Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by युयुत्सु on गुरुवार, 06/19/2025 - 10:00
लेखनविषय (Tags)
जीवनमान
कथा एका पीएचडीची... पूर्वप्रसिद्धी- https://aisiakshare.com/node/1747 http://www.loksatta.com/sampadkiya-news/ph-d-very-easy-20848/ वरील लेख नुकताच वाचला. तो वाचल्यावर मला एका पीएचडी प्रबंधांची आठवण झाली. गोपनीयतेच्या कारणास्तव सर्व तपशील देत नाही पण बाकी सर्व घटना पूर्ण सत्य आहेत. मी संगणकीय संगीतावर काम करत असताना डॉ. किरण रेगे (प्रा. मे. पु. रेगे यांचे चिरंजीव) माझे सहकारी आणि एका अर्थाने माझे बॉस पण होते. त्यांनी त्यांच्या शेजारीच माझी बसायची व्यवस्था केली होती. आमच्यामध्ये बरेच विषय समान असल्याने बर्‍याच गप्पा चालायच्या. आम्ही जेवायला पण एकत्र असायचो. असंच एकदा मला डॉ. रेग्यांच्या टेबलावर एक प्रबंध दिसला. मी तो कशासंबंधी आहे, असे विचारल्यावर, "तुला वाचायचा असेल तर वाच आणि मग मला काय वाटते ते सांग", असे म्हणून त्यांनी मला वाचायला दिला. तो प्रबंध एका पीएचडीच्या विद्यार्थ्याचा होता. त्या प्रबंधाचा विषय तेव्हाचा अत्यंत ज्वलन्त असा संशोधन विषय होता. डॉ. रेग्यांच्याकडे तो प्रबंध तपासण्याकरता आला होता. तो जाडजुड प्रबंध मी कुतुहलाचा विषय म्हणून वाचायला घेतला. पण मला दोन प्रकरणांपलिकडे जाता आले नाही. लिखाणाच्या क्लिष्ट शैलीमुळे मला प्रतिपाद्य विषय आणि प्रतिपादन यापैकी कशाचाच बोध न झाल्यामुळे ३-४ दिवसांनी डॉ. रेग्यांना तो परत दिला आणि सर्व डोक्यावरून गेल्याचे सांगितले. माझ्या वाचनानंतर मात्र डॉ. रेग्यांनी तो प्रबंध तपासायला सुरुवात केली. पुढे कित्येक दिवस ते नियमितपणे त्या प्रबंधाचे वाचन करत आणि बारीकसारीक टिपणे काढत. अधूनमधून मला एखाददुसरा प्रश्न विचारत आणि अधुनमधुन मला टिपणे वाचायला देत. अगदी विरामचिन्हांच्या चुकांपासून त्यांनी त्या प्रबंधाच्या सर्व नोंदी त्यांच्या टिपणांमध्ये ठेवल्याचे मी स्वत: बघितले होते. तो प्रबंध तपासून झाला आणि त्यांनी तो टिपणांसह त्यांच्या टेबलावरच्या एका पुस्तकांच्या चळतीमध्ये ठेऊन दिला. ...नंतर बरेच दिवस गेले. एक दिवस अचानक मला भलतीकडून डॉ. रेग्यांनी राजीनामा दिला असल्याचे कळले. ती बातमी ऐकून मला धक्का बसला कारण रोज अनेक विषयांवर एकत्र गप्पा मारताना डॉ. रेग्यांनी राजीनाम्याविषयी ताकास तूर लागू दिला नव्ह्ता. दोन दिवसांनी मी त्यांना हिय्या करून ऐकल्याचे खरे आहे का विचारले, तेव्हा त्यांनी हो असे सांगितले. अमुक अमुक तारीख माझा शेवटचा दिवस आहे, असेही मग म्हणाले. मला तेव्हा अचानक त्या पीएचडी प्रबंधाची आठवण झाली आणि मी डॉ. रेग्यांना विचारले, "तुम्ही त्या पीएचडी थेसिसचे काय केलेत?" त्यावर एकदम दचकून मला म्हणाले, "अरे, बरं झालं तू आठवण केलीस". असं म्हणून तो थेसिस त्यांनी शोधून काढला आणि कंप्युटरवर संबंधित विद्यार्थाच्या मार्गदर्शकाला पत्रवजा रिपोर्ट लिहून तयार केला. ते पूर्ण झाल्यावर त्याची एक प्रत छापून मला वाचायला दिली. त्या एक पानी अहवालाचा गोषवारा असा होता - "मी मूलत: इलेक्ट्रीकल इंजिनिअर असून माझी स्वत:ची पीएचडी अमुक विद्यापीठातून अमुक विषयात केली आहे. त्यानंतर माझी सर्व करीअर टेलीकम्युनिकेशन या विषयात आहे. सध्या मी भारतात मात्र या या विषयात काम करत आहे. केवळ यास्तव हा प्रबंध माझ्याकडे तपासण्यासाठी पाठविण्यात आला असावा, असा माझा अंदाज आहे." "या प्रबंधात एकूण चार प्रकरणे असून त्यातील चवथ्या प्रकरणाचा संबंध दुरान्वायाने माझ्या सध्या चालू असलेल्या संशोधनाशी लावता येईल. त्यामुळे पहिल्या ३ प्रकरणांवर मी भाष्य करणे योग्य ठरणार नाही. मात्र चवथ्या प्रकरणात मला पीएचडी देण्यालायक काहीही दिसले नाही. याची कारणे पुढीलप्रमाणे ..." "तरीही या प्रबंधाच्या बाकीच्या परिक्षकांना या प्रबंधाची पहिली ३ प्रकरणे पीएचडी देण्या योग्य वाटली तर या विद्यार्थाला अवश्य पीएचडी देण्यात यावी" हे वाचल्यावर मला हसु आलं आणि मी ते पत्र डॉ. रेग्यांना दिल्यावर त्यांनी ताबडतोब सही करून लिफाफ्यात घालून ते सीलबंद करून संबंधित विद्यापीठाला पाठवून दिले...
  • Log in or register to post comments
  • 743 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com