बिडी: नाशिक उद्योग - ०५ : बिडीने "वळवले" नाशिकचे अर्थकारण
ती १९/२० वर्षाची असेल. साल सुमारे १९८०. काशा तिचा धाकटा भाऊ. मी अन काशा घट्ट मित्र. शाळेतले. त्यावेळी आम्ही पाचवीत. खेळायला आम्ही एकमेकांच्या घरी किंवा गल्लीत पडीक. काशाची आक्का (ताई) मला किती तरी वर्षे राखी बांधायची. आमची तिघांची घट्ट गट्टी. आक्काचं लग्न चारच महिन्यापूर्वी करंडीच्या जल्लोषात झालं होतं. करंडी हे आमच्या निपाणीचे खास वाद्य. लग्नानंतर चारच महिन्यांनी त्यादिवशी कामगार वस्तीतल्या त्यांच्या एक खोलीच्या घरात जोरात रडारड.कल्ला. आक्की रडत होती. आई मोठ्यानं शिव्या देत रडत होती. आबा ओरडून समजावत होता. मला एवढंच आज नक्की आठवतं, आक्की शेवटी ओरडून म्हणाली होती ".... मी तुमानी जड न्हाई व्हायची. मरस्तोवर बिड्या वळून जगन, पन त्या भाड्याच्या घरी कधी जायची न्हाई ..." आक्की चार महिन्यापूर्वी झालेलं लग्न मोडून निपाणीलाच थांबली. लग्न मोडण्याचे धाडस त्या १९/२० वर्षाच्या पोरीला त्यावेळी केले ते बिडीच्या भक्कम आर्थिक आधाराच्या जोरावर. निपाणीची अशी शेकडो घरे लहानपणापासून जवळून बघितली आहेत ज्या कुटुंबांचा आर्थिक आधार फक्त बिडी व्यवसाय होता आणि आजही आहे. निपाणीचे अर्थकारणच तंबाखू आणि बिडी वर अवलंबून आहे. त्यामुळे ओठांचा नसला तरी बिडीशी माझा जिव्हाळ्याचा संबंध आहे. योगायोगाने जन्मभूमी निपाणी प्रमाणेच आज माझी कर्मभूमी असलेल्या नाशिकच्या अर्थकारणातही बिडीचा भरघोस वाटा आहे. नाशिकचा बहुतांश बिडी व्यवसाय निपाणीहून होणाऱ्या तंबाखूच्या पुरवठावरच अवलंबून होता आणि आहे.
भारतात तंबाखू पिकवायला सुरुवात झाली सतराव्या शतकात. बिडीचा कुणी संशोधक नाही. गरजेतून, संधीतून, अडचणीतून आणि स्पर्धेतून बिडी हे उत्पादन फुलत गेले. हुक्का एका समूहाला एकत्र प्यायला लागायचा त्यामुळे उष्टा व्हायचा आणि प्रवासाला गेले की अडचण व्हायची म्हणून चिलीम तयार झाली. पण चिलीम प्रत्येकवेळी भरण्यात वेळ जातो म्हणून विशेषतः दक्षिण गुजरात मधल्या कामगारांनी मिळेल त्या थोड्याशा ओलसर पानात तंबाखू वळून ठेवायला सोपी म्हणून विडी तयार व्हायला लागली. पानावरुन विडा आणि त्यामुळे विड्यावरून विडी हे नाव पडले. वैयक्तिक पातळीवर बिडी बनवताना त्यावेळी लोकांनी वेगवेगळी पाने विड्या वळण्यासाठी वापरली. आंबा, केळी, केवडा, पळस वगैरे. गुजरातमधल्याच कुणाच्या तरी डोक्यात आपल्या आवश्यकतेपेक्षा थोड्या अधिक वळून थाळी मध्ये पसरून बिड्या आणि काडेपेटी विकण्याची कल्पना आली आणि गुजरात मध्ये आठवड्याच्या बाजारात बिडी विकायला आली. विकली गेली त्यामुळे पटापट आणखी विक्रेते तयार झाले. विक्रेते स्वतःच घरी बिडी वळून थाळीतून बाजारात घेऊन जाऊ लागले. मुंबईत स्थायिक झालेल्या काही गुजराती व्यापाऱ्यांनी आपल्या गावाकडे सुरु झालेला हा नवीन व्यवसाय बघितला आणि त्यांनी बिडी मुंबईत आणली. सन १९०० मध्ये बिडी फक्त दक्षिण गुजरातेत आणि मोठ्या प्रमाणात मुंबईतच मिळायची. हल्ली ज्याला आपण पानठेला म्हणतो तशा त्या सुमारास मुंबईत पानाच्या गाद्या होत्या. त्या पानाच्या गाद्यांवर बिडी विकायला आली. इंग्रज त्याकाळी फक्त विधवा महिलांना या पानाच्या गाद्या लावायची परवानगी देत. ठेल्यावर बिडी विक्रीला आल्यामुळे गादीची मालकीण विड्या वळण्यासाठी आणखी चारपाच महिलांना बरोबर घेऊन बसत असे.
अवघ्या पाच सहा वर्षात १९०६च्या सुमारास बिडी व्यवसाय नाशिक परिसरात पोहोचला. सिन्नर जवळ डुबेरे नावाचं एक छोटे खेडे आहे. हे डुबेरे थोरले बाजीराव पेशव्यांचे जन्म स्थान. डुबेऱ्याचे एक शेतकरी बाळाजी गणपत वाजे यांची मुंबईला त्या काळी वरचेवर चक्कर व्हायची. त्यांनी पानाच्या गादीवर चालणारी ही बिडी बघितली. खरीप संपल्यावर सिन्नर सारख्या दुष्काळी भागात लोकांना यातून पोटापाण्याचा प्रश्न सोडवता येईल असा विचार करून वाजेंनी बिडी व्यवसाय १९०६साली सिन्नरला सुरु केला. त्यासाठी कारागीरपण मुंबईहून आणले. घराच्या घरी बसून बायाबापड्याना १९१०च्या सुमारास हजार बिडी वळून सहा आणे मजुरी सिन्नर सारख्या दुष्काळी भागात मिळणे ही फार मोठी बाब होती. त्यामुळे साहजिकच व्यवसाय आकर्षक बनला.
इथला मुख्य असणारा कापडाचा व्यवसाय चिरडून टाकण्याच्या ब्रिटिशांच्या नीतीमुळे रोजगाराची जी भीषण कमतरता निर्माण झाली होती ती नाशिक आणि आजूबाजूला सुरु झालेल्या बिडी व्यवसायाने भरून काढली. १९१० साली येवल्याच्या भिकुसा क्षत्रिय यांनी अशाच कारणांनी बिडी व्यवसायात उडी घेतली. मोठया प्रमाणात येवल्याचे विणेकरी बिडी वळण्याचे काम करू लागले. १९२२ च्या सुमारास बस्तीराम सारडा या कांदा आणि लसूण यांची दलाली करणाऱ्या तरुण व्यपाऱ्याने बिडी व्यवसायात उडी घेतली. ५०० बिड्यांच्या बंडलावर असलेल्या लेबलवर बस्तीरामजी "हमारे यहा कांदा और लसूण की दलाली भी की जाती है" अशी तळटीप टाकायचे. सारडा यांच्या उंट छाप बिडीने मात्र नाशिकला या व्यवसायात एका कौतुकास्पद उंचीवर नेऊन ठेवले. ही उंट बिडी पुढे अमेरिका आणि स्वित्झर्लंड सारख्या देशात पोहोचली. या व्यतिरिक्त चांडक, चोथवे असे अनेक बिडी व्यावसायिक समकालात तयार झाले.
नाशिकचे आर्थिक आणि पर्यायाने सामाजिक चित्र पालटण्यात या बिडी उद्योगाचा मोठा वाटा आहे.
विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकात नाशकात बिडी उद्योगाला जोमात सुरुवात झालीच होती. पण एका महत्वाच्या घटने मुळे हा उदयोग अतिशय गतिमान झाला. १९२० साली महात्मा गांधीजीनी स्वदेशी वापरासाठी आंदोलन छेडले. परदेशी मालावर बहिष्कार टाकण्याच्या कचाट्यात परदेशी असणारी सिगारेट सापडली. सिगारेट बहिष्कृत होऊ लागली. कुटीर उद्योगाला बळ देण्याच्या देशवासीयांच्या प्रयत्नात बिडीला अचानक देशभर चांगले दिवस आले. सिगारेट ऐवजी बिडीची मागणी देशभर वाढली. हसन इमामींसारखे अनेक मान्यता प्राप्त मुस्लिम नेते देखील उघड उघड " सिगारेट विदेशी असल्यामुळे हराम आहे, त्यामुळे स्वदेशी बिडी भारतीयांनी वापरावी" अशी घोषणा देऊ लागले, जी स्थानिक बिडी उद्योगाची मोठी जाहिरातच होती. दुसऱ्या महायोध्दाने तर या व्यवसायात कहर केला. युद्धासाठी जाणाऱ्या सैनिकाच्या शिदोरीचा बिडी ही सरकार मान्य भाग बनली. त्यामुळे बिडी उद्योगाची प्रचंड भरभराट या कालावधीत झाली. नाशिकच्या आर्थिक सामाजिक बदलाबरोबर नाशिकचा भूगोल बदलायची ही सुरुवात होती. ( पुर्वार्ध )
याद्या
3970
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
मस्त
मस्त माहिती, अजून येऊदे.
अभ्याला विचार, सोलापूरला आहे
In reply to मस्त माहिती, अजून येऊदे. by बॅटमॅन
संभाजी विडि ही ठाकुर सावदेकर
In reply to मस्त माहिती, अजून येऊदे. by बॅटमॅन
व्वा !
In reply to संभाजी विडि ही ठाकुर सावदेकर by अभ्या..
मस्त चालली आहे ही मालिका !!!
जबरदस्त!
छान चालू आहे लेखमाला.
वेगळीच माहिती मिळते आहे.
छान!
माहीतीपूर्ण लेख.
छान!!
धन्यवाद !
In reply to छान!! by सचिन काळे