माझी - ती....

अथांग जे न देखे रवी...
काही दिवसांपूर्वी कुसुमिता ची 'ती' वाचली, आणि शेवटचा प्रश्न छळत राहीला - 'स्त्री' आहे ती आता, आता तिच्या स्वप्नांवर तिचा काय हक्क? वाटले याच्याही पुढे काहितरी असावे. स्वप्नं जरी भंगली तरी आशा सुटत नाही, माहीत नाही मला जे म्हणायचेय, ते स्पष्टं होतंय की नाही या लिखाणातून, पण प्रयत्न केला आहेच तर तो आपल्याबरोबर शेअर करते आहे. ती उंबरठ्याचे माप ओलांडून, आली घरात.. तिला वाटले, प्रत्येकाच्या मनात देखील, घर करू ! मधुचंद्राचे दिवस थोडे, बावरलेले.. तिला वाटले, होऊ द्यावी अजून ओळख, धीर धरू ! नव्याचे नऊ दिवस, पटकन संपले.. तिला वाटले, माहेरची सय येणारच, नको झुरू ! स्वप्नं काही होती उराशी, एक एक करत विझली.... तिला वाटले, हे काय नशिबी? मागं फिरू ??? आई-बाबांनी शिकवलं खूप, आठवत सारं राहिली चूप... तिला वाटले, होईल सगळं नीट, दमादमाने वाटचाल करू ! अचानक ओच्यात एक चाहूल. मग सगळ्याचीच कशी पडली भूल... तिला वाटले, तनामनात भिरभिरणारे, जणू पाखरू ! 'तिचा' जन्म झाला आणि सभोवार फक्त आनंद.. तिला वाटले, भरून पावले आता, नवे पर्व सुरु ! आत्तापर्यंत होते हात, आता पाय पण अडकले.. तिला वाटले, आपण कलंदर, पुरून उरू ! वेड्या आशा, अश्शा छळतात.. १४ वर्षं फशी पडतात.. तिला वाटले, वनवासच हा.. कुणा स्मरू ? पण मग आले भान तिला, स्वतःचे, जगण्याचे.... ती परत एकदा उंबरठ्यापाशी, आली दारात.. तिला वाटले, हे ओलांडले की बाहेरचे विश्व - कसेही तरू, नवा श्वास भरू, खूप कष्ट करू, खरं-खुरं जगून... मगच मरू...मगच !!!!!
वर्गीकरण
लेखनविषय:

12 टिप्पण्या 1,822 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

क्रान्ति नवीन

मस्त आहे कविता. खूप खूप आवडली.

काव्यवेडी नवीन

अप्रतिम काव्य !!!! कुसुमिता ची ती पण खुप आवडली होतीच. तुम्ही कवि असेच लिहित रहा आणि मी काव्यवेडी त्त्याचा आस्वाद घेत राहीन. प्रत्येक बाईच्या काळजाला भिडणारी कविता.