मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गाडी रूळावरून सांधे बदलून जाते तेंव्हा..

बहुगुणी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मिपावरचा लतादीदींवरचा लेख वाचल्यानंतर डोक्यात घुसलेलं 'जो वादा किया वो' आज सकाळी गुणगुणत होतो (बाथरूम मध्ये, दुसरीकडे कुठे आमची हिंमत असायला), आवरून बाहेर गाडीकडे जात असतांना गाण्याच्या शब्दांचं शिटीत रूपांतर झालेलं. गाडी सुरू केली आणि मग पुन्हा (काचा बंद आहेत हे subconsciously लक्षात येऊन!) शिटीवरून पुन्हा शाब्दिक गाण्यावर. फ्रीवेवर गेल्यावर लक्षात आलं की आपण भलतंच गाणं गातोय आता ... 'ये दिल और उनकी निगाहोंके साये...' च्या मारी! हे गाणं कुठून आलं? असं बर्‍याच वेळा होतं, म्हंटलं काही तरी लिंक नक्कीच असणार दोन गाण्यात.. मनात दोन्ही गाण्यांचे अर्थ ताडून पाहिले, काही खास साम्य आढळलं नाही. 'ताजमहाल' सिनेमाची गाणी रोशन ने संगीतबद्द केल्याचं आठवत होतं, तर 'प्रेमपर्बत' जयदेवांचा. 'साम्य काहीच नसतांना असा गाडीने रूळांचा सांधा बदलण्याचं कारण काय असावं' याचा विचार करताकरताच ऑफिस आलं. अर्थात्, असं भलतंच गाणं सुरू होणं ही पूर्णपणे माझीच (अ-)सांगितीक चूक असणं हाही एक पर्याय open ठेवला होता! पण तरीही, वेळ मिळेल तेंव्हा आंतर्जालावर शोध घायचं आणि या गाण्यांचे मूळ राग कोणते ते शोधायचं ठरवलं. (इथे हे स्पष्ट करतो की मला शास्त्रीय संगीतातलं काहीही कळत नाही! ऐकायला आवडतं, पण का आवडतं म्हणाल तर सांगता येणार नाही!) आता वेळ मिळाल्यावर शोधलं तर कारण सापडलं असं वाटतं: ही दोन्ही गाणी 'पहाडी' रागावर आधारित आहेत. मला वाटतं 'जो वादा किया वो' मधल्या 'किया वो' नंतर केंव्हा तरी असा सांधा बदलून माझी गाडी 'निगाहोंके साये' वर गेली असावी. इथल्या जाणकारांनी हा खुलासा बरोबर आहे का, आणि हे असं का झालं असावं याची सोप्या शब्दांत माहिती दिली तर आवडेल. तसंच, अशी सांधे बदलून इतरत्र जाणारी गाणीही सोदाहरण ऐकायला आवडतील.

वाचने 16696 वाचनखूण प्रतिक्रिया 38

बबलु 04/11/2009 - 02:31
लगेच आठवलेली दोन ठळक उदाहरणं :--- ठंडी हवांए लहेराके आए (संगीतः सचिनदेव बर्मन १९५१) सागर किनारे दिल ये पुकारे (संगीतः राहुलदेव बर्मन १९८५) ये हवा ये रात ये चांदनी (संगीतः सज्जाद हुसेन १९५२) तुझे क्या सुनांऊ मै दिलरूबा (संगीतः मदनमोहन १९५८) ....बबलु

In reply to by बबलु

बहुगुणी 04/11/2009 - 03:56
वा, बबलूशेठ! बहोत खूब! ठंडी हवांए लहेराके आए (संगीतः सचिनदेव बर्मन १९५१) - राग: दरबारी कानडा सागर किनारे दिल ये पुकारे (संगीतः राहुलदेव बर्मन १९८५) रागः?? ये हवा ये रात ये चांदनी (संगीतः सज्जाद हुसेन १९५२)- राग: दरबारी कानडा तुझे क्या सुनांऊ मै दिलरूबा (संगीतः मदनमोहन १९५८) - राग: दरबारी कानडा(बहुधा, या लेखावर विश्वास ठेवून)

In reply to by बहुगुणी

चिरोटा 04/11/2009 - 09:26
ठंडी हवांए लहेराके आए (संगीतः सचिनदेव बर्मन १९५१) - सागर किनारे दिल ये पुकारे (संगीतः राहुलदेव बर्मन १९८५) आर्.डी.ची रेडियोवर एकदा मुलाखत ऐकली होती.तेव्हा त्याने सागर किनारेची प्रेरणा ठंडी हवांए वरुन मिळाल्याचे सांगितले होते.राग तोच आहे की नाही ह्याचे कल्पना नाही. भेंडी P = NP

In reply to by बहुगुणी

विजुभाऊ 05/11/2009 - 11:02
सागर किनारे दिल ये पुकारे (संगीतः राहुलदेव बर्मन १९८५) हे यमन मधले गाणे. चाल ढापलेली आहे. मूळ गाणे "पुण्यवंत दाता मनी धरी खंत. तोची खरा साधू तोची खरा संत " चित्रपटात गाणे बहुतेक निळूफुलेंच्यावर चित्रीत आहे सन १९८०/८१ चित्रपट आठवत नाही. याच चालीतले स्वर क्रम न बदलेले आणखी एक गाणे घरसे निकलते ही कुछ दूर चलते ही रसते में है उसका घर.. आणि हमे रासतो की जरुरत नाही है ... आपके पावोंके निशां मिल गये है..... चित्रपट नरम गरम संगीत. आर डी बर्मन यमन रागातल्या बर्‍याच गाण्यांच्या बाबत असे होते. उदा " टाळ बोले चिपळ्यांशी नाच माझ्या संगे" या ओळी म्हणताना/ वाजवताना टाळबोले या नंतर निगाहे मिलाने को जी चाहता है " हे चपखल बसते. चाल जशीच्या तशी ढापण्याचे प्रकार बरेच आहेत " तू कल चला जायेगा तो मै क्या करुंगा तू याद अगर आयेगा तो मै क्या करुंगा" चित्रपट नाम . संगीत लक्ष्मिकान्त प्यारेलाल. हे गाणे "हलके हलके जोजवा बाळचा पाळणा...पाळण्याच्या मध्ये फिरतो खेळणा" यावरून जसेच्या तसे हुबेहुब उचललेले आहे. ऐकताना कमी पण वाद्यावर वाजवताना चढता सूरज धीरेधीरे ढलता है ढल जायेगा हे गाणे मालवून टाक दीप चेतवून अंग अंग या गाण्याप्रणेच वाजवता येते. फक्त स्पीड बदलावा लागतो मस्त गुलाबी थंडीत आठवणींची दुलई पांघरून घ्या .

In reply to by विजुभाऊ

JAGOMOHANPYARE 05/11/2009 - 12:19
पुण्यवंत दाता मनी धरी खंत......... हीच खरी दौलत चित्रपटात निळू फुले.. आवाज- सुधीर फडके... संगीत राम लक्ष्मण. आता राम लक्ष्मणाण्ची चाल सागर किनारेत आर डी नी ढापली म्हणजे रामलक्षमण याना पुण्यवंत दाताच म्हटले पाहिजे ! :) ... ( उलट खैके पान बनारसवाला ची चाल राम लक्ष्मणानी 'तुला कसला नवरा हवा' या दादा कोंडकेंच्या एका गाण्यात जशीच्या तशी वापरली आहे.. बहुतेक येऊ का घरात या चित्रपटात आहे...) सागर किनारे हे एस डीम्च्या थंडी हवाये वर आधारीत आहे, असे आर डींच्या एका मुलाखतीत वाचल्यासारखे वाटते. *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

In reply to by बबलु

ठंडी हवांए लहेराके आए (संगीतः सचिनदेव बर्मन १९५१) सागर किनारे दिल ये पुकारे (संगीतः राहुलदेव बर्मन १९८५)
यादोन्ही गाण्यांचे मुखडे 'आपकी परछाईयाँ' चित्रपटातील या गाण्याच्या मुखड्यासारखे वाटतात. नम्र सूचना - यातल्या हीमॅनच्या डान्सकडे न बघता गाणे ऐकावे नम्र उपसूचना - गाणे एकदा ऐकून झाले की हीमॅनचा डान्स मस्त एन्जोय करावा. ;-)

सुनील 04/11/2009 - 06:59
असा अनुभव कधीकधी येतो खरं. एकाच रागावर आधारीत असलेली गाणी, हे त्याचे कारण असू शकेल काय? की डोक्यात झालेला केमिकल लोच्या? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

आनंद घारे 04/11/2009 - 08:44
सारेगमपधनी या स्वरांच्या काँबिनेशनमधून चाल ठरते आणि विशिष्ट कालांतराने त्यात उतारचढाव किंवा खटके येतात त्याला ताल म्हंटले जाते. सोप्या भाषेत आपण ठेका म्हणतो. शास्त्रीय संगीतात या दोन्हींमध्ये नियमानुसार पुनरावृत्ती होत असते. कवितेचा अर्थ लक्षात घेऊन ती गुणगुणली तर तिचे शब्द लक्षात राहतात (बडबडगीतांचा अपवाद सोडून), पण चाल आणि ताल न समजतासुध्दा स्मरणात राहतात. शीळ घालून वाजवतांना आपल्या मनात त्यातले शब्द नसतातच. खाली कांही प्रसिध्द गाण्यांच्या ओळी दिल्या आहेत बिन गुरुग्यान कहांसे पाऊँ .... राणाने विषका प्याला भेजा ... अंगे भिजली जलधारांनी ... या तीन्ही ओळींची स्वररचना एकच आहे आणि ती मालकंस रागातल्या 'कोयलिया बोले' या बंदिशीच्या 'नवकलियनपर गूँजत भंवरा' या अंत-याच्या सुरुवातीनुसार आहेत. रागदारी गातांना पुढे त्याचा अनंत प्रकाराने विस्तार केला जातो. सिनेसंगीतात मागल्या पुढल्या ओळी वेगळ्या चालींवर बांधलेल्या असतात. पण या समाईक भागातून जातांना आपल्या नकळत रूळ बदलू शकतात, याचे कारण आपण त्या ओळी नकळत गुणगुणत असतो. कधीकधी तालाचे असे होते. 'माँगके साथ तुम्हारा' या गाण्यातील 'यार मिला, दिलदार मिला ...' वगैरे गुणगुणतांना 'मिल गया एक सहारा' च्या जागी 'हमभी पीछे हैं तुम्हारे' येते कारण दोन्ही गाण्यांना एकसारखा ठेका आहे. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

