मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जमणार नाही ... !!!

नाना चेंगट · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
निवेदन - सदर काव्य दोनअडीच वर्षांपूर्वी मीमराठी या संकेतस्थळावर प्रकाशित झाले होते. निवेदन संपले. *** तेच ते... तेच ते ज्यांनी लंगोटीची अंडरपँट केली सद-याचा शर्ट केला आणि कुटुंबाची फॅमिली केली तेच ते... बगळ्याच्या वेषातले धूर्त.. जेव्हा मरायला टेकली होती ती तेव्हा मावशीचा आधार घेवुन तुंबड्या भरत होते सात पिढ्यांची सोय व्हावी म्हणुन आणि तोडकं मोडकं जोडत तोडत आम्ही कसं बसं व्यवहारात वापरत होतो तिला साहेब पेमेंट रिलीज करा... रेट काय लावला... मला ट्रेनचं तिकीट बुक करुन दे... ही टॅब्लेट सकाळी ही रात्री... एट्सेट्रा एट्सेट्रा वगैरे इत्यादी. आणि चक्क ती पुरुन उरली... नामशेष होईल नामशेष होईल असे म्हणणारेच नामशेष झाले इंडोआर्यन भाषाकुलातील ती हजारो वर्षांची परंपरा "दुस-या भाषेतील शब्द घेवुन आपले व्याकरण लावुन भाषेत सामावुन घेतात" तिने जपली, तिच्या लेकरांनी जपली जोपासली समृद्ध केली. आणि आता आले तेच परत .. हो तेच ते (कदाचित आर्थिक, सामाजिक, राजकीय गरजेपोटी) आणि सांगत आहेत ... अरे असे नका बोलु... तसे बोला... अरे असे नका लिहु... तसे लिहा कानाउकारमात्रांच्या सुतळ्या बांबुला बांधुन तिची तिरडी उचलण्याचा त्यांचा कावा आमच्या लक्षात आला आहे कारण भाषा प्रवाही रहात नाही, तिच्यात तोच तो पणा येतो तेव्हा ती मृतावस्थेकडे जाते हे सत्य त्यांना माहित आहे की नाही हे माहित नाही, पण आम्हाला माहित आहे आणि म्हणुनच जेव्हा जेव्हा ते होय तेच ते.. आम्हाला "शुद्ध बोला शुद्ध लिहा" असा उपदेश करतील तेव्हा एकच उत्तर ... जमणार नाही !!

वाचने 4489 वाचनखूण प्रतिक्रिया 30

sneharani 25/06/2012 - 15:32
छान. आता भाषेवर एक लेख येऊ दे! :)

In reply to by मुक्त विहारि

सुनील 25/06/2012 - 22:50
एका वेलांटीने पण फरक पडू शकतो.. नुसताच का शब्द वापरणार आहात? शब्द वाक्यात येईल, वाक्य परिच्छेदात येईल, परिच्छेद लेखात येईल. संदर्भावरून अर्थ लावणे अशक्य का आहे?

In reply to by मुक्त विहारि

नाना चेंगट 26/06/2012 - 12:08
>>>पाणि = हात आणि पाणी= जल पाणि हा शब्द मराठीतला मुळचा नाही. तो संस्कृतातून उधार आणलेला आहे. पाणी शब्द संस्कृतात नाही. तो पानीय असा आहे. त्यामुळे संस्कृतचा विचार करता वेलांटीचा फरक या शब्दाला पडत नाही. इतर शब्दांना पडू शकतो. आपण मराठीचा विचार करत आहोत. मराठीत हात असा शब्द सर्वत्र वापरला जातो. केवळ (पोकळ) पंडीती काव्य रचतांना पाणि अशा शब्दाचा वापर होतो. >>>एका वेलांटीने पण फरक पडू शकतो.. फक्त कृत्रिम भाषांमधे (जसे की संस्कृत). मराठी कृत्रिम नाही आणि होऊ नये असे आमचे मत आहे.

In reply to by नाना चेंगट

बॅटमॅन 26/06/2012 - 12:15
>>फक्त कृत्रिम भाषांमधे (जसे की संस्कृत). मराठी कृत्रिम नाही आणि होऊ नये असे आमचे मत आहे. संस्कृत ही कृत्रिम भाषा आहे हे अतिशय अज्ञानजन्य विधान आहे, मजा म्हंजे हा पूर्वग्रह तथाकथित बहुजनवाद्यांमध्ये जितका कॉमन आहे तितकाच बर्‍यापैकी हिंदुत्ववाद्यांमध्येदेखील. सध्यातरी हहपुवा इतकेच म्हणतो.

In reply to by बॅटमॅन

नाना चेंगट 26/06/2012 - 12:27
पाणिनीय संस्कृतावर पतंजलीचे महाभाष्य आणि कात्यायनाचे वार्त्तिक यांच्या प्रभावामुळे संस्कृतचे प्रवाही रुप नष्ट झाले आहे. तिला एक प्रकारची कृत्रिमता आली आहे. याचे पुरावे ८ व्या शतकानंतरच्या सर्व संस्कृत साहित्यात दिसतात. (मात्र तत्पुर्वीचे संस्कृत साहित्य रसाळ आणि गोड आहे. वाल्मिकी रामायणात तर व्याकरणाच्या (जे आज आपण आधारभुत मानतो त्यानुसार) असंख्य चुका आहेत पण गोडवा..... अहाहा ! तसे काव्य पुन्हा बनले नाही) तुम्ही हसलात याचे काहीही वाईट वाटत नाही.

In reply to by नाना चेंगट

बॅटमॅन 26/06/2012 - 12:30
प्रवाही रूप नष्ट झाले हे मान्य. कृत्रिमता तशा अँगलने म्हणणार असाल तर ठीके, नैतर नै. रस्त्याच्या कडेने: जनरली उत्तरकालीन संस्कृत साहित्याबद्दल फारसे चांगले मत नसते, पण अशा या 'अप्रवाही' भाषेत इ.स. १५५० ते १७५० मध्ये किती विविध प्रकारची आणि दर्जेदार ग्रंथरचना झाली होती हे पाहणे रोचक ठरावे. हा पहा दुवा.

In reply to by अस्वस्थामा

बॅटमॅन 26/06/2012 - 16:33
हौ तर येतं ना सुद्द लेकनात हे पन. वाती वळतात. अर्थात 'तयार करणे' या अर्थी बनवणे असे म्हटले तर ते चूक ठरू नये, पण भाषेच्या शुद्ध/अशुद्ध निर्णयात तिचे नेटिव्ह स्पीकर्स कसे बोल्तात हादेखील एक अतिशय महत्वाचा निकष असतो, निव्वळ व्याक्रन नस्तं :) म्हनुन वाती बनवून शिल्पाज्जींनी मस्त बनवले आहे ;)

In reply to by बॅटमॅन

नाना चेंगट 26/06/2012 - 12:37
>>>प्रवाही रूप नष्ट झाले हे मान्य. कृत्रिमता तशा अँगलने म्हणणार असाल तर ठीके, नैतर नै. वर्तमानातलेच रुप आपण विचारात घेणार ना? म्हणून कृत्रिम. यावर आता एकमत. >>>जनरली उत्तरकालीन संस्कृत साहित्याबद्दल फारसे चांगले मत नसते, पण अशा या 'अप्रवाही' भाषेत इ.स. १५५० ते १७५० मध्ये किती विविध प्रकारची आणि दर्जेदार ग्रंथरचना झाली होती हे पाहणे रोचक ठरावे. हा पहा दुवा. अहो लंकेत सोन्याच्या वीटा. समाजापर्यंत कितपत पोहोचलं होतं हे? आणि तेच ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोध घरोघरी पोचले. शेवटी दर्जेदार असले तरी लोकांपर्यंत जायला नको का? उगा आपलं लिहून दोन चार जणांनी काप्या बनवायच्या आणि लाल कपड्यात गुंडाळून माळ्यावर ठेवून द्यायच्या.

In reply to by नाना चेंगट

बॅटमॅन 26/06/2012 - 12:42
संस्कृत साहित्याच्या सुवर्णकाळात ज्ञानेश्वरी, गाथा, इ. इतकीच त्यांचीसुद्धा क्रेझ होती. >>उगा आपलं लिहून दोन चार जणांनी काप्या बनवायच्या आणि लाल पोथ्यात गुंडाळून माळ्यावर ठेवून द्यायच्या. हे वाक्य मुख्यतः विश्लेषणात्मक ग्रंथांबद्दल जास्त लागू पडते, काव्य वैग्रेंबद्दल नै.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 25/06/2012 - 22:25
जमणार नाय. -दिलीप बिरुटे

राजेश घासकडवी 26/06/2012 - 01:03
सदर काव्य दोनअडीच वर्षांपूर्वी मीमराठी या संकेतस्थळावर प्रकाशित झाले होते.
मला आठवतं आहे की मुळात हे काव्य वेगळ्या नावाने प्रसिद्ध झालं होतं. त्या नावावर अनेकांनी आक्षेप घेतला होता, आणि शेवटी तुम्ही ते बदललंत. त्याच मूळ नावाने प्रसिद्ध करण्याची हिंमत झाली नाही का? की कवितेत मांडलेला झुंजार बाणा थोडा कमी झाला? जर 'सभ्यपणे लिहा' असं सांगितल्यावर बदलणं जमतं तर 'शुद्ध लिहा' असं सांगितल्यावर बदलण्याची तयारी का नाही? कुठेतरी केव्हातरी समाजाच्या मागणीला एका विशिष्ट मर्यादेपर्यंत महत्त्व द्यावंच लागतं, नाही का? या कवितेत शुद्धलेखनाच्या चुका जवळपास नाहीत, हेही गमतीदारच. कंटेंटशी फॉर्म काही जुळत नाही बुवा.

In reply to by राजेश घासकडवी

नाना चेंगट 26/06/2012 - 07:01
>>>>मला आठवतं आहे की मुळात हे काव्य वेगळ्या नावाने प्रसिद्ध झालं होतं. त्या नावावर अनेकांनी आक्षेप घेतला होता, आणि शेवटी तुम्ही ते बदललंत. तिथले संदर्भ वेगळे होते. (कोणते होते हे विचारु नये) इथले वेगळे आहेत. (कोणते आहेत हे विचारु नये) काळ वेळ स्थिती पाहून शीर्षक बदलावे लागते हे आपणास आम्ही सांगणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास. आमची ती लायकी नाही. >>त्याच मूळ नावाने प्रसिद्ध करण्याची हिंमत झाली नाही का? वरील उत्तराप्रमाणे. >>की कवितेत मांडलेला झुंजार बाणा थोडा कमी झाला? वरील उत्तराप्रमाणे >>>जर 'सभ्यपणे लिहा' असं सांगितल्यावर बदलणं जमतं तर 'शुद्ध लिहा' असं सांगितल्यावर बदलण्याची तयारी का नाही? सभ्यतेचे संकेत समाज एकत्रितरीत्या ठरवतो. शुध्द किंवा शुद्ध हे लादले जाते. >>>कुठेतरी केव्हातरी समाजाच्या मागणीला एका विशिष्ट मर्यादेपर्यंत महत्त्व द्यावंच लागतं, नाही का? कोणती मागणी किती मानायची, महत्व द्यायचे ह्याचे आमचे काही निकष आहेत ते आम्ही पाळतो. बाकी समाजाच्या मागणीला महत्व देण्याचा आपला आग्रह पाहून डोळे पाणावले. असो. >>>या कवितेत शुद्धलेखनाच्या चुका जवळपास नाहीत, हेही गमतीदारच. कंटेंटशी फॉर्म काही जुळत नाही बुवा. बर मग?

In reply to by नाना चेंगट

राजेश घासकडवी 26/06/2012 - 09:09
सभ्यतेचे संकेत समाज एकत्रितरीत्या ठरवतो. शुध्द किंवा शुद्ध हे लादले जाते.
हे पटत नाही, पण सोयीस्कररीत्या काही बंधनांना बाब्या म्हणायचं, आणि काहींना कार्टं म्हणायचं; लॉजिक समजावून घ्यायचं नाही, अशांशी वाद घालायची पाळी आली की मी 'जमणार नाही' असं म्हणतो. या लेखावरचा माझा शेवटचा प्रतिसाद. तेव्हा श्रामो म्हणतात तसा अच्छेर पावशेर टाकण्याची तुम्हाला सोय आहे.

In reply to by राजेश घासकडवी

नाना चेंगट 26/06/2012 - 12:02
तुमच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल तुमची जाहीर क्षमा मागतो. पण असे तणतणू नका हो. काळजी वाटते.