एक कथा
आता आपण ज्या नदीला तापी म्हणतो ती नदी तेव्हा कधीतरी तपस्विनी म्हणून ओळखली जायची.
म्हणजे सांगायचं एव्हढंच की कथा ऐतीहासीक आहे पण या कथेत युध्द नसल्यामुळे इतिहासात या कथेला जागा मिळाले नाही.
पण माणसांच्या मनातून विसरली गेली नसल्यामुळे एका मनातून दुसर्या मनात झिरपत गेली.
मानवी मनाचा इतिहास अशा कुठल्या कुठल्या कथांमध्ये असतो पण आपण मात्र पाठ करतो जन्म मरण आणि युध्दाच्या सनावळ्या.
एका प्राचीन पर्वतराजीतून उगम पावणार्या या नदीच्या सुपीक खोर्यामध्ये छोटी छोटी पण समृध्द नगरं वसली होती.
शेती करणारी प्रजा आणि त्यांची काळजी वाहणारे राजे होते.
ही गोष्ट आहे अशाच एका राजाच्या राज्याची.
राजाचं नाव आता प्रत्येक जण वेगळं काहीतरी सांगतो पण कथा मी ऐकली तेव्हा राजाचं नाव निधीधारी होतं .
त्याच्या राज्याचं नाव ही असंच काहीतरी छान छान होतं पण नाव लिहीलं तर इतिहासावर हक्क सांगायला माणसं धावून येतात म्हणून आपण ते विसरून जाऊ या.
राजाचा खजीना त्याच्या नावाप्रमाणे समृध्द होता. काळजी करायचं काहीच कारण नव्हतं .
ज्या पर्वतराजीतून तपस्विनी वाहत यायची ती पर्वतराजीची भिंत परचक्रापासून संरक्षण करायला समर्थ होती.
वेळेवर पाऊस पण पडायचा. इतकाच पडायचा की नदीला कधी पूर आल्याचं किवा नदीचं पात्र कोरडं पडल्याचं कोणीही ऐकलं नव्हतं .
बियाण्याचं जतन राजकोषात होत असल्यामूळे शेकडो वर्षं होऊन गेली तरी वाण शुध्द होतं.
राज्यातली प्रजा कृषीवल होती.धान्याचे व्यापारी सचोटीनी व्यवहार करायचे. आधी शेतकरी असलेले नंतर व्यापारी झाले असल्यामुळे दलालाची आवश्यकता नव्हती.
शेतीचा सारा धान्याच्या रुपात जमा व्हायचा त्यामुळे कर भरण्यासाठी शेतकर्यांची कुचंबणा व्हायची नाही आणि व्यापार्यांना राजकोषातल्या साठ्याचा अप्रत्यक्ष धाकही असायचा.
कडबा चांगल्या वाणाचा असल्यामुळे पशुधन पण सशक्त होतं .गायीच्या आचळाला अखंड मायेचा पाझर होता.
पण हे सगळं तपस्विनीच्या पाण्याला असलेल्या गुणामुळे. राज्याच्या पिकाला इतर राज्यातून मागणी असायची .त्यामुळे दाणादाण्याचा पै पैका जमा व्हायचा.
आता माणसं म्हटली म्हणजे रोगराई आलीच .शेकडो वर्षं ज्ञानाची जोपासना करणारे धन्वंतरी होते.सुदृढ वरीष्ठ नागरीकांची संख्या अमाप होती.
परीपक्व मनाच्या या नागरीकांनी येणारी पिढी घडवली होती.
अमरपट्टा नव्हता .
पिकलेलं फळ आपल्या इच्छेनी झाडापासून फारकत घेतं तशी जुनी पिढी मातीच्या स्वाधीन व्हायची पण तोपर्यंत नवीन जोमदार रोपं उगवलेली असायची.
दक्षीणेकडून बरेच फिरस्ते यायचे.खास करून सणासुदीला. त्यांच्या राज्यातून नविन काहीतरी घेऊन यायची. त्यांची राज्य पण श्रीमंत असल्यामुळे फिरस्ते परत जायचे.
राज्याच्या समाजमनात भेसळ व्हायला संधी नव्हती.
माणसंच शेवटी .थोडाफार दुराचार करायची .राज्यात दुराचार मानसीक विकार समजला जायचा म्हणून त्यांच्या मनावर इलाज करण्यासाठी परीवर्तनाची इस्पितळं होती.त्यात फार गर्दी नसायची.
राज्यात मद्यगृह होती. द्युतगृहे होती .मनोरंजनगृहे होती .त्यांची जागा नगराच्या बाहेर होती.त्यावर राज्याची नजर असायची.
राज्यात नियम बंधनकारक होते पण जाचक नव्हते.
एक खुशाल राज्य म्हणून राज्याची ख्याती होती.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
राजा निधीधारी आणि अमात्य जनलोचन राज्याचा गाडा कुशलतेने हाकत होते.अमात्य जनलोचन निधीधारींच्या पित्याचे मित्र आणि अमात्य . निधीधारींचे सगळे शिक्षण अमात्यांच्या नजरेखाली आणि मार्गदर्शनाखाली पार पडले होते. अमात्यांचे वय झाल्यामुळे आजकाल ते फारसे कारभारात लक्ष घालत नव्हते.
अमात्यांच्या नंतर त्यांचे पद सांभाळण्यासाठी नविन उमेदवाराचा शोध बरीच वर्षे चालला होता.अमात्यांचा पुत्र विरलकुमारही तयारीत होता.
आज वसंतोत्सवाची तयारी करताना राजा निधीधारींना अमात्य थकले असल्याची जाणीव झाली.
उत्सवात महत्वाचा कार्यक्रम म्हणजे शारीरीक कौशल्य आणि शक्तीच्या प्रदर्शनाचा.
आज जेव्हा मलखांबाची कसरत चालू होती तेव्हा अमात्य डोळे बंद करून स्वस्थ बसले होते.
असे अनेक उत्सव राज्यात व्हायचे आणि त्यातून तरुणांना राज्याच्या वेगवेगळ्या सेवेत भरती केले जायचे.जनलोचनांची खास नजर या उत्सवात असायची ती याच कारणासाठी .
आज मात्र अमात्य कंटाळलेले पाहून निधीधारींना आश्चर्य वाटले होते.
वडीलधारी समस्या सांगतील तेव्हाच ऐकावे आणि त्यावर आपले मत द्यावे असा पायंडा असल्यामुळे राजे निधीधारी शांतपणे निरीक्षण करत होते.
आता अश्वशाळेचे प्रदर्शन सुरु झाले होते.
तरणेबांड घोडे आणि तसेच चपळ तरुण स्वार आपले कौशल्य दाखवत होते.
अमात्यांचा पुत्र विरलकुमार एक तरबेज अश्वपारखी होता पण आज तो दिसेना म्हटल्यावर राजांनी अमात्यांना न राहवून विचारलं
"अमात्य आज विरलकुमार कुठे दिसत नाहीत."
त्यांच्या तब्येतीची काही तक्रार आहे असे उत्तर अमात्यांनी दिले पण त्यांच्या उत्तरात एक दु:खाचा सूर होता.
निधीधारींनी हे ओळखले .फार तगादा न करण्याच्या स्वभावामुळे त्यांनी आणखी चौकशी केली नाही.
एव्हढ्यात एक तरुण घोडा बेफाम उधळला. स्वाराला अंगावरून फेकून जागीच थयथय नाचायला लागला.
मोतद्दार आणि दोन सेवकानी त्याच्या तोंडात साखर कोंबली तरीपण त्याचे थैमान कमी होईना.
सरतेशेवटी मोतद्दारानी एक लोखंडाची गरम कांब त्या अश्वाच्या कानावर टेकवली आणि तो अश्व स्तब्ध उभा राहीला.
निधीधारींना एक लांब सुस्कारा ऐकू आला.
त्यांनी अमात्यांकडे बघीतलं .अमात्य डोळे पुसत होते.
निधीधारी पुढे झाले त्यांनी अमात्यांना उठून उभे राहण्यासाठी आधार दिला.
सेवकांची एक रांग पुढे झाली.
अमात्य शांत पावले टाकत त्यांच्या निवासस्थानाकडे गेले.
निधीधारींना पण कंटाळा आला.
कर्तव्य निष्ठेच्या भावनेतून ते शेवटपर्यंत प्रदर्शन बघत होते.
मनात मात्र अमात्यांची समस्या छळत होती.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आजकाल अमात्यांचे काहीतरी बिनसले आहे याची कल्पना निधीधारींना होती पण नक्की काय याची कल्पना त्यांना नव्हती.
महालात आल्यानंतर राजांनी गुप्तचरांना बोलावणी पाठवली.मंत्रणा केली पण राज्यात अमात्य नाराज असतील असे काही कारण नव्हते.
विंधकर नावाच्या हेरानी मात्र एक अस्वस्थ करणारी खबर राजांच्या कानावर घातली .
थोडावेळ दोघांची चर्चा झाल्यावर निधीधारींनी हेराला रात्री नगराच्या मध्यभागी असलेल्या कारंजाजवळ भेटण्याचे ठरवले.
राजांना असे गुप्तचरांबरोबर फिरण्याचे प्रसंग फार कमी यायचे. सुबत्तेच्या शिखरावर असलेल्या राज्यात गुप्तचरांना फारसे काही काम नव्हते पण अमात्यांनी घालून दिलेल्या शिस्तीत राज्याचा गाडा हाकला जात असल्यामुळे गुप्तचर रात्रीपण फेरफटका मारत असायचे.
रात्रीच्या दुसर्या प्रहराची वेळ .विंधकर आणि निधीधारी एक अंधारा कोपरा शोधून वाट बघत होते.
चंद्र माथ्यावर आला तरी विंधकराने सांगीतल्यापरमाणे काही हालचाल दिसेना तेव्हढ्यात अंधारात हालचाल दिसली.
एक अर्धविवस्त्र तरुण स्त्री चिंध्यांचे गाठोडे घेऊन दबकत दबकत पुढे आली. चांदण्या त्या प्रकाशात सुध्दा ती अतिशय अनाकर्षक आणि कुरुप दिसत होती.
कडेवर एक अर्भक होते.कुरकुरणार्या अर्भकाला बाजूल ठेवून तिनी चिंध्यांचे गाठोडे उघडले. आतून शिळ्या अन्नाची एक मोटळी काढली आणि खायला सुरुवात केली.
रात्रीच्या त्या अंधारात तिला भिती वाटत नव्हती. मनासारखे खाल्यावर ती वरती चंद्राकडे बघून पिशासारखी हसायला लागली.
अर्भक तिच्या हसण्यामुळे दचकले असावे.त्यानी रडायला सुरुवात केली. आता ती वेडी चेकाळली.
तिनी अर्भकाला उचलून उंच फेकायला सुरुवात केली.झेलायला सुरुवात केली.
तिच्या काळ्याकुळीत हातावर ते बालक काहीसे विचीत्र दिसत होते.
अर्भकानी किंचाळायला सुरुवात केल्यावर वेडी आणखी खदखदायला लागली.
विंधकरानी निधीधारींच्या कानात कुबुजत सांगीतले की ते बालक जेमतेम तीन आठवड्याचे असावे.
राजांच्या मनात मात्र एकच कल्लोळ होता .राज्यात अशा मानसीक रुग्णांची संख्या फार कमी होती.जे रुग्ण होते ते शासकीय केंद्रात बंदीस्त होते.त्यांची लहान मुलांसारखी काळजी घेतली जायची.
राज्यातल्या अशा एखाद्या स्त्री रुग्णाला मोकळे ठेवणे फार कमीपणाचे होते .
अती खेदकारक गोष्ट अशी होती की या स्त्रीला नवजात बालक होते म्हणजे कोणीतरी तिच्या मानसीक अपंगत्वाचा फायदा घेऊन.......
तेव्हढ्यात एक किंकाळी ऐकू आली .किंचालत किंचाळत ती स्त्री आता कारंजाजवळ गेली आणि अर्भकाला कारंज्याच्या हौदात फेकले.
विंधकर आणि निधीधारी पुढे धावत गेले.
राजांनी हौदात उडी मारून बालक वाचवले.
विंधकरानी एका दोरीच्या फासात त्या स्त्रीला अडकवले.
एक कर्णकर्कश शिळ वाजवली आणि दुरून घोड्यावर स्वार शिपाई दौडत आले.
परीस्थिती त्यांच्या स्वाधीन करून निधीधारी महालाकडे परतले.
बालकाला हौदातून बाहेर काढल्यावर त्यांच्या निरीक्षणात आले होते की ते बालकाच्या अंगावर जन्मजात उच्च कुळाच्या खूणा होत्या .
म्हणजे हे बालक एका उच्च खानदानातल्या शरीर संबंधातून जन्माला आले होते.
पण मानसीक रुग्ण असलेल्या कुरुप स्त्रीशी कोणत्या उमरावानी संबंध ठेवला असेल हा प्रश्न निधीधारींना छळत होता.
रात्रभर तळमळून त्यांना झोप येईना .
हे असं कृत्य कोणी बरं केलं असेल ?
पापाचे मूळ विकृतीत आहे.
विकृतीचे मूळ मानसीक स्खलनात आहे.
स्खलानाचे मूळ व्यसनात आहे.
व्यसनाचे मूळ मानसीक असुरक्षीततेत आहे.
मग आपल्या उमरावात कोण असुरक्षीत आहे ?
निधीधारींना प्रश्न छळत होते.
ह्या कोड्याचा उलगडा करण्याचा निर्धार केल्यावर त्यांना झोप लागली.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आजचा रात्र पहार्याचा चौथा दिवस होता.
गुप्तचरांनी राज्य पालथे घातले तरी काही छडा लागला नव्हता.
राजे स्वतः पाळतीवर होते. पण छडा लागेना.
कुठल्यातरी अज्ञात सावलीचा पाठलाग करावा असे चालले होते.
अमात्य आजारी होते .त्यांना त्रास द्यावा असेही वाटत नव्हते पण न राहवल्यामूळे त्यांनी अमात्यांशी मंत्रणा केली.
त्यांनी एकच सल्ला दिला.
स्खलनाचे मूळ व्यसनात आहे.
त्यामुळे आजचा फेरफटका द्युतगृह आणि मद्यालयाकडे मारण्याचे ठरवून निधीधारी रात्री एका मद्यालयाच्या समोर एका आडोशाला उभे होते.
रात्री मद्यगृहे लवकर बंद करण्याचा आदेश कसोशीने पाळला जात असल्याचे पाहून त्यांना आनंदही वाटला.
हळूहळू सगळी मद्यालये बंद होत आली.
मद्यपी आनंदाच्या लकेरी मारत घराकडे जायला लागले.
निधीधारींनी आजच्या रात्र्फेरीची समाप्ती करावी असे ठरवता ठरवता एक कोलाहल त्यांच्या कानी आला.
एका छोट्या मद्यगृहासमोर एक युवक बरळत उभा होता.
तू वारंवार आत जाण्याचा प्रयत्न करत होता आणि मद्यालयाचे सेवक त्याला उचलून बाहेर पायरीवर आणून ठेवत होते.
निधीधारी जवळ जाईपर्यंत दरवाजे बंद झाले होते.
आकाशात चंद्रावर ढग जमा झाले. निधीधारींनी एक अंधारा कोपरा निवडला.
मद्याच्या नशेत असलेला तो तरुण ओरडत होता.
पायरीवर आडवा पडून लोळत होता.
थोड्या वेळानी एक सेवक दरवाजा उघडून बाहेर आला.
त्यानी त्या युवकाच्या हातात एक पानाचा डबा दिला.
युवकानी पुन्हा मद्याची माङणी केली.
सेवकानी ती नाकारून दरवाजा बंद केला.युवकानी उठून उभे राहण्याचा प्रयत्न केला.
पण धुंदीमुळे शिवीगाळ करत तो युवक पायरीवरच कोसळला.
मद्यालय बंद झाले.
युवक आता थोडा हुशार झाला होता.
चंद्रावरचे अभ्र दूर झाल्याने निधीधारींना अगदी सुस्पष्ट नाही पण युवकाच्या कपड्यावरून ते भरजरी असल्याची कल्पना आली.
हा कोण बरं उमराव असा विचार करत असताना त्या युवकानी पुन्हा एकदा चालायचा प्रयत्न केला .चार पावले टाकल्यावर तोल गेला.
बराच वेळ तो युवक शांत पडून होता. अधून मधून एक गीत त्याच्या तोंडून बाहेर पडत होते.
काही वेळानी त्यानी शिवीगाळ करायला सुरुवात केली.
हातातला पानाचा डबा उघडून विडालावण्याचा प्रयत्न केला.
आता चंद्राचा उजेड वाढला होता.
राजे दोन पावलं मागे झाले.
युवकाला विडा लावायचा होता पण हातात पान घेतल्यावर बहुतेक लक्षात आले असावे की चुना पाण्याअभावी सुकून गेला होता.
विडा खाण्याची इच्छा फार अनिवार होत होती.
हातातली चुन्याची डबी घरंगळून पुढे गेली .
तो युवक रांगत रांगत पुढे गेला.
डबी उचलताना कष्ट झाले पण तो अचानक हसायला लागला.
जवळच एक गटार वाहत होते.
लोळत लोळत युवक गटाराजवळ वाकला.
एका हाताच्या ओंजळीत त्यानी गटाराचे पाणी घेतले.
गटारच्या पाण्यात चुना भिजवला.
हातात पान घेऊन तो चुना पानाला लावला.
निधीधारींच्या पोटात ते दृष्य बघून मळमळ सुरु झाली.
इकडे तो गटाराच्या पाण्यात भिजवलेला चुना लावून तो तरुण विडा चघळत होता.
आता मात्र पुढे व्हावेच असा विचार करताना एक विचार निधीधारींचा मनात विजेसारखा कोसळला.
त्या वेडीला झालेले मूल आठवले.
गटारच्या पाण्यात भिजवलेला चुना निशंक मनाने खाणारा तरुण आणि ते उमराव घराण्यात शोभणारे अर्भक.
कोडे सुटले होते.
निधीधारी पुढे झाले.
तरुणाला मारण्याच्या मोहाला दूर सावरत त्यांनी तरुणाचा चेहेरा निरखून पाहीला.
अमात्यपुत्र विरलकुमाराचा चेहेरा बघीतल्यावर त्यांना सगळी कोडी उलगडली.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वास्तवीक कथा इथेच संपते. त्या बालकाचे काय झाले ? विरलकुमाराला काय झाले याची उत्तरं ह्या कथेत नाहीत.
पण मानवी इतिहासात फक्त युध्दाच्या आणि हत्येच्या सनावळ्या वाचल्यावर नक्की कळते की निधीधारींचे प्रयत्न अपुरे ठरले असावेत.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(ह्या कथेची मध्यवर्ती श्रीमंत कल्पना एका गुजराथी कथेची आहे.बाकीची सजावट माह्या गरीबाघरची आहे.)
वाचने
9221
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
अरे देवा..
अधाश्या सारखे ......
In reply to अधाश्या सारखे ...... by jaypal
जयपाल
क्लास
कथा मस्त
कथा आवडली
श्री
उत्तमकथा
भयानक
श्री रा रा
पोचली आणि
मूळ
In reply to मूळ by तिमा
स्वतःचे उद्दिष्ट सापडलेले नसणे
कथा
कथा आवडली.
वेगळीच कथा
अतिशय आशयगर्भ कथा!
विचारास चालना...
पापाचे मूळ विकृतीत आहे.