बायपास सर्जरी की अंजिओप्लास्टी योग्य?

उल्का's picture
उल्का in काथ्याकूट
19 Apr 2016 - 11:22 pm
गाभा: 

मनात काही शंका आहेत. त्यांचे निवारण होऊ शकेल का?

माझ्या माहितीतील दोन काका.
दोघांची बायपास सर्जरी केली होती.
ज्यांची ७२ व्या वर्षी झाली त्यांचा सहा महिन्यात मृत्यू झाला आणि ज्यांची ७६ व्या वर्षी झाली त्यांचा महिन्याभरातच मृत्यू झाला.
दोघेही मानसिक दृष्ट्या बायपास साठी तयार नव्हते. ऑपरेशन नंतर गुंतागुंत झाली होती असे ऐकून आहे. मला ह्याहून अधिक तपशील माहित नाही.

परन्तु त्यामुळे मला पडलेले प्रश्न असे -

१. वयाची सत्तरी ओलांडल्यावर जर मधुमेह, रक्तदाब असेल तर बायपास करणे योग्य असते का?

२. जर रुग्ण 'मानसिक' दृष्ट्या तयार नसेल आणि पथ्य पाणी व काही आयुर्वेदिक औषधांनी तो तब्येतीची काळजी घेत असेल तर खरेच गरज असते का?

३. अंजिओप्लास्टी केली असती तर वरील दोन्ही काकांना फायदा झाला असता का?

४. सतरीनंतर अंजिओप्लास्टी करतच नाहीत का? बायपासच करावी लागते का?

५. इतर काही पर्याय असु शकतो का?

ह्या प्रश्नाच्या उत्तरांमुळे आमहाला घरातील वयोवृद्ध आई वडिलांविषयी निर्णय घ्यायला थोडीफार मदत होईल म्हणून विचारते आहे.

मिपाकर, तुमच्या मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे.

धन्यवाद.

प्रतिक्रिया

आनंदी गोपाळ's picture

19 Apr 2016 - 11:40 pm | आनंदी गोपाळ

भारतातली आजची अ‍ॅवरेज लाइफ एक्स्पेक्टन्सी ६६.१ वर्षे आहे. यापुढचे सर्व दिवस बोनस समजावेत. ;) त्यामुळे तुमच्या माहितीतले ७०+ वयाचे काका, बायपासमुळे नव्हे, तर रिटर्न तिकीट वटवायची वेळ झाल्याने मार्गस्थ झाले असावेत, असे वाटते.

युज्वली, जितका आजार जास्त, तितकी प्लास्टी कमी उपयोगाची. ३ पेक्षा जास्त ब्लॉक असतील तर सरळ बायपास करावी.(अपवाद मा. उद्धवजी ठाकरे)

त्याच वेळी, हार्ट अ‍ॅटॅक येत असताना किंवा आल्या आल्या, लगेच प्लास्टी करण्याचे प्रमाण, व त्यातून उत्तम रिझल्ट्स मिळण्याची शक्यता आजकाल वाढीस लागली आहे.

बायपास व अँजिओप्लास्टी या दोन्ही उपचारपद्धती, पेशंटचा जीव वाचवण्यासाठी व त्याचे जीवनमान सुधारण्यासाठीच विकसित झालेल्या आहेत. प्रत्येक पेशंटसाठी व्यक्तिगतरित्या काय योग्य त्याचा सल्ला (तुमचा विश्वास असलेले) हृदयरोगतज्ज्ञ त्या-त्या वेळी देतात, व तो स्वीकारायचा किंवा कसे हे तुमच्या सद्सदविवेकबुद्धी व खिसापाकीटावर अवलंबून असते, हे ही तितकेच खरे.

प्रश्न खिसापाकीटाचा कमी अणि आपल्या माणसाचा खूप जास्त आहे. त्यांच्या आरोग्यासाठी घेतलेला निर्णय योग्य असावा असेच कायम वाटते.
डॉक्टर वर विश्वास म्हणालात म्हणून सहज माझी आई पूर्वी म्हणायची ते आठवले - "डॉक्टर वर विश्वास असेल तर आपण अर्धे बरे तिथेच होतो."
एकन्दरित सत्तरिनन्तर मात्र विशवासाइतकीच किन्वा किम्बहुना त्यापेक्षा थोडी जास्तच सद्विवेकबुद्धी महत्वाची ठरत असावी असेच वाटते. :)

विजय पुरोहित's picture

20 Apr 2016 - 12:07 am | विजय पुरोहित

आवरा आता!!!
इतरांच्या लेखांवर पण थोडे प्रतिसाद देत चला. एकाच दिवसात इतके लेख टाकू नका.

विषय चांगला आहे. त्यामुळे हा धागा तरी राहूदे. उल्का यांचे बाकीचे धागे पाहीले नाहीत अजून...

चंद्रनील मुल्हेरकर's picture

20 Apr 2016 - 12:49 am | चंद्रनील मुल्हेरकर

माझ्या वडीलांची ॲजिओप्लास्टी झाली आहे दोन महीण्यांपुर्वी,mid LAD 99 ℅ stenosis, RCA 85℅ stenosis.डॉकटरांनी ॲजिओप्लास्टीचा पर्याय निवडला ,दोन स्टेंट टाकले.माझं असं मत आहे की जे डॉक्टर आहेत त्यांना निर्णय घेउ द्यावा,पैशांची तयारीहि हवी.बायपासने माणुस मरतो हा गैरसमज मनातून काढून टाका,माझ्या मामांची ७० व्या वर्षी बायपास झाली ,आज ते ७८ वर्षांचे आहेत व ठणठणीत आहेत.

काहीही करा किंवा करु नका पण कोणतेही ब्लाॅक बिना सर्जरी आयुर्वदिक औषधांनी बरे करण्याच्या भूलथापांना बळी पडू नका.
साधी गोष्ट आहे.एक जागा तुंबली आहे.एकतर तिला वळसा घालुन जा किंवा आहे त्यात जागा करुन प्रवाह सुरु ठेवा.त्यासाठी प्लास्टी किंवा सर्जरी पेशंटच्या शारीरिक कुवतीप्रमाणे डाॅ सांगतातच.जास्त ब्लाॅक असतील तर बायपास सांगतात.पण आयुर्वेदिक सलाइनवाले, चिलेशनवाले हातोहात गंडवतात.पेशंटच्या घाबरलेल्या मानसिक स्थितीचा फायदा घेतात.पेपरात मोठ्या जाहिराती देऊन लोकांना आकर्षित करतात.काही सलाईनचा कोर्स लाखो रुपये लावून करुन देतात.ब्लाॅक तिथेच राहातो.पेशंट अक्षरशः विनाइलाज मरतो.हे इतक्या वेळा पाहिलेत आत्तापर्यंत.
स्टेंट टाकायची घाई नसेल तर सेकंड ओपिनियन घ्या.सिडी घ्यायची अँन्जीओग्राफीची.ती दाखवून घेता येतो ओपिनियन.
मग ठरवा.किंवा सरकारी इस्पितळात ग्राफी करुन घेतल्यास खरा निर्णय मिळण्याची शक्यता जास्त वाढते असा अनुभव आहे! थोडी धडपड करावी लागते पण सरकारी काम चोख असते!

रुस्तम's picture

20 Apr 2016 - 11:38 am | रुस्तम

छान माहिती डॉक्टर

कपिलमुनी's picture

21 Apr 2016 - 2:29 am | कपिलमुनी

माधवबाग ईत्यादी चोर आहेत

विटेकर's picture

20 Apr 2016 - 9:30 am | विटेकर

माझ्या वडीलांची २०१२ मध्ये वयाच्या ७८ व्या वर्षी प्लास्र्टी झाली आहे, प्लास्टी पण गुन्तागुतीची झाली , स्तॅन्ट जागेवर लवकर बसत नव्हता ! खबरदारी म्हणून डो़क्ट्रानी ओप्रेशन थेटर तयार ठेवेले होते, सुदैवाने गरज लागली नाही !
आता वडील ठणठणीत आहेत ! प्लास्टी केलेल्या डो.साठ्यांनीच आयुर्वेदिक काढे दिले आणि योगासनाच्या वर्गाला जायला सांगितले !~

चौकटराजा's picture

20 Apr 2016 - 9:37 am | चौकटराजा

माझ्या बहिणीला थकव्याचा फार त्रास, छातीत दुखणे व ढेकरा यांचा अतोनात त्रास होउन लागला. कार्डिओ सामान्य आल्याने अ‍ॅसिडीटीची ट्रीटमेंंट देण्यात आली. तरीही त्रास काही जाईना . पुन्हा कार्डिओ काढला असता ब्लॉकेज चे प्राथमिक शंका आली. आंजिओ ग्राफी केली असता एल ए डी ९५ टक्के व उजवी ८५ टक्के असे दिसले. मधुमेह असल्याने डो नी बायपास मधे फायदे व तोटे तसेच प्लास्टी मधील फायदे व तोटे समजावून सांगितले. माझ्या भाच्याने इन्सुरेन्स शी सम्पर्क साधून केवळ पाच मिनिटात प्लास्टीचा निर्णय सांगितला. विमा असल्याने निर्णय सोपा झाला हे खरे प्ण तो अचूक झाला का ते येता काळ तिला पुन्हा कधी व किती अडथळे निर्माण होतील हे काळच सांगेल. त्यातही व्यक्तिगणिक उत्तर वेगवेगळे असते.

मी मध्यंतरि सकाळ मुक्तपिठ मध्ये एक अनुभव वाचला होता, कि त्या व्यक्तिंना ब्लोकेज चा प्रोब्लेम होता व त्यांना शुगरचाहि त्रास होता त्यामुळे त्यांचि सर्जरि होउ शकत नव्हती, मग त्यांनी सुर्यनमस्काराचा व्यायाम चालु केला, त्यानंतर काहि महिन्यांनि चेक केल्यावर त्यांचे जिथे ब्लोकेज होते तिथे रक्त्वहिन्यांचे नविन जाळे तयार झाले होते व ह्रुदयाचे काम व्यवस्थित चालु झाले होते, व डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सर्जरिचि गरज रहिलि नव्हति.

चंद्रनील मुल्हेरकर's picture

20 Apr 2016 - 12:54 pm | चंद्रनील मुल्हेरकर

माझ्या वडीलांनाही कोलॅटरल वेसल डेवलप झाल्या आहेत,व्यायाम व काही प्रमाणात अनुवांशिकतेचा फायदा होतो.

उल्का's picture

20 Apr 2016 - 12:46 pm | उल्का

@ अजया, खूप छान माहिती दिलीत. खास करून सरकारी इस्पितळ आणि सी डी पर्याय सांगितलात तो आवडला. आयुर्वेदिक औषधे म्हणजे काढा किंवा गोळ्या म्हणायचे होते. मागे लोकसत्ता मध्ये वैद्य खडीवाले (नाव नक्की नाही आठवत. तर एक वैद्य) यांचे लेख वाचल्याचे आठवते. त्यात उल्लेख होता की अर्जुनारिष्ट खूप फायद्याचे ठरते. अर्थात कोणत्याही तज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्यावे लागते.

@ चंद्रनील, बायपासने मृत्यू ओढवतो असा माझा गैरसमज नाही झालाय पण ह्या दोन उदाहरणांवरून खूप उतार वयात बायपास करणे योग्य ठरते का? हा माझा प्रश्न होता. शरीर थकलेले असते. प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्या दोघांची बायपास तज्ञ डॉक्टरनी यशस्वीरीत्या केली. गुंतागुंत नंतर झाली. lung infection झाले होते असे ऐकून आहे. पण खात्री नसल्याने लिहिले नाही.

डॉक्टर तज्ञ असतात. अनुभवी असतात. आपण विश्वास ठेवतो. परंतु ते सगळेच प्रामाणिक असतील असे नाही. मला म्हणायचे आहे की ते त्यांच्या कामात प्रामाणिक असतील पण ते आपल्याला प्रामाणिकपणे संभाव्य धोके सांगतीलच असे नाही. फक्त फायदेच सांगतील. म्हणून मी हा धागा काढला की उतार वयात धोके किती असतात ते कळावे.

@ विटेकर आणि चौकटराजा, तुमचे अनुभव सांगितल्याबद्दल आभारी आहे.

@ विजय, तुमच्यासारखे खवचट बोलणे हा माझा स्वभाव नाही. इतक्या गंभीर धाग्यावर तुमची अशी प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती. मी तुम्हाला कसलेही स्पष्टीकरण द्यायला बांधील नाही पण तरीही देणारच. कारण तुम्ही जाहीरपणे आरोप करत आहात. मी हा धागा खूप उशीरा काढला. त्याआधी जेनेरिक औषधांविषयीचा धागा वाचला. तिथे प्रतिसादही दिला. मिपा डॉक्टर्सचे त्यांच्या अमुल्य मार्गदर्शनासाठी मनापासून आभार मानले. त्यानंतर हा धागा काढायचे सुचले. तेव्हा एकच सांगते तुम्ही असे खवचट प्रतिसाद देण्यापासून स्वत:ला वेळीच आवरा. दुसऱ्यावर असे प्रत्युत्तर द्यायची वेळ आणू नका. तुम्हाला सवय असेल आम्हाला नाही. आणि हो जाता जाता तुमच्याही एका धाग्यावर 'चांगला' प्रतिसाद दिला होता. हवे असल्यास जरूर तपासा. तेव्हा तुम्ही काढलेला हा विषय इथेच संपला आणि मूळ धागा नीटपणे चालू राहील अशी अपेक्षा तुमच्याकडून करते.

विजय पुरोहित's picture

20 Apr 2016 - 2:03 pm | विजय पुरोहित

तुमच्यासारखे खवचट बोलणे हा माझा स्वभाव नाही.
यात खवचटपणा काय झाला? एकाच दिवशी दोन तासांत दोन धागे टाकले आहेत आपण. यामुळे इतरांचे लेखन खाली जाते किंवा दुर्लक्षित होते.

इतक्या गंभीर धाग्यावर तुमची अशी प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती.
हां. याबाबत मी माझी चूक मान्य करतो.

मी तुम्हाला कसलेही स्पष्टीकरण द्यायला बांधील नाही पण तरीही देणारच. कारण तुम्ही जाहीरपणे आरोप करत आहात.
मी तुम्हांला कसलं हो स्पष्टीकरण मागितलं? आणि मला एक सांगा की मी आरोप काय केला?
तुमचं लेखन चेक केलं तर स्पष्टच दिसून येतंय की दोन तासांच्या आत तुम्ही दोन धागे काढलेले आहेत. आता यात आरोप कुठला आला?

येथे लिहिणा-या प्रत्येकाची अपेक्षा असतेच की आपल्या धाग्यावर प्रतिसाद यावेत, आपल्याला महत्वपूर्ण वाटत असलेला विषय चर्चेत यावा. पण अलिकडे काही नवे आयडी केवळ येऊन स्वतःचे लेखन टाकून जातात. त्यात आपण तर एकाच दिवशी दोनच तासांत दोन धागे टाकलेत. यामुळे इतरांचे धागे दुर्लक्षित होत नाहीत का?

अनंत छंदी's picture

20 Apr 2016 - 2:08 pm | अनंत छंदी

सर्वप्रथम मी एक गोष्ट स्पष्ट करतो की मी काही तज्ज्ञ डॉक्टर वगैरे नाही. माझ्या आईबाबत जे अनुभव आले ते नमूद करतोय.
माझी आई ७२ वर्षांची असताना तिला २००२ साली पहिला हार्ट अ‍ॅटॅक आला, सुदैवाने ते वेळीच लक्षात आले आणि गावात असूनही तिला अवघ्या अर्ध्या तासाच्या आत. तेथील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी बायपासचा सल्ला दिला होता. पण, एकूणच तिची त्यासाठी नसलेली तयारी आणि तिची तोळामासा प्रकृती पाहाता आम्ही तिला औषधोपचारांवर ठेवण्याचा निर्णय घेतला. ते डॉक्टर माझ्या चांगल्या परिचयाचे असल्यामुळे त्यांनी मला औषधावर पेशंट जास्तीत जास्त सहा वर्षे काढतो हे स्पष्ट सांगितले होते. या नंतर २०१२ पर्यंत ती औषधांवर छान होती. अगदी घरातील शारीरिक कष्टाची कामे देखील करीत होती. २०१२ मध्ये तिला पुन्हा त्रास झाला म्हणून त्याच डॉक्टरांकडे दाखल केले. तेव्हा नायट्रोग्लिसरीन, लो मॉलिक्युलर वेट हिपारीन वगैरे देऊन डॉक्टरांच्या भाषेत थ्रॉम्बोलाईज करून तीन दिवसांनी घरी पाठवण्यात आले. परंतु पुन्हा चार दिवसांनी तसाच त्रास सुरू झाला. पुन्हा तशीच ट्रीटमेंट व डिस्चार्ज असेच चक्र दर चार सहा दिवसांच्या फरकाने सुरू झाले असे चार-पाच वेळा झाल्यानंतर त्या डॉक्टरांनी मला स्पष्ट सांगितले की हे काय चालले आहे ते नेमके कळत नाही. तुम्ही त्यांना आता इतरत्र मोठ्या शहरात उपचारासाठी घेऊन जा. अँजिओग्राफी करून पुढचा निर्णय घ्या. एकंदरीत लक्षणांवरून जवळपास ९९ टक्के ब्लॉक असण्याची शक्यता आहे. इजेक्शन फ्रॅक्शन अवघे २५% आहे. यानंतर तिला घरी आणले त्याच दिवशी तिला जोराचा श्वास लागला अगदी अखेरची घरघर लागते अगदी तसाच प्रकार झाला होता. आम्ही तिला तातडीने पुणे येथे आणले. त्या दिवशी तिला डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये अतिदक्शता विभागात दाखल केले. पुढील चार दिवस ती तेथे होती मात्र तेथे अँजिओग्राफी व हृदयरोग विषयक शस्त्रक्रिया वगैरे सुविधा नसल्याने तिला तेथून डिस्चार्ज मिळाल्यानंतर रुबी एलकेअर च्या सेंटरमध्ये घेऊन गेलो तेव्हा तिला तपासल्यानंतर तेथील डॉक्टरांनी अँजिओग्राफी करण्यास नकार दिला. इतकी तिची तब्येत खालावलेली होती. नाईलाजाने आम्ही तिला घरी घेऊन आलो औषधे सुरूच होती आता किती दिवस निघतात ते बघायचे एव्हढेच बघणे हाती होते. या दरम्यान औषधांच्या परिणामांमुळे तिला भ्रम सादृष्य त्रास सुरू झाला. रात्री उठून काहीतरी करायचा प्रयत्न करणे हवेतल्या हवेत काही वस्तू पकडल्यासारखे करणे असे सुरू झाले या बरोबरच ढेकर येणेही मोठ्या प्रमाणात वाढले. म्हणून आम्ही तिला परत हॉस्पिटलमध्ये दाखल केले तेव्हा पोटॅशियमची लेव्हल वाढल्याचे दिसून आले त्यावर उपचार करून तिला घरी आणले मात्र ढेकर येणे तोंड कडू असणे व अन्नावर अजिबात वासना नसणे असे दुखणे सुरू झाले. पॅन डी व तत्सम गोळ्या सुरू होत्याच मात्र परिणाम शून्य! हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी आता यापेक्शा वेगळी ट्रीटमेंट नाही असे सांगितले त्यावेळी मी मि.पा. वरही मदत मागितली होती, व येथील सदस्यांनीही आपुलकीने सल्ले दिले होते हे ही आवर्जून नमूद करतो. शेवटी उपचारांसाठी अन्य पॅथींचा उपयोग करण्याचे ठरवले व त्या प्रमाणे माझ्या एका डॉक्टर मित्रांचा सल्ला घेतला त्यांनी पाषाण येथील एका आयुर्वेदिक डॉक्टरबाईंचा क्रमांक दिला मी त्यांच्याशी बोलून अपॉईंटमेंट घेतली व त्यांनी आईला तपासून उपचार सुरू केले. हळूहळू फरक दिसू लागला. मात्र गेल्या वर्षी उन्हाळ्याच्या दिवसातच अचानक बी.पी. लो झाल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते. यापूर्वी तिच्या सुरू असलेल्या आयुर्वेदिक औषधात दीर्घ खंड पडला होता. हॉस्पिटलमध्ये पुन्हा तिच्या पोटॅशियम लेव्हलची समस्या उद्भवली त्यावर झालेले उपचार नीट न झाल्यामुळे तिची तब्येत अगदी गंभीर बनली. डॉक्टरांनी माझ्याकडून अखेरचे डिक्लेरेशन वगैरे लिहूनही घेतले परंतु सुदैवाने ती त्यातून वाचली. मग आम्ही अधिक हॉस्पिटलच्या वाटेस न जाता तिला घरी आणले त्या डॉक्टरबाईंची ट्रीटमेंट सुरू ठेवली.साधारण सहा महिन्यात चांगलाच फरक पडला अशक्तपणाही बर्‍यापैकी कमी झाला आहे. हृदयाचीस्थिती सुधारली आहे हे कळते आहे. स्वत:ची सर्व कामे स्वतःच करून अन्य कामात सहभागी होण्याइतपत उत्साह वाढला आहे. सध्या वय वर्षे ८४ आहे. हल्ली फक्त इकोस्प्रिन गोल्ड एव्हढीच एक अ‍ॅलोपाथीची गोळी प्रिकॉशन म्हणून सुरू आहे. बाकी आयुर्वेदिक औषधे सुरू आहेत. खाण्यापिण्याची पथ्ये व वेळा कटाक्षाने पाळल्या जातात. या सर्व अनुभवावरून आयुर्वेदाने हृद्रोगाला प्रतिबंध करता येतो असे माझे मत बनले. आहे.

या सर्व अनुभवावरून आयुर्वेदाने हृद्रोगाला प्रतिबंध करता येतो असे माझे मत बनले आहे.

ह्या तुमच्या स्पष्ट मतामुळे एक वेगळा आशेचा किरण दिसतो आहे. खासकरुन जे मानसिक द्रुष्ट्या सर्जरी साठी तयार नाहित त्यान्च्यासठी. :)

पिलीयन रायडर's picture

20 Apr 2016 - 2:53 pm | पिलीयन रायडर

पाषाणच्या ह्या वैद्य बाईंचा पत्ता व नंबर मिळेल का?

अनंत छंदी's picture

20 Apr 2016 - 8:35 pm | अनंत छंदी

पत्ता आणि मोबाईल नंबर दिला आहे.

पण यावर खफवर चर्चा होऊ शकते.
आणि धाग्यावेताळपणा करने बरोबर नाही.
असो आपल्या धाग्याशिवाय इतर कुठल्याच धाग्यावर या आई डी ने प्रतिसाद दिल्याचे आठवत नाही.
तत्सम विजयजी आपल्याशी सहमत आणि आपला पास!

पिलीयन रायडर's picture

20 Apr 2016 - 2:57 pm | पिलीयन रायडर

डेड्पुल आणि विजय दादा,

तुमचा प्रतिसाद वाचुन सहज म्हणुन उल्का ह्यांची प्रोफाईल पाहिली.

http://www.misalpav.com/user/27783/track

तुम्हाला आठवत नसलं तरी बर्‍याच धाग्यांवर त्यांचे प्रतिसाद आहेत. तेव्हा एखादे विधान करताना चटकन पडताळणी होऊ शकत असेल तर का करु नये?

उल्काताई काही रतीब घालणार्‍यातल्या किंवा स्वतःचे काय ते लिहुन झाले की धाग्याकडे अजिबात न फिरकणार्‍यातल्या वाटत नाहीत. समजा टाकले एखादे दिवशी दोन धागे तर काय बिघडतं?

असो.. हा विषय इथेच थांबवुया. उगाच तुमच्या विधानांनी लोकांचा गैरसमज नको म्हणुन त्यांच्या ट्रॅकची लिंक दिली.

उल्का's picture

20 Apr 2016 - 3:21 pm | उल्का

विनाकारण वेळ जातोय ह्या अवान्तर चर्चेत. समजुन घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!

टवाळ कार्टा's picture

20 Apr 2016 - 6:28 pm | टवाळ कार्टा

पिराशी (परत एकदा*) सहमत

*काय दिवस आलेत

उल्का's picture

20 Apr 2016 - 3:17 pm | उल्का

@ विजय, DEADPOOL कृपया मूळ धाग्यावाराती चर्चा होऊ दे. झाली तेवढी अवांतर चर्चा पुरे. मी नवीन आहे मान्य. (म्हणुन मला टार्गेट करु नका.) मी हळू हळू शिकते आहे. ख फ हा काय प्रकार आहे माहित नाही. मी फक्त धाग्यावरील प्रतिसादाला प्रतुत्तर दिले आहे. (त्याच भाषेत.) त्यात दोन धाग्यांचे स्पष्टीकरण दिले आहे. थोडे समजून घ्याल तर फार बरे होईल. मी कोणाला किती प्रतिसाद दिले ते आठवत नसेल तर प्रोफाईल मध्ये TRACK मध्ये जाउन बघू शकता.
आता हा अवांतर विषय थांबवा इथेच ही नम्र विनंती. हो! नाहीतर विनाकारण परत परत माझाच धागा वर येईल आणि इतर चांगले धागे खाली जातील. ते तुम्हाला नाही आवडणार. FULL STOP

भीमाईचा पिपळ्या.'s picture

20 Apr 2016 - 3:39 pm | भीमाईचा पिपळ्या.

उल्कातै दुर्लक्ष (इग्नोर) करायला शिका.

विवेकपटाईत's picture

20 Apr 2016 - 6:04 pm | विवेकपटाईत

उल्का ताई,
माझी मेडिकल history: माझी २००८ मध्ये दिल्लीच्या माता चानन देवी इस्पितळात अंजिओप्लास्टी झाली होती. RCA १०० टक्के ब्लॉक होती. या शिवाय ओम 1 होती. RCA मध्ये stant लावला. २०१० पुन्हा अन्जिओग्राफि सफरजंग इस्पिताळात झाली.OM 1 हि. ८५% होती. तिथल्या HODच्या हिशोबाने औषधावर काम भागेल. २९ june २०१४ ला रस्त्यावर बेशुद्ध होऊन पडलो RML अन्जिओग्राफि झाली. ४ ब्लोकेज होते. बाय पासचा सल्ला दिला.

३ जुलै ला एस्कॉर्ट हॉस्पिटल, ओखला येथे डॉक्टर मेहरवाल यांनी सर्जरी केली. दोन्ही पायातून नसा काढाव्या लागल्या. ७ दिवसांत सुट्टी मिळाली. काही त्रास झाला नाही. दुसर्या