रद्दीपेपर च्या मोबदल्यात काय आवडेल घ्यायला?
नमस्कार मिपाकर मित्रांनो,
सर्वसामान्य घरांमधे किमान एक किंवा दोन वर्तमानपत्रे येतात. वर्षाला साधारण ३० ते ५० किलो रद्दी तयार होते. बाजारभावाप्रमाणे दारावर येणारा रद्दीवाला ९-१०-११ रुपये किलोने रद्दी विकत घेतो. पण त्याच्या काट्यावर १० किलो रद्दी ७ किलो भरते. आमच्या घरात डिजिटल काटा आहे व नेहमी आधी मी मोजुन घेऊन नंतरच रद्दीवाल्याला मोजायला देतो म्हणून माहिती. जेव्हा माझ्या काट्यावर मोजतो तेव्हा रद्दीवाला ७ रुपये किलोने पैसे देइन असे बोलतो. रद्दीवाल्याच्या काट्यावर ३० किलो रद्दी फक्त २२ किलो भरली होती.
असो, अजून अनेक समस्या रद्दीवाल्यासंबंधित आहेत. रद्दीशीही संबंधित आहेत.
भारतात कचरासंकलनामध्ये निव्वळ रद्दीपेपरची समस्या इतकी आहे की डम्पींग ग्राऊंडचा सुमारे ४०-५० टक्के कागदासंबंधित कचर्याने व्यापला आहे. वापरल्या जाणार्या १०० किलो कागदापैकी फक्त २० टक्के पुनर्वापरासाठी उपलब्ध होतो. विकसित देशांत हे प्रमाण सुमारे ५० ते ७० टक्के आहे. भारतातल्या पेपरमिल्सना वापरलेले कागद लागतात, त्यांच्या एकुण गरजेपैकी त्यांना परदेशातून सुमारे ५०-६० टक्के आयात करावे लागते. नवीन पेपर तयार करायला सुमारे ६० टक्के नवीन कच्चा माल (झाडे), व ४० टक्के जुने कागद लागतात.
जर प्रत्येक घरातुन वापरलेले कागद नीट गोळा करता आले तर. ही आयात कमी करता येईल-त्यात जाणारे विदेशी चलन वाचवता येईल, डम्पिंग ग्राउंडची वाया जाणारी जागा वाचवता येइल. करोडो लिटर पाणी, लाखो झाडे, वीज वाचवता येईल. फायदे अनेक आहेत.
भारतातले रद्दी पेपर गोळा करण्याची व्यवस्था अतिशय वाईट आहे हे आपण वर पाहिलेच. मुळात आपण सामान्य लोक ह्याकडे तसे लक्ष देत नाही, सरकार जागृती करुन थकून जाते, पेपरमिलवाले त्यांच्या उद्योगाच्या व्यापातच फसले आहेत. अशा समयी जर व्यावसायिकरित्या घरोघरचे, ऑफिसांतले वापरलेले कागद गोळा करुन पेपरमिलवाल्यांपर्यंत पोचवले तर हे सगळे शक्य होईल. वापरलेल्या कागदांपैकी सुमारे ८० टक्के कागद पुनर्प्रक्रिया करुन नवीन कागदनिर्मितीसाठी वापरता येतो.
असे प्रयत्न झाले आहेत, होत आहेत. अनेक पेपर मील जसे खन्ना, आयटीसी, रामकी ग्रूप सारख्यांनी रिवर्स इंटीग्रेशन सुरु केले आहे, पण म्हणावे तितके यश येत नाही. अनेक एन्जीओ ह्यात आहेत पण तुम्हाला माहितच आहे एन्जीओ कसे काम करतात ते. मुख्य प्रश्न आहे सामान्य नागरिकांच्या सहभागाचा. माझ्यामते सामान्य लोकांना रद्दीच्या बदल्यात पैसे मिळतात ते हवे असतात विनासायास. घरबसल्या कोणी पेपर घेउन जातो, पैसे देउन जातो, कसं सुटसुटीत. एन्जीओ दान करा म्हणतात, पेपरमिलवाले आमच्या कलेक्शन सेण्टरवर आणुन द्या म्हणतात. बरेच इशु आहेत.
प्रश्न असा आहे की जर घरीच येउन कोणी हे पेपर घेउन जाणार असेल व ह्या बदल्यात पैसे न देता इतर काही देणार असेल तर तुम्हाला ह्या वर्षाच्या ३०-५० किलो रद्दीच्या ३००-५०० रुपयांच्या ऐवजी काय घ्यायला आवडेल? तुम्हाला काही कल्पना सुचतात का की पैशांऐवजी काहीतरी पर्यावरणासाठी केल्याचं समाधान व त्याचं बक्षिस म्हणून एखादी गोष्ट, सेवा, सवलत मिळाली तर सामान्य जनता आकर्षित होऊन सहभागाचं प्रमाण वाढेल?
माझ्या डोक्यात काही कल्पना आहेत. बघा कशा वाटतात, यातल्या व्यवहार्य नसतील तर सांगा, वेगळ्या काही असतील तरी सुचवा.
१. एका वर्षाच्या रद्दीचे पैसे नियोजित करुन तेवढ्याचे गिफ्ट कुपन, डिस्काऊंट कुपन, गिफ्ट वाउचर्स देणे.
२. बचतगटांकडून हाताने बनवल्या जाणार्या वस्तू, अंध, अपंग मुलांकडून, व्यक्तिंकडून बनवल्या जाणार्या वस्तु देणे
३. सोडेक्सो कुपनसारखे फुड कुपन्स देणे
४. ५०० रुपयात बसेल असा जास्तीत जास्त रकमेचा हेल्थ इन्शुरन्स, अॅक्सिडेंट इन्शुरन्स तत्सम देणे.
५. घरपट्टी, पाणीपट्टी, तत्सम करांतून १ टक्का सुट देणे.
स्वच्छ भारत अभियानास समस्त भारतीयांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. आपले अमुल्य मत जरुर नोंदवा.
धन्यवाद.
संदर्भः http://dipp.nic.in/english/Discuss_paper/DiscussionPaper_Recycling_WastePaper_21October2011.pdf
वर्गीकरण
प्रतिक्रिया
प्लास्टिक वर लसूण!
चांगले प्रतिसाद दिले सर्वांनी
मी वस्तू घेताना खूप विचार
रद्दी विकून येणारा पैसा आजू
चांगला उपक्रम आहे. कोणत्या
मुंबई - ठाणे
धन्यवाद!
आमची कंपनी