Skip to main content

हाॅटेलमधील आरोग्यदायी जेवण

लेखक Dr prajakta joshi यांनी सोमवार, 17/04/2017 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
"हाॅटेलमधील आरोग्यदायी जेवण" "रोगी चिरप्रवासी परान्न .भोजी परावसथशायी। यज्जिवती तन्मरणं यन्मरणं सो स्य विश्राम:।" अर्थ - आजारी व्यक्ती,नेहमी हिंडणारा ,बाहेरचे खाणारा,दुसर्याच्या आश्रयाने राहणारा यांचे जीवन मृत्युसमान असते.(आरोग्यास हानिकारक) आजच्या काळात मात्र फिरतीवर असणे व बाहेरचे खाणे ही जीवनशैली बनली असून ती अनिवार्य आहे. हाॅटेल मधील जेवण,फास्ट फुड,शीतपेय हे सारं नकळत तुमच्या -माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होवून गेले आहेत. हाॅटेलमधील जेवण हे आजकाल बहुतांशवेळा स्वच्छतेच्या दृष्टीने काटेकोर असते. पण टिकाऊपणासाठी वापरलेली रसायने, आकर्षकतेसाठी शरीरास अहितकर गोष्टीदेखील वापरल्या जातात. खर तर हे टाळणे अशक्य नाहीये.. पण जरा कठीण वाटते. त्यामुळे बाहेर जेवताना थोडा विचार केलेला बरा. म्हणूनच आज आपण घराबाहेर जेवताना काय आरोग्यदायी बदल करू शकतो, यावर चर्चा करूया. सर्वात महत्वाचे म्हणजे शक्यतो रात्री बाहेर जेवण टाळावे, किंवा जेवणानंतर किमान दोन ते अडीच तासांनी झोपावे. महिन्यातून फार फार तर 2वेळा बाहेरचे जेवण घ्यावे. वारंवार बाहेर जेवण होत असेल तर किमान व्यायाम नियमीत आणि भरपूर करावा.जीवनशैली सक्रिय ठेवावी. शक्य होईल तेवढे चालावे. बाहेर खाल्ल्यावर पुन्हा घरी काही खाऊ नये. आता बाहेर जेवताना घ्यावयाचा आहार यावर बोलू या. बाहेर जेवताना भारतात शक्यतो पंजाबी ,उत्तर भारतीय प्रकारचे जेवण मागवले जाते .त्याच अनुशंगाने विचार करूया. १) जेवणाची सुरूवात नेहमीच सलाडने करावी.रशीयन सलाड,ग्रीन सलाड हे छान पर्याय आहेत.तसेच भाजलेले पापडही चांगला पर्याय आहे. २) भाज्या मागवताना त्या आमटी (करी) प्रकारातील मागवाव्यात. कारण त्यातील तेलाचे प्रमाण मर्यादीत असतेच. शिवाय मसाल्याचा वापर योग्य असल्याने ते शरीराला जास्त हानी पोचवत नाही. ३) जेवणाचे समाधान हा आहारातील अत्यंत महत्वाचा भाग आहे. कारण त्यावरच आपल्या पचनाशी निगडीत जीवद्रवांची(enzymes) निर्मीती अवलंबून असते. ४) वजन कमी करताना भाज्यांचे; भुना, टिक्का, तंदुर असे रस्सा नसलेल्या भाज्याही उपयुक्त ठरतात. मसाला,पसंदा या प्रकारच्या भाज्या रस्सायुक्त (थिक ग्रेवी) असतात. त्यातील ग्रेवी सुकामेवा (काजु, बदाम) व साय (cream) यापासून बनलेली असते. त्यामुळे असे पदार्थ अहितकर असतात. ५) मांसाहार सर्व भाजलेल्या (grilled/roasted) / आमटी (curry) स्वरूपात मागवा. ६) सलाड, स्टार्टर्स आणि त्यानंतर खिचडी / दालचावल हाही चांगला विकल्प ठरेल. ७) जेवताना जेवढे मागवू इच्छिता त्याच्या निम्मेच मागवा व सेवन करा. (पोट तुडुंब होईपर्यंत जेवणे टाळा) ८) हळूहळू जेवण करा. म्हणजे जे खाता त्याचा आनंद तर मिळेलच. पण लाळेची योग्य निर्मिती होवून पचन व्यवस्थित होईल. ९) जेवणाचा शेवट ताकाने करावा. (buttermilk/masala chaas) आता संक्षेपात बोलुया बाहेरचा नाश्ता (snacks)आणि शितपेयांबद्दल. बाहेर नाश्ता घेताना शक्य होईल तितके कमी तेल, मसाल्याचे, ताजे आणि भारतीय पदार्थ घ्यावेत. उदा. उपमा, दाक्षिणात्य नाश्ता, सँडविच - चिज /बटाटा नसलेले किंवा भाजलेले. शितपेयांना, कोकम, लिंबुसरबत, ताजा फळांचा रस, (संत्री/मोसंबी), ऊसाचा रस हे उत्तम पर्याय आहेत. या सर्व बाबी ध्यानात घेवून जर आपण बाहेर जेवण केले तर शारीरीक अपायांचे प्रमाण कमी होईल.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 21952
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया