नमस्कार , मिसळपाव वर ही माझी पहिलीच पोस्ट आहे . तसं इथे खातं सुरु करून एक वर्ष तीन महिने झाले असले तरी सुरुवातीचं वर्ष मी इथे जवळजवळ कधीच फिरकले नव्हते . तेव्हा सगळा वेळ फेसबुकवर जायचा , तिथे सचिन परांजपे , स्मिता जोगळेकर , राज जैन , संजीव पालेकर , सर्जेराव जाधव , रुचिरा कुळकर्णी आणि अशा कितीतरी उत्तम लेखकांचं लिखाण वाचताना दिवस कधी सरायचा तेच समजायचं नाही . सकाळी ब्रश करायच्याही आधी , रात्री अंथरुणात पडून २- ३ वाजेपर्यंत आणि दिवसभरातले बरेच तास फेसबुकवरच जाऊ लागले जेव्हा आपण प्रचंड फेसबुक अॅडिक्ट झालो आहोत हा साक्षात्कार झाला आणि मनावर मोठ्ठा दगड ठेवून फेसबुक खातं डिलीट केलं . पण काहीतरी दर्जेदार वाचायची भूक स्वस्थ बसू देत नव्हती तेव्हा मिपाकडे वळणं झालं . साधारण गेल्या ३ महिन्यांपासून मी मिपावर सक्रिय आहे . इथे फेसबुकएवढा वेळ जात नाही आणि उत्कृष्ट पोस्ट्सही वाचायला मिळतात . इथल्या पोस्ट्स वाचत आहे . फक्त १० - १२ पोस्ट्सवर प्रतिसाद दिला आहे . इथल्या २-३ रेसिपीज ट्राय केल्या आहेत :) . स्वतःचं काही लिहिण्याएवढी प्रतिभा / उत्साह माझ्यात बहुधा नसावा , निदान सध्यातरी .