In reply to by आनंद घारे

घाटावरचे भट 06/11/2009 - 01:24
बंदिशींच्या अंतर्‍याच्या सुरुवातीला बहुतांशी रागाच्या अंतर्‍याचा उठाव (तार षड्जाकडे जाण्याची पद्धत) जसाच्या तसा बांधलेला असतो (या उदाहरणात मालकंसाचा 'ग् म (नी)ध् नी सां'). 'कोयलिया बोले' ही एकच बंदिश नाही, तर 'नंद के छेला','पग घुंगरू बांध मीरा', 'मुख मोर मोर' अशा बर्‍याच पारंपरिक बंदिशींच्या अंतर्‍याच्या पहिल्या ओळी आपण वर दिलेल्या गाण्यांशी सुरावटीने सारख्या आहेत.

In reply to by घाटावरचे भट

आनंद घारे 06/11/2009 - 08:41
स्वरलिपी दिल्याबद्दल आभार. मी फक्त एक उदाहरण दिले आहे. ही चाल जशीच्या तशी ऐकू येण्यामुळे ती कॉपी होत नाही हा माझा मुद्दा आहे. त्या चालीच्या रुळावरून जातांना गाडी अचानक सांधे का बदलते याचे हे एक स्पष्टीकरण आहे. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

In reply to by आनंद घारे

घाटावरचे भट 06/11/2009 - 08:55
>>ही चाल जशीच्या तशी ऐकू येण्यामुळे ती कॉपी होत नाही हा माझा मुद्दा आहे. वरील विवक्षित उदाहरणांबद्दल आपले म्हणणे मान्य आहे, कारण त्यातील विवक्षित सुरावटी रागाची विशिष्ट चौकट पकडून चालतात. किंबहुना, तसे न चालल्यास रागाच्या सौंदर्याची हानी होते (अर्थात सुगम संगीतात रागाची चौकट धरून असणे अपेक्षित किंवा/आणि आवश्यक नाही). पण त्याव्यतिरिक्त केवळ मालकंस किंवा तत्सम कुठलाही राग वापरला आहे म्हणून चौर्यकर्माचा आरोप नाहीसा होत नाही. इथे एक शेप्रेट आणि गमतीशीर मुद्दा मांडावासा वाटतो. पूर्वीच्या संगीत नाटकांतल्या अनेक उत्तमोत्तम चाली काही तत्कालीन नाटकवाल्यांनी बांधलेल्या नाहीत. किंबहुना जुन्या नाटकांतल्या (म्हणजे गंधर्वकालीन वगैरे) कुठल्याच चाली त्या त्या नाटकांसाठी बांधल्या गेलेल्या नाहीत. पारंपरिक बंदिशी/ठुमर्‍या/दादरे/गाणी गोळा करून त्यावर नवीन अक्षरं लिहिली गेली आहेत. आज आपल्याला त्या मूळ बंदिशी ठाउकही नाहीत, पण ती गाणी आजही आपल्या आवडीची आणि आपल्या प्रचारात आहेत. मग याला पुराण्या मंडळींचं चौर्यकर्म म्हणायचं काय?

In reply to by घाटावरचे भट

विंजिनेर 06/11/2009 - 09:07
आज आपल्याला त्या मूळ बंदिशी ठाउकही नाहीत, पण ती गाणी आजही आपल्या आवडीची आणि आपल्या प्रचारात आहेत. मग याला पुराण्या मंडळींचं चौर्यकर्म म्हणायचं काय?
थोडा विषयांतराचा दोष पत्करून म्हणतो: नवीन गाणी रसिकांना आवडली की नाही हा मुद्दा गौण आहे. चोरी ती चोरीच. अर्थात, एक महत्वाचे असे की हा चोरीचा आरोप सिद्ध करायची जबाबदारी मुळ बंदीश ज्याने बांधली त्याची असते. ती लोकं तर अर्थात आता नाहीत. सामान्य रसिकांना कलाचौर्याशी फारसे देणेघेणे नसते.

In reply to by विंजिनेर

आनंद घारे 06/11/2009 - 14:28
हयात असतांना त्यांची दूरदर्शनवर घेतली गेलेली एक मुलाखत आठवते. "तुमच्या नाटकात संस्कृत आणि उर्दू साहित्यातून उचललेल्या काही गोष्टी, शास्त्रीय संगीतातील बंदिशीवर आधारलेली गाणी वगैरे आढळतात, हे चौर्य नाही काय?" त्यावर स्व.गोखले यांनी उत्तर दिले, " हा सगळा आमचा सांस्कृतिक वारसा आहे. आम्ही आपल्या बापाचा माल वापरला तर काय बिघडले? पाश्चिमात्य संगीतातून उचलेगिरी करणारे लोक त्या संगीतकारांना आपला बाप मानतात काय?" आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

JAGOMOHANPYARE 04/11/2009 - 09:00
कधीकधी तालाचे असे होते. 'माँगके साथ तुम्हारा' या गाण्यातील 'यार मिला, दिलदार मिला ...' वगैरे गुणगुणतांना 'मिल गया एक सहारा' च्या जागी 'हमभी पीछे हैं तुम्हारे' येते कारण दोन्ही गाण्यांना एकसारखा ठेका आहे. अगदी समान अनुभव... :) आजच सकाळी रेडिओवर मन मोरा बावरा.... चालू होते.... लगेच त्यानंतर सुख के सब साथी लागले.... आणि दोन्ही गाणी स्म्पली तेंव्हा माझ्या तोंडात गाणे होते.. तोरा मन दर्पन कहलाये..... दरबारी कानडा... ठंडी हवाये आणि सागरकिनारे... राग यमनकल्याण. इशारो इशारो मे दिल लेनेवालो... मध्ये 'बता ये हुनर तुमने सीखा कहाँ से..' ही ओळ झाली की नेहमी 'मेरा मन क्यु तुम्हे चाहे मेरा मन.. ' हे गुणगुणावेसे वाटते..... दोन्ही पहाडीत आहेत. *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

मिसळभोक्ता 04/11/2009 - 09:03
माझ्या मते, अशी सांधे बदलण्या ची दोन कारणे आहेतः १. संगीताची थोडी फार आवड. (संगीता नाही, संगीत). दोन - तीन सुरांचा सीक्वेन्स ओळखण्याची बुद्धिमत्ता. २. अनेक गीतांचा डोक्यात संग्रह. आपले डोके, नैसर्गिकरीत्या "पॅटर्न मॅचिंग" करते. हा पॅटर्न २ सेकंदांच्यावर गेला, की डोक्याला तो पर्सिव्हेबल पॅटर्न वाटतो, आणि मॅचिंगला सुरुवात होते. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

प्रदीप 06/11/2009 - 11:05
१. मधील 'दोन - तीन सुरांचा सीक्वेन्स ओळखण्याची बुद्धिमत्ता' हे महत्वाचे, कारण संगीतातील जाणकार सुरावटी तपासूनच साम्य आहे की नाही, गीत कुठल्या रागावर आधारीत आहे इ. सांगतात. तेव्हढी रागदारीची जाण नसलेल्या माझ्यासारख्या अनेकांना ह्या वरवरच्या सीक्वेन्सवरून एखादा पॅटर्न जाणवतो आणि तितकाच पुरतो! पटकन आठवतात ते एक दोन पॅटर्न्सः (१) - मैने देखा था सपनों मे एक चंद्रहार (गबन- शंकर जयकिशन) - मिल गये, मिल गये आज मेरे सनम (कन्यादान- शंकर जयकिशन) - सलाम-ए-इश्क़ मेरी जां जरा क़बूल कर लो (मु. का. सि. -कल्याणजी आनंदजी) (२) - मुझे तुम मिल गये हमदम, सहारा हो तो ऐस हो (लव्ह इन टोकियो- शंकर जयकिशन) - तुम दिल की धडकन मे(धडकन- नदीम-श्रावण) सहसा मी तरी कुणी कुणाचे 'चोरले/ढापले' आहे, असली वक्तव्ये करणे टाळतो. कारण हा आरोप गंभीर आहे असे मला वाटते. आता एक गाणे दुसर्‍याचे 'इंस्पिरेशन' असू शकते. हा शब्दछल नाही. कारण बरेचदा एका गाण्यावरून/ धुनीवरून बेतलेले दुसरे गाणे पुढे जाऊन बरेच वेगळे, स्वतंत्र असू शकते. एका संकेतस्थळावर असली उदाहरणे खूप आहेत. त्यातील बरीच उदाहरणे (विषेशतः शंकर जयकिशन, आर. डी. इत्यादी मान्यवरांची) ह्या प्रकारची आहेत. मूळ फ्रेम भले असेल अरेबिक किंवा पाश्चात्य सुरावटीची. त्याचे पुढे जाऊन त्यांनी आपल्या परिने सोने केले आहे. (कालच एका फोरमवर 'बोल री कठपुतली' चे 'मूळ' काय आहे, ह्याविषयी सप्रमाणा चर्चा वाचली. त्यात त्या अरेबिक गाण्याचा दुवा ऐकला. मुळात कुणी कुणावरून घेतले हे अजून नक्की नाही. पण ते अरेबिक गाणे म्हणजे एकच पहिली ओळ पुन्हा पुन्हा म्हणणे होते, त्यात इतर काहीही वैषिष्ट्य नव्हते. आता 'बोल री कठपुतली' --दोन्ही आणि विषेशतः दु:खी-- किती विवीध अंगांनी सजवलेय!) मदन मोहनने 'तुझे क्या सुनावू' हे 'ये हवा, ये रात..' वरून बेतल्याचे कबूल केले असे म्हटले जाते. ह्यावरून (म्हणे) सज्जादने खास त्याच्या शैलीत मदन मोहनला टोकले होते, तेव्हा त्याने ही कबुली दिली असे म्हणतात. विजुभाऊंच्या आर. डी. ने कुठल्यातरी ऑब्स्क्युर मराठी गाण्यावरून चाल 'ढापली' ह्या विधानाने मात्र करमणूक झाली. किती हा मराठी प्रगल्भतेवर गाढ विश्वास!!

In reply to by प्रदीप

विजुभाऊ 06/11/2009 - 11:42
तुमच्या शी १२३४५६७८९% सहमत १)तु चीज बडी है मस्त मस्त. हे गाणे नुसरत फते अली खान च्या दम मस्त मस्त दम मस्त कलंदर वरून ढापलेले नसून इन्स्पायर झालेले आहे. २) मेरा पिया घर आया हे गाणे नुसरत फते अली खान च्या मेरा पिया घर आया या गाण्यावरून ढापलेले नसून ते इन्स्पायर झालेले आहे. ३) तम्मा तम्मा लोगे / जुम्मा चुम्मा दे दो.. या दोन्ही गाण्यांच्या चाली योगायोगाने एकाच गाण्यावरून इन्स्पायर झालेल्या आहेत. ४) तेरे लिये जमाना तरे लिये और तू मेरे लिये . चित्रपट हम किसिसे कम नही हे गाणे आबा च्या मामा मिया या गाण्यावरून इन्स्पायर झालेले आहे. ५) बाजे पायल छम छम होके इन्तजार हे गाणे अरेबीयन नाईट्स या अल्बम मध्ये कितीतरी वर्षे अगोदर आलेले होते ते त्या गाण्याचे इन्स्पिरेशन आहे. ६) मेरे सवालों का जबाब दो : चित्रपट मैने प्यार किया हे गाणे फायनल काऊंट डाऊन या सारखेच आहे. ७) आते जाते. हसते गाते....मैने प्यार किया हे गाणे आय जस्ट कॉल टू से आय लव्ह यू या गान्यावरून ढापलेले नाही तर इन्स्पयर झालेले आहे. ८) मनपसंद चित्रपटातील रहने को इक घर होगा हे गाणे माय फेअर लेडी चित्रपटातील अर्थासहीत एका गाण्यावरखेच आहे. योगायोगाने चित्रपटाची कथा आणि माय फेअर लेडी या चित्रपटाची कथाही एकच आहे. याला म्हणायचे योग्य इन्स्पिरेशन. आर. डी. ने कुठल्यातरी ऑब्स्क्युर मराठी गाण्यावरून चाल 'ढापली' ह्या विधानाने मात्र करमणूक झाली. किती हा मराठी प्रगल्भतेवर गाढ विश्वास!! मराठी प्रगल्भ नाही असा अर्थ तुमच्या विधानातून दिसतो. तुम्ही दोन्ही गाणी ऐकली नाहीत. पुण्यवंत दाता हे गाणे हीच खरी दौलत या चित्रपटात होते. मराठी चित्रपट हा सागर चित्रपटाच्या किमान सात वर्षे अगोदर आला होता. सागर चित्रपटातली तीच चाल नरमगरम या चित्रपटात "हमे रासतो की जरुरत नाही " या गाण्यासाठी वापरली गेली होती. नरगरम हा चित्रपट मात्र सागर चित्रपटाच्या दोनच वर्षे अगोदर आलेला होता. असो...... माझा मराठी प्रगल्भतेवर विष्वास आहे. लता मंगेशकर / आशा भोसले / सी रामचंद्र / व्ही शांताराम / शंकर जयकिशन /लक्ष्मीकांत कुडाळकर ( लक्षीकांत प्यारेलाल) सुधीर फडके हे सगळे मराठीच आहेत. आणि तेवढे प्रगल्भ ही आहेत. मस्त गुलाबी थंडीत आठवणींची दुलई पांघरून घ्या .

In reply to by विजुभाऊ

प्रदीप 06/11/2009 - 16:44
अनवधानाने माझ्या लिखाणात दोन त्रूटि राहून गेल्या आहेत त्या सुधारतो: १. चोरणे/ढापणे आणि इन्स्पिरेशन ह्यातील मला अभिप्रेत असलेला फरक, मला वाटते, मी माझ्या तर्‍हेने समजवावयाचा प्रयत्न केला होता. हे कबूल आहे की काही गाणी अगदी अथपासून इतिपर्यंत जशीच्या तशी दुसर्‍या कुठल्यातरी पूर्वी आलेल्या गाण्याशी अथवा सुरावटीशी संपूर्ण साधर्म्य ठेऊन असतात. आणि अलिकडच्या काही संगीतकारांविषयी हा आरोप केला जातो. ते तसे असेलही, पण माझा रोख एकादी दुसर्‍याची अथवा स्वत:चीच जुनी रचना घेऊन त्यावर बरेच काही अन्य संस्कार केले जातात, त्या गाण्यांविषयी होता. शंकर जयकिशन ह्यांनी असे बरेच काही अरेबियन अथवा पाश्चिमात्य संगीतातून घेतलेले आहे, एस. डी. बर्मनलाही असे (किमान एकदा तरी) करावे लागले आहे, सलील चौधरींच्या काही रचना पाश्चिमात्य शास्त्रोक्त संगीतावर आधारित आहेत असे वाटते. ह्या सगळ्यांची कॅटेगरी 'इन्स्पिरेशन' पुरती मर्यादित असावी असे मी म्हटले. कारण त्या मूळ रचना घेऊन त्यावर त्यांनी कितीतरी स्वतःचे संस्कार केले आहेत. तुम्ही दर्शवलेल्या 'बाजे पायल छम छम' मधेच र्हिदम पहा, अंतरा पहा, मूळ गाण्यात ते तसे नाही. 'दिल देके देखो' ची मूळ धून मी आमच्या येथील कॉफी शॉपमधे अलिकडे दररोज ऐकतो. ही पहिली ओळ सोडली तर पुढचे सगळे अगदी भिन्न आहे, आणी ते त्या संगीतकारांचे 'स्वतःचे' आहे. बरेचदा स्वतःच्याच पाश्चसंगीतातील तुकडे घेऊन त्यांच्या चाली करण्याचे कामही ह्या काही संगीतकारांनी केलेले आहे, ती चोरी (स्वतःचीच!) म्हणणे मला तरी रास्त वाटत नाही. २. 'मराठी प्रगल्भते' ह्याऐवजी मला 'मराठी चित्रपट संगीताची प्रगल्भता' असे म्हणायचे होते. हिंदीत पूर्वी (आणि मी १९४५ ते १९९० ह्या कालखंडाविषयी बोलत आहे) जे वैविध्य, आणि ज्या सजावटी आहेत, त्याच्या तुलनेने मराठी चित्रपट संगीतात काय आहे? तुम्ही नावे दिलेल्या सर्व मराठी व्यक्तिंचे मुख्य कार्यक्षेत्र हिंदी चित्रपट सॄष्टि होते. (आणि जाता जाता, शंकर हा 'शंकर रामसिंग'-- मूळचा राजस्तानचा, हैद्राबादेत वाढला; 'जयकिशन पांचाल' तर सुरतेहून आलेला. ते दोघेही मराठी नव्हते).

In reply to by प्रदीप

विजुभाऊ 06/11/2009 - 17:17
सलील चौधरींचे १)अंदाज मेरा मस्ताना......दिल और प्रीत परायी २)कैसे किसीसे प्यार करू के मै इक बादल आवारा...चित्रपट आठवत नाही हे दोन्ही मोझ्झार्ट च्या पाचव्या सिंफनी वर आधारीत आहेत. शंकर जयकिशन च्या चल अकेला चल अकेला तेरा मेला राही छुटेना या गाण्यात वापरलेले मास व्हॉयलीन चा पीस सही सही चल संन्यासी मंदीर में ...... या गाण्याच्या मुखड्या च्या चाली प्रमाणे प्रमाणे आहे. चल संन्यासी हे गाणे बरेच नंतर आलेले आहे. अजुन एक :वाल्ट्झ च्या तालावर असणारी बरीच गाणी सारखीच वाटतात. उदा: दिलकी नजर से नजरोंको देखो...

In reply to by विजुभाऊ

प्रदीप 06/11/2009 - 18:08
सलील चौधरींचे .............. वर आधारीत आहेत.
हे जे 'आधारित आहे' ना, तेच म्हणतो आहे मी. 'इतना ना मुझ से तू प्यार बढा' के कुठच्यातरी सिंफनीवर आधारित आहे, ती मूळ रचना मीही ऐकली आहे. पण पुढे गाणे बघा कसे गेले आहे ते? 'अंदाज मेरा मस्ताना' हे शंकर जयकिशनचे (दि. अ. प्री. प.) गाणे तर मी एक बहारदार रचना समजतो, त्यातील प्रील्यूडचे संगीत ऐका, काय भव्यदिव्य आहे, त्यातील र्हिदमची अ‍ॅरेंजमेंट मी एक त्यातील अभ्यासक म्हणून नेहमीच सर्वात उत्तम दर्जाची समजतो. वेस्टर्न व भारतीय र्हिदमचा सुंदर संगम, आणि अब्दुल करीमने धमकून वाजवलेला ढोलक-- हे सगळे त्या गाण्यातील मूळच आहे!! थोडक्यात-- हे असे 'आधारित असणे' आक्षेपार्ह असू नये, जोंवर संगीत दिग्दर्शकाने त्यात स्वत:ची भर टाकली आहे, त्या मूळ रचनेस आपल्या स्टाईलने 'अ‍ॅडॉप्ट' केले आहे.

JAGOMOHANPYARE 04/11/2009 - 10:26
थंडी हवाये' वर सागर किनारे आधारीत आहे... याच सुरावटीत आणखी एक रोमॅन्टिक गाणे आले......... घर से निकलतेही कुछ दूर चलतेही......... सगळे यमन मध्येच आहेत.. *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

विसुनाना 04/11/2009 - 12:54
राधा ही बावरी हरीची ... आणि राधाधर मधुमिलिंद जयजय रमारमण हरीगोविंद... ही गाणी मला खूपच जवळची वाटतात.

दिलीप वसंत सामंत 04/11/2009 - 14:37
ह्यावरून आठवलं - काही वर्षापूर्वी पु. ल. नी घेतलेल्या एका मुलाखतीत किंवा चर्चेत (मला वाटते माणिक वर्मा यांचे बरोबर) गाण्यांतील सारखे पणा दाखवण्यासाठी एकाच चालीतील गाण्यांची खालील उदाहरणे दिली होती. यदुमनी सदना / ननदिया काहेको. नाही मी बोलत आता नाथा / हमसे ना बोलो राजा. बाई मी विकत घेतला शाम / माई मैने गोविंद लीनो मोल. लोकगीतातून अगर लोकसंगीतातून आलेली असतील तर निरनिराळ्या भाषांतून शब्द अगर चाल सारखीच असलेली अनेक गाणी आढळतील. जाणकार यावर अधिक सांगू शकतील.

ललिता 05/11/2009 - 13:44
या तीन गाण्यांच्या सुरावटीत कमालीचं साधर्म्य आहे... पहिली दोन गाणी गुणगुणताना कडव्यांची देखिल सरमिसळ होते. बदले बदले मेरे सरकार नज़र आते है - संगीत: रवी, चौदहवीं का चाँद (१९६०) वो जो मिलते थे कभी हम से दीवानों की तरह - संगीत: मदन मोहन, अकेली मत जईयो (१९६३) प्यार पर बस तो नहीं है मेरा लेकिन फिर भी... - संगीत: ओ. पी. नय्यर, सोने की चिडिया (१९५८)

अविनाशकुलकर्णी 05/11/2009 - 14:47
अल्ला मेघ दे पानी दे मेघ दे रे...गाईड..स.द.बर्म्न दे दे प्यार दे प्यार दे प्यार दे रे..बप्पी लहरी

मॅन्ड्रेक 05/11/2009 - 15:59
केस चिंब ओले होते , थेंब तुझ्या गाली - ओठावर माझ्या त्यांचि किती फुले झाली. हाय वो रेशमी झुल्फों से बरसता पानी फुल से गालों पे रुकनेको तरसता पानी दोन्ही तितकीच सुंदर - मला आवड्लेली गाणी. at and post : Xanadu.

विजुभाऊ 05/11/2009 - 16:45
हुबेहूब चाली मूळ चालः चलो सजना जहां तक घटा साथ दे... ढापीव चाल : जमाने के देखे है रंग हजार्..बस ईक सीवा प्यार के ..चित्रपट : सडक अजून एक गम्मत वाटलेले चाल. पिकल्या पानाला देठ की हो हिरवा..... आणि मागे उभा मंगेश पुढे मंगेश....... एकाच रागात असल्याने दोन्ही पाठोपाठ ऐकताना गंमत येते मस्त गुलाबी थंडीत आठवणींची दुलई पांघरून घ्या .

विजुभाऊ 05/11/2009 - 17:11
हुबेहूब चाली मूळ चालः चलो सजना जहां तक घटा साथ दे... ढापीव चाल : जमाने के देखे है रंग हजार्..बस ईक सीवा प्यार के ..चित्रपट : सडक अजून एक गम्मत वाटलेले चाल. पिकल्या पानाला देठ की हो हिरवा..... आणि मागे उभा मंगेश पुढे मंगेश....... एकाच रागात असल्याने दोन्ही पाठोपाठ ऐकताना गंमत येते मस्त गुलाबी थंडीत आठवणींची दुलई पांघरून घ्या .

JAGOMOHANPYARE 05/11/2009 - 17:28
अगदी हुबेहूब ! :) दोन्ही प्रतिसाद अगदी हुबेहुब आहेत... ! *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

क्रान्ति 05/11/2009 - 21:10
राग जयजयवंतीवर आधारित दोन अभंग, एक चित्रपटगीत आणि एक भजन यांच्यात [विशेषतः आलापात] बरंच साधर्म्य जाणवतं. अवचिता परिमळू झुळकला अळुमाळू - संत ज्ञानेश्वर- गायिका लताबाई अजि मी ब्रम्ह पाहिले - संत अमृतराय - गायिका आशाबाई मनमोहना बडे झूठे - चित्रपट सीमा [नूतनचा] - गायिका लताबाई जय राम रमारमणम् शमनम् - तुलसीदास - गायिका लताबाई क्रान्ति अग्निसखा

भडकमकर मास्तर 06/11/2009 - 01:38
मी नेहमी म्हणताना एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले ( एका तळ्यात होती ) जनशासनातळीचा पायाच सत्य आहे ( हे राष्ट्र देवतांचे) असे गातो.. राग सेम नसेल पण पद्यरचनांचे मीटर सेम आहे... _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

In reply to by भडकमकर मास्तर

भाग्यश्री कुलकर्णी 06/11/2009 - 14:41
माझा नवरा तर दोन -तीन गाणी एकत्र करुन गातो की त्याला सुधारताना मी गुणगुणत असणार्‍या गाण्याच्या ओळीही मला चुकीच्या आहेत की काय असे वाटायला लागते.

आनंद घारे 06/11/2009 - 08:49
एका रागावर आधारलेल्या किंवा एका चालीच्या वाटणार्‍या अनेक गाण्यांच्या उदाहरणाने माहितीत महत्वाची भर पडली आहे, पण रुळावरून जाणार्‍या गाडीचा सांधाबदल हा या धाग्याचा मुख्य मुद्दा आहे. दोन गाण्यांमधला कांही भाग समान असतो, पण पुढचा भाग वेगळा असल्यामुळे हा बदल आपल्याला जाणवतो. मंगलाष्टकांप्रमाणे किंवा आरतीप्रमाणे संपूर्ण गाणे एकाच चालीवर असले तर शीळ घालतांना त्यातील कोणत्याही गाण्यावर घातलेली शीळ तशीच ऐकू येईल. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

विजुभाऊ 06/11/2009 - 11:45
जाने कहां गये वो दिन : परवरीश : मुकेश तेरे मेरे बीच मे कैसा है ये बंधन : एक दुजे के लिये : लता मंगेशकर मेरे मेहेबूब कयामत होगी :मि एक्स इन बॉम्बे : किशोर कुमार ये वक्त न खो जाये बस आज ये हो जाये : एस पी बालसुब्रमण्यम ही चारही गाणी एकाच शिवरंजनी रागात आहेत परंतु ती कुठेच एकमेकंसारखी वाटत नाहीत दे मला दे चंद्रीके आणि सनम तू बेवफा के नामसे मशहूर ना हो जाये. ही कलावती रागातली गाणी मात्र अगदी एकसारखी वाटतात. धुंदीत गंधीत प्रीतीत सजणा हे गाणे आणि सागर चित्रपटातले ओ मारीया ओ मारीया.. या ओळी अगदी सारख्याच आहेत. मस्त गुलाबी थंडीत आठवणींची दुलई पांघरून घ्या .

गणपा 06/11/2009 - 17:01
परिचय मधली बरीच गाणी साउंड ऑफ म्युझीक या चित्रपटातल्या गाण्यांबर बेतलेली (इंस्पायर्ड) होती. तस पाहीलतर परिचयच, साउंड ऑफ म्युझीक वरुन इंस्पायर्ड होता. पण कलाकारांचा अभिनय आणि दिग्दर्शकाच दिग्दर्शन मस्त होत त्यामुळे परिचय आपलाच वाटला..

JAGOMOHANPYARE 06/11/2009 - 18:11
ढापाढापीची वेब साईट.... www.itwofs.com *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

विजुभाऊ 11/11/2009 - 12:59
कहो ना प्यार है या चित्रपटातले चांद और तारे ....फूल और खुशबू ये तो सारे पुराने है....ताजा ताजा फूल खीला है हम उसके दिवाने है या गाण्यात या ओळीनन्तर दादा कोंडकेंच्या चित्रपटातले "आता सांगु कशी बोलु कशी नाव कुणाच घेऊ कशी." या ओळी चपखल बसतात. किंवा काल रातीला सपान पडल सपनात आला तुमी न बाई मी गडबडले . गालावरच्या खुना बगुनी आई म्हनाली काय घडले या ओलॅए नन्तर ताजा ताजा फूल खीला है हम उसके दीवाने है हे असे गाऊन बघा.