Skip to main content

कथा दोन साधुंची

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 29/09/2009 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
हैयो हैयैयो यांनी न्यायशास्त्रातील एका कोड्यावर नुकतीच एक उद्बोधक आणि रंजक चर्चा घडवून आणली. त्यातून एक मूलभूत प्रश्न निर्माण झाला. तो असा की सामाजिक अन्यायाची सुरुवात नेमकी कुठुन होते? मी पूर्वी लिहिलेल्या या कथेत या प्रश्नाचे उत्तर शोधायचा प्रयत्न केला आहे. - युयुत्सु राजा विक्रमादित्याने आपला हट्ट काही सोडला नाही. त्याने झाडावरचे प्रेत आपल्या खांद्यावर ऒढून घेतले आणि तो स्मशानाचा रस्ता चालू लागला. राजाच्या चिकाटीने प्रभावित होऊन प्रेतामधला वेताळ मानवी वाणीने बोलू लागला आणि म्हणाला, "राजा तुझ्या जिद्दीचे मला खूप कौतुक वाटतॆ. तुझे कष्ट थोडेफार हलके व्हावेत म्हणून मी तुला एक गोष्ट सांगतॊ." "आटपाट नगर होतं. त्यात एकदा आपल्या शिष्यपरिवारासह दोन साधूंनी मुक्काम केला होता. एक साधूमहाराज त्यांच्या यज्ञयागादि तप: सामर्थ्यासाठी प्रसिद्ध होते. शिवाय प्रत्येक माणसाचे भूत-भविष्य-वर्तमान जाणून घेण्याचे सामर्थ्य त्यांना प्राप्त झाले होते. गतजन्मीच्या पापांचे प्रायश्चित्त घेतल्या शिवाय याजन्मीचे भोग संपणार नाहीत अशी त्यांची शिकवण होती. तर दूसरे केवळ आपल्या अमोघ वाणीने समोर जमलेल्या भक्तांचे दू:ख निवारण करण्यासाठी प्रसिद्ध होते. दोघांनाही आटपाट नगरात प्रचंड भक्तबल लाभले होते. त्यात नुकतेच मिसरूड फुट्लेले वितर्कतीर्थ आणि सन्मतितीर्थ या नावाचे दोन तरूण पण होते. आटपाट नगरात उपजीविकेसाठी फारशी संधी नसल्याने ते दोघे आलेला प्रत्येक दिवस या दोन महंतांच्या कार्यक्रमांत व्यतीत करत." "वितर्कतीर्थ यज्ञयागादि तप:सामर्थ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या साधूंच्या थाटामाटाने भारावून गेला होता. तर सन्मतितीर्थ गावाबाहेर मुक्कामास असलेल्या महंतांच्या साध्या शिकवणुकीने प्रभावित झाला होता. वितर्कतीर्थाला प्रभावित करणारे महाराज त्यांची दैनिक पूजाअर्चा संपली की हत्तीवरून गावात मिरवणुकीने आपला लवाजमा घेऊन फेरफटका मारत. गावातील सर्व लोक ही मिरवणूक पाहण्यासाठी गोळा होत आणि यथाशक्ती धनधान्याचे दान करत. कितीही गैरसोय झाली तरी मिरवणूकीबद्दल गावात नाराजीचा जराही सूर उमटला नव्हता. कदाचित या साधूमहाराजांच्या तप:सामर्थ्याचा दराराच तसा होता." "याउलट आपल्या अमोघ वाणीने समोर जमलेल्या भक्तांचे दू:ख निवारण करण्यासाठी प्रसिद्ध असलेले साधूमहाराज मात्र गावाच्या वेशीबाहेर मुक्कामाला होते. त्यांच्या वास्तव्याने आटपाटनगराच्या रोजच्या व्यवहारात फारसा हस्तक्षेप होत नसे. त्यांच्या प्रवचनास येणा-या भक्तवर्गाकडून मिळणा-या भिक्षेवर सर्वजण उदरनिर्वाह करीत. सन्मतितीर्थ या साधूमहाराजांना शरण गेला होता..." "एकदा काय झालं, गावातील नदीवर वितर्कतीर्थ आणि सन्मतितीर्थ संध्याकाळी अंघोळीसाठी आले असताना पाण्यात डुंबताना दोघांमध्ये गप्पा चालू झाल्या. गप्पांचा विषय होता, गावात मुक्कामास आलेल्या दोन साधूंची शिकवण आणि त्यांचे आचरण. तपाचे सामर्थ्य श्रेष्ठ की समस्यांचे निवारण करणारे मार्गदर्शन श्रेष्ठ? वितर्कतीर्थ आणि सन्मतितीर्थ गप्पांमध्ये एवढे बुडून गेले की की सूर्य मावळतीला कधी गेला याचे त्यांना भानच राहीले नाही. नदीकाठच्या जंगलात झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट वाढू लागला. निशाचर श्वापदांच्या आरोळ्या जशा वाढू लागल्या तसे वितर्कतीर्थ आणि सन्मतितीर्थ भानावर आले आणि पाण्यातून बाहेर आले. कपडे बदलून आणि ओले पिळे खांद्यावर टाकून त्यांनी गावचा रस्ता पकडला. जंगल अर्धे पार होईपर्यंत काळोखाने आपले पूर्ण साम्राज्य पसरले होते. आता मात्र दोघांची पावले झपाझप पडू लागली. पण तेवढयात सन्मतितीर्थाचा पाय एका खड्ड्यात पडून मुरगळला. त्याला चालता येणे अशक्य झाले. वितर्कतीर्थाला तर गावाकडे परतायची घाई झाली होती. संध्याकाळची मठातील स्वादिष्ट प्रसादाची वेळ टळली असती तर रात्रभर भुकेने तळमळून काढावी लागली असती. या विचाराने अस्वस्थ होऊन तो सन्मतितीर्थाला म्हणाला "तुला आता बरोबर घेऊन गेलो तर आपण दोघे एखाद्या वन्य श्वापदाच्या भक्ष्यस्थानी पडू. तेव्हा तू सकाळ होईपर्यंत एखाद्या झाडाच्या ढोलीत विश्रांती घे. सकाळी मी गावातील लोकांना मदतीला घेऊन येईन आणि तुला गावात घेऊन जाईन." बराच विचार करून सन्मतितीर्थाने या सूचनेस संमती दर्शवली. त्यावर वितर्कतीर्थाने अंधारात धडपडत एका विशाल वटवृक्षाची ढोली शोधून काढली आणि तेथे सन्मतितीर्थाची व्यवस्था करून वितर्कतीर्थाने त्याचा निरोप घेतला. दाट काळोखाने व्यापलेल्या जंगलात काही पावले चालून जातो न जातो तोच काही कळायच्या आत वितर्कतीर्थ एका कठडा नसलेल्या पाण्याच्या विहीरीत घसरून पडला. त्या किर्र शांततेत मोठ्ठा धोंडा पाण्यात पड्ल्याचा आवाज आणि "वाचवा वाचवा" असे शब्द सन्मतितीर्थाच्या कानावर पडले आणि त्यावरून काय घडले असावे हे त्याने जाणले. पण तो हतबल असल्याने "सकाळ होई पर्यंत त्याने वाट बघू" असा विचार करतानाच त्याला झोप लागली. सकाळ झाली आणि सूर्याच्या उबदार किरणांनी सन्मतितीर्थाला जागे केले. पायाचा ठणका कमी झाल्याने तो लंगडत ढोलीतून बाहेर पडला आणि वाळलेल्या फांदीची कुबडी करून वितर्कतीर्थाला हाका मारु लागला...रात्री ऐकलेल्या आवाजाच्या दिशेने त्याने जेव्हा शोध घेतला तेव्हा त्याला वितर्कतीर्थ पडला होता ती कठड्यास भगदाड पडलेली विहीर नजरेस पडली. त्याने विहिरीत डोकाऊन पाहिले तेव्हा विहीरीच्या पाय-यांवर मूर्च्छा येऊन पडलेला वितर्कतीर्थ दिसला. आता आपल्या मित्राला बाहेर कसे काढायचे याचा विचार त्याच्या मनात डोकावताच दूर अंतरावर त्याला एक स्त्री लाकूडफाटा गोळा करताना दिसली. हातवारे करून आणि हाका मारून सन्मतितीर्थाने तिच्याकडे मदतीची याचना केली. जेव्हा ती स्त्री विहिरीजवळ आली तेव्हा सर्व वृत्त सन्मतितीर्थाने तीस कथन केले. तेव्हा ती म्हणाली, "मी अशीच गावात जाते आणि जो भेटेल त्याला घेऊन येते." जाण्यापूर्वी तीने विहिरीतून कसेतरी पाणी काढले आणि तर्कतीर्थाच्या तोंडावर मारले. सरपणाची लाकडे गोळा करताना वेचलेली कंदमुळे सन्मतितीर्थाच्या हवाली करून ती गावाकडे निघाली. ती स्त्री गावाकडे निघाली तेव्हा तीने सन्मतितीर्थाच्या गुरूंच्या आश्रमात निरोप दिला व पुढे वितर्कतीर्थाच्या गुरुंच्या आश्रमात निरोप द्यायला गेली तेव्हा तपस्वी महाराजांची मिरवणूक गावात नेहमी प्रमाणे चालू झाली होती. तिने जोरजोरात हाका मारून तपस्वी महाराजांच्या शिष्याचे लक्ष वेधायचा प्रयत्न केला. महाराजांचे लक्ष तीच्याकडे गेले तेव्हा त्यांनी मिरवणूक थांबवण्यास सांगून एका शिष्योत्तमास चौकशी करण्यास सांगितले. गुरूंच्या आदेशाप्रमाणे शिष्य त्या स्त्रीकडे चौकशी करून आला आणि म्हणाला, "गुरूवर्य एका क्षुद्र कुळात जन्मलेला आणि उद्योग नसलेला गावातील एक तरूण आपला भक्त आहे. तो विहीरीत पडला असून, त्यास बाहेर काढण्यासाठी ही स्त्री मदत मागत आहे." तपस्वी महाराजांनी काही क्षण डोळे मिटले आणि ते म्हणाले, "हा तरूण गेल्या जन्मी पाखंडी म्हणून प्रसिद्ध होता. त्यामुळे त्याचा हीन कुळात जन्म झाला आणि त्याच्या वाट्याला हे दू:ख आले. पण गावातील लोकांची मदत घेऊन त्याला सायंकालीन पूजेच्या वेळी घेऊन या म्हणजे मी त्यावर मंतरलेले उदक शिंपडतो म्हणजे त्याच्या पीडेचे निवारण होईल." असे म्हणून मिरवणुकीस त्यांनी पुढे जाण्याचा आदेश दिला. इकडे गावाबाहेर मुक्काम केलेल्या साधुमहारांजाचे भक्त त्वरेने जंगलाच्या दिशेने निघाले आणि वितर्कतीर्थ आणि सन्मतितीर्थाला त्यांनी शोधून काढले आणि त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करून त्यांना गांवात नेले. वितर्कतीर्थ मात्र या अनपेक्षित माणुसकीच्या अनुभवाने भारावून गेला. त्याची तपस्वीमहाराजांवर असलेली श्रद्धा पूर्णपणे उडून गेली. "ज्यांचे तप:सामर्थ्य माझी वेदना दूर करत नाही त्यांची सेवा करून मला काय मिळणार" असा त्याने स्वत:शीच विचार केला." त्याने त्यांच्या दर्शनाला जाणे पूर्ण थांबवले. तो ह्ळुहळु सन्मतितीर्थाबरोबर गावाबाहेर मुक्कामाला असलेल्या गुरूंच्या प्रवचनास जाऊ लागला. गावात जो भेटेल त्याच्या समोर त्यांचे गोडवे गाऊ लागला. पण झाले काय की या प्रकाराने मात्र तपस्वी महाराज आणि त्यांचा शिष्यपरिवार अस्वस्थ झाला. त्यांनी वितर्कतीर्थाला एक दिवस पळवून आणले आणि अंधारकोठडीत डांबून ठेवले. पण या प्रकाराचा मात्र गावात बभ्रा झाला तेव्हा मात्र तपस्वी महाराजांनी गावातून काढता पाय घेतला. येथवर गोष्ट सांगून वेताळ म्हणाला, "आम्हा पिशाच्चांचे एक बरे असते. आमच्या कुठेही श्रद्धा नसतात. तसेच आमच्यात जातपात, धर्म पण नसतात. त्यामुळे धर्मांतर आणि धर्मबुडवेपणा पण आमच्यात नसतो. पण मला सांग, तुला यातल्या कोणत्या महाराजांचे शिष्यत्व स्वीकारायला तुला आवडेल." या प्रश्नाचे उत्तर ठाऊक असून दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन ती तुझ्याच पायाशी लोळू लागतील." यावर राजा विक्रमादित्य हसून म्हणाला, "तपस्वी महाराजांच्या लेखी वितर्कतीर्थ एक क्षुद्र माणुस होता. त्यांच्या परिवारास त्याचा तसा काहीच उपयोग नव्हता. त्यामुळे याला मदत करून काय साधणार असा सुप्त विचार तपस्वी महारांजांनी केला असावा. संकटातून किंवा बंधनातून बाहेर पडायला प्रत्यक्ष मदत करणारी प्रवृत्ती मला श्रेष्ठ वाटते. ही प्रवृत्ती आपापसातील दरी कमी करते." राजाच्या या उत्तराने वेताळ खूष झाला आणि विक्रमादित्याचा मौनभंग झाल्याने प्रेतासह झाडावर जाऊन लोंबकळू लागला. http://rajeev-upadhye.blogspot.com/2008/09/blog-post.html
लेखनविषय:

