मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रथम क्रमांक स्पर्धा विजेता कविता

गंगाधर मुटे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू? किती ज्येष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे, किती सभ्य आहेत ही माणसे परी माणसासारखी वागताहे, असे चित्र नाही दिसे फारसे कधी भाट होई सख्या चेहर्‍यांची, कधी घोटती लाळ द्रव्यापुढे खरे रूप दावी असे धैर्य नाही, किती भ्रष्ट झालेत हे आरसे? "घराणे" उभे राहिले गावगावी, कुठे लोकशाहीस नेतो अम्ही? सग्यासोयर्‍यांचे अता राज्य आले, पदे भोगण्याला नवी वारसे जरा गंध नाही मुळी झोपडीला, नव्या इंडियाच्या युगाचा नव्या कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू, मिटवले कुणी पावलांचे ठसे? कुणी एक वेडा म्हणे जागवावी, अभय झोपलेली इथे माणसे परी घेतले सोंग ज्याने निजेचे, कळेना तया जागवावे कसे...! . गंगाधर मुटे ---------------------------------------------------------------------

वाचने 3363 वाचनखूण प्रतिक्रिया 21

नरेशकुमार 22/04/2011 - 12:31
ह्म्म्म्म.
परी घेतले सोंग ज्याने निजेचे, कळेना तया जागवावे कसे...!
हम्म्म्म !

अरुण मनोहर 24/04/2011 - 14:40
सुंदर गझल. मनातली कळकळ समर्थपणे उमटली आहे. >>जरा गंध नाही मुळी झोपडीला, नव्या इंडियाच्या युगाचा नव्या ह्यात इंडिया खटकले. नव्या भारताच्या युगाचा नव्या असे घातले असते तर आणखी चांगले वाटले असते. ........की तसा शब्द मुद्दाम वापरला आहे?

llपुण्याचे पेशवेll 27/04/2011 - 11:39
मुटेजी कविता छान. नेहेमीप्रमाणे आवडली. उषःकाल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मेणबत्त्या | ओहो होहोहोहोहो

मैत्र 27/04/2011 - 16:00
"घराणे" उभे राहिले गावगावी, कुठे लोकशाहीस नेतो अम्ही? सग्यासोयर्‍यांचे अता राज्य आले, पदे भोगण्याला नवी वारसे कुणी एक वेडा म्हणे जागवावी, अभय झोपलेली इथे माणसे परी घेतले सोंग ज्याने निजेचे, कळेना तया जागवावे कसे...! मस्त गझल... वजन खूपच छान आहे. आणि अतिशय नेमके आणि सहज शब्द... !

गंगाधर मुटे 28/04/2011 - 10:31
प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद.

दैत्य 30/04/2011 - 00:45
जरा गंध नाही मुळी झोपडीला, नव्या इंडियाच्या युगाचा नव्या कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू, मिटवले कुणी पावलांचे ठसे? अप्रतिम!

रामदास 30/04/2011 - 09:15
कुणी एक वेडा म्हणे जागवावी, अभय झोपलेली इथे माणसे परी घेतले सोंग ज्याने निजेचे, कळेना तया जागवावे कसे...! हे कडवे फार फार आवडले.

निनाद 12/09/2011 - 06:27
जरा गंध नाही मुळी झोपडीला, नव्या इंडियाच्या युगाचा नव्या कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू, मिटवले कुणी पावलांचे ठसे?
जरा गंध नाही मुळी झोपडीला, हे समजले नाही. आर्थिक स्तरावर मागे पडलेल्यांना नवी (सधन?) इंग्रजाळलेली पिढी विसरली आहे, असे सूचित करायचे आहे का?

In reply to by निनाद

गंगाधर मुटे 12/09/2011 - 17:00
जरा गंध नाही मुळी झोपडीला, नव्या इंडियाच्या युगाचा नव्या स्वातंत्र्योत्तर काळात जे विकासाचे वारे वाहत आहे, त्याचा गंधही झोपडी पर्यंत पोचलेला नाही. असा काहीसा अर्थ घेता येईल. आणि मग हाच धागा पकडून पुढे या शेराचे विश्लेशन करता येईल. ही गझल प्रथम क्रमांक पारितोषक विजेता ठरली आहे.

योगप्रभू 12/09/2011 - 18:49
ही खूपच भावणारी कविता आहे. तिला पहिला क्रमांक मिळावा, अशीच तिची श्रेष्ठता आहे. पण कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू हा प्रश्न का पडावा? अहो अनेकांनी त्या नावांची दुकाने उघडून भरभराटीत चालवलेली आहेत. :)

प्रकाश१११ 12/09/2011 - 20:58
मुटेजी- खूप खूप मनापासून अभिनंदन. !!! प्रथम क्रमांक ..! आपल्यां प्रतिभेचा सुंगध गगनात जाऊ द्यां हीच परमेश्वराजवळ प्रार्थना