मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

[शशक' १९] - भूक

साहित्य संपादक · · स्पर्धा
जंगलापासून जवळच काही डोंगर होते. त्यापलीकडे माणसांची वस्ती होती. तो त्या बाजूला फारसा फिरकत नसे. जंगल त्याच्या गरजांसाठी पुरेसे होते. एकदा तो पलीकडे गेला. माणसांच्या वस्तीत फिरून आला. फिरून फिरून तो दमला. त्याला भूक लागली. फार करकचून भूक लागली. पण ही नेहमीसारखी साध्यासुध्या मांसाची भूक नव्हती तर ही होती 'माणसाच्या' मांसाची भूक ! ते कसे मिळवावे? तो विचारात पडला. कोल्हा हुशार होता, लोक त्याच्या हुशारीला लबाडी म्हणत. पण लोकांच्या बोलण्याकडे किती लक्ष द्यायचे? तर कोल्ह्याने युक्ती केली. एका रात्रीत एक गाय आणि एक डुक्कर मारले आणि त्या माणसांच्या वस्तीत टाकून दिले. त्यानंतर अनेक दिवस कोल्ह्याला माणसाच्या मांसाची ददात राहिली नाही.

वाचन 28463 प्रतिक्रिया 38