...शेवटी हि गोष्टच आहे...छान लिहिली... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/