मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अभिजात मराठी

बाजीगर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
सालंकृत नटली मराठी, झाली अभिजात मराठी ।। कोल्हापूर,जळगाव गोवा कोकण नागपूर सातारा सांगली मराठी, अनेक स्वादांची, सर्वच चांगली मराठी ।। आंग्लमिश्रीत भ्रष्टतोमय मराठी, सावरकरांची शुद्ध तेजोमय मराठी ।। शासकीयपत्रातील दूर्बोध गूढ मराठी, ओव्या अभंगातील गोड मराठी, संगणक प्रोग्रामींग शिकवणारी अर्वाचीन मराठी, शिलालेखांवर सापडणारी प्राचीन मराठी ।। फार्सीमिश्रीत बखरींतील मराठी, दलीत साहीत्य तसेच नारायण सूर्वेंची जळजळीत कष्टकरींतील मराठी ।। खांडेकर, कुसुमाग्रज, ग दि माडगूळकर,रणजित देसाई,अच्यूत गोडबोले यांची मराठी, शिवाजी सावंत, मृत्यूंजय मराठी, विश्वास पाटील, पानीपत मराठी ।। बा भ बोरकर, मंगेश पाडगावकर, इंदिरा संत,गुरु ठाकूर, संदीप खरे ची कविता मराठी ।। जाणता राजा, तो मी नव्हेच,कट्यार काळजात घुसली ,चारचौघी नाटकाची गर्विता मराठी ।। श्यामची आई, श्वास, वाळवी चित्रपटाची मराठी ।। केसरी,पुढारी, मटा, लोकसत्ता,लोकमत,नवाकाळ,सकाळ,सामना वृत्तपत्राची मराठी ।। नामदेव, तुकाराम, एकनाथांची भारुड अभंग मराठी. अमृताशी पैजा जिंकणारी, ज्ञानेश्वरी अक्षय मराठी ।। नवरात्रातील नवदूर्गेच्या नवरुपांपरी, नवसहस्त्र शारदीयरुपे मराठी ।। नवकोटी मराठींची बोलीभाषा मराठी त्रिवार अभिनंदन अमर अभिजात मराठी ।।

वाचने 4021 वाचनखूण प्रतिक्रिया 17

In reply to by Bhakti

बाजीगर Mon, 10/07/2024 - 23:33
आपणच एकटीने दखल घेतली आहे, बाकी मंडळींनी दूर्लक्ष केलं आहे, कारण या राजकीय निर्णयाने आपल्या आयुष्यात काहीच फरक पडला नाही !

प्रचेतस Tue, 10/08/2024 - 08:01
ह्यात कन्नडचाही उल्लेख आवश्यक होता असे वाटते. कारण ह्या दोघी भगिनी आहेत. मऱ्हाटी संस्कृती : काही समस्या ह्या शं. बा. जोशी लिखित पुस्तकात कन्नड मराठीचा अनुबंध उलगडून दाखवला आहे. मराठी कन्नडपासून उत्क्रांत झाली हे त्यांचे मत बहुतांशी वादग्रस्त किंवा न पटण्याजोगे असले तरी दखल घेण्याजोगे आहे हे निश्चित.

In reply to by प्रचेतस

श्वेता२४ Tue, 10/08/2024 - 11:09
प्रचेतस यांच्या मताशी सहमत. माझा जन्म कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागाजवळचा. मराठीतील बरेच शब्द व कानडी शब्द सारखे आहेत. किल्ली,कडबू,अक्का,अण्णा इ. असो. कवितेतून बऱ्याच गोष्टींचा समावेश झाला आहे. काव्य हे उत्स्फुर्त असते. त्यामुळे त्यातल्या तपशीलापेत्क्षा भावनाप्रकटन महत्वाचे. कवीता अतीशय आवडली.

In reply to by प्रचेतस

सागर Wed, 10/09/2024 - 01:59
कन्नड आणि मराठी या भगिनि भौगोलिक कारणांनी आहेतच. पण सातवाहन काळात उत्तर कर्नाटक चा बराच भाग अधिपत्याखाली असल्याने महाराष्ट्राचे पैठण, तेर, नाणेघाट ते उत्तर कर्नाट्क यांच्यात संस्कृती आणि व्यापार यांचे आदान प्रदान झाल्याने एकमेकांवर प्रभाव आणि ठसा उमटणे हे होणारच. जशी कन्नड भाषेची लिपी ही तेलुगू लिहिण्यासाठी देखील वापरली जाते. याचे कारण पुन्हा तेच. आंध्र आणि उत्तर कर्नाटक यांचा एकमेकांवर असलेला सांस्कृतिक आणि व्यापारी आदान प्रदाना मुळे झालेला प्रभाव. त्यामुळे तेलुगू आणि कन्नड एकाच लिपीत लिहिले जात असले तरीही भाषा मात्र भिन्न आहेत. आणि त्यांच्यातही भरपूर साम्यस्थळे आहेतच. एकूणच भाषा प्रवाही असणे हे त्यातून दिसते. आणि अशा प्रवाही भाषाच काळाच्या ओघात टिकून राहतात. जवळपास १५ ते २० कोटी लोक मराठी भाषा बोलतात, वाचतात लिहितात हाही एक आपल्या माय मराठीसाठी एक अभिमानाचीच गोष्ट आहे. अभिजात दर्जाच्या निकषांची पूर्तता करण्यासाठी अनेक लूप होल्स आहेत हे मान्यच आहे. पण रंगनाथ पाठारे समितीने शिफारस केलेल्या अहवालात पुरेसा डाटा आहे ज्यावरून केंद्र सरकारला मराठी भाषा अभिजात आहे या निष्कर्षाला येण्यासाठी वेळ लागला पण अडचण आली नाही. पुढे मागे हा अभ्यास भाषातज्न्य पुढे नेतील आणि अजून वस्तुनिष्ठ पुरावे मांडतील अशी अपेक्षा करूयात :)

In reply to by सागर

सुरिया Wed, 10/09/2024 - 12:08
त्यामुळे तेलुगू आणि कन्नड एकाच लिपीत लिहिले जात असले तरीही भाषा मात्र भिन्न आहेत. आणि त्यांच्यातही भरपूर साम्यस्थळे आहेतच. नाही. बिल्कुल नाही. असे म्हणणे म्हण्जे मराठी (देवनागरी) बंगाली आणि गुजराती एकच लिपि आहे असे म्हणावे लागेल. कन्नडा आणि तेलुगु मध्ये काही अक्षरे जरी सारखी असली तरी स्ट्रोक्स आणि वळणे भिन्न आहेत. काही अक्षरे सुध्दा वेगळी आहेत. जोडाक्षरांची पध्दत वेगळी आहे. केवळ शिरोरेषा नसणे ह्या निकषावर दोन्ही लिपी एकच म्हणणे म्हण्जे हास्यास्पद आहे. तसे सारखी लिपी आपण नेपाळी आणि देवनागरी ला म्हणू शकतो तसे कन्नडा आणि तेलुगुचे नाहिये.

In reply to by सुरिया

अथांग आकाश गुरुवार, 10/10/2024 - 08:52
चांगली माहिती दिलीत! दोन्ही लिपी वेगळ्या आहेत एवढे माहित होते त्यामुळे >>तेलुगू आणि कन्नड एकाच लिपीत लिहिले जात असले तरीही भाषा मात्र भिन्न आहेत >>हे वाचुन चक्रावलो होतो!!

In reply to by सुरिया

सागर गुरुवार, 10/10/2024 - 10:54
मला कन्नड आणि तेलुगु दोन्ही भाषा येत नाहित. लिपि ही केवळ भाषा प्रकट करण्याचे माध्यम असते. त्यात भाषे नुसार बदल होऊ शकतात. जशी संस्क्रुत इसवी सनाच्या ८ व्या शतका पर्यन्त ब्राह्मि लिपित लिहिली जायची. प्राक्रुत देखिल ब्राह्मि लिपित लिहिलि जात होति. पण भाषा वेगळ्या होतात. लिपि भाषे नुसार बदलते एवढाच मुद्दा होता. मी काही दाक्षिणात्य भाषा तज्न्य नाही. पण लिपि पूर्ण वेगळी आहे हे माझ्या वाचनात आले नाही.

सागर Wed, 10/09/2024 - 01:49
२०१२ साली अस्तित्वात आलेल्या रंगनाथ पाठारे अध्यक्ष असलेल्या समितीने महाराष्ट्र राज्य सरकार कडे सुपूर्त केलेला हा अहवाल केंद्र सरकारने एकदाचा मान्य केला आणि अभिजात भाषेचा दर्जा आपल्या माय मराठी ला मिळाला. कित्येक दशकांची भाषा धुरिणांची मेहनत फळाला आली. मागे अनेकदा मिपावर देखील मराठी भाषा अभिजात आहे की नाही यावर अनेकदा चर्चा झाल्या आहेत. संपादकांना शक्य झाले तर अशा चर्चा आणि लेख एका धाग्याखाली / टॅग खाली एकत्र करून मुख्य पानावर "अभिजात मराठी भाषा" किंवा तत्सम योग्य शीर्षकाद्वारे लिंक देऊन एकत्र करता आले तर छान होईन. असो.. तर अभिजात म्हणजे अन्य कोणत्याही भाषेपासून उत्पत्ती न झालेली आणि किमान २,००० वर्षे जुनी असलेली भाषा. त्यामुळे मराठी भाषेला अनेक विद्वान संस्कृतोद्भव किंवा अन्य भाषेपासून उत्पन्न झाली असे मानत होते त्या मिथकाला हा तडा आहे. शिवाय इतर देखील काही निकष आहेतच. त्याचा काथ्याकूट आधी अनेकदा झाला आहे. या सर्वांचा शेवट एकदाचा गोड झाला. आता आपण आपल्या मराठी भाषेच्या पुढील प्रवासासाठी अभिजाततेची ही शिदोरी घेऊन पुढे जाऊयात.

In reply to by सागर

चौकस२१२ Wed, 10/09/2024 - 11:13
मराठी ला हा दर्जा प्राप्त झालला या बद्दल अभिनंदन पण संस्कृत शी काहीच संबंध नाही ??? संस्कृत नंतर प्राकृत आणि मग मराठी असे नाही का झाले ? संस्कृत, बंगाली हिंदी मराठी गुजराथी यांचाच संस्कृत शी काही संबंध नाही? काय एकदम उगवल्या का त्या भाषा

कंजूस गुरुवार, 10/10/2024 - 09:34
भाषेला अभिजात मानांकन मिळाले याविषयी चर्चा असेल असे वाटले होते. आजच्या लोकसत्तामध्ये - यांच्या लेखामुळे मला बरेच काही कळले. 'अभिजात'तेची राजकीय पाळेमुळे' लेखक प्रमोद मुनघाटे अभिजात मराठीला कवितेत मांडलेले आवडले.

विवेकपटाईत गुरुवार, 10/10/2024 - 10:10
अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे सर्व विश्वविद्यालयात मराठीच्या प्रोफेसर ची नियुक्ती होणार. बहुतेक 20 एक वर्षांपूर्वी दिल्ली विश्वविद्यालयात मराठी शिकवणाऱ्या प्रोफेसरशी भेट झाली होती त्यावेळी त्यांना सहज विचारले होते ,किती मुले मराठी शिकतात. त्यावर ते फक्त हसले. मराठीत एमबीबीएस, इंजिीअरिंग, आर्किटेक्ट इत्यादी विज्ञानाच्या शाखांचे विषय जो पर्यंत शिकविले जात नाही तो पर्यंत अभिजात देऊन काहीही फायदा नाही. फक्त चार पाचशे प्रोफेसरांना नोकरीत देण्यासाठी सरकारचा खर्च होईल.