✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

घरी जायच्य...एक रूपक

श
शरद यांनी
Mon, 04/02/2018 - 14:59  ·  लेख
लेख
घरी कधी जायच्य ? (श्री.संदीप चांदणे यांची कविता )tp://www.misalpav.com/node/42187 सकाळचे सहा वाजावयाचे आहेत. आम्ही दोघे निरव शांततेत, शांतपणे कॉफीचे घुटके घेत आहोत. मी विचारले " एक छान कविता बघायची आहे ? " ती प्रश्नार्थक नजरेने बघते. मी तिला संदीप चांदणेंची."घरी कधी जायच्य ? काढून देतो. ती वाचते. दोघेही गप्प. थोड्या वेळाने मी विचारतो " काय वाटले ? " कॉंप्युटरकडे बघतच ती म्हणते "रूपक कथा..आहे. " रूपक कथा..... मग बच्चीला "घरी जायच्य " म्हणजे काय ? आता बाबाला जावयास घरच नसेल तर तो भटकत बसणार हे खरेच. पण हे चार भिंतींच घर तर आहे असेच दिसते. त्याची लहान लेकीला आठवण आहे. बाहेर कितीही भटकलो. बागेत खेळलो, आईसक्रीम खाल्ले. तरी शेवटी तिला उबदार आसरा मिळवण्यासाठी "घरीच " जावयाचे आहे.. पण हे चार भिंती, वरचे छप्पर असलेले घर बाबाकरिता "घर" उरले आहे कां ? जर ... जर घराला घरपण देणारी "घ्ररधनीण " घरात नसेल तर ? त्याची पावले त्या घरपण हरवलेल्या घराकडे कशी वळ्णार ? अजाण लेक बाबाच्या कुशीत झटकन झोपी जाईलही कदाचित पण त्याला तर डोळे उघडे ठेवून आढ्याकडे बघतच रात्र घालवावयाची असेल तर ..? रूपक कथा.... हे घर खरच चार भिंतींचे आहे का ? कवीला काय म्हणावयाचे आहे ते पाहण्यासाठी रसिक वाचकाला आधी थोडे कष्ट केले पाहिजेत. मागे "कवितेचा आस्वाद" या लेखात मी म्हटले होते की कविता "आपली" करण्यासाठी कवितेच्या आशयाला जवळ जाणारी दुसरी एखादी कविता आठवण्याचा प्रयत्न करा. इथे हा शोध सोपा आहे. मराठीतील एक मनोवेधक, हृदयाला भिडणारे काव्य म्हणजे "नटसम्राट" बेलवलकरांनी रसिकांना आनंद दिला. मुला-मुलींना सर्व संपत्ती दिली देतांना मागेपुढे पाहिले नाही. त्यांनी आपले रसिक प्रेक्षक काळाच्या पडद्या आड गेले हे स्विकारले, मुले आता आपली उरली नाहीत हे मान्य करून रस्ता आपला केला. पण "सरकार" गेल्यावर त्यांची अवस्था शीड फाटलेल्या वादळी नौकेसारखी झाली. कोसळून पडतांना हा महान वटवृक्ष काय आक्रोश करतो ? "घर द्या हो, घर ?" मागे "अश्वत्थामा" या कावितेवर लिहतांना " व्यथा, भळभळणारी जखम ही एकट्या अश्वत्थाम्याची असेल तर कवितेच्या आशयाचा संकोच होतो; पण जर ही व्यथा मानव समाजाची झाली तर तिला एक विशाल पट मिळतो ".असे लिहले होते. आज येथेही लहान मुलीला, तिच्या बाबाला किंवा नटसम्राटाला "घर" पाहिजे असेल तर कविता संकुचित होते . पण घरा ऐवजी "मानसिक आधार," "आसरा " असे वाचा आणि तुमच्या लक्षात येईल की तुमची नाळ या बाबाशी, नटसम्राटाशी जुळ्लेली आहे. ज्याला कधी मानसिक आधार वा आसरा हवा आहे अशी गरजच वाटली नाही असा एकादा महाभाग असेलही; पण तुम्ही आम्ही पडलो सामान्य माणसे. आपल्याला ही गरज कधी ना कधी भासतेच. कविता संपूर्ण आकलन झाली नव्हती तरी ती मनाला का भिडली होती हे आता कळू लागेल. काही गोष्टी sub-consious mind ला तुमच्या नकळत भेट देतात, त्यातली ही एक कविता. पण ही झाली एक शक्यता. बरेच दिवसांपासून जगजित-चित्रा यांनी गायलेली एक सुरेख गझल आपणास पेश करावयाची होती. आज ती संधी घेतो. आवारा गलियोंमे मै और मेरि तनहाई जाए तो कहा जाए हर मोडपे रुसवाई मै और मेरी तन्हाई तनहाई ---.. ये फ़ूलसे चेहरे है हंसते हुए गुल दस्ते कोई भी नही अपना बेगाने है सब रिश्ते राहे बी तमाशाई राही भी तमाशाई मै और मेरी तनहाई ---... अरमान सुलगते है सीनेमे चिता जैसे कातील नजर आते है दुनिया की हवा जैसे रोती है मेरे दिलपर बजती हुई शहनाई. मै और मेरी .तनहाई----... हर रंगमे दुनिया सौ रंग दिखाती है रोकर कभी हसती है हसकर कभी गाती है ये प्यारकी बाहें है या मौतकी अंगडाई मै और मेरी .तनहाई आकाश के माथे पर तारोंका चरागा है पहलू मे मगर मेरे जख्मोंका गुलिस्ता है आंखोसे लहू टपका दामन मे बहार आई मै और मेरी .तनहाई. प्रेम बार बार्टिनी तनहाई --एकटेपण मोड--वळण, गुलदस्ता --फूलांचा गुच्छ, बेगाना --परका, रिश्ते---नातीगोती, राह ---मार्ग, राही ---पथिक, तमाशाई ---तमाशा बघणारा, अरमान--- इच्छा, आकांक्षा, सुलगना--जळणे, सीना (फा) छाती, हृदय कातिल --वध करणारा, मारेकरी, अंगडाई ---आळस देण्यासाठी हात उचलणे गुलिस्ता---...उद्यान, पहलू---कूस, चरागां ----रोषणाई, लहू--- रक्त , दामन ---पदर हा ही आवारा गल्ल्यांतून एकटाच फिरत आहे. कोठे जावयाचे तेही कळत नाही कारण प्रत्येक वळणावर "छि:थू" करावयास उभे असलेले लोक ! सगळे सोयरेही परके झालेच आहेत. केलेली प्रत्येक इच्छा-आकांक्षा म्हणजे हृदयात जळणारी चिता ! जरा हात पुढे आले की कळत नही की हे प्रेमाने आलिंगन देण्याकरिता आहेत की हा मृत्यूचा विळखा आहे ? काय काय सांगणार ? शेवटी " एकटेपणा" स्वत:च भोगावयाचा आहे. आज गझलेचा आस्वाद घेणे तुमच्यावर सोडून गझलेचे संदीपच्या कवितेशी काय नाते ते पाहू. गझलेतील "तनहाई", एकटेपणा, यातून सुटका देणारी जागा म्हणजे संदीपच्या कवितेतील "घ्रर" आता आपण संदीपच्या कवितेला एक निराळी अर्थछटा देऊं शकतो कां ? लक्षात ठेवा.प्रत्येक सुंदर कविता तुमच्या मनात निरनिराळे भाव निर्माण करू शकते. समुद्रकिनार्‍यावर बसून आपण जेव्हा समुद्राच्या लाटा बघत आतो तेव्हा पाणी एकच असते पण तुम्हाला दिसणारी प्रत्येक लाट आगळीवेगळी असते. आता संदीपची कविता तुमची आहे. बाबा निराधार म्हणून जेवढा अस्वस्थ असू शकतो तेवढाच "एकटेपणाच्या" जाणीवेनेही कोसळून जाऊं शकतो. इथे मी दोन शक्यता बघितल्या. तुम्हीही आज त्याच्या "भावना" काय असतील ते मनोमन जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आता ही छोटी मुलगी यात कोठे बसते ? कल्पना करा. स्वत: कवी बना. ( जरा मदत करा ना. जगजित-चित्रा यांच्या गझलेच्या गाण्याचे दुवे द्या.) शरद
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कविता
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
1436 वाचन

💬 प्रतिसाद (1)

प्रतिक्रिया

https://m.youtube.com/watch?v

एस
Tue, 04/03/2018 - 00:40 नवीन
https://m.youtube.com/watch?v=gnZh9poXlCw
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा