मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तो पाहिला ना अत्ता..,बाप वेडा मी ....

अत्रुप्त आत्मा · · जे न देखे रवी...
तो पाहिला ना अत्ता..बाप वेडा मी हसता हसता अवचित रडू लागला भरुन आलेला होता आतून .. हसतानाच! हे मात्र तो रडल्यावरच कळलं शब्द बंद झाले..भावना अबोल झालि कारण आता मुलीला सोडून बापच जाणार होता लग्न मंडपातून त्याच्या आपल्या घरी.. एक न तुटणारि फिल्म काही क्षणात सलग दिसून गेली त्याला आणि त्या पुढला मुलीच्या आयुष्यातला सुखाचा भाग त्याला दिसणार नाही याची खंत ..उरलेल्या उपस्थितांना आणि मग काही क्षणातच , आदल्या दिवशीचं कार्यालयातलं स्वागत कमानिचं दार.. परतीच्या गाड्यांनि भरुन येऊ लागलं आणि याचीही पावलं जड होऊ लागली मग ! अखेर तो अटळ क्षण आला ..त्याच्या अंतर्मनात त्याच्याच संवादांना कुणीतरी कोंडल्याचा भास होउ लागला त्याला.. त्याची लाडकी छकुलि निघाली...दुसय्रा घरी जायला.. आता त्याला ती भेटूहि शकत नाही मनापासुन ,त्याच्याच खांद्यावर पडून रडत असली तरी! एकामेकाचे अश्रू पुसणे ही तर एक कृतीच असते नुसती.. परतीच्या वेळी , त्या ताटातुटिला सामोरं जाताना घडलेली.. खरा संवाद आत चाललेला असतो, ज्याचे.. केवळ काही शब्द वर येतात.. त्या संवादातल्या ..बाप लेकीच्या नात्याचे! . "सोन्या नीट रहा गंss!" असली औपचारिक वाटणारी ओळ आपण ऐकतो. तिच्या मागे प्रेमच असतं काळजितून आलेलं .. पण आत तो बाप बावरलेला असतो स्वत:च्याही काळजिनि ..आणि आठवत असतात त्याला छकुलिचे कपाळावर "थापटि थापटि" करणारे चिमुकले हात.. "बाबा गाइ गाइ कल ना ले लवकल!" असं म्हणणारे. "मुलगा आईजवळच राहतो,पण मुलगी मात्र नेहमीच सोडून जाते बापाला!" .. असलं काहीतरी अश्यावेळि सुचवणारि.. हीच विभागणी त्याला नको असते.. पण मग काही ठिकाणी थांबावं लागतं .. गुंत्यातूनच गुंता आहे हा..हे कळल्यावर! म्हणून तो गप्प बसतो.. आणि मंगल कार्यालयाच्या त्या कमानी जवळ उभं राहुन गाडीत बसलेल्या मुलीला तो सगळ्यांसह हसतमुखाने 'टाटा बाय' करतो...मनातून शांत शांत.. होत असतानाच. =================

वाचने 6440 वाचनखूण प्रतिक्रिया 20

जडभरत Sun, 07/12/2015 - 15:23
कारण आता मुलीला सोडून बापच जाणार होता लग्न मंडपातून त्याच्या आपल्या घरी.. हे खूप आवडलं. सत्यच! त्या पिल्लु पेक्षा बापच जास्त एकटा पडणार असतो.

प्यारे१ Sun, 07/12/2015 - 15:49
बापाच्या भावना छान व्यक्त झाल्यात. हल्ली मात्र मुलगी व जावई अनुक्रमे आईवडील व सासूसासरे यांच्याकड़े लक्ष देताना जास्त आढळतात त्यामुळे मुलीच्या लग्नानंतर हे लोक जास्त जवळ आलेले दिसतात. मुलगा त्याच्या सासरी जास्त जवळीक असलेला पाहायला मिळतो. सन्माननीय अपवाद आहेतच. हे फ़क्त निरीक्षण आहे. बाकी बरोबर लोकांचं नेहमीच्च् बरोबरच्च् असतंच्च् यात वाद नाहीच्च्!

तुडतुडी Mon, 07/13/2015 - 13:32
नका हो असं लिहू . :-( सन्माननीय अपवाद आहेतच>>> what does that mean ? लग्नानंतर मुलगा आणि सून जशी मुलाच्या आईवडिलांची काळजी घेतात तशी मुली आणि जावयाने घेतली तर काय बिघडतं ?

पैसा Mon, 07/13/2015 - 13:54
छान लिहिलंय बुवा! असेही बाप असतात आणि "गेली एकदाची जबाबदारीची धोंड गळ्यातून" म्हणत सुटकेचा निश्वास टाकणारे बापही असतात. सगळं काही याच पृथ्वीवर बघायला मिळतंय.

In reply to by पैसा

हे प्रसंग मी कार्यालयात अनेकदा पाहिलेले आहेत. अत्ता आठवड्यापूर्वि माझ्या मित्राच्याच बीहिणिच्या लावलेल्या लग्नात त्या बापाला बिचाय्राला खरच त्या शेवटच्या त्यांच्या पंगतित घासही घश्याखाली जात नव्हता .. मग मुलिनी येऊन अक्षरश: लहान मुलाला समजावतात तसं करून तिच्या बाबाला हतानी दोन घास भरवले आणि जेवायला लावलं! कारणही बरोबर होतं.. तिलाही वडिलांचा प्रचंड लळा होता.. आणि अगदी कार्यालय सोडल्या सोडल्याच जावई आणि मुलगी डायरेक हुंबैला आणि तिथून us ला जाणार होते.. त्यामुळे ह्यांची पंगत चालू असताना जश्या ब्यागा गाड्यांकडे जायला लागल्या, तसा यांचा धीर सुटला.. मग कसलं जेवण आणि काय?

नाव आडनाव गुरुवार, 07/16/2015 - 10:34
आवडलं ! मस्तं लिहिलंय :) एकदम समोर होतंय सगळं असं वाटलं. याआधी मी आई - वडिलांमधे आई बद्दल लिहिलेलं जास्त वाचलंय ( ईंटरनेटवर, कवितांमधे ). त्यामुळं एक बाप म्हणून हे मला अजून जास्त आवडलं. माझ्या दोन पर्‍या अजून लहान आहेत (६ वर्ष आणी ३ वर्ष) पण असं बर्‍याचदा वाटत राहतं या दोघी जातील एक दिवस त्यांच्या घरी आणी रडायला येतं. अजून ~२० वर्ष तरी आहेत दोघी माझ्याकडे. पण जाणार एक दिवस. हे असंच चालंत आलंय आणी असंच चालंत राहणार. माझी आई आली, बायको आली तश्या या पर्‍या जाणार. मा़झी आई सांगत असते त्या कुठे जाणार, माणसं कशी मिळणार हे माहित नाही पण जो पर्यंत आपल्याकडे आहेत तोवर त्यांना अजिबात नाराज करू नको, रागवू नको. त्यांना काय शिकायचं असेल त्या त्यांच्या आवडीने शिकतील, काय करायचं ते त्यांच्या आवडीने करतील, त्यांना अजिबात रागवत जाऊ नको :). ती मला दोघींवर अजिबात रागाऊ देत नाही. सगळं दोघींच्या आणी त्यांच्या आजिच्या मनासारखं :) आठ - दहा ओळी लिहायला बराच वेळ लागला :)