पुस्तकपरिचय: 'भय इथले...' - आतिवास सविता.
‘भय इथले... तालिबानी सावट : प्रत्यक्ष अनुभव’
लेखिका – आतिवास सविता.
आतिवास यांच्या या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर नजर जाताच वाचकाला आतील शब्दानुभवांमध्ये भरलेल्या ताणाचे दडपण जाणवायला सुरूवात होते, इतके हे मुखपृष्ठ भेदक झाले आहे. आणि याचे श्रेय अर्थातच ‘रविमुकुल’ यांना आहे. एका भिंतीवर गोळीबाराच्या असंख्य खुणा आणि शेजारी एक बंद खिडकी. सेपिया रंगसंगतीवर खरवडल्यासारखं शुभ्र रंगातील शीर्षक. जणू भीतीचं सावट पुसण्याचा, जिवंत राहण्याच्या अनिवार ओढीतून केला गेलेला आकांत. लेखिका म्हणतात तसा ‘माणूस म्हणून जगण्याचा हक्क’ मिळवण्यासाठी धडपडणार्या असंख्य अनामिक अफगाण स्त्रियांचा तो भिंतीरूपी बुरख्याआडचा चेहरा. तितकाच बंदिस्त, तितकाच भयग्रस्त.
लेखिकेला इ. स. २०१३ मध्ये एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातनं चार महिने काबूलमध्ये राहून काम करण्याची संधी मिळाली. त्या अनुभवांवर आधारीत लेखांची एक मालिका ‘अब्द-शब्द’ या त्यांच्या ब्लॉगवर आणि ‘मिसळपाव’ वर प्रसिद्ध होत असे. त्याचंच विस्तारीत आणि सुधारीत म्हणूया, असं लिखित स्वरूप म्हणजे ‘भय इथले...’ हे पुस्तक. मूळ शीर्षक ‘भीतीच्या भिंती’ हे जसे समर्पक होते तसेच ‘भय इथले...’ हेही वाटते, कारण कवी ग्रेस यांच्या ‘भय इथले संपत नाही...’ मूळ ओळी अफगाणिस्तानच्या आजच्या परिस्थितीला चपखल लागू पडतात, हे अफगाण लोकांचे, विशेषतः स्त्रियांचे दुर्दैव. तेथे काम करताना लेखिकेला मर्यादा आल्या, सुरक्षिततेसाठी बंधनांच्या दृश्य आणि भीतीच्या अदृश्य भिंती त्याच्या भोवती सतत उभ्या होत्या. त्या भिंतींपलीकडील जगात, तिथल्या सामान्य जनतेच्या, स्त्रियांच्या भावविश्वात डोकावण्याची पुरेशी संधी इतक्या कमी कालावधीत मिळणे जरी अशक्य असले, तरी त्यातूनही त्यांना जे दिसले, जाणवले, बोचले आणि जे जितपत समजले; ते या पुस्तकामध्ये नुसते वाचतानाही भारतासारख्या तुलनेने खूपच सुरक्षित वातावरणात जगणार्या तुमच्या-आमच्यासारख्या वाचकांना तरीही हादरवून सोडते, इतके तिथले वास्तव भयानक आहे.
‘भीतीच्या भिंती’ या आंतरजालावरील लेखमालिकेत सुमारे सात-आठ भाग प्रसिद्ध झाले होते. पुस्तकात एकूण सतरा प्रकरणे आणि चार परिशिष्टे, तसेच शक्य तितकी छायाचित्रे आणि नकाशाच्या माध्यमातून हे अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवतात. प्रत्येक प्रकरणात छोट्या-छोट्या वाक्यांतून, किश्श्यांतून, माहितीच्या तुकड्यांतून आणि विश्लेषणातून लेखिकेची शैली झळकत राहते. कुठेही मेलोड्रामाटिक वगैरे न होता सहज-सरळ पद्धतीने हा पट आपल्यापुढे उलगडत राहतो. ‘आहे हे असं आहे’ आणि ‘असं आहे तर ते तसं का आहे’ या प्रामाणिक उत्सुकतेनेही. ही उत्सुकता, कळकळ भीतीच्या भिंतींमुळे बव्हंशी अपूर्णच राहत असली तरी त्या भिंतींपलीकडील जगाचा बाह्य जगाशी संवाद साधण्याचा प्रयत्न अगदीच निष्फळ ठरत नाही हाच काय तो त्यातल्या त्यात दिलासा. आणि हे पुस्तक म्हणजे याच दिलाशाचे छापील रूप.
हे पुस्तक वाचत असताना सर्वसामान्य वाचकाच्या समजुतींना धक्के बसू शकतात हे मात्र आधी सांगितलं पाहिजे. लेखिका सामाजिक कार्यकर्ती आहेत; युद्धनीतीविश्लेषक वगैरे नाहीत. तेव्हा अफगाणिस्तान म्हणजे ‘काबुलीवाला’ ते ‘सोवियेत सैन्याचे आक्रमण व माघार’ ते ‘तालिबानी धर्मांध राजवट’ ते ‘९/११ आणि अमेरिकेचे आक्रमण’ इतकेच ढोबळमानाने असलेले ‘सामान्यज्ञान’ कदाचित या पुस्तकातील दृष्टिकोनातल्या सर्वच मतांशी सहमत होऊ देईल असे म्हणणे धाडसाचे ठरेल. उदा. खालील वाक्य पहा –
‘युद्ध फक्त शस्त्रास्त्रं, रणनीती, शौर्य यांची साहसगाथा नसते; तर ती दुःख, अश्रू, शोषण, अन्याय आणि हतबलता यांचीही अविरत गाथा असते.’
ज्यांना ‘युद्धस्य कथा रम्यः’ वाटतात त्यांना वरील दृष्टिकोन कदाचित अडचणीचा आणि म्हणून न पटणारा वाटू शकेल. अशा वाचकांना काही ठिकाणी लेखिकेची काही मते आवडणार नाहीत. तेव्हा हे पुस्तक वाचताना एकतर लेखिकेचे इतर लिखाण वाचणे व त्यांच्या कार्याची पार्श्वभूमी जाणून घेणे उपयुक्त तर ठरेलच; आणि दुसरे म्हणजे स्वतःची मतेमतांतरे काहीशी बाजूला ठेवून तटस्थपणेच या प्रश्नाकडे बघावे लागेल. लेखिकेची ‘इनसाइट’ आणि निरीक्षणशक्ती या दोहोंच्या संगमामुळे असा तटस्थपणा वाचकांत आपसूकच येत जातो.
अफगाणिस्तानमध्ये सध्या काय परिस्थिती आहे, किंवा लेखिकेला तिथे काय दिसले याची हे पुस्तक म्हणजे जंत्री नाही. पण सामान्यतः एखाद्या वाचकाला तिथल्या प्रश्नांची शक्य तितकी माहिती व्हावी यासाठी उपयुक्त असलेली जगाच्या या भागाची ऐतिहासिक, भौगोलिक आणि भूराजकीय माहिती बर्याच प्रमाणावर दिली आहे. यात परिशिष्टे, नकाशे, रंगीत छायाचित्रे, अगदी तिथल्या खाद्यसंस्कृतीबद्दलही माहिती आहेच. परंतु नुसत्याच विदाजंजाळपणापेक्षा या पुस्तकाचे वाचनमूल्य वाढते ते लेखिकेच्या सखोल विचारपद्धतीचा पुनःपुन्हा प्रत्यय येत राहिल्याने. तळागाळातल्या माणसांमध्ये कार्य करत असल्याने लेखिकेकडे माणसे वाचण्याचे कौशल्य आहे, आणि कित्येकदा पुस्तक वाचताना वाचक याची प्रचीती येऊन थक्क होतो. मग ते दिल्लीतील विमानतळाच्या लाउंजमध्ये बसलेले अफगाण स्त्री-पुरुष असोत, वा ऑफिसमधल्या खालाजान, वा गुरखे सुरक्षारक्षक अथवा फाहिमी हा अनुवादक, तिथले सरकारी कर्मचारी, रुकिया बाल्खींसारख्या महिला उद्योजिका, मलिकाजान, सईदाजानसारख्या मंत्रालयात भेटलेल्या स्त्रिया, विशेषतः स्थानिक अफगाण स्त्रियांचे वागणे-बोलणे ज्या खुबीने त्या टिपतात आणि त्यामागील चिकित्साही वाचकांपुढे मांडतात ते स्तिमित करणारे आहे. पुस्तकात पदोपदी लेखिका या हाडाच्या सामाजिक कार्यकर्त्या असल्याचा प्रत्यय येत राहतो. (आजकाल गल्लीबोळांत बोकाळलेले तथाकथित ‘सा. का.’ पाहून खरे सामाजिक कार्यकर्ते कसे असतात हे समाज विसरूनच गेलाय की काय असे वाटते. असो.)
‘स्त्रिया’ असे एक स्वतंत्र प्रकरणच या पुस्तकात आहे. हे प्रकरण म्हणजे माझ्या मते या पुस्तकाचा प्राण आहे. आणि मुखपृष्ठावरील बंद खिडकीपासून ते मलपृष्ठावरील पुस्तकओळखीपर्यंत आणि प्रत्येक प्रकरणाचे, छायाचित्रांचे सर्व धागे या प्रकरणापर्यंत पोहोचतात. आंतरजालावरील मूळ लेखमालिका जेव्हा सुरू झाली तेव्हा कित्येक वाचकांच्या मनात आलेला प्रश्न सुरूवातीला मलाही पडला – एक स्त्री आणि तेही अफगाणिस्तानसारख्या देशात जातेय! काय? बापरे!... पण हे प्रकरण वाचताना हे एका स्त्री-लेखिकेचे अनुभवपटल आहे याबद्दल मनापासून बरे वाटले. तिथल्या स्त्रियांच्या प्रश्नांची अशी जाणीव, त्यामागील कार्यकारणभाव, कित्येकदा अव्यक्त, अपरिचित अशी स्पंदने, हुंकार, निश्वास आणि अजूनही बरेच काही हे कुणा पुरुषाला इतक्या संवेदनशीलतेने टिपता व मांडता आलेही नसते. किंबहुना ते पहायची, तिथल्या स्त्रियांशी संपर्क साधून त्यांना बोलत्या करायची व त्यांची परिस्थिती जाणून घ्यायची संधीच त्याला मिळाली नसती. युद्धाच्या अन्यायाच्या, झळीच्या पहिल्या बळी तिथल्या स्त्रिया असतात. या पुस्तकातून हे पुनश्च अधोरेखित होत राहते. आतिवास यांच्या शब्दांमधून भेटत राहणारी प्रत्येक अफगाण स्त्री आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडते. दारिद्र्य, निरक्षरता, आरोग्याची हेळसांड, जीवनावश्यक उत्पन्नाची साधने मिळवता येण्यास मर्यादा, बहुपत्नीत्त्व, कुटुंबनियोजनाचा डावलला जाणारा हक्क, सतत डोक्यावर घिरट्या घालणारे भयाचे सावट, एक ना अनेक प्रश्न. असंख्य संकटे. आणि त्यातूनही उमलू पाहणारी त्यांची जीवनेच्छा. व ती जपण्याचा त्यांचा दैनंदिन संघर्ष. हे सारेच वाचकाच्या मनःपटलावर कोरले जाते. कुठेही अकारण भावनाविवश, करुणार्द्र वगैरे न होता. या सर्व समस्यांच्या भयानकतेतूनही तिथे होत असलेले काही सकारात्मक प्रयत्न, ‘तीळभर पुढे – इंचभर मागे’ का होईना, होत असलेली प्रगती हेही तितक्याच सकारात्मकतेने लेखिका मांडतात तेव्हा जीव किंचित सुखावतोही.
या आवर्जून संग्रही ठेवण्यायोग्य पुस्तकात काढायच्याच झाल्या तर काही त्रुटीदेखील नक्कीच आहेत. एक म्हणजे मुद्रितशोधनाच्या काही चुका अधूनमधून रसभंग करतात. दुसरे म्हणजे नकाशे अजून जास्त सखोल आणि संदर्भसूची, दिशादर्शक बाण इत्यादींसहीत असायला हवे होते. नकाशांची संख्याही वाढवता आली असती. (‘राजहंस’ सारखे प्रकाशन नकाशांकडे ‘नकोशे’ असेच बघते की काय असे मला त्यांच्या इतर पुस्तकांचाही अनुभव घेता वाटले. असो.)
सरतेशेवटी ‘आतिवास सविता’ ही त्यांची आंतरजालावरील नाममुद्राच पुस्तकात लेखिकेचे नाव म्हणून येते. या नाममुद्रेमागील व्यक्ती आपल्याला या पुस्तकातून कुठेही भेटत नाही. तसेच त्यांचे अफगाणिस्तानमध्ये नेमके काय काम ( इंग्रजीमध्ये ‘रोल’) होते हेही पुरेसे स्पष्ट होत नाही. तेथील स्त्री-उद्योजक विश्वाचे निरीक्षण नोंदवायचे असे जरी मलपृष्ठावर लिहिलेले असले तरी त्याची ही ढोबळ रूपरेषा आणि त्यांनी आखून घेतलेली आभासी प्रतिमा यांच्या भिंतींमधल्या किलकिल्या खिडक्यांमधूनच वाचकालाही हे अनुभवविश्व वाचावे लागते आणि तितकेच समजून घ्यावे लागते. अर्थात हे माझे मत झाले. त्यांच्या भूमिकेचा आदर आहेच.
वाचकांना हा पुस्तकपरिचय आवडल्यास त्याचे संपूर्ण श्रेय या पुस्तकालाच असेल; तथापि यातल्या उणिवांची जबाबदारी मात्र पूर्णतः माझी.
‘भय इथले... तालिबानी सावट : प्रत्यक्ष अनुभव’
लेखिका – आतिवास सविता.
राजहंस प्रकाशन.
किंमत रू. २७५/-
ISBN 978-81-7434-967-5
प्रतिक्रिया
सुरेख पुस्तक परिचय. धन्यवाद.
सुरेख पुस्तक परिचय. धन्यवाद.
छान परिचय
या पुस्तकाचे प्रमोशन
मुखपृष्ठ
सुरेख परिचय
उत्कृष्ट परिचय.
असेच म्हणतो.
उत्तम परिचय,
पुस्तक परिचय आवडला. 'भय इथले'
लवकरच वाचले जाईल.
अतिवास ताईंची मिपावरील
सुरेख
भरपूर प्रतीक्षेनंतर आजच
पुस्तकपरिचय खुप आवडला. एस भाऊ
धन्यवाद मंडळी. काहीबाही
धन्यवाद
सुरेख परिचय!
वा!
सविस्तर पुस्तक परिचयासाठी एस
पुस्तकपरिचय आवडला
बरोबर आहे. थोडे घाईतच लिहिलेय
?
आदरार्थी अनेकवचन? मला वाटते ते तुमच्यासाठी नसावे.हो
ओह! आलं लक्शात!!
अचूक
वाह एस भाऊ !! अप्रतिम परिचय
मस्त.
छान पुस्तक परिचय