कवितेपलिकडील कविता - २

आनन्दा's picture
आनन्दा in जनातलं, मनातलं
7 Jun 2019 - 2:44 pm

या कवितेपलिकडील कवितेची प्रेरणा वेगळी होती - पण आज मी खरेच अश्या काही कविता, मला भावलेल्या आणणार आहे. काही अवांतर विषय पण येतील, पण ते कृपया सहन करून घ्या.
=========================================================================================

मे महिन्यात कार ने फिरणे बरेच होते, त्यामुळे अर्थात रेडीओ पण खुप ऐकला जातो. गेल्या वर्षी का आदल्या वर्षी याच सुमारास हेट स्टोरी मधले "आज फिर तुमपे प्यार आया है" हे गाणी ऐकलं होतं. मला व्यक्तिशः जुन्या गाण्यापेक्षा हे नवीन गाणं आवडलं जास्त, म्हणून यावर्षी मे महिन्यात यूट्युब म्युझिक वरती हे गाणं लावून फिरत होतो.

जुन्या गाण्यापेक्शा हे गाणं मला अधिक का आवडलं याचा विचार करता करता अचानक ट्युब पेटली की खर्जाचा वापर या गाण्यात अधिक झाला आहे. पूर्वीच्या काळी माहीत नाही, पण अरिजित सिंगला रोमान्स चा बादशहा करण्यामध्ये या खर्जामधल्या गाण्यांचा खुप वाटा आहे. कदाचित माणुस जेव्हा शांत असतो, किंवा आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर असतो तेव्हा त्याचा बोलण्याचा सूर खाली असतो. तारस्वरात कोणी रोमान्स करतं का? पण तारस्वरात देखील रोमँटिक गाणी येतात आणि आपण ती सहन पण करतो. पण हे गाणं ऐकताना मला साक्षात्कार झाला त्या खर्जातल्या सुराचा आणि मग अचानक खजिनाच उघडल्यासारखे झाले. मग मी अशी खर्जातली गाणी शोधायला सुरुवात केली, आणि असे लक्षात आले की जी गाणी ऐकताना मन शांत होते, किंवा अचानक डोळे मिटले जाऊन तंद्री लागते तिथे बर्‍याच वेळेस खर्ज किंवा षड्ज अतिशय परिणामकारक वापरला असतो.

असो, नमनाला घडाभर तेल. हे गाणं माझ्या लक्षात राहण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यातील कविता.

यापुर्वी मी तो समिरा कोप्पिकरच्या आवजातला अंतरा केवळ तिच्या आवाजासाठी ऐकायचो, पण एकदा त्यातले शब्द ऐकले

टूटे तो टूटे तेरी बाहों मे ऐसे के शाखों से पत्ते बेहया
बिखरे तुझीसे और सिमटे तुझीमें, तुही मेरा सब ले गया

हीच ती कवितेपलिकडील कविता. आता बाकीच्या गाण्याशी मला काही कर्तव्य नाही. समर्पण म्हणजे काय असावे याची पूर्ण व्याख्या एका ओळीत कवीने करून टाकली. (आज संक्षी असते तर त्यांनी याचे किती सुंदर रसग्रहण केले असते याची आठवण होउन उगीचच नोस्टॅल्जिक पण झालो). जेव्हा जेव्हा विचार करतो तेव्हा ते ओळ मला नव्याने उलगडते.

त्यानंतर जाता जाता एकदा मी एक मराठी गाणे ऐकले - तुला पाहते रे.
हे गाणे देखील मी कित्येक वर्षे ऐकत आलोय, पण शब्दांना मी सुरांपेक्षा नेहमीच कमी भाव देत आलो. त्यातही गाण्याच्या ओघात कवी लिहून जतो -

किती भाग्य या घोर अंधेपणीही
दिसे स्वप्न ते थोर जागेपणीही

म्हटले तर ही ओळ अगदीच फालतु आहे, पण म्हटले तर सगळे आयुष्याचे सार या दोन ओळीत आहे. या ओळी त्या गाण्यापेक्षा खूप वरच्या स्तरावर जातात आणि मनाला भावतात.

आता छंदच लागलाय या कवितांवर विचार करायचा आणि अश्या कविता शोधायचा. बघा तुम्हाला पण कुठे मिळते का अशी कविता?

वाङ्मयप्रकटनविचार

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

7 Jun 2019 - 3:06 pm | कुमार१

म्हटले तर सगळे आयुष्याचे सार या दोन ओळीत आहे. >>>>
सहमत.

श्वेता२४'s picture

7 Jun 2019 - 3:21 pm | श्वेता२४

छान लिहलंय

ज्योति अळवणी's picture

7 Jun 2019 - 3:27 pm | ज्योति अळवणी

छान लिहिलंय. पण या ओळींच आजून सुंदर रसग्रहण करता येईल. तुमचा दृष्टिकोन वाचायला आवडेल

ज्योति अळवणी's picture

7 Jun 2019 - 3:27 pm | ज्योति अळवणी

छान लिहिलंय. पण या ओळींच आजून सुंदर रसग्रहण करता येईल. तुमचा दृष्टिकोन वाचायला आवडेल

लई भारी's picture

7 Jun 2019 - 3:36 pm | लई भारी

आवडलं!
अजून लिहा की राव. सुरुवातीला एवढं लिहिल्यावर अपेक्षा वाढल्या होत्या.
मेन पॉईंटच्या मुद्द्याला आल्यावर जरा आवरत घेतलं असं वाटलं! :)

अन्या बुद्धे's picture

7 Jun 2019 - 4:30 pm | अन्या बुद्धे

नजरिया.. आपला, आपल्यापुरता..
उलगडून सांगितलात तर पोचेल नीट

सुबोध खरे's picture

7 Jun 2019 - 8:18 pm | सुबोध खरे

गदिमा यांचे प्रत्येक काव्य अत्यंत सुंदर साधा शिवाय गूढ अर्थ असलेले असते.

उदा. १) मरण कल्पनेसी थांबे तर्क जाणत्यांचा.

कितीही ज्ञानी माणूस असेल तरी मरणानंतर काय याचे उत्तर कुणाकडेही नाही.

२) कल्पतरूला फुल नसे का वसंत सरला तरी?

दशरथ राजाला तारुण्य संपत आले तरी मूल नव्हते हि साधी गोष्ट सांगताना गदिमा म्हणतात कि जो वृक्ष जगाला जे कल्पनेत असलेल्या गोष्टी सुद्धा देऊ शकतो त्याला स्वतःला स्वतःचा उमेदीचा काल समाप्त होत आला तरी फूल येऊ नये यापेक्षा दैवदुर्विलास काय असावा

३) ज्योतीने तेजाची आरती

लव आणि कुश श्री रामांसमोर "रामायण" गात असल्याचे त्यांनी केलेलं वर्णन आहे.

एक एक ओळीचा अर्थ समजून घेताना अंगावर रोमांच उभे राहतात.

गदिमांच्या काव्याचा अर्थ लावेपर्यंत आयुष्य सरून जाईल अशी स्थिती आहे.

आनन्दा's picture

7 Jun 2019 - 9:37 pm | आनन्दा

गदिमा लोकोत्तर होते.

खरे आहे, लेख घाईघाईत आवरला आहे.
खरे तर ललित लेखन हा माझा प्रांत नव्हे, पण प्रयत्न करेन एकदा.

दुसऱ्या कोणी याचा विस्तार केला तर वाचायला आवडेल

किती भाग्य या घोर अंधेपणीही
दिसे स्वप्न ते थोर जागेपणीही

म्हटले तर ही ओळ अगदीच फालतु आहे,

ह्या ओळी अगदीच फालतू का वाटल्या हे जाणून घ्यायचे कुतूहल आहे. प्लीज सांगा.

फालतू म्हणजे तुम्हाला वाटतय त्या अर्थाने फालतू नव्हे. पण गाण्यामध्ये आलेली सामान्य ओळ या अर्थाने..

कदाचित मी *सामान्य* असा शब्द वापरायला हवा होता.

अभ्या..'s picture

8 Jun 2019 - 11:47 am | अभ्या..

नाही, सामान्य पण नाही चालणार, तुम्ही ते सगळेच लै भारी म्हणायला पाहिजे. ;)

यशोधरा's picture

8 Jun 2019 - 12:18 pm | यशोधरा

तिरकस टोमणे मारायचे कारण समजले नाही.

मला खरेच कुतूहल वाटले म्हणून मी विचारले. पुढच्या वेळी तुझी परवानगी घेऊन विचारीन.

अभ्या..'s picture

8 Jun 2019 - 1:24 pm | अभ्या..

अस पटकन चिडायचं नसतं बाबा, वाक्याच्या शेवटची स्मायली बघायची असते.
आता तुम्हा ज्येष्ठांना असे चालत नसले तर राह्यलं...
आमची बिनशर्त माफी.

अच्छा, ओके. तरीही माझा प्रश्न आहेच. सगळंच भारी, भारी म्हणा, असा आग्रह नाही पण सामान्य/ फालतू वगैरे वाटण्यामागे काय विचार आहे, ते जाणून घ्यायचे आहे.

मला फालतू वाटले नाही, म्हणूनच तर ते कवितेपलीकडे आहे असे मी म्हणालो. पण एखाद्याला ते फालतू वाटू शकते, इतकेच

यशोधरा's picture

8 Jun 2019 - 12:44 pm | यशोधरा

ओके. धन्यवाद.

कुमार१'s picture

8 Jun 2019 - 1:17 pm | कुमार१

संदीप खरेंची कविता:

कितीक हळवे, कितीक सुंदर, किती शहाणे अपुले अंतर
त्याच जागी त्या येऊन जाशी माझ्यासाठी माझ्यानंतर ....

.... अशी सुरवात होऊन पुढच्या ४ कडव्यांत ती रंगत जाते आणि वाचकाला असे वाटते की हे २ प्रेमिकांच्या लपाछपीचे व आत्मीयतेचे वर्णन दिसतेय !

..आणि मग शेवटच्या कडव्यात एकदम काय आहे बघा:

मेघ कधी हे भरून येता अबोल आतून घुसमट होता
झरते तिकडे पाणी टपटप आणि इकडे शाई झरझर.

.... तेव्हा साक्षात्कार होतो की ‘ती’ ही कवीची प्रेमिका नसून ....... आहे !

....ओळखताय का ? सोप्पंय !