बालपणीचा काळ खाण्यापिण्याच्या बाबतीत खरेच सुखात गेला. मिसळ, वडे, भजी यांसारख्या जिभेचे चोचले पुरवणार्या 'जहाल' पदार्थांवर बालवयातच श्रद्धा बसल्याने वरण-भात, कच्च्या भाज्या, सलाड्स वगैरे गोष्टी एकदम 'ह्या' वाटायच्या. त्यातून डाएट बिएटचे फॅड घरात शिरलेले नव्हते. मायाजालाची क्रांतीही दूर होती त्यामुळे कॅलरीज, मेटाबॉलिझम, लीन मीट, लो फॅट असे शब्द घराघरात अजून मुरलेले नव्हते. दुधातून साय काढून टाकणारा 'येडा' वाटावा असे दिवस होते. बासुंदीला लावण्यासाठी पेढ्यांचे पाकीट फोडताना 'कॅलरीच्या' भीतीने गृहिणीचा हात थरथरत नसे.