Skip to main content

प्रथमच एक गझल लिहण्याचा प्रयत्न केला आहे.

लेखक psajid यांनी मंगळवार, 22/10/2013 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
मी प्रथमच एक गझल लिहण्याचा प्रयत्न केला आहे. ओढून ताणून आणलेल्या शब्दापेक्षा त्यामध्ये भावना याव्यात या हेतूने लिहलेली माझी ही पहिली गझल आहे. या गझल मध्ये मी ऱ्हस्व - दीर्घ, नुकता, रदीफ किंवा काफिया या पैकी कशाचाही योग्य वापर केला नाही याची मला कल्पना आहे. (गोड मानून घ्या) - साजीद पठाण गीत आयुष्याचे गीत गाण्या, जमते ‘खास’ एखाद्याला वेचतात दु:खात फुले, येतो ‘सुवास’ एखाद्याला !! वेदनांना टाकून पाठी, ज्यांची चालण्याची रीत टेकतो हात विधाता, देऊन ‘त्रास’ एखाद्याला !! मैफल जमवण्यासाठी, लागते जवळ हातोटी होऊन वाहतात झरा, घेऊन ‘श्वास’ एखाद्याला !! सुंदरतेच रहस्य, फुललेल्या शेवाळाच्या ओठी जीवनातील खडक वाटतो, ‘वसंत मास’ एखाद्याला !! मंद्ज्योत करते जिथे, पराजित वादळाला लाचार तो कसा छळेल ? ‘दु:स्वास’ एखाद्याला !! आनंदाचा गांव त्यांचा, ‘साजीद’ कसे तुला कळावे ? राहून उपाशी भरवतात, तोंडातला ‘घास’ एखाद्याला !! श्री. साजीद यासीन पठाण
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3836
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

"आनंदाचा गांव त्यांचा, ‘साजीद’ कसे तुला कळावे ? राहून उपाशी भरवतात, तोंडातला ‘घास’ एखाद्याला !!" हे सालं कुठेतरी आर पार भिडले.....

मस्त.. सगळे शेर आवडले :)

उत्तम प्रयत्न भाव सुरेख बहरलेत.... आवडले. मक्ता विशेष! सुंदर...

ते नियम राहू देत हो, भाव पोचला. आवडला पहिलाच प्रयत्न.

आवडली कविता. सुंदर भावना आहेत. पहिला प्रयत्न (गझलेचा) म्हणता तसं वाटत नाही. उत्तम आहे. फक्त एक म्हणून पाहतो. भावना आणि वृत्त-यमकांचे गणित हे एकमेकांना अडवतात आणि अंतिम रचना बिघडते असं वाटत असेल तर गझल हाच विशिष्ट फॉर्मॅट घेण्याचा प्रयत्न करुच नका. १. मुक्तपणे आलेल्या भावना २. त्यांना आकारात आणि शाब्दिक तालात बद्ध करुन एक गेय / र्हिदमिक सुंदर रचना या दोन वेगवेगळ्या गोष्टी म्हणून असू शकतात, पण त्या एकत्र आल्या तर आणि तरच गझलसारखा वृत्त-नियमबद्ध आकार समोर आणता येतो. त्यामुळे
ओढून ताणून आणलेल्या शब्दापेक्षा त्यामध्ये भावना याव्यात या हेतूने लिहलेली माझी ही पहिली गझल आहे.
शब्द ओढावे ताणावे लागत असतील तर सरळ जसे येतात तसे मांडावे आणि त्याला गद्य किंवा पद्य संबोधावे. पद्यमय रचना असली तर त्याचा छंदबिंद शोधण्याच्या फंदात पडू नये. पण अशा वेळी "गझल" बनवली आहे अशा प्रकारे ती पेश करु नये. गझल हा एक विशिष्ट प्रकार आहे. त्याचे अत्यंत कडक किंवा अत्यंत विस्कळीत नियम असलेले असे अनेक उपप्रकार असले तरीही.. इफ यू वाँट टू प्ले क्रिकेट, फॉलो क्रिकेट रूल्स.. मग माझ्या अंगभूत फटकेबाजीला या नतद्रष्ट क्रिकेटच्या नियमांनुसार कॅच घेणार्‍या अन चौकार अडवणार्‍या फिल्डर्सच्या बंधनात रहावं लागतं अशी खंत ठेवू नये.
या गझल मध्ये मी ऱ्हस्व - दीर्घ, नुकता, रदीफ किंवा काफिया या पैकी कशाचाही योग्य वापर केला नाही याची मला कल्पना आहे. (गोड मानून घ्या)
कोणतीही कविता गोड "मानून घ्यायची" नसते. ती चांगली असली की मनाला भिडतेच. त्यामुळे तुम्ही मनापासून लिहीत रहा. गोड मानून घेण्याची विनंती करु नका असा माझा उगीचच सल्ला. तुम्ही चांगलं लिहीता आहात.

आनंदाचा गांव त्यांचा, ‘साजीद’ कसे तुला कळावे ? राहून उपाशी भरवतात, तोंडातला ‘घास’ एखाद्याला !! आत्मस्तुतिचा दोष पत्करून म्हणतो वरील दोन ओळी सोडल्या तर माझे वर्णन आहे. वरील दोन ओळी का नाहीत. उत्तर सोपे आहे . मी उपाशी राहून काही दुसर्याला भरविण्याइतका महान आत्मा नाही.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! या गझल (?) वरती जे जाणकार आहेत त्यांनी दुरुस्ती सुचवावी हा उद्देश ठेवून मी ती लिहण्याचा प्रयत्न केला. गवि यांनी आपल्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे गझल ही तिचे अत्यंत कडक नियम सांभाळून बनवली जाते त्यासाठी लहेजा, मक्ता, रदीफ किंवा काफिया यांचा अचूक वापर करून तिला फुलवली जाते किंवा शेर बनवला जातो हेही ठाऊक होतं आणि मदतीसाठी मराठीतील गझल नवाज सुरेश भट यांची "गझलेची बाराखडी" या पुस्तकाचाही अभ्यास केला होता, मात्र मी योग्य शब्दामध्ये ती व्यक्त करू शकलो नाही. याची जाणीव मनात आहे. तरीही गझलेच्या प्रांतामध्ये स्वतःला एक धडपडून पडणारा पुन्हा धडपडणारा म्हणून घ्यायला आवडेल. शिकायला आवडेल. यावरती अजून काही सूचना असतील तर त्या पाळण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद ! - साजीद पठाण

गझलची चौकट जपा. नाहीच जमलं तरी ओढून ताडून गझलेच्या चौकटीत आशय नका बसवू इतकेच म्हणेन. आपली रचना आवड्ली आहे. -दिलीप बिरुटे

आवड्ली आहे.... अभिनन्दन

>>टेकतो हात विधाता, देऊन ‘त्रास’ एखाद्याला !! -- 'तो' बघत असेल 'वरुन'... आणि म्हणत असेल, 'खरय रे बाबा साजीद' :) >>होऊन वाहतात झरा, घेऊन ‘श्वास’ एखाद्याला !! -- हे नाहि कळलं. थोडं फोड करुन सांगा कि.

>>होऊन वाहतात झरा, घेऊन ‘श्वास’ एखाद्याला !! -- हे नाहि कळलं. थोडं फोड करुन सांगा कि. - अर्धवटराव ....मला म्हणायचं होतं कि, काही काही लोकांना माणसं जोडण्याचा छंद असतो. नाती जपण्याचे वेड असते आणि त्यासाठी त्यांना स्वतः ला कितीही यातना किंवा त्रास झाला तरी हे सर्व जपण्याच्या पायी झालेला त्रास कोणालाही न दाखवता ते हसत जगतात. आणि झरा म्हणजे पाणी आणि पाणी म्हणजे जीवनाचा श्वास असं रूढार्थाने घेतलं तर अशी माणसं एखाद्यासाठी श्वास घेऊन वाहत असतात हे सांगण्याचा प्रयत्न होता. ही गझल (?) मी माझ्या वडिलांना डोळ्यासमोर ठेऊन लिहली आहे. ज्यांनी प्रत्येक शेर मध्ये वर्णन केल्याप्रमाने आपले आयुष्य दुसऱ्यांच्या (कुठुंबातील सर्वांच्या, नात्यातील लोकांच्या, मित्र परिवाराच्या) सुखासाठी खर्च केले. त्यांच्या त्या निस्वार्थी वृत्ती मुळेच आजही माझे ३५ लोकांचे एकत्र कुठुंब या आधुनिक काळामध्येही आनंदामध्ये राहते आहे. त्यांना खरंच आयुष्याचे गीत गाणे जमले होते. त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन ! - साजीद पठाण