Ee Sala Cup Namde अखेर सत्यात उतरले..

सुजित जाधव's picture
सुजित जाधव in जनातलं, मनातलं
8 Jun 2025 - 12:49 pm

तुम्ही फक्त किडनी, लिव्हर आणि दिलच जिंकू शकता आयपीएल ट्रॉफी तुमच्या नशिबात नाही.. विराट कोहली आरसीबीसाठी पनौती आहे त्याच्यामुळे आरसीबी ट्रॉफी जिंकत नाहीये.. विराटने एकतर टीम बदलावी किंवा आयपीएल खेळणे सोडून द्यावे.. या आणि अशाच प्रकारे विराट, विराट फॅन्स आणि आरसीबीला ट्रोल केले गेले, मजाक उडवला गेला, सल्ले दिले गेले. १८ वर्षे, तब्बल १८ वर्षे आरसीबी एका आयपीएल ट्रॉफी साठी झगडत होती, चाहते तळमळत होते. यादरम्यान २- ४ वेळेस आरसीबी जेतेपदाच्या अगदी जवळ सुद्धा गेली पण कधी नशीब तर कधी समोरील संघाच्या चांगल्या कामगिरीमुळे त्यांना ट्रॉफीने हुलकावणी दिली. दरवर्षी आयपीएलचे नवीन पर्व सुरू झाले की आरसीबी यावर्षी तरी ट्रॉफी जिंकणार का हा प्रश्न हमखास चर्चेत यायचा. आरसीबीने साखळी फेरीत चांगली कामगिरी केली तर चाहत्यांच्या अपेक्षा उंचावायच्या, विराट व इतर खेळाडूंच्या कामगिरीची वाहवा व्हायची. पण एलिमिनेटर मध्ये हार पत्करावी लागायची आणि पुन्हा तेच ते निराश चेहरे, ट्रोलींगचा खेळ सुरू व्हायचा.

पण १८ वर्षांनंतर ३ जून २०२५ हा सुवर्णदीन उगवला आणि आरसीबी व विराट कोहलीचे चाहते, क्रिकेटचा किंग विराट कोहली या सर्वांनी मिळून जे स्वप्न पाहिले होते ते सत्यात उतरले. १९ व्या षटकात पहिले दोन चेंडू निर्धाव गेल्यानंतर जेव्हा बेंगलोरचा विजय पक्का झाला तेव्हा विराटने इतकी वर्षे ज्या दुःखाच्या अश्रूंना साठवून ठेवले होते त्यांना सुखाच्या अश्रूंसोबत वाट मोकळी करून दिली.

afsdg

लीग क्रिकेट मधील सर्वाधिक लोकप्रिय असलेली आयपीएल ट्रॉफी मुंबई व चेन्नई संघांनी प्रत्येकी पाच वेळा तर कोलकाताने तीन वेळा जिंकलीये पण जितकी चर्चा या संघांच्या विजयाची झाली नाही त्याहून अधिक चर्चा आरसीबीच्या पराभवाची आणि आता विजयाची होतीये. यापाठीमागील प्रमुख कारण भारतीय क्रिकेटचा झळाळता तारा आणि क्रिकेटचा बादशहा विराट कोहली या संघाचा भाग असणे. विराट कोहलीने या संघासाठी सर्वकाही दिले, प्रत्येक हंगामात तो तुफान फलंदाजी करून संघाच्या विजयांत मोलाचा वाटा उचलायचा. त्याच्या सोबत क्रिकेट करिअर आणि आयपीएल खेळायला सुरुवात केलेल्या खेळाडूंनी एकतर क्रिकेट खेळणं थांबवलं किंवा संघ बदलले पण विराट कोहली १८ वर्षांपासून एकाच संघाकडून खेळतोय. यंदाचा ट्रॉफी विजय त्याच्या loyality, hardwork आणि dedication ची tale आहे असंच म्हणावं लागेल. विराट शिवाय एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल, अनिल कुंबळे, राहुल द्रविड, ग्लेन मॅक्सवेल, जॅक कॅलिस, डॅनियल व्हिटोरी सारखे दिग्गज या संघाकडून खेळलेत. या ट्रॉफी विजयाचं स्वप्न यावर्षी आरसीबी कडून खेळलेल्या खेळाडूंप्रमाणेच या दिग्गजांनी सुद्धा कधीतरी पाहिलं होतं. या सर्व कारणांमुळेच बेंगलोरच्या संघाने एकदातरी आयपीएल ट्रॉफी जिंकावी अशी प्रत्येक चाहत्याची मनोमन इच्छा होती.

dsfgbe

विराट कोहलीच्या ट्रॉफी कॅबिनेट मध्ये आयसीसी टी 20 विश्वचषक, आयसीसी 50-50 विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी, अंडर 19 विश्वचषक, टेस्ट क्रिकेट मेस यासारख्या सर्व प्रमुख ट्रॉफीज होत्या. आयसीसी प्लेअर ऑफ दि इयर, आयसीसी प्लेअर ऑफ दि डिकेड, आयसीसी क्रिकेटर ऑफ दि इयर सारखे प्रतिष्ठित किताब तर त्याच्याकडे भरभरून आहेत. मात्र, त्याच्या करिअरमध्ये एकच गोष्ट अपूर्ण होती—आयपीएल ट्रॉफी. ही ट्रॉफी केवळ एक विजय नाही, तर त्याच्या अखंड समर्पणाचा आणि क्रिकेटमधील अमूल्य योगदानाचा सन्मान आहे. आता त्याच्या करिअरला 'पूर्णत्व' मिळाले असे म्हणणे योग्य ठरेल.

क्रीडालेख