शेवटी आम्ही चंडोलच ..

चंडोल जनातलं, मनातलं
आंतरजालावरील वेगवेगळ्या संस्थळांवर हिंडताना आम्ही अनेक बरे वाईट लेख वाचले आणि विचार केला आपणही काही मोजक्या स्थळांचे सभासदत्व घेऊन थोडे लिहून पाहावे. पण हे सभासदत्व घेताना सर्वात महत्वाचा प्रश्न होता माझ्या खात्याला द्यायच्या नावाचा, पुन्हा एकदा आमची जालवारी सुरु झाली, काहींनी आपल्या नावाला अनुसरून नाव दिली होती काहींनी स्वभावाला, पण स्वतःला नावं ठेवायचे जास्त प्रसंग मी माझ्यावर येऊ दिले नसल्यामुळे मला काही नाव सुचेना. शिवाय नवीन लिहायची खाज देखील जात नव्हती. अशाच विचित्र मनस्थितीत हिंडताना (आर्थात जालावरच, १५-२० इंच बर्फात कसला हिंडतोय दुसरीकडे?) मला ९-१० वीत असतानाची ''ती फुलराणी'' हि कविता वाचायला मिळाली आणि तोंडावर हसू उमटलं, कविता आवडीची होतीच आणि शिवाय आमच्या वर्गात मुलांचे (होय आम्ही वाळवंटात होतो शिकायला, फक्त मुलेच वर्गात ) खेळ आठवले. वर्गातील सर्व मुले त्या कवितेतल्या फुलराणीच्या नाव ऐवजी आपल्याला आवडलेल्या मुलीचे नाव टाकायची आणि ते स्वतः रविकर व्हायचे !!! शिवाय कवितेतील वनदेवी, कोकीळ, पाट वगैरे लोकांना वाटेल तशी नावे देखील द्यायचे. अशाच मुलांपैकी एक असलेल्या आमच्या चावट मित्राने '' आकाशी चंडोल चालला ..'' येथे चक्क माझं नाव टाकलं आणि त्याला कारणही तसंच होतं .. मी म्हणजे पहिल्या पासूनच तसा परोपकारी (शेपुटघाल्यासाठी चांगला शब्द ), एखद्या मित्राला मुलीला चोरून देण्या साठी ग्रीटिंग पाहिजे असेल, किंवा मुलीचा पाठलाग करून तिचा पत्ता शोधायचा असेल तर असल्या कामांसाठी नेहमीच मला पाचारण केले जायचे. इतर मुलांच्या मते मी 'सज्जन' दिसायचो, त्यामुळे माझ्यावर संशय घेतला जाणार नाही अशी (निदान त्यांनातरी ) खात्री होती. आता ह्या भानगडी मध्ये सर्व मुली आधीच १-२ वेळा ''बुक'' झाल्या असल्याने माझ्यासाठी असले काही करायची वेळच नाही आली. जर एखादी बरी वाटलीच तरी ३-४ दिवसांनी तिचा पत्ता सांगणारा दुसरा कोणीतरी भेटायचा, आमचे काम बाजूलाच. त्यामुळे बहुतेक शाळेतील वर्षे '' अर्रे नड रे जाऊन, काही नाही होत','अर्रे ती ना? मयाच्या कॉलोनीत राहते त्याला विचार ' किंवा '' फ्रेन्शीप देत्ये म्हणली म्हणजे हाड म्हणली अर्रे तुला .. सोड दुसरी बघ', 'जौंदेरे गेली उडत, छप्पन मिळतील असल्या ..' असली (निरुपयोगी आणि धोकादायक) वाक्ये बोलण्यात गेली. कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात सुद्धा हे दुर्दैव काही पाठ सोडीना, झक मारली आणि जीवशास्त्र घेतले असे व्हायचे, वर्गात १:४ या प्रमाणात मुली .. मग ओळख करून दे', 'माझ्या बद्दल काही बोल्ली का' वगैरे सुरु झालं. तशातच आमच्या हातभाराने एका जोडप्याचा जमलं, माग काय विचारता हो .. 'काकू तो/ती आत्ताच माझ्या घरून निघालेत येतीलच थोड्या वेळात ..', 'त्याला मला फोन करायला सांग', 'ती फोन वर बोर करते र्रे ..','शेवटी तू त्याचाच मित्र' .... काही विचारू नका रात्री ११-११:३० पर्यंत आम्ही हीच कामं केलेली आहेत. बरं अशा राड्यातून ताटातुटीची वेळ आली कि ते काम पण मीच करायचे. उगीच डोक्याला कल्हई ... फुलराणी आणि रविकर सगळ्यांनाच दिसतात नव्हे आवडतात, पण आमच्या सारख्या चान्डोलांच काय? आमच्यावर ना पिक्चर निघतात ना गाणी, निष्काम कर्मयोगाच इतकं उत्तम उदाहरण असूनही हा अन्याय? लोकांना पाय मध्ये घालून ठरलेले लग्न मोडणारे हिरो पण आवडतात, काहीही देणे घेणे नसताना पळती गाढवं *** करणारे हे कर्मयोगी दिसतच नाहीत. नाही म्हणायला शोले मधला अमिताभ बच्चन .. 'क्या करे मेरा तो दिल ही कुच्छ ऐसा हैं' म्हणत जाख्मावर फुंकर मारून गेला. माझं आणि जगातल्या सर्व चंडोल वर्गाचं 'क्या करे मेरा तो दिल ही कुच्छ ऐसा हैं' हे जणू ब्रीदवाक्य आहे. असो, तर हे सगळं माझ्या डोळ्या समोर ती कविता वाचता वाचता विजेसारखा चमकून गेलं. आणि मी ठरवलं. सुमारे एक तपा पूर्वी एका आचरट मुलाने लिहिलेली 'आकाशी पाट्या चालला, हा वाग्निश्चय करावयाला' ही ओळ उलटी फिरवायची, अशा सगळ्या उपेक्षित चंडोल वर्गाचं स्मरण करून माझं जालावरील 'तखल्लूस' चंडोल ठरवायचं आणि लिहायला सुरवात करायची ....
वर्गीकरण
लेखनप्रकार

6 टिप्पण्या 1,928 दृश्ये

Comments

शुचि नवीन

फार विनोदी लेख आहे. मजा आली वाचून. >>'आकाशी पाट्या चालला, हा वाग्निश्चय करावयाला>>> =)) =)) =)) खूपच भारी!!! ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

अनिल हटेला नवीन

.. आकाशी चंडोल चालला .. =)) येउ द्यात अजुनही !! (जमिनीवर चालणारा) ;-) बैलोबा चायनीजकर !!! © Copyrights 2008-2010. All rights reserved.

मदनबाण नवीन

या चंडोल महोदय या... :) (माझ्या आयडीचे नाव ठरवतानाची वेळ आठवली... ;) ) मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato