मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लॉकडाऊन : पंधरावा दिवस

हेमंतकुमार · · काथ्याकूट
नमस्कार. आज कर्दनकाळ कोविदने लादलेल्या टाळेबंदी आणि मर्यादित संचाराचा १५ वा दिवस. अत्यावश्यक सेवक वगळता आपण बहुतेक जण घरच्या तुरुंगात बंदिस्त झालो आहोत. तसे आपण कधी ना कधी आजारी पडतो. त्या दरम्यान आपल्याला घरात सक्तीने रहायची सवय असते. पण ती तशी मोजक्या दिवसांची असते. असा आजार जर मध्यम स्वरूपाचा असेल, तर आपण औषधे घेऊन आपल्या कामावरसुद्धा जात असतो. सध्याचा प्रकार मात्र वेगळाच आणि गंभीर आहे. समाजातील बरेच जण त्या घातक आजाराने त्रस्त आहेत. हा आजार साधासुधा नसून तीव्र गतीने फैलावणारा आहे. त्यामुळे हा आजार आपल्याला होऊ नये म्हणून आपण बंदिस्त झालेलो आहोत. कालच जागतिक आरोग्यदिन होता. त्या निमित्ताने मी आपणा सर्वांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देतो. कधी नव्हे इतकी सध्या आपल्याला अशा शुभेच्छांची गरज आहे. सध्या आपण एक विचित्र प्रकारची सामाजिक शांतता अनुभवत आहोत. शहरी जीवनात तर ही अभूतपूर्व अशीच आहे. एरवी सकाळी ७ ते रात्री १२ पर्यंत आसमंतात असंख्य आवाज चालू असतात. ते मुख्यत्वे वाहनांचे असतात. छोट्या दुचाकीपासून ते ट्रकपर्यंत असंख्य वाहने रस्त्यावरून दौडत असतात. त्यांच्या इंजिनांचा आवाज स्वाभाविक आहे. पण गरज नसताना वाजवले जाणारे कर्कश हॉर्न, सिग्नलला थांबले असताना उगाचच बुंग बुंग असा accelerator ताणणारे वाहनचालक अशा अनेक कृतींतून बरेच ध्वनीप्रदूषण होत असते. रेल्वे आणि विमानांचे आवाजही सभोवतालचा परिसर दणाणून टाकतात. आपल्याकडे कुठे ना कुठे ध्वनिवर्धक लावून खाजगी, सांस्कृतिक अथवा सामाजिक कार्यक्रम नियमित चालूच असतात. अशा सर्व कार्यक्रमांना आवाजाच्या पातळीचे आणि वेळेचे निकष ठरवून दिलेले आहेत खरे. पण वास्तवात ते पाळले जातातच असे नाही. किंबहुना ते नियम मोडण्याकडेच काहींचा कल असतो. एकूण काय तर आपण सतत आवाजमय दुनियेत वावरत असतो. काही जण तर सतत कानठळ्या बसवणाऱ्या वातावरणात वावरत असतात. असे काही लोक ठराविक ध्वनीलहरींना बहिरे झालेले असतात. आवाजाच्या जोडीला आपली दुसरी समस्या आहे ते म्हणजे प्रमाणाबाहेर गेलेले हवेचे प्रदूषण. हे होण्यात कारखाने आणि सर्व प्रकारच्या स्वयंचलित वाहनांचे योगदान आहे. या सगळ्यातून होणारी कर्बउत्सर्जन पातळी आज भयावह झालेली असून त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम दिसू लागला आहे. असे दिसते की या विषयावर लेखन, चर्चा, परिसंवाद आणि परिषदा अगदी भरपूर होतात पण, सर्वात गरजेची असलेली कृती मात्र अत्यल्प असते. बहुतेक सगळा मामला ‘लोका सांगे...’ असा असतो. सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्याने खाजगी वाहनवापर प्रचंड वाढत गेला. आता त्याला आवर घालणे हे महाकठीण झाले आहे. तरी पण काही प्रमाणात आपण वाहन संयम बाळगावा असे आवाहन बरेचदा केले जाते. त्यानुसार अधूनमधून कृतीच्या छोट्या लाटा येतात अन लगेच त्या विरूनही जातात. कधी आपण ‘बस डे’ अनुभवतो, कधी सायकलची प्रभातफेरी पाहतो तर कधी पाच वर्षातून एखाद्याच दिवशी आपले काही अत्यल्प खासदार संसदेत सायकलवरून जाताना फोटोत पाहतो ! पण अशी कृती ही नियमित स्वरुपात सर्वांकडून झाली तरच त्याचा फायदा होईल. यासाठी एक सोपा उपाय मी बरेचदा सुचवतो. तो म्हणजे प्रत्येक वाहनचालकाने आपले वाहन आठवड्यातून फक्त एक दिवस रस्त्यावर आणायचे नाही. यासाठी समाजात विविध गट करून आठवड्याचे वार वाटून घेता येतील. मी गेली २० वर्षे हे आचरणात आणल्यावरच हे आवाहन करीत आहे. वाहनांवर कायद्याने सम-विषम योजना लादा, मग त्यात अपवाद आणि पळवाटा शोधा, असले काही होण्यापेक्षा हा संयम उत्स्फूर्तपणे व्हावा हे बरे. बाकी विमानांमुळे होणारे प्रदूषण तर अतिप्रचंड आहे. हे माहित असूनसुद्धा व्यक्तिगत खाजगी मालकीच्या विमानांची संख्या जगभरात वाढतेच आहे, अशा बातम्या वाचल्या की मन उद्विग्न होते. अशा विमानांतून केवळ २-३ व्यक्तीच एका वेळेस प्रवास करतात हे पाहून मनोमन खिन्नता येते. सध्या आपली कर्कश आवाज आणि प्रदूषण या दोन्ही समस्यांपासून काही काळ तरी सुटका झाली आहे खरी. आताच्या शांततेत अजून एका महत्वाच्या मुद्द्यावर चिंतन केले. तो म्हणजे आपली जीवनशैली. याचा विचार करताना आपण विद्यार्थी आणि सेवानिवृत्तांना थोडे बाजूला ठेवू. म्हणजेच नोकरी वा व्यवसायात कार्यरत असणाऱ्यांचा विचार करू. चांगले आरोग्य आणि मनस्वास्थ्य हवे असेल तर जीवनशैली कशी असावी हा प्रश्न स्वाभाविक आहे. याचे एकच असे उत्तर असणार नाही याची मला कल्पना आहे. मतभिन्नता राहीलच. तरीसुद्धा या संदर्भात एक विचार नोंदवतो, जो मी काही समाज अभ्यासकांच्या लेखांत वाचला आहे. एका दिवसाचे तास २४. त्याची साधारण विभागणी अशी सुचवली आहे: १. व्यावसायिक कामाचे तास ८ ( कामाच्या स्वरूपानुसार अधिक १) २. झोपेचे तास ८ (वयानुसार अधिक/ उणे १) ३. उरलेले तास हे कुटुंबासाठी अर्थपूर्ण वेळ देण्यासाठी. थोडक्यात ८ x ३ = २४ अशी ही त्रिसूत्री सुचवली गेली आहे. सध्या विचार करायला वेळच वेळ मिळाला आहे. म्हणून सहज मी साधारण ३० वर्षांपूर्वीचे चित्र मनात आणले. अत्यावश्यक सेवा वगळता ते असे होते: १. बहुतेक नोकरदार सकाळी ९ ( किंवा १०) ते संध्या. ५ – ५.३० अशा वेळाच्या नोकऱ्या करत. त्यामुळे घरी सामान्य वेळेत पोहोचत. >> लवकर झोपी जाणे >> सलग छान झोप >>> लवकर उठणे >> व्यवस्थित व्यायाम वगैरे. २. तेव्हाचे काही व्यावसायिक पहा. ९ ते १ काम >>> जेवायला घरी >>> तासभर झोप आणि घरासाठी वेळ >> ५ ते ९ काम >> व्यवसाय बंद व घरी >>> थोडे उशीरा झोपणे व थोडे आरामात उठणे; पण सलग झोप >> उत्साहात व्यायाम. सध्याचे सर्वसाधारण चित्र आपणा सर्वांपुढे आहे. त्याचे आत्मपरीक्षण करूया इतकेच म्हणेन. फक्त एक जुनी आठवण लिहितो. अंदाजे २० वर्षांपूर्वीची. शिवाजीराव भोसलेंचा एक लेख वाचला होता. त्या दरम्यान औद्योगीकरणाने प्रचंड वेग घेतला होता. ‘नऊ ते पाच’ ही संकल्पना मोडीत निघत होती. काम, काम आणि काम हाच आयुष्याचा मूलमंत्र होत होता. या परिस्थितीवर त्यांनी लिहिलेले काही विचार माझ्या शब्दात लिहितो: “ सध्या बघावे तिकडे आणि केव्हाही एकच दृश्य दिसतंय. प्रत्येक जण एकतर कुठून तरी निघालेला आहे, नाहीतर प्रत्येकाला कुठेतरी पोचायची तरी घाई आहे. कोणीही थांबलेला असा नाहीच. सकाळी ७ची वेळ असो अथवा रात्री १०ची, शांतपणे एखाद्याशी आपण फोनवर तरी बोलू शकतोय का? माणसे पळताहेत, वाहने धावताहेत .... वेग, वेग आणि वेग... बस्स हेच आयुष्य झालंय खरं”. सध्याच्या बंदिवासात आपल्या अशा भरधाव वेगाला एक करकचून ब्रेक लागलाय खरा – एका नैसर्गिक आपत्तीमुळे. इथून पुढे तो वेग नियंत्रित करावा की नाही, यावर आपण शांतपणे विचार करू शकू. स्पर्धा आणि मनःशांती यांचा समतोल साधता आला तर आपण मनापासून आनंदी असू. मग जगातील ‘आनंदी लोकांचा देश’ या सारखी सर्वेक्षणे करायची गरजही संपू शकेल. सन १९९९ संपून जेव्हा २००० सुरु झाले तेव्हाचा जागतिक जल्लोष आठवतो. तेव्हा अनेक उपक्रम राबवले गेले आणि प्रकल्प आखले गेले. तेव्हा मी फक्त एक छोटे काम केले. दुकानातून एक दैनंदिनी-वही घेऊन आलो. तिच्या एका पानावर एक दिवस अशी छापील आखणी आहे. पण मी ती वही वेगळ्या कामासाठी वापरायचे ठरवले. आपल्या रोजच्या जगण्यात आपल्याला जे जे आवडेल ते त्यात लिहून ठेवायचा संकल्प केला. सुरवातीस ते अगदी विस्कळीत स्वरुपात झाले. पुढे त्याचे व्यवस्थित वर्गीकरण केले. ती सदरे अशी आहेत: १. आवडलेली वाक्ये २. आवडत्या कविता ३. वाचलेल्या पुस्तकाचा सारांश ४. पाहिलेल्या नाटक वा चित्रपटाचा सारांश ५. भाषेतील मनोरंजक गोष्टी, आणि ६. संकीर्ण अशा प्रकारच्या या आठवणी अधूनमधून वाचायला मजा येते. सध्या तर या वाचनाची पारायणे होताहेत. आता आपल्याला एका उदासीने व्यापलेले आहे. एकीकडे आपण घरकामे आणि छंदांत मन रमवित आहोत, पण तरीही मनावर मळभ दाटलेलेच आहे. सध्याचे संकट आज ना उद्या दूर होईलच, पण यानिमित्ताने आपण स्वसंवाद करायला शिकलो. आता आपण आयुष्यावर स्वतःशीच बरेच काही बोलत आहोत. “जगाचे कोणावाचूनही अडत नाही, कशासाठी ही धडपड, सगळेच मिथ्या आहे... वगैरे”, यासारखे विचार अधूनमधून मनात येत आहेत. किंबहुना असे वातावरण यासारख्या विचारांना भयंकर पोषक असते ! त्याला अनुसरून माझ्या वहीत लिहिलेला महाभारतातील एक संवाद लिहून या मनोगताचा समारोप करतो. ..... यक्षाने युधिष्ठिराला विचारलं, “जगातली सर्वात मोठी विसंगती कोणती?” युधिष्ठिर म्हणाला, “सर्वत्र आणि कधीही पेटणाऱ्या चिता दिसत असूनही मी आणि माझे आप्तेष्ट चिरंजीव आहेत असं गृहीत धरूनच माणूस जगत असतो, हीच सर्वात मोठी विसंगती आहे”. *******************************************************************

वाचने 42081 वाचनखूण प्रतिक्रिया 67

कंजूस 08/04/2020 - 07:24
आवडला लेख. तुम्हाला 'काय करू, वेळ कसा घालवू' हा प्रश्न पडत नसणार. फक्त यांतलं काय करू असा असावा. एकूण या विषाणूने पृथ्वीवर अधिपत्य गाजवू पाहणाऱ्या मनुष्य प्राण्याचा माज उतरवला आहे. "अरे मूर्खा अंतराळातली उडी सोड, आधी धरेवरचं निश्चित कर." मीसुद्धा डायरीत लिहितो भटकंती वर्णन. पण माझे अक्षर फारच वाईट आहे. "पुढे कोणी वाचणार नाही" या अभिप्रायामुळे उपक्रम कधी सुरू केला नाही. एक उपाय आहे - ब्लॉगवर लिहून ड्राफ्ट ठेवायचा, पब्लिश करायचं नाही.

मदनबाण 08/04/2020 - 09:37
एकूण काय तर आपण सतत आवाजमय दुनियेत वावरत असतो. अगदी ! अवांतर :- महाराष्ट्रातील मोगलाई...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- फेसबुक पोस्ट का टाकली ?, जाब विचारत आव्हाडांच्या बंगल्यात अभियंत्यास बेदम मारहाण !

In reply to by मदनबाण

चौथा कोनाडा 08/04/2020 - 12:32
खूपच दुर्दैवी. आता जाणत्या नेत्यांपासून ते संबंधित यंत्रणेचे कर्मचारी काय कृती करतील या बद्दल उत्सुकता.

हेमंतकुमार 08/04/2020 - 09:59
ब्लॉगवर लिहून ड्राफ्ट ठेवायचा, पब्लिश करायचं नाही. >>> +११ म बा >> आवाज ऐकले !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 08/04/2020 - 11:17
छान लेखन आवडले. आवडलेल्या कविता, ओळी, कधीतरी लिहून ठेवतो. आपल्याला पुन्हा पुन्हा ते सर्व वाचल्यानंतर आनंद देतात. महाभारतातील शेवटच्या ओळी आवडल्या. लॉकडाऊनच्या निरोपांच्या दिवसांकडे आपण हळुहळु जातोय, अर्थात लॉकडाऊन लांबेल की राहील माहिती नाही. परिस्थिती तर अशी दिसते की लॉकडाऊन लांबवावेच लागेल असे दिसते. मूर्खपणे रस्त्यावर उतरलेले लोक टीव्हीवर पाहता आज पंधरा दिवस होत आहेत, पण त्यांना कर्फ्यु वगैरे काही असतो त्याची अक्कल आलेली नाही असे दिसते. सोशीयल डिस्टंस अजूनही लोक पाळत नाही, याचं चित्र पाहून वाईट वाटतं. अतिशय आवश्यक आहे, तेव्हा रस्त्यावर एकट्याने येणे हे सांगावे लागते.लोक समूहाने मॉर्निंग वॉक, दुधा किराणा सामानाचे निमित्त करुन रस्त्यावर दिसतात. गंभीर म्हणून काही नसतं, शिस्त पाळायची नसते हे आपण सामान्य जनतेने ठरवलेले असते. सर्व जवाबदारी सरकारची आपली काहीच जवाबदारी नसते असे वाटले. बाकी, रुटीन पंधराव्या दिवशी रामायण महाभारत पुराणे वगैरे अधेमधेच चाळतो आहे. टीव्ही पाहणे कमी केलं आहे. सर्वात मोठी बातमी म्हणून प्रत्येक मिनिटाला आपल्याला टीव्हीसमोर बसवून ठेवण्याच्या त्या फंड्याचाही आता कंटाळा आला आहे. औरंगाबादेत वाढणारी रुग्णसंख्या चिंता वाढवणारी आहे,. मिपावर पडीक आणि बुद्धीबळ हा पूर्ण टाईमपास आहे. मिपावर आणि धाग्यावर असेनच. आलोच. -दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा 08/04/2020 - 12:07
१. बहुतेक नोकरदार सकाळी ९ ( किंवा १०) ते संध्या. ५ – ५.३० अशा वेळाच्या नोकऱ्या करत. त्यामुळे घरी सामान्य वेळेत पोहोचत. >> लवकर झोपी जाणे >> सलग छान झोप >>> लवकर उठणे >> व्यवस्थित व्यायाम वगैरे. २. तेव्हाचे काही व्यावसायिक पहा. ९ ते १ काम >>> जेवायला घरी >>> तासभर झोप आणि घरासाठी वेळ >> ५ ते ९ काम >> व्यवसाय बंद व घरी >>> थोडे उशीरा झोपणे व थोडे आरामात उठणे; पण सलग झोप >> उत्साहात व्यायाम.
हा प्रकार खुपच भारी होता, मी साधारणपणे १९९० पर्यंत हे सुख अनुभवले. स्त्रियांची नोकरी देखील तशी मर्यादित आणि सुखाची होती ! १९९० नंतर चित्र बदलू लागले,संगणकामुळे २०००-२००५ नंतर तर जीवनाला भयानक वेग आला. स्मार्ट टेक्नॉलोजी आली, कामाचे तास सैलावले. स्पर्धा आली. आता तर मशिन लर्निंग, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि ऑटोमेशनमुळे दैनंदिन क्रमावर नियंत्रण रहिले नाहीय. सध्या या स्पर्धायुगात काही करियरीस्टिक महिलांचे हाल बघवत नाहीत.

हेमंतकुमार 08/04/2020 - 12:36
गीता रामजी : आदरांजली जगातील ख्यातनाम विषाणूशास्त्रज्ञ असलेल्या गीता रामजी यांचे नुकतेच कोविद-१९ मुळे निधन झाले. जोहान्सबर्ग येथे ऑरम इन्स्टिटय़ूट ही सेवाभावी संस्था एड्स व क्षयरोगावर संशोधन करीत आहे. त्याच्या त्या मुख्य वैज्ञानिक अधिकारी होत्या. एचआयव्ही प्रतिबंधाच्या अनेक साधनांच्या चाचण्या करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 08/04/2020 - 13:36
मला देशद्रोही म्हणालात तरी हरकत नाही; पण मोदीजी, तुम्ही चुकलात हे मान्य करा - कमल हासन राष्ट्रहित लक्षात घेऊन देशाची उन्नती हवे असणारे आवाज कुठूनही आले की त्यांना तात्काळ चिरडून टाकण्यासाठी आणि त्यांची बदनामी करण्यासाठी आपली ट्रोल आर्मी तुटून पडते आणि अशा आवाजांना राष्ट्र-विरोधी करारही दिला जातो. या प्रकारच्या मोठ्या संकटासाठी जर सामान्य लोकसंख्या तयार नाही तर यासाठी त्यांना दोषी ठरवता येऊ शकत नाही. कोणत्याही महामारीचा सामना थाळी आणि दिवे घेऊन करणं हे खूपच उथळ होतं. नक्की काय आहे कमल हासन यांच्या मनातील खदखद? सविस्तर वाचा - https://hellomaharashtra.in/political-news/kamal-haasan-letter-to-pm-modi/
आत्ताच कमल हसनचं हे पत्र वाचलं. विचार पटण्यासारखे वाटले. सर्वांनाच पटले पाहिजे असे काही नाही. बाकी, मला कमल हसनचा 'सदमा' आणि ’पुष्पक’ मूक सिनेमा आवडतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सोयीस्कर विचार पटणारंच हो सर. बाकी वरती बाणाने दिलेल्या लिंकांवर तुमची शांतता आणि इथे उच्चारवाने मांडत असलेले मोदी / सरकारविरोधी विचार हे अगदीच अपेक्षित होत आहे. अर्थात सर्वांनाच पटले पाहिजे असे काही नाही.

In reply to by मोदक

सुबोध खरे 08/04/2020 - 18:33
कमल हसन ची अक्कल गुढघ्यात आहे. त्याला देशद्रोही म्हणावे का हे माहिती नाही परंतु हलकट मात्र नक्की आहे. लॉक डाऊन आणि जमावबंदी करणायचा निर्णय घ्या अगोदर मोदी सरकारने मोठ्या प्रमाणात वैद्यकीय आणि मुलकी अधिकार्यांशी चर्चा केली होती. इंग्लंडसारख्या शिस्तबद्ध देशाने सुद्धा उशीर झाला तरी लॉक डाऊन केला आहे. कमल हसन केवल गरिबांच्या दुःखाच्या आगीत आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे हा अत्यंत नालायक पणा आहे. flatten the curve चा अर्थ कळत नसेल तर त्याबद्दल बोलू नये एवढी अक्कल त्याला नाही कि केवळ मोदीविरोधी बोलून लोकांची सहानुभूती मिळवायची आहे ही हरामखोरी आहे हे मला माहिती नाही. लॉक डाऊन अजून वाढवा असे गैर भाजप मुख्यमंत्री सुद्धा म्हणत आहेत याचा अर्थ काय आहे? का त्या सगळ्यांना अक्कल नाही आणि हा एकटाच शहाणा आहे? परंतु असे निवेदन अशा वेळेस करू नये एवढे तारतम्य त्याला नाही एवढेच मी म्हणेन.

मदनबाण 08/04/2020 - 13:58
P1 हिंदुस्थानचे प्रथम स्वतंत्रता संग्रामी मंगल पांडे यांच्या पुण्यतिथी निमित्त्य त्यांना विनम्र श्रद्धांजली !

मदनबाण.....

आजची बदललेली स्वाक्षरी :- Main Vari Vari... :- Mangal Pandey: The Rising

चौकटराजा 08/04/2020 - 15:05
१९९१ साली देशावर आलेली नामुश्की लपविण्यासाठी देशाची अर्थव्यवस्था सक्तीने जगाला खुली करण्यात आली. परंतू खुल्या अर्थव्यवस्थेला एक निदर्य अशी शिस्त असेल तर ती फलदायी होते. आपल्याकडे निर्दयपणा म्हटले की पोलादी पडदावाला कम्युनिझम डोळ्यासमोर येतो. नव्या आर्थिक सुधारणा या अजूनही व्हायला पाहिजे तितक्या झाल्या नाहीत याचे एक दु: ख अजून काही अर्थ तज्ञाना आहे. ते त्याचे रडगाणे कधीच सम्पणार नाही. पैसा व अनुशन्गिक चंगळ हे आपले एकमेव ध्येय आयुष्यात असले पाहिजे असा सन्देश १९८० नन्तर जन्मलेल्या पिढीत गेलेला स्पष्ट दिसतो आहे. एका बाजूला कसलीच महत्वाकांक्षा नसलेला गरीब समाज तर दुसर्या बाजूला हावरट आहेरे समाज निर्माण झाला आहे. माझ्या कार्यलयातील मुलीला इतके स्वेटर होते की ती महिन्यातून एक दिवस एक वेगळा असे रिपीट न होता स्वेटर घालीत असे . हे उदाहरण यासाठी दिले की या हव्यासातून स्पर्धा व त्यातून जीवनमान अनावश्यक पणे वाढविण्यासाठी जा अमेरिकेला जा ओस्त्रेलियाला असे चालू झाले. यातून अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत. खरे तर निसर्गाला याचे काहीच देणेघेणे नाही पण या हव्यासाला निसर्गाने धडा शिकविण्यासाठी तर या व्हायरस ची निर्मिती केली नसेल ना ,,,,, ?

धर्मराजमुटके 08/04/2020 - 15:09
लॉकडाऊन मधे दोन महत्त्वाच्या गोष्टी समजल्या. अन्नधान्य उत्पादन करणारा शेतकरी आणि घरात रांधून खाऊ घालणारी स्त्री यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. अगोदर गृहिणींच्या कष्टांची फक्त जाण होती मात्र आता तीव्र जाणिव होत आहे. या दिवसांचा सदुपयोग म्हणून चपाती आणि बाजरीची भाकरी बनविणे शिकलो. काही भाज्या / डाळ / भात /पोहे इ. अगोदरच शिकलो होतो. आता फक्त चपाती ही चपाती सारखी दिसली पाहिजे, विविध देशांच्या नकाशासारखी नको इतके शिकायचे बाकी आहे.

In reply to by धर्मराजमुटके

चौकटराजा 08/04/2020 - 15:18
जिथे चपातीचा एखादा भाग लाम्बोळका असा बाहेर आला असेल त्याला काटकोनातून लाटणे फिरवायचे ! चपातीच्या गोलपणावरचा आपला ताबा जात नाही. याला फिजिक्स मधे रेझोल्युशन ऑफ फोर्सेस असे म्हणतात !

In reply to by चौकटराजा

धर्मराजमुटके 08/04/2020 - 15:24
प्रयत्न चालू आहेत सर. पण शेवटी बायकोच्या हाताखाली शिकण्याला मर्यादा आहेत. माहेराचे नाव रोशन करण्यासाठी आईकडून म्हणा किंवा सासरकडून माहेरचा उद्धार झाल्यावर बाईमाणूस जितक्या लवकर शिकेल तितके बायकोच्या हाताखाली लवकर शिकू शकत नाही. प्रेमामुळे मर्यादा येतात.

In reply to by धर्मराजमुटके

सुबोध खरे 08/04/2020 - 18:38
चपाती ही चपाती सारखी दिसली पाहिजे, पाहिजे तेवढी पातळ होई पर्यंत लाटायचे आणि मग गोल थाळी ठेवून बाहेरची कड कापायची. हा का ना का. वर्षानुवर्षे पोळ्या करण्यात आलेली सफाई काही दिवसात येण्याचा हट्ट कशाला? उगाच कलाकुसर करत बसायला तुम्ही पाककला स्पर्धेत नाही घरचा आकाशकंदील बाहेरच्या इतका सुबक असतो का? मग त्यासाठी कुणी रडत बसल्याचे ऐकिवात नाही.

In reply to by सुबोध खरे

हा प्रयोग यशस्वीपणे केला आहे पण त्यात वेळ वाढतो तसेच चपाती कापून उरलेल्या भागाचा ढीग वाढत जातो तो नंतर लाटायला अवघड होतो.
वर्षानुवर्षे पोळ्या करण्यात आलेली सफाई काही दिवसात येण्याचा हट्ट कशाला?
हा हट्ट नाही पण ध्येय्य आहे.

In reply to by धर्मराजमुटके

हेमंतकुमार 08/04/2020 - 19:15
पोळ्यांकडून थालीपिठाकडे.... मला ज्वारीच्या पीठाचे थालीपीठ छान करता येते व नियमित करतो. घरी एकदा दोन्ही पिठांच्या डब्यांची अदलाबदल झाली होती. तेव्हा मी चुकून गव्हाचे पीठ घेऊन ते मळू लागलो अन सगळे चिकट झाल्यावर घोळ लक्षात आला. तरीही नेटाने ते मी थापलेच ! ही दोन्ही तयार पीठे आम्ही गिरणीतून आणतो. दोन्ही एकदम घेताना ते चालक नेहमी विचारतात की ज्वारीच्या प्लास्टिक पिशवीवर लिहून देऊ का? अर्थात मीही होच म्हणतो !

In reply to by धर्मराजमुटके

सुबोध खरे 08/04/2020 - 20:08
मी पहिल्यांदा पुऱ्या करायला घेतल्या तेंव्हा शान्तपणे गोल ताटलीने कडा कापून टाळायला टाकत होतो आणि तीन चार पुऱ्या झाल्यावर उरलेल्या बाजूच्या कणकेची एक पुरी लाटून तळायला टाकली. त्यात अर्धचंद्र, चंद्राची कोर किंवा स्माईली असलेल्या पुऱ्या पण टाळून मुलांकडून आपला बाप किती हुशार आहे हे कौतुकही मिळवले होते. तसेच एकदा गणपतीत मोदक करायला बसून सुंदर मोदक पण केले होते. अर्थात घरच्या बऱ्याच बायकांना ते फारसे पचनी पडले नव्हते हा भाग अलाहिदा. एकंदर स्वयंपाक करणे एवढे काही अवघड नाही, अगदी पहिल्यांदा करायला घेतला तरी किंवा सिनेमात पुरुषांची फजिती होते ते दाखवतात तसे(अर्थात ती अतिशयोक्ती असते हा भाग सोडा)

हेमंतकुमार 08/04/2020 - 15:16
प्रा. डॉ. >>> दुव्यासाठी धन्यवाद. मंगल पांडे >>> आदरांजली. चौरा, विचारमंथनाबद्दल आभार. माणूस आणि रोगजंतू हा एक प्रकारे चोर-पोलीस असा खेळ आहे. दोघेही सतत एकमेकावर मात करून एक पाउल पुढे राहायला बघतात. त्यात कधी ‘ते’ तर कधी आपण पुढे राहतो. पण, कायम पुढे कोणीच नसतो ! लवकरच सध्याच्या खेळत आपण पुढे जाऊ ही इच्छा. धमु >>> + ११११११११.... अगदी !

प्रकाश घाटपांडे 08/04/2020 - 15:55
ज्या लोकांना गोंगाटाशिवाय शांतताच लाभत नाही त्यांना आता काय करायचे हा प्रश्न भेडसावतो आहे. काहींना मोकळा श्वास मिळाल्यामुळे गुदमरायला होते आहे. काहींना पक्षांच्या किलिबिली मुळे अच्छा हे पण अजून आहेत तर ? असा प्रश्न पडला. भुभु लोकांना कार्पोरेशनने माणसांना पकडून नेले आहे असे वाटते आहे.

प्रचेतस 08/04/2020 - 16:16
लेख आवडला. आज चकवाचांदण वाचन, थोडं चेस, थोडं ऑफिसचं काम, रामायण, महाभारत बघणे अशी विविध कामे करून वेळ घालवला. दोनेक दिवसांआड मित्रांशी ग्रुप व्हिडीओ कॉल करून गप्पा चालू आहेत, arrow आणि फ्लॅश पाहून संपली असल्याने आता कोणती सिरीज पाहणे सुरू करायचे विचार चालू आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 08/04/2020 - 16:30
मिपाकर गुल्लूदादाबरोबर हरलो. भारी खेळतात गुल्लुदादा. अजिबात उसन्त नै दिली धन्यवाद. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 08/04/2020 - 17:09
एक ते जिंकले, एक मी जिंकलो. मजा आली.
एक हरलो असे मोठेपणाने सांगा ना. तुम्ही हरले हे वाचून आनंद झाला. नाय तर तुम्हाला वाटायचं मला कोणी हरवू शकत नाही. ;) -दिलीप बिरुटे

मदनबाण 08/04/2020 - 16:36
मुनींनी मला असुर ही वेब सिरीज पहाण्यासाठी सुचवली होती, २ भाग आत्ता पर्यंत पाहुन झाले आहेत. भारी आहे !

मदनबाण.....

आजची बदललेली स्वाक्षरी :- Main Vari Vari... :- Mangal Pandey: The Rising

हेमंतकुमार 08/04/2020 - 17:03
तुम्हा बुद्धिबळवाल्यांचा लई हेवा वाटतोय राव. दूरस्थ मित्रांशी खेळू शकता. त्या खेळात पहिली चाल E४, E५ असते अन तो वजीर कसा बी हलतो, येवडं सोडल्यास मला कायबी कळत नाय राव !

In reply to by कंजूस

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 08/04/2020 - 17:19
काय हे जीवघेणे वेढे..... कंजुस काका. आपला मिपाकरांचा कट्टा होईल तेव्हा, इतकंच ताटभरुन शेव खाईन. सोबत काही असतं का याच्या ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कंजूस 08/04/2020 - 19:31
शेवेबरोबर 'चा' घेतो. तोंड बंद ठेवण्यासाठी मुगाचे लाडू पेढ्याच्या आकारात. ब्याकग्राउंडला आहे मोठी शिवलेली कापडी पिशवी. एकाच फेरीत बरीच खरेदी आणण्यासाठी.

In reply to by कंजूस

चौकटराजा 08/04/2020 - 17:35
मधुमेही रूग्णानी घरी असल्यामुळे येता जाता हे खा ते खा असे करू नये असे आवाहन उद्धव यानी यान्च्या भाषणात केले आहे. आमचा जो शेजारी आरोग्य खात्यात आहे त्यानेही मला वॉर्न केले आहे . मधुमेही, कर्करोगी किडनीवाले ५० ते ७० करोनाचे लाडके आहेत. पुरूष स्त्रीयापेक्शा तिप्पट लाडके आहेत.

In reply to by चौकटराजा

हेमंतकुमार 08/04/2020 - 17:45
चौरा, बरोबर. लाडीकपणाचा थोडा क्रम बदलतो : १. हुच्च रक्तदाबवाले २. मधुमेही ३. करोनरी हृदयविकार

हेमंतकुमार 08/04/2020 - 17:24
सोबत काही असतं का याच्या ? >>> नाही ! ती दुकाने लई काळ बंद ठेवणार आहेत हो ...

In reply to by हेमंतकुमार

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 08/04/2020 - 20:56
नाही ! ती दुकाने लई काळ बंद ठेवणार आहेत हो ...
या लोकांची मनोगतं यायला पाहिजेत हो.नेमकं कसं वाटतं. आपको कैसे लग रहा है वगैरे ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हेमंतकुमार 09/04/2020 - 12:39
छान बातमी डकवलीत इथे. अशा अनेक बातम्या येवोत ! ............ रच्याकने... कोविद च्या पार्श्वभूमीवर आज सहज २ शब्दांची उजळणी केली. १. Infectious २. Contagious इंग्रजी वृत्तमाध्यमांत हे दोन्ही शब्द ‘सारखेच’ म्हणून वापरले जाऊ शकतात. पण तसे नाही. जे Infectious आजार व्यक्तींच्या संपर्कातून पसरतात, त्यांनाच फक्त Contagious म्हटले जाते. कोविद तसा आहे, हे आपण जाणतोच.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हेमंतकुमार 01/05/2020 - 12:39
अल्कोहोलने हात धुतल्यावर करोना मरत असेल, तर दारु प्यायल्याने घशात नक्कीच मरेल; आमदाराचं पत्र एका आमदारानं मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे: https://www.loksatta.com/desh-videsh-news/coronavirus-can-be-removed-by-washing-hands-with-alcohol-then-drinking-alcohol-will-surely-remove-virus-from-the-throat-says-mla-jud-87-2147107/

Nitin Palkar 08/04/2020 - 21:21
ध्वनी प्रदूषण बऱ्यापैकी कमी झाल्याचे जाणवते आणि एकंदरीतच ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी झाल्यामुळे बरे वाटत आहे. प्रा. शिवाजीराव भोसले यांचे अवतरण वाचून त्यांची मूर्ती डोळ्यांसमोर उभी राहिली. त्यांची संथ, लयदार आवाजात ऐकलेली भाषणे आठवली. 'वक्ता दश सहस्रेषु' या उक्तीला न्याय देणारे वक्ते....

हेमंतकुमार 08/04/2020 - 21:36
नि पा धन्यवाद.
'वक्ता दश सहस्रेषु' या उक्तीला न्याय देणारे वक्ते....
>>> अगदी ! श्रोत्यांना ते मंत्रमुग्ध करीत. त्यांचा अजून एक लेख कायम लक्षात राहिला आहे. त्यात त्यांनी लता मंगेशकर, अमिताभ आणि अन्य काहींची उदा. दिली होती. पुढे असे म्हटले होते की या दिग्गजांनी जे काही गुण कमावलेत ते सगळे प्रयत्नसाध्य असतात. तेव्हा ज्यांना त्यांच्यासारखे व्हावेसे वाटते, त्यांनी कठोर परिश्रम करा. तरच तसे यश मिळेल. सामान्य माणूस बऱ्याचदा “ते आपले काम नाही, त्या लोकांचा पिंडच वेगळा असतो”, वगैरे म्हणून स्वतःचे अपयश झाकत असतो.

In reply to by हेमंतकुमार

चामुंडराय 09/04/2020 - 03:49
जे गुण प्रयत्नसाध्य असतात ते कमवायला कमीत कमी १०,००० तासांची इन्व्हेस्टमेंट असते असे कुठेसं वाचल्याचे स्मरते.

मित्रहो 08/04/2020 - 22:28
शेवटल्या ओळीतील विसंगती आवडली. सुदैवाने किंवा दुर्दैवाने आमच्या ऑफिसमधील काम काही कमी झाले नाही. फक्त ऑफिसमधे जाण्याएवजी घरुन करावे लागते. ऑफिसमधे अधून मधून चहा ब्रेक व्हायचे ते आता होत नाही. स्वतः चहा बनवावा लागतो. हल्ली तर मी नेहमीच्या ऑफिसच्या वेळेवर आंघोळ वगैरे करुन तयार होतो. ऑफिसला घालायचा टि शर्ट घालतो. ऑफिसच्या कामाला लागतो. संघ्याकाळी तो टिशर्ट बदलून घरचा टिशर्ट घालतो. त्यामुळे ऑफिस आणि घर वेगळे आहे याचे भान राहते. याचा आणखीन एक फायदा असा ही की ऑफिसच्या वेळातील मिटिंग मी विडियो कॉलनी जॉइन करतो.

हेमंतकुमार 09/04/2020 - 05:32
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार ! १.
ते कमवायला कमीत कमी १०,००० तासांची इन्व्हेस्टमेंट असते
पूर्ण सहमत. असे वाचले होते : १. एक तासाचे प्रभावी चांगले भाषण द्यायचे असल्यास त्याधी निदान १०० तास चिंतन, मनन झाले पाहिजे. २. एक अभ्यासपूर्ण लेख लिहिण्या पूर्वी त्या विषयावरील निदान ५० लेख तरी वाचावेत. ....... २.
त्यामुळे ऑफिस आणि घर वेगळे आहे याचे भान राहते.
>>>> आवडली कल्पना !

विकास... 10/04/2020 - 11:26
नमस्कार  डॉक्टर साहेब फक्त एक छोटीसी शंका  आहे "मास्क वापरल्यामुळे ऑक्सिजन रक्तामध्ये कमी जाईल का" ता.क.  लॉगिन कधीतरीच होतेय त्यामुळे नंतर चर्चेत सहभाग असेलच असे  नाही

हेमंतकुमार 10/04/2020 - 12:50
विकास, परिणाम होणार नाही. मास्क हा हवेतील सूक्ष्मकण (particulates) फिल्टर करतो. हवेतील ऑक्सिजनच्या प्रवेशावर त्याचा परिणाम होत नाही.

लई भारी 17/04/2020 - 20:20
मनोगत आवडल आणि पटलं पण. आहे!नोंद/टिपण ठेवणं वगैरे प्रकार आळशीपणामुळे जमत नाहीत खर तर :-) युधिष्टिराचा संवाद अंतर्मुख करणारा आहे!

हेमंतकुमार 18/04/2020 - 09:20
ल भा व वा दे, धन्यवाद.
रोजनिशी
>>>> मी देखील एकेकाळी ती लिहायचो. त्यातून वह्यांवर वह्या भरत राहतात. नंतर त्या माळ्यावर गेल्या. पुढे ठरवले की रोज आपल्या आयुष्यात खास असे काही घडत नसते. म्हणून तो प्रकार बंद केला. आता २००० साली घेतलेली वही फक्त निवडक रोचक गोष्टी लिहून अजून पुरवली आहे.

गणेशा 30/04/2020 - 08:31
लेख आवडला... जुनी जीवन पद्धती एकदम भारी होती.. तुम्ही बरोबर सांगितली आहे..

हेमंतकुमार 09/05/2020 - 13:29
सध्या लग्न समारंभ करायचा असल्यास फक्त ५० जणांना उपस्थित राहायला परवानगी आहे असे वाचनात आले. या निमित्ताने पुन्हा एकदा 1972- 73 मधली एक आठवण जागी झाली. तेव्हाच्या महादुष्काळानंतर लग्न समारंभांवर अशीच बंधने होती. एका मंगल कार्यालयाबाहेरच्या पाटीवर लिहिलेली एक पाटी मला अजून आठवते. त्यानुसार फक्त 40 लोकांना लग्नाचे जेवण द्यायला परवानगी होती. प्रत्यक्ष समारंभाचे ठिकाणी एक सरकारी अधिकारी येऊन ही पाहणी करीत असे.

हेमंतकुमार 21/05/2020 - 18:38
खरं म्हणजे कधी एकदा एक जून येतोय असं झालंय. अर्थात थोडी कळ अजून अजून सोसायची आहे. आज प्राईम वर अचानक ‘कॅच मी इफ यू कॅन’ पाहिला आणि मरगळ दूर झाली. खूप आवडला. सत्य घटनेवर आधारित आहे. दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्ग आणि प्रमुख भूमिका Leonardo DC & Tom Hanks .

In reply to by हेमंतकुमार

पावसाळ्याची वाट पहात आहात तर त्याचा शटर आयलँड आवर्जून बघा आणी बरेचदा पाहिला असेल तर बेन किंजले चा स्टोनहार्ट असायलंम बघा

हेमंतकुमार 21/05/2020 - 19:19
सुचवणी बद्दल धन्यवाद ‘शटर’ प्राईम वर आहे. नक्की बघेन. पण तो दुसरा नाही