वाचने 3412
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

राजाच्या या उत्तराने वेताळ खूष झाला खरेतर विक्रमादित्याने वेताळाच्या प्रश्नाचे उत्तर दिलेलेच नाहीय्ये. वेताळाने विचारले त्याप्रमाणे त्याने कोणाचे शिष्यत्व पत्करायला आवडेल हे सांगितलेच नाही. राजाने वेताळाला पद्धतशीरपणे शासकीय उत्तर देऊन खुश केले. वेताळाने हा प्रश्न उत्तर मिळवण्यासाठी विचारला नसून राजाचे मौन तोडण्यासाठी विचारला असावा. "ज्यांचे तप:सामर्थ्य माझी वेदना दूर करत नाही त्यांची सेवा करून मला काय मिळणार" असा त्याने स्वत:शीच विचार केला." वितर्कतीर्थाची खरी श्रद्धा असती तर तो केवळ शिंपडलेल्या उदकानेच प्लासीबो इफेक्ट नेच बरा झाला असता. श्रद्धा नसेल तर वितर्कतीर्थाने कितीही गुरु केले तरी तो सुधारणार नाहीच. पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

In reply to by विजुभाऊ

श्रद्धा नसेल तर वितर्कतीर्थाने कितीही गुरु केले तरी तो सुधारणार नाहीच.
घाटपांडे आता सभेत उपस्थित झालेले आहेत बरं का! युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

राजाने वेताळाला पद्धतशीरपणे शासकीय उत्तर देऊन खुश केले.
:) युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || अर्थ - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल. ------

