आज काय घडले... पौष व. १२ वडगांव येथे इंग्रजांचा पराभव !

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
14 Feb 2021 - 11:31 am

marathe engrajआज काय घडले...

पौष व. १२

वडगांव येथे इंग्रजांचा पराभव !

शके १७०० च्या पौष व. १२ रोजी वडगांव येथे इंग्रज व मराठे यांचे युद्ध होऊन इंग्रजांचा पराभव झाला; आणि त्यांना मराठ्यांशी तह करावा लागला.

मुंचई प्रातात फ्रेंचांचे वर्चस्व वाढून ते पुण्याच्या दरबारांत सलोखा करीत आहेत असे दिसतांच इंग्रजांना वैषम्य वाटले. मराठ्यांच्या दरबारी फ्रेंचांचें वर्चस्व वाढले तर कंपनीच्या हितास मोठाच धक्का बसणार होता. तेव्हां त्यांच्या प्रतिकारासाठी कलकत्त्याहून इंग्रजी फौजा खुष्कीच्या मार्गाने मुंबईकडे येऊ लागल्या. मुंबईकरांच्या हाती असलेल्या राघोबास मराठ्यांच्या स्वाधीन त्यांनी केले नव्हतेच. या सर्व गोष्टी पुरंदरच्या तहाविरुद्ध होत आहेत असे पाहून मराठ्यांनाहि सामना देण्याचे ठरविले. नाना फडणीस आणि महादजी शिंदे या जोडीने जोरांत तयारी सुरू केली. इंग्रजांच्या फौजेत कर्नल इगर्टन, कार्नक व मॉस्टिन हे तीन अधिकारी होते. त्यांनी दादा व अमृतराव यांना घेऊन पनवेलखाली आपले सैन्य उतरवले. मराठ्यांचे सैन्य सावध होतेच. त्यांनी इंग्रजांना सतावून सोडण्यास सुरुवात केली. वडगांव येथे दोन्ही सैन्यांची गांठ पडली. त्या ठिकाणी निकराचा सामना होऊन इंग्रजांचा मोड झाला. तहनाम्याची बोलणी सुरू झाली. त्या वेळी महादजीने स्पष्ट बजाविलें,'पुरंदरचा तह तुम्ही मोडला आहे. प्रथम रघुनाथरावांस स्वाधीन करा आणि मग बोला. आम्हांस लढाईचा बाऊ दाखवू नका. त्याची आम्हांला मुळीच परवा नाही. या ठिकाणी नवीन तह केल्याखेरीज आम्ही तुम्हांस परत जाऊ देणार नाही!" तेव्हां तहाच्या वाटाघाटी झाल्या. 'दादास स्वाधीन करावे, साष्टी, ठाणे, उरण, गुजराथचे महाल इंग्रजांनी मराठ्यांना परत करावेत, दादापासून दस्तऐवज परत द्यावेत...' याप्रमाणे पौष व. १२ ला वडगांव येथे तह ठरला. आणि नंतर इंग्रज फौजेस परत जाण्यास परवानगी मिळाली. यासंबंधी इंग्रज रिपोर्टर लिहितो.--" करार पुरा होऊन मराठ्यांच्या अंगचे औदार्य व नेमस्तपणा यांचा लगोलग अनुभव इंग्रजांना आला. जिंकलेल्या शत्रूना इतक्या सवलतीने वागविल्याची उदाहरणे क्वचितच सांपडतात.
-१३ जानेवारी १७७९

इतिहास