"केशवा अन्याय झालाय माझ्यावर!"
"आणि तु केलास तो न्याय होता दुर्योधना?
भर सभेत तु मांडी उघडून दाखवलीस तो न्याय होता?"
दुर्योधन विषण्णपणे हसला!
"माझी अंधपुत्र म्हणून हेटाळणी झाली तो न्याय होता? प्रत्येक वेळी मी भीमाच्या बरोबरीचा असतांना फक्त पितृहीन म्हणून भीष्म, विदुर आणि द्रोण यांचा प्रेमाचा झरा त्याच्यासाठीच वाहणे हा न्याय होता?"
"तू आपली बाजू निवडून घेतलीस दुर्योधना!"
"नाही केशवा लादली गेली ती बाजू माझ्यावर. जेव्हा आपल्याच लोकांचा आधार संपतो, तेव्हा मनुष्य कुठलाही आधार शोधतो!"
"तुझा अहंकार तुला आडवा आला."
"मला अंधपुत्र म्हणताना अहंकार नव्हता? आपल्या स्त्रीला जुगारात पणाला लावणे हा अहंकार नव्हता? युद्धाचे सर्व नियम मोडून माझ्या जाँघेवर आघात करणे हा हल्ला नव्हता?"
"हे युद्ध धर्मरक्षणासाठी झालय दुर्योधना!"
"एका स्त्रीला पाच पुरुषाबरोबर संसार करायला लावणे हा धर्म? स्त्रीला जुगारात पणाला लावणे हा धर्म? लोकलज्जेमुळे आपल्या शिशुला नदीत सोडणे हा धर्म?
न्याय शेवटी विजयी पक्षाकडूनच होतो!
केशवा अजूनही विजय निश्चित नाही!तो बघ तक्षक!"
केशवाने चमकून बघितले!
बोरातून तक्षक परीक्षित राजाकडे निघाला होता!
"धर्मयुद्ध राजाच्या अंतानंतर संपत नाही केशवा, ते राज्याच्या अंतानंतर संपते!!!"
प्रतिक्रिया
4 May 2016 - 11:41 am | DEADPOOL
याआधीची कथा http://www.misalpav.com/node/35839
4 May 2016 - 12:16 pm | विजय पुरोहित
एकदम ड्रॅमॅटिक लिहिलंय...
क्लायमॅक्स पण जबरा.
4 May 2016 - 12:40 pm | तुषार काळभोर
+१
4 May 2016 - 12:33 pm | mugdhagode
.. तारुण्य न दिल्याने ययातीने यदुला शाप दिलेला होता. तो परिक्षितलाही लागु होता ना ?
4 May 2016 - 1:02 pm | मृत्युन्जय
परिक्षित पुरु च्या वंशात जन्मला. त्याला शाप नव्हता.
4 May 2016 - 3:44 pm | mugdhagode
आई उत्तरेकडुन तो अर्धा यादव होता.
मुली सासरी गेल्या की शाप फॉरवर्ड करत नाही का ?
4 May 2016 - 5:21 pm | मृत्युन्जय
नाही. तशी सोय नाही. वंश बदलतो ना.
4 May 2016 - 4:22 pm | परिंदा
तारुण्य न दिल्याने ययातीने यदुला शाप दिलेला होता. ह्या शापाविषयी सांगाल का?
4 May 2016 - 5:23 pm | मृत्युन्जय
http://misalpav.com/node/21307
या धाग्यात अजुन माहिती मिळेल आणि एक वर्तुळ पुर्ण झाले
4 May 2016 - 6:18 pm | परिंदा
धन्यवाद. अजुन एक वाचनीय लेख सापडला.
4 May 2016 - 1:02 pm | मृत्युन्जय
छान लिहिली आहे कथा. आवडली.
4 May 2016 - 1:48 pm | मुक्तछन्द
शेवटच्या दोन ओळी थोड्या झेपल्या नाहीत. कोणी तक्षक आणी परिक्षित बद्दल थोडे सा॔॓गेल काय?
4 May 2016 - 2:28 pm | इस्पिक राजा
अर्जुनाने खांडव वनात अनेक नागांना मारले याचा सूड म्हणुन तक्षकाने अर्जुनाच्या नातवाला म्हणजे परीक्षिताला मारायचे ठरवले आणि मग एका फळात तो अळीचे रुप घेउन घुसला आणि परिक्षिताने ते फळ खायला घेतल्याबरोबर त्याला दंश केला ज्यामुळे परिक्षित मेला. नंतर परिक्षिताच्या मुलाने जन्मेजयाने सर्पसत्र (एक प्रकारचा यज्ञ) आरंभले त्यात अनेको नाग मारले गेले पण तक्षक इंद्राला शरण गेला आणि मग इंद्राने रदबदली करुन त्याला वाचवले.
4 May 2016 - 3:49 pm | mugdhagode
तपश्चर्येला बसलेल्या ऋशीच्या गळ्यात परिक्षिताने चेष्टा म्हणुन मेलेला साप घातला.
ऋषीचा शाप ... तू सापाकडुन मरशील.
तो उंच ठिकाणी सापापासुन दुर घर बांधतो.
एकदा बोरे विकणारा jaäत असतो.
तो नोकराकडुन बोरे मागवतो.
एका बोरातुन अळी येते... तिचा साप होतो... तो चावतो.
...
ट्तात्पर्य : रुषीला त्रास देउ नये.
( तरीही इथले लोक मला त्रास देतात ! )
4 May 2016 - 4:54 pm | अभ्या..
हायला ...
रुषी पकूर
4 May 2016 - 2:07 pm | नीळा
जय नावाचा ईतीहास
वीजेत्यानीच लीहीलेला
पराभूतांचे निश्वास कोण अ
ऐकणार
4 May 2016 - 4:42 pm | जगप्रवासी
खूप छान लेख.
अवांतर : दुर्योधानाबद्दल मला खूप कुतूहल आहे. त्याच्यावर लिहिलेलं पुस्तक आहे का? मला वाचायला आवडेल.
4 May 2016 - 5:08 pm | DEADPOOL
दुर्योधन- काका विधाते.
"लोक म्हणतात दुर्योधन लोभी, असंतुष्ट, मत्सरी
आहे; अहंमन्य आणि दुष्ट आहे. यांतला एकही
आरोप मला नाकारायचा नाही. मी लोभी
आहे कारण मला सम्राटपदाची हाव आहे.
शत्रूविषयी मी मत्सरी आहे. त्याचा उत्कर्ष हे
माझ्या असंतोषाचं कारण ठरू शकतं. राजाचा
देहच मुळी अभिमानातून घडलेला असतो. त्यामुळे
अहंमन्यता हा त्याच्या लेखी दुर्गुण समजता
येणार नाही. शत्रूचा नाश चिंतणं, त्यासाठी
प्रयत्नशील रहाणं हा दुष्टपणा ठरतो असं मला
वाटत नाही. ऋण, अग्नी नि शत्रू यांचा
मुळापासून संहार केला पाहिजे हे माझ्या
राजनीतीचं मुख्य सूत्र आहे.
मी कौरवांचा युवराज आहे. प्रजेचा नियंता,
भूपाल नि सीमांचा संरक्षक आहे मी.
शांतिवचनाचं वावडं मला नाही, सज्जनांचा
तिटकाराही नाही. माझी खरी अडचण ही आहे
की, स्वत:चा पराक्रम, प्रतिभा, राजकीय हक्क-
अधिकार मी या ऋषि-मुनींच्या चरणांवर
समर्पित करू शकत नाही; त्यांच्या सल्ल्यानं
राज्य चालवू शकत नाही."
साभार-ग्रंथाद्वार.com
5 May 2016 - 9:55 am | सिरुसेरि
पुर्वी महाभारत सिरीअलमध्ये प्रेक्षकांच्या महाभारतविषयक सर्व शंकांना "सब विधीके विधानसे हो रहा है" असे उत्तर दिले जात असे .