मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एकमेकांसाठी (दुसरी आवृत्ती)

धनंजय · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
(दुसरे संस्करण ) आज माझ्या कडेवर तुला सांभाळतो, बाळ राजा... उद्या तुझ्या कडेशी तुला साथ देतो, बाळा माझ्या... कधी येईन कडेला, मला टेकू देतोस? माझ्या राजा... ****************** (पहिले संस्करण मुद्दामून इथेच ठेवतो आहे. पुढे पुन्हा संपादन करून काढून टाकीन.) धरितो तुज माझ्या बाहूंत बाळ राजा रक्षितो, जगी पीडा बहूत बाळ राजा झुंजतोस तू भवजलौघे बाळा माझ्या कडेला ये तू विसावा घे बाळा माझ्या क्लांत जधी मी शांत तू करी माझ्या राजा शक्ती दे तू, धीर मी धरी माझ्या राजा *******************

वाचने 20229 वाचनखूण प्रतिक्रिया 17

धनंजय Sun, 09/23/2007 - 00:20
[निकृष्ट असल्यास समीक्षणाने लेखन अधिक रटाळ होऊ शकते.] कुठल्याही स्नेहसंबंधात, अगदी बाप-लेकांच्यातही, दोघांचे स्थान आणि मान, मनुष्य म्हणून समसमान हवेत. भावनेच्या बाबतीत कोण ज्येष्ठ, कोण कनिष्ठ याची परिस्थितीनुसार अदलाबदल केली तर ते समानत्वच. कोणी एक सदासर्वकाळ शासक नको हे खरे, पण बळेच अष्टौप्रहर समानत्वाचा एकसुरीपणा नको.

विसोबा खेचर Sun, 09/23/2007 - 00:25
अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर तुझी कविता आपल्याला काय समजली नाय बा! साला, उगाच खोटं कशाला बोला? :) मात्र तुझी ही कविता तू आपलेपणाने मिसळपाववर प्रथम प्रकाशित केलीस याचा मात्र मनापासून आनंद वाटला! तात्या.

सहज Sun, 09/23/2007 - 07:21
आजकाल धनंजयांनी काही लिहिलेले वाचले की सर्व प्रथम, काय धागा आहे, काय विचारसरणी आहे (स्वसमीक्षण) ओळखूया असे होते मग त्यांच्या साहीत्याचा आस्वाद घ्यायचा. कवी कवीतेच्या वरचढ, होतोय का? :-) वाचले की लेखाचा / काव्याचा आनंद मिळाला पाहीजे म्हणजे डो़क्याला खूराक नको, गरजेपेक्षा जास्त वेळ चावून दात दुखतात. तुम्ही राव डायरेक्ट पी एच डी वाल्यांसाठी कवीता नका लिहू :-) मासेस साठी लिहा तुमचा क्लासच ए-वन आहे की ते काव्य देखील भारीच असेल. असो वर जो विचार व्यक्त केला हाच तुमच्या खर्‍या स्व-समीक्षण भाग तर नव्हे? कारण अजूनही एक मन सांगत आहे धनंजय कॅनॉट डू एनीथीन्ग राँग. :-) भवजलौघे म्हणजे?

धनंजय सेठ, कविता आवडली असा शेरा द्यायला आलो होतो,पण आज जरा शब्द खेचून आणल्यासारखे वाटले. ''झुंजतोस तू भवजलौघे, क्लांत जधी मी शांत तू करी, या शब्दांमुळे कवितेचा आस्वाद घेता येत नाही असे वाटते, पण टेन्शन घ्यायचे नाही,आम्हाला धनंजयच्या कविता आवडतात ! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राजे Sun, 09/23/2007 - 18:45
अहो कोणी तरी कवितेचा अर्थ तरी लिहा हो... मला तर काहीच कळाले नाही. पहलीच अल्प बुध्दी त्यात कवितेशी जन्मजात वावडे .....त्यात भरीस भर हे अवघड मराठी शब्द.. क्षमा असावी हा काही रोक वयक्तीक नाही आहे पण एक सुचना जसे काही जागी कविता लिहल्यानंतर भावार्थ दिला जातो त्या प्रमाणे येथे देखील भावार्थ लिहावा ही विनंती. जेणे करुन माझ्या सारख्या लोकांना त्याची मदत होईल व कवितेचा पुर्णपणे आनंद घेता येईल. [काही मंडळीच्या लक्षात आलेच असेल की मी कवितेला कधी प्रतिसाद का देत नाही ते :D] राजे (*हेच राज जैन आहेत)

प्राजु Sun, 09/23/2007 - 19:16
मला नाही झेपली ही कविता.... प्लिज याचा अर्थ सांगा कोणीतरी.. - प्राजु.

प्रमोद देव Sun, 09/23/2007 - 19:53
लहानपणी 'कडेवर' घेऊन वाढवले.....बाळाला त्याच्या (बाळाच्या)मोठेपणी वेळप्रसंगी त्याची 'कड' घेतली (बाजू घेतली) आणि स्वतःच्या(बाबा,आई जे कुणी असेल) म्हातारपणी तू(बाळा) 'आधार'(कड घेशील/खांदा देशील) देशील ना?

विसोबा खेचर Sun, 09/23/2007 - 20:28
धन्याशेठ, पहिले, दुसरे, तिसरे संस्करण या स्वरुपात एखाद्या कवितेची वाटचाल दाखवण्याचा तुझा प्रयत्न स्तुत्यच आहे हे आधी कबूल करतो आणि त्याबद्दल तुझ्या कल्पकतेला आणि प्रतिभेला सलामही करतो! अरे पण मी काय म्हणतो, की काव्याची कसली संस्करणं करता रे? :) अरे कविता कशी पाहिजे? सहज,सोपी, ओघवत्या शैलीतली. ती वाचताना जणू आपल्याला ती कुणी गाऊनच दाखवत आहे इतकी ती रसाळ आणि गेय हवी! आणि हो, ती संस्कारित स्वरुपातच जन्माला यायला हवी, किंबहुना कुठलिही उत्तम व गेय कविता ही संस्कारितच असते. काय म्हणतोस? आता उदाहरणार्थ, 'हिरवे हिरवे गार गालिचे हरिततृणांच्या मखमालीचे' बघ किती सुरेख आणि मुख्य म्हणजे समजायला किती सोप्या आहेत वरील ओळी! बरं आता तुला जरा अजून पिडतो. वरील ओळी हे आपण फायनल संस्करण समजू, तू या ओळींची आधीची दोन संस्करणे लिहून दाखव पाहू! :)) किंवा, रसाल मुले फले सेवुनी, रसाळता घ्या स्वरात भरुनी, अचुक घेत जा स्वरा मिळवुनी, लयतालाचे पाळा बंधन, गा बाळांनो श्रीरामायण या कडव्याची आधीची दोन संस्करणे लिहून दाखव पाहू! :) काय? कसा काय दिलाय तुला "घरचा अभ्यास?" :)) आपला, (साध्यासोप्या कवितांचा भुकेला!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विसोबा खेचर Sun, 09/23/2007 - 20:37
बरं आता तुला जरा अजून पिडतो. वरील ओळी हे आपण फायनल संस्करण समजू, तू या ओळींची आधीची दोन संस्करणे लिहून दाखव पाहू! :)) किंवा अद्याप संस्करण सुरूच आहे असे समजून पुढचे संस्करण तरी लिहून दाखव पाहू! :) मी बालकवींच्या किंवा माडगुळकरांच्या ओळी एवढ्याच साठी घेतल्या की या ओळी लोकांच्या तोंडावर आहेत इतकंच. यात तुलना करण्याचा हेतू नक्कीच नाही. वाटल्यास 'गंगा जमुना डोळ्यात उभ्या का?' ही ओळ घेतलीस तरी चालेल. पण तू जे काही बापलेकाचं काव्य काढलं आहेस ना, ते इथे माझ्यासकट बर्‍याच जणांच्या डोक्यावरून जातंय रे! :) आपला, (कठीण कठीण काव्य प्रकारांना भुतापेक्षाही जास्त घाबरणारा! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धनंजय Sun, 09/23/2007 - 21:51
बालकवींची सोयीची नव्हती, गोविंदाग्रजांची ही कविता घ्या (एक कडवे) : थांब जरासा बाळ ! सुंदर खाशा प्रभातकाळीं, चहूंकडे ही फुले उमललीं, बाग हांसते वाटे सगळी! शीतल वारा, या जलधारा कारंजाच्या छान ! थांब जरासा बाळ ! आता माझी (हे तिसरे संस्करण नव्हे, कारण ही गोविंदाग्रजांची, आणि केशवसुमारांची दुहेरी चोरी!) ********************** नीज जरा तू बाळ... निर्दय काळ्या संध्याकाळी कीट जिवाणू डसण्या टपली पांघरून तुज मी कवटाळी रक्षण करितो, तुज मी धरितो, भिस्त मजवरी टाक ! नीज जरा तू बाळ... भल्या थोरल्या वादळवेळी शक्ती जर ही कमती पडली सहानुभूती बहाल केली ! घेइ विसावा, जसा असावा, आधार मज तू मान... नीज जरा तू बाळ... कधि ही काया जर्जर झाली क्षीण मनाची रयाच गेली शोधिन तेव्हा तुझी सावली ! देइ सहारा, उचली भारा, मदतीसाठी धाव ! नीज जरा तू बाळ... ********************** पहिले संस्करण गेय नव्हते ते आधी ठरवून. ते संदिग्ध होते ते मुद्दामून - बापलेकांइतपतच ते प्रियकरांमधील बदलत्या शक्ति-समीकरणाबद्दल (पॉवर-इक्वेशन बद्दल) आहे. ते बरळलेले पिलो टॉक आहे, की अघळपघळ अंगाईगीत हेदेखील संदिग्धच. राग माहीत असून वर्ज्य स्वर आवर्जून घेतले आहेत. ते साहस कधीकधी काय, बहुतेक वेळा फसते, आणि श्रोते आपल्याला लगेच सांगतात. श्रोत्यांचे ऐकून, मनन करून पुन्हा तयारी करायला बसायचे. काय म्हणता? जोपर्यंत मला बेमालूम वर्ज्य वापरता येत नाही तोपर्यंत रागच कळला नाही! - असा तुमच्या विषयातला दाखला देऊन मी मोकळा!

In reply to by धनंजय

सर्किट Mon, 09/24/2007 - 04:50
धनंजयराव, हुकुमी कविता आवडली. आम्ही सध्या गद्याची टोपी घातली आहे. काही दिवसांतच पद्यची टोपी घालून आपल्या कवितेचे परीक्षण करू ! (पळा ! पळा !! कोण पुढे पळे तो !) - सर्किट

वाचक्नवी Sun, 09/23/2007 - 23:17
गेय नव्हते तरी पहिले संस्करण छान होते. समजायला अजिबात कठीण नव्हते. कोडी सोडवायची चतुराई अशी कधीकधी कामी येते! दुसरे आवडले नाही. तिसरे बाळबोध.--वाचक्‍नवी

In reply to by वाचक्नवी

धनंजय Mon, 09/24/2007 - 00:29
> गेय नव्हते तरी पहिले संस्करण छान होते. अंगाई गीताची ही अगदी बाळबोध चाल लावा, पटले तर बघा : (सर्व 'ग' कोमल) धरि तोऽ तुऽजऽ | माझ्या बाऽहूऽतऽ | बाऽळऽ राऽजाऽ रेमऽ नीऽसाऽ | रेमऽ नीऽसाऽ | रेरेऽ नीऽसाऽ अंगाईगीत हे चालीत अक्षरे कोंबताना जरा अघळपघळच असणार हे आलेच!

चित्तरंजन भट Mon, 09/24/2007 - 11:53
पहिले संस्करण बरे आहे पण जुनाट वळणाचे आहे. पहिल्या आवृत्तीतली जुनाट वळणे दूर करून बघावी, असे वाटते.