कवितेपासून कवितेपर्यंत....प्रवाह कवितेचा.
विशेष
मिपावर मराठी दिनानिमित्त विविध उत्तम लेखन वाचायला मिळत आहेत तेव्हा आमचेही दोन शब्द.
मराठी कविता म्हटले की आपल्या डोळ्यासमोर आपल्याला आवडणा-या कवितांची आठवण होते. आपापल्या आवडत्या कवींच्या कविता डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागतात. काही कवितेच्या ओळी आठवतात. काही कवितेच्या शब्द, प्रतिमा आठवतात. काही कवितेचे आशय आठवतात तर कधी नुसतीच कवींची आठवण होते. कवितेचा प्रवास सुरु झाला तो ''माझा म-हाटिची बोल कौतुके । परि अमृतातेंही पैजा जिंके ॥”म्हणणा-या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरापासून. संत ज्ञानेश्वरापासून सुरु झालेला हा कवितेचा प्रवास आजही अखंडपणे सुरू आहे. कवितेचा विषय निघाला की अनेक कवींची आठवण होते.
मराठी कवितेचा विचार करायचा म्हटला की प्राचीन कवितेकडे वळावे लागते. प्राचीन कवितेचे साधारणत: तीन प्रवाह मानले जातात. संत काव्य, पंत काव्य आणि (तंत काव्य) शाहिरी काव्य. असे ढोबळमानाने त्याचे वर्गीकरण केले जाते. मराठी काव्याची परंपरा ही संत काव्यापासून सुरु झालेली आहे. बाराव्या शतकापासून सुरु झालेली ही काव्यपरंपरंपरा अठराव्या शतकापर्यंतही दिसून येते. आजही काही काव्यरचना या प्राचीन काव्याशी नातं सांगतांना दिसतात. मात्र ही संख्या अगदी बोटावर मोजता येईल इतकेच भरेल असे वाटते. संतांच्या काव्यात ईश्वर भक्ती, धार्मिक विचार आणि त्याचबरोबर लोककल्याणाची तळमळही काव्यररचनेत दिसून येते. लोककल्याण आणि शिक्षण हा उद्देश दिसत असला तरी 'ईश्वरभक्ती' ची ओढ काव्यातून दिसते. संत कविता म्हटले की, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम संत रामदास यांच्याबरोबर संत मांदियाळातील थोरा मोठांची आठवण झाली नाही तर नवल वाटावे.
काव्यपरंपरेत पुढे परंपरा येते ती पंत काव्याची. याला पंडिती काव्याची परंपरा असेही म्हटले जाते. संत काव्याहून वेगळी अशी रचना पंडिती काव्याची दिसते. पंडिती काव्याचे स्वरूप आख्यानप्रधान असे होते. जसे, रुक्मिणी स्वयंवर,नलदमयंती स्वयंवर, संक्षेप रामायण, वेणूसूधा, वगैरे प्रकारच्या रचनेतून लोकांचे मनोरंजन करावे लोकप्रिय व्हावे असा सरळ उद्देश दिसतो. लोकांच्या मनोरंजनासाठी रामायण, महाभारत, भागवत या ग्रंथातला काही भाग निवडून त्यावर अलंकार,शृंगाराचा मारा करुन विविध रसांच्या माध्यमातून पांडित्याचे उत्तम प्रदर्शन पंडिती कवींनी केले. पंडितांसमोर विशिष्ट असा श्रोतुवर्ग होता. पंडित जरासे पुराणिक पद्धतीचे होते आणि त्यांना धनिकांचा आश्रय होता. राजे रजवाड्यांच्या आश्रय असल्यामुळे पुराणे सांगणे हा त्यांचा व्यवसाय होता जरासा फावला वेळ मिळाला की काव्यरचना करायची. पंडित कवींनी समाजमनाचे रंजन करायचा विडाही जरासा उचलला होता. असे असले तरी पंडितांचे लेखन मात्र संस्कृत महाकाव्यांवर पोसलेले असायचे. संस्कृत साहित्यातील रस,अलंकार,वृत्त यांचा या पंडितांना भारी नाद. उच्चभ्रू समाजातील संस्कृततज्ञ, पंडितवर्ग आणि उच्च अभिरुची असलेल्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे काव्य सादर केले. 'प्रगल्भ' लोकांसाठी केलेले साधारणतः त्यांचे लेखन होते. असे म्हटले तर वावगे ठरू नये. पंडित कवी म्हटले की, मुक्तेश्वर, वामनपंडित, मोरोपंत, यांची आठवण होते.
काव्य परंपरेचा प्रवास आपल्याला पुढे शाहिरी काव्याकडे घेऊन जातो. शाहिरांनी मात्र काव्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलून टाकली. पोवाडा आणि लावणीने नुसती बहार उडवून दिली. पोवाड्यात पराक्रमी व्यक्तीच्या प्रशंसनीय घटनांचे रसपूर्ण वर्णन शाहिरांनी केले. आपल्या धन्याचे गुण गौरव शाहिरांनी केले. शिवछत्रपती, सवाई माधवराव, भाऊसाहेब पेशवे, हे शाहिरांच्या लेखणीचे विषय झाले. श्राव्यकाव्य म्हणनन्यापेक्शा त्याला नाटकच म्हणावे इतके शाहीर आपल्या काव्याशी एकरूप झाले. पोवाडा वीररसाने ओतपोत भरलेला तर लावणी शृंगाराने सजवली गेली. लावणी जशी शृंगाराची होती तशी लावणी धार्मिकही होती. लावणीच्या रचनेत जसा ताल मोहवून टाकणारा होता तसा त्यात खटकेबाजपणाही होता. लावणीची रचना लोकगीतासारखी दिसते. मराठी माणसाच्या सांस्कृतिक परंपरा, संकेत, आदर्श हे लावणी रचनेतून दिसतात. लावणीचे लोकगीताशी जवळचे नाते आहे. गोंधळगीत, जागरण,वासुदेव अशा लोकगीतातून लावणीनृत्य आकाराला येत गेले. रामजोशी, अनंतफंदी, होनाजी बाळा, सगनभाऊ, या लावणीकारांची आपल्याला ओळख आहेच.
पेशवाई गेली इंग्रजी राजवट आली नवविचारांची रेलचेल सुरु झाली आणि दोस्त हो येथून मात्र कविता बदलत गेली. प्राचीन परंपरेशी आशयाच्या बाबतीत तिने फारकत घेतली. प्राचीन कविता वर्णनपर, कथनपर,अशी होती. नव कविता मात्र स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा विचार सांगता सांगता समाजनिष्ठ होत गेली. केशवसुतांना आधुनिक कवितेचे जनक म्हणतात कारण त्यांनी काव्याची जुनी वाट सोडून नवी वाट चोखाळली. नवे मूल्य, नवे विचार कवितेतून मांडायला सुरुवात केली. कवितेला आत्मनिष्ठ आणि काही बाबतीत जीवननिष्ठ बनविले. जुन्या रुढी प्रथा परंपरेवर जोरदार हल्ला चढविला. समता,स्वातंत्र्य व बंधुत्वाची एक नवी 'तुतारी' फुंकली. नव्या दमाचा ’नवशिपाई’’ त्यांच्या कवितेतून दिसू लागला. सारांश सांगायचा असा की नवकविता पूर्णपणे बदलून गेली. लौकिक विषय काव्याच्या कक्षेत आले. काव्याचे प्रयोजन असे मानले गेले की समाजाला स्फूर्ती देते ते काव्य. नव्या मूल्यांचे दर्शन घडविते, आनंद देते ते काव्य मानल्या गेले. इंग्रजी काव्य अनुकरणानेच मराठी कवीतेला एक नवे वळण मिळाले.
सामाजिक सुधारणांचा विचार, जातिभेद, आर्थिक विषमता आणि निसर्ग असे विषय काव्यातून डोकावू लागले. निसर्गातील वस्तूंवर मानवी भावभावनांचा आरोप करुन काव्यमय वर्णने असलेल्या कविता याच काळातल्या. प्रेमविषयक दृष्टीकोन पवित्र आणि उदात्तही याच काळात होत गेला. केवळ कविताच नव्हे तर कवितेचा आकृतिबंधही बदलून गेला. आर्या,फटका,दोहा,अभंग काही जुनी वृत्ते, केशवसुताच्या समकालीन कवितेत दिसत असली तरी नवकवींनी आकृतीबंधाच्या बाबतीत बराच बदल केला. इंग्रजी सॉनेटची सुनीते झाली. अर्थात हा सर्व बदल इंग्रजी राजवटींमुळेच झाला असे म्हणण्यास वाव आहे.
केशवसुतपूर्व कविता, आधुनिक कवीपंचक, रविकिरण मंडळ आणि पुढे मर्ढेकर संप्रदाय पासून ते आजची जालीय कवी कवयत्रीपर्यंत कविता इतकी बदलली की विचारु नका. नैतिक मूल्यावरील कविता, यंत्राच्या संचारामुळे भावशुन्य झालेली माणसे, शेती,शेतकरी,दलित दुबळ्यांचे शोषण,ढोंगीपणा, दांभिकपणा, नैराश्य दु:ख, मानवता,स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि राजकीय उदासिनता या आणि अशा आशयांनी मराठी कविता बदलून गेली आहे. रे.ना.वा.टिळक, कवी विनायक, बालकवी, गोविंदाग्रज, बी, ते आजच्या नवकवीपर्यंत अनेक कवींची नावे आता टंकावे लागतील.
कवितेच्या बाबतीत कवितेला अनेकदा विविध आरोपांना सामोरे जावे लागले आहे. कवितेतील स्वैरपणाचा अतिरेक, वास्तवाशी संबंध नसणा-या कविता. यमक जुळवून ओढून ताणून आलेल्या कविता. वास्तविक जीवनापासून फारकत घेतलेल्या कविता. अलंकारात मढवून घेतलेल्या कविता. प्रणय कवितांचा सुळसुळाट असलेल्या कविता . चंद्र,सूर्य,पाने फुले यात रमणारी निसर्ग कविता,स्वप्नांची नुसतेच मनोरे रचणारी कविता, चित्रविचित्र शीर्षकाच्या कविता, प्रचारकी कविता, राजकीय कविता, संगणकीय काळातील शब्दांचा भडीमार असलेल्या कविता, इंग्रजी शब्दांच्या अतिरेक असलेल्या कविता, पाश्चात्य कल्पना, तेच ते दु:खानुभव सांगणारी कविता, कविता प्रकारातील ग्रामीण कविता, लोकगीत वळणाची कविता, गझल,चारोळ्या,विडंबने,भावकविता,राष्ट्रीय कविता, अनुवादित कविता अशा काय नी कितीतरी प्रकारांच्या कवितांवर विविध आरोप बिचा-या कवितेवर झाले, होत असतात. कवी आणि कविता विनोदाचे विषय होतात. अशा सर्व गोष्टी सहन करत कवितेचा प्रवास आजही दमदारपणे सुरु आहे. ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं।।’ असे म्हणना-या तुकोबापासून ते आत्ताची कविता लिहिणा-यापर्यंत प्रत्येक काळातल्या कवींनी शब्दांवर प्रभुत्व राखत मराठी भाषा समृद्ध केली आहे. अशा सर्व कवींना जागतिक भाषा दिनाच्या निमित्ताने मी वंदन करतो.
वाचन
19025
प्रतिक्रिया
34
सुरेख आढावा !! लेखन आवडले.
कवितेचा शतकांतून प्रवास
अगदी बरोबर.
मस्त आढावा
कविता....!!
कवितेच्या प्रवाहाला केवळ
नामदेव ढसाळ
लेख आवडला
श्रोतुवर्गाच्या मुद्याबद्दल
बिरुटे सर
योग्य अपेक्षा....!
सहमत
+
एका वेलांटीने
धन्यु...!
दिलीप शेटशी सहमत आहे.
खूप सुंदर आढावा घेतला आहे
जबरा.
सुंदर लेख.
आरोप.....!!
कवितेतील एकसुरीपणाचे एक उदाहरण
सुंदर आढावा!
'थोरले' असावेत....!
पोवाडे आहेत
अवांतरः डकवणे
लेख आवडला
सुंदर
लेख आवडला
सुरेख लेख. आढावा आवडला.
लेख अतिशय आवडला ... मनापासुन
नानबाशी सहमत प्रा.डॉ. सुरेखच
चांगला लेख
असेच म्हणतो
धावता आढावा