बाजारगप्पा-भाग-१

मारवा's picture
मारवा in जनातलं, मनातलं
26 May 2024 - 6:12 pm

खुलासा

सर्वप्रथम मी सेबी अधिकृत सल्लागार नाही. दुसरे म्हणजे या लेखात व्यक्त झालेली ही सर्व माझी व्यक्तिगत मते व अनुभव आहेत. यावर आधारीत जर काही केले तर ते आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर आणि ट्रेडींग मध्ये असलेल्या धोक्याची जाणीव ठेउन करावेत. तुमच्या निर्णयांची जबाबदारी सर्वस्वी तुमचीच राहील. तर आता हात झटकुन झाल्यानंतर मी हातवारे करत तुम्हांस माझे अनुभव शेअर करतो कदाचित कोणांस उपयोग झाला तर होइल.

काही सार्वकालिक मुलभुत बाजारु सत्ये

सुरुवात मी गेली काही वर्षे सातत्याने केलेल्या ट्रेडींग मधुन आलेले स्वतःचे बरे वाईट अनुभव व काही निरीक्षण,वाचन, चिंतन व महाजनां बरोबर झालेल्या सत्संगातुन गवसलेली अशी काही बाजारा व ट्रेडींग संदर्भातील सत्ये इथे मांडतो. (महाजन हा शब्द एक सोय म्हणुन पुढे ही वापरेल याचा अर्थ बाजारातींल यशस्वी मंडळी आडनाव नव्हे)

१- बाजार १००% आकलनीय/अंदाज करण्यालायक नाही तसेच बाजार १००% अनाकलनीय/ अंदाजालायकच नाही असेही नाही.

नवा भिडु जेव्हा ट्रेडींग च्या खेळात पहिल्यंदा येतो तेव्हा त्याचे दोन मोठे भ्रम असतात. पहीला भ्रम म्हणजे बाजार हा १००% आकलनीय आहे. म्हणजे नभि समजतो की एक गुप्त आपल्यापासुन लपवण्यात आलेली strategy नक्कीच काही मोठ्या लोकांकडे आहे जी आपल्याला शोधुन काढायची आहे इतकेच आपले काम ती एकदा मिळाली की आपण राजीनामा देणारच्/गंगेत घोडे न्हालेच/ वगैरे. त्या strategy ने आपण प्रत्येक स्टॉक वर जाईल की खाली आणि नेमका किती वर/खाली याचा १००% छडा लावु और बस फिर क्या ?. यासाठी नभि मग एकामागोमाग युट्युब व्हिडीयोज, कोर्सेस, गुरु,पुस्तके सर्व काही शोधतो त्यात त्याला सापडलीच यावेळी-काही काळ वापरुन-पैसे गमावुन- चालत नाही- नविन शोधु या ती ही नव्हेच-मग पुन्हा दुसरी-काही काळ वापरुन..... अशा दुष्टचक्रात अडकतो. चक्राचे प्रत्येक नविन आवर्तन त्याचा बहुमुल्य वेळ, चिक्कार मानसिक/शारीरीक श्रम व पैसा बरबाद करत जाते. व आवर्तनागणिक नभि कोलमडत उध्वस्त होत जातो. ( यात एक मटका फॅक्टर कधी कधी थोडा काळ साथ देते पण कायम नाही त्याने थोडा दिलासा वा फसवे यश दिसु शकते पण ते टिकाऊ नसते ) तर हे वरील वाक्यातील पहीला भागाच्या अज्ञानातुन होते. म्हणजे नभि समजत असतो की बाजार १००% आकलनीय आहे त्याचा १००% अंदाज बांधता येतो स्टॉक १००% सांगता येतो की वर जाईल की खाली. पण ते सत्य नाहीच. मग आता आपला नभि हा निराश होतो. आणि तो दुसर्‍या भ्रमाच्या तावडीत सापडतो. ते असे की मार्केट १००% अनाकलनीय आहे. तो सर्वांना सांगतो " अरे काही नाही रे सट्टा आहे सट्टा यात काहीच म्हणजे काहीच खरं नाही. हा वरील भ्रमाच्या बरोब्बर विरोधी भुमिका आहे.

आता बाजारा चा ज्याने काही काळ अनुभव घेतलाय त्याला अर्थातच दोन्ही भ्रमांचा सहजच साक्षात्कार होतो. पण तरी एक पुरावा म्हणुन एक मांडणी बघा. जर बाजाराचे एकच एक असे सत्य असते एकच एक strategy असती तर यशस्वी होणारे सर्व ती एकच strategy वापरत असते. पण बाजारात प्रत्यक्षात तसे आढळुन येत नाही.
इथे ज्यांनी मोठे यश संपादन केलेले आहे अशामध्ये इतके वैविध्य आढळते की काही १ मिनिट टाइमफ्रेम वर काही अगदी काही मिनिंटांसाठी ट्रेड घेतात. काही फक्त १ दिवसाच्या आत काम करणारे intraday traders करतात. काही swing tradres असतात काही आज विकत घेतला तर काही वर्षे स्टॉक सांभाळतात. सर्व प्रकारात यशस्वी मंडळी आढळतात.

बरे हे तर time frame चा फरक वेगवेगळ्या असंख्य नाना प्रकारांनी Trading Thought Schools आणि strategies आहेत. वेगवेगळे वादी आहेत. काही indicators वादी असतात. त्यांच्या ठराविक indicators नेच ते ट्रेड करतात. काही मंडळी price action वादी असतात त्यांच्या मते indicators सब झुट आहे. काही कमालीच्या किचकट अशा Gaan Square किंवा इलियट वेव्ह च्या आधारानेच ट्रेडींग करतात. काही institutional smart money चा आधार घेऊन काही algos वापरुन व्यक्ति तितक्या प्रवृत्ती च्या चालीवर व्यक्ति तितक्या strategies आहेत. व सर्वच वापरणारे यशस्वी होतात. म्हणजे एकच एक अशी कुठलीच Holy Grail कधीच नसते. असे असते तर ती फक्त शोधणे इतकेच काम बाकी होते पण असे नाहीये.

दुसरे म्हणजे जर काहीच अंदाजालायक नसते वर सगळेच पुर्णतः अनाकलनीय असते तर सातत्याने इतकी वर्षे कोणीच यशस्वी होऊ शकले नसते वा सर्वांनी एक दिवस
ट्रेडींगच बंद केली असती. पण सातत्याने यशस्वी होणारे व दिर्घकाळ काम करणारे महाजन आहेत याचाच अर्थ ते एका मर्यादेपर्यंत नक्कीच आकलनीय आहे. अर्थात तुम्ही स्वतः याचा अनुभव घेऊ शकता. आणि जे काय यशस्वी होण्यासाठी लागते ते केवळ strategy नसुन त्याच्या व्यतिरीक्त ही काहीतरी आहे ज्यावर काम करणे आवश्यक आहे.

तर वरील विवेचनावरुन आपण दोन निष्कर्ष काढु शकतो ते असे की

अ-आपण एका सत्याचा स्वीकार करावा की १००% काम करणारी अचुक परीपुर्ण अशी कोणतीच गोष्ट्च अस्तित्वात नाही या मर्यादेचा सहर्ष स्वीकार करावा.
ब -दुसरे म्हणजे एका मर्यादेत जितके शक्यआहे आकलनीय आहे त्यावर आपल्याला काम करायचे आहे. म्हणजे इतर आपल्या कुवतीतील घटकांवर काम करायचेय.

तुम्ही कल्पना करु शकत नाही की हे इतके जरी केले तरी बरेच श्रम वेळ पैसा नक्कीच वाचतील.

२- एक शांती और एक ट्रेडर कभी दोस्त नही बन सकते ( मुळ प्रेरणा जुने बॉलिवुड एक लडकी और एक लडका कभी........)

कल्पना करा की एक रम्य शांत तळे आहे. मग्न तळ्याकाठी तुम्ही शांती बरोबर बसलेला आहात. आणि तुम्ही नुस्ताच काय बसु या नेहमीच्या सवयीने तळ्यात एक खडा टाकला तर काय होणार ? तळ्यात तरंग उठतील एकामागोमाग. तसेच तुम्ही जेव्हा एक ट्रेडखडा टाकला की काय होते ? म्हणजे तुमच्या मानससरोवरात फक्त तीनच शक्यता आणि तीन च संभाव्य परीणाम होतात.

१- तुम्ही विकत घेतलेला stock वर गेला की उठणार तरंग....तरंग... अजुन वर गेला की अजुन तरंग...आनंदाचे डोही आनंद तरंग ....
२- तुम्ही विकत घेतलेला stock खाली आला की उठणार तरंग.....तरंग..... राग-तरंग नैराश्य तरंग
३- तुम्ही विकत घेतलेला stock ना खाली ना वर गेला जागच्या जागी रेंगाळत राहीला की उठणार अस्वस्थतेचा तरंग....

पण तेच ते तेच ते तुम्ही बाजुला बघितले तर तुमच्या लक्षात येइल की शांती कधीचीच निघुन गेलेली आहे आणि तुम्ही तरंगाच्या मधोमध .......तर अशा तर्हेने तुमचे मानससरोवर सतत अस्थिर राहते. त्यात तुम्ही सत्य बघु शकत नाही शांती लाभत नाही. आणि ट्रेडींग मध्ये यशस्वी होण्यासाठी शांतीची साथ मिळणे आवश्यक पुर्वअट आहे. कारण यश हे पुर्णपणे तुमच्या मानस वर अवलंबुन आहे. कारण बघा जर तुम्ही अस्थिर आणि कंपित होत असाल तर तुम्ही लक्ष्याचा अचुक वेध म्हणजे योग्य ट्रेडींग निर्णय घेऊच शकत नाही. तुम्ही अनेक वेळा वाचले असेल की भय आणि लोभ हे दोनच घटक सर्वात महत्वाचे आहेत. तर पुर्ण शांती लाभणे ट्रेडरला तेव्हाच शक्य आहे जेव्हा तो ट्रेडींग पुर्णपणे बंद करतो त्याग करतो. किंवा जर कोणी योगी ( अध्यात्म फेम ) असेल तर च ते शक्य आहे. आपण फक्त सामान्य जन फक्त as much as possible हे धोरण ठेउन स्वतःच्या विकारांना नियंत्रित करु शकतो. इथे ही १०० % नियंत्रण करु हे फक्त आदर्श आहे.

यावरुन पुन्हा दोन निष्कर्ष निघतात

अ- शांती साध्य करण्यासाठी as much as possible हे धोरण ठेउन आपण आपले भय लोभ नियंत्रणात ठेवणे इतकेच आपल्या हातात आहे.
ब- वरील अ हा हेतु साध्य करण्यासाठी ची जी साधने आहेत त्यावर आपल्याला काम करायचे आहे.

आता पुढील भागात आपण नेमका काय उपाय करु शकतो याचे विवेचन करु नंतर पुन्हा इतर सत्यांकडे वळु असे करत करत जमेल तसे पुढे सरकत राहु या.

मांडणीअनुभव