यात सामाजिक अन्याय, त्याची सुरुवात .. वगैरे कुठे आहे.. ? मूळ विषयच पाय मुरगळून कुठेतरी पडला आहे........ :) , आम्हा पिशाच्चांचे एक बरे असते. आमच्या कुठेही श्रद्धा नसतात. तसेच आमच्यात जातपात, धर्म पण नसतात. >>>>>>>>>> मग पिशाच्चाला मुक्ती कशी मिळते? कारण मुक्ती ही धर्मावर अवलंबून असते.... :) हिन्दु असेल तर मोक्ष, बौद्ध असेल तर महानिर्वाण, कुठलाही 'करार' वाला असेल तर कयामत का दिन ..... इ.. ,, तुला यातल्या कोणत्या महाराजांचे शिष्यत्व स्वीकारायला तुला आवडेल. >>>>>>>>> वेताळाचे प्रश्न असे चॉईसवाले नसतात... :) .. ते परिस्थितीतील गुन्ता सोडवायला लावणारे असतात.. ... विक्रमाने दुसरे उत्तर आपला चॉईस म्हणून दिले असते तरी वेताळ काय करू शकणार होता? ......... बाकी तुमचे मौन भंग झाले , हे मात्र चांगले झाले..... :) एवढे दिवस कुठे धप्प्प्प झाला होता ? :)

यात सामाजिक अन्याय, त्याची सुरुवात .. वगैरे कुठे आहे.. ?
या प्रश्नाचे उत्तर ठाऊक असून दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन ती तुझ्याच पायाशी लोळू लागतील ;) ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || अर्थ - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल. ------

In reply to by युयुत्सु

तपाचे सामर्थ्य श्रेष्ठ की समस्यांचे निवारण करणारे मार्गदर्शन श्रेष्ठ? हा विचारच चुकीचा आहे.......... तप करणारा समस्या निवारण करत नाही आणि समस्या निवारणारा हा तप करणारा नसतो, हे जाणीव पूर्वक आधीच निश्चित करून मग ही कथा लिहिल्यासारखे वाटते... १. तप करणारा हा काही सामाजिक अन्यायाची सुरुवातच असेल असे काही नाही... २. तप करणारा कोणत्या समस्यांचे हरण करत नाही , असेही नाही... असेच जर असेल, तर कुन्डली बघणारा हा तप करणारा म्हणायचा की समस्या 'निवारणारा' ? ( कुन्डलीवाला मार्गदर्शक असतो, असे मोघम उत्तर देऊ नये.... तो समस्येचे मूळ 'सांगू' शकतो... 'निवारत' नाही.. :) ३. कथेमधला समस्या निवारणाराही फक्त वरवरच्या दृश्य स्वरूपाच्या समस्या निवारणारा वाटतो आहे...

हे जाणीव पूर्वक आधीच निश्चित करून मग ही कथा लिहिल्यासारखे वाटते
तुमच्यामधला 'तपस्वी' कुठेतरी दूखावला गेला असावा असे वाटते...ते जाउ दे. कुण्डली बघणारा प्रथम एक listener असतो. नंतर तो कुंडलीचा समस्येच्या संदर्भात अर्थ लावतो आणि पर्याय सुचवतो. या गोष्टी त्याचा world view, pattern finding capacity आणि native intelligence यावर अवलंबून असतात. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || अर्थ - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल. ------

In reply to by युयुत्सु

तपस्वी काय फक्त माझ्यातच नाही, सगळ्यांमध्ये असतो....... :) .. आणि उपाय सुचवणारादेखील प्रत्येकात असतो... तुम्ही वर दिलेल्या दोन व्यक्ती २ अती टोकाची उदाहरणे आहेत... आपण सामान्य माणसे यांच्या दरम्यान रेंगाळत असतो..... कधी आपण असे असतो, कधी तसे असतो..कधी थोडे थोडे दोन्ही असतो.. .... तुम्ही लिसनर शब्द वापरला, तोही असाच 'बीचवाला' ... अपनी छत्री तुमको दे दे कभी जो बरसे पानी . कभी नये पॅकेट मे बेचे तुमको चीज पुरानी... फिर भी दिल है हिन्दुस्तानी...... बाकी, गावात रहाणारा, तपस्या करणारा, मन्त्रशक्ती वापरणारा असे उल्लेख एकाबद्दल आणि गावाबाहेर रहाणारा आणि (तरीही! ) प्रत्यक्ष्य समस्या सोडवणारा असे उल्लेख दुसर्‍याबाबत... वर ठसठशीत नाव- सामाजिक शोषणाचे मूळ कारण...... यातून तुम्हाला काही दुसरेच ( म्हणजे नेहमीचेच हो!) सांगायचे असेल, तर त्याला मीच काय कुणीही उत्तर देऊ शकणार नाही..... आणि असला अनुत्तरीत रहाणारा प्रश्न वेताळ कधीच विचारणार नाही ... डोकं फुटून विक्रम मोक्षाला/निर्वाणाला/कयामतीला ( हो... तीन्ही शब्द वापरलेले बरे... उगीच 'कट्टर' 'तपस्वी' असल्याचा फुका ( ?) आळ यायचा !) गेला की वेताळाचं मढं मग रोज उचलणार तरी कोण? :) ( कभी नये पॅकेट मे बेचे तुमको चीज पुरानी.. हे तुम्हाला उद्देशून नाही... मूळ गाण्यात असेच आहे! :) कृपया गैरसमज नसावा... )

तुम्ही वर दिलेल्या दोन व्यक्ती २ अती टोकाची उदाहरणे आहेत...
ही दोन टोकाची उदाहरणे असली तरी extreme personalities समाजावर प्रभाव जास्त पाडतात. शिवाय ही उदाहरणे प्रतीकात्मक आहेत. आता सामाजिक शोषणाच्या मूळ कारणाविषयी (मी अन्याय हा शब्द वापरला आहे). दूस-यांची वेदना नाकारणे ही एक अन्यायाची सुरुवात असते. युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || अर्थ - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल. ------

येथवर गोष्ट सांगून वेताळ म्हणाला, "आम्हा पिशाच्चांचे एक बरे असते. आमच्या कुठेही श्रद्धा नसतात. तसेच आमच्यात जातपात, धर्म पण नसतात. त्यामुळे धर्मांतर आणि धर्मबुडवेपणा पण आमच्यात नसतो. पण मला सांग, तुला यातल्या कोणत्या महाराजांचे शिष्यत्व स्वीकारायला तुला आवडेल." अरे वा! विक्रमाने उत्तर बदलले ! ........ ! चक्क ब्लॉगवर देखील तसा बदल केलात.......... धन्य आहात...... :) कथा प्रतिकात्मक आहे.... माहीत आहे....... पण माणसानी एक्मेकांच्या वेदना नाकारणं आणि पिशाच्चाला धर्म , श्रद्धा अशा भावना नसतात ( म्हणे!) यांचा सन्दर्भ नाही कळला.... :) ... म्हणजे एकमेकाच्या वेदना कळणं/न कळणं हे धर्माशी/श्रद्धेशी संबंधित असते काय? ... आणि हेच जर तुमचे मत असेल तर.... तुम्हाला धर्मसुद्धा कळत नाही आणि वेदना म्हणजे काय हेही कळत नाही, असेच म्हणावे लागेल.. :)

तुम्हाला धर्मसुद्धा कळत नाही आणि वेदना म्हणजे काय हेही कळत नाही,
तुमची "खरी वेदना" आता मला नक्की समजली... युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

बोधकथा या आपल्याला जो संदेश द्यायचा असतो तो हेतु गृहीत धरुन त्यानुसार पाडलेल्या असतात. कथारुपातुन दिलेले संदेश हे मनोरंजनातुन प्रबोधनाकडे अशा वाटचालीवरचे असतात. प्रत्येक विचारश्रेणीचे लोक आपल्याला अनुकुल अशाच बोधकथा वा संदर्भ घेतात. अगदी अंनिस सुद्धा संतांचे जे विचार आपल्याला अनुकुल आहेत असेच उचलतात. बाकी जे ग्राह्य नाही त्यावर मौन बाळगतात. वरील उदाहरणात वितर्कतिर्थाचे उपयुक्तता हे मुल्य संपुन त्याचे उपद्रवमुल्यात रुपांतर झाल्याने तपस्वी महाराजांनी त्याला डांबुन ठेवले प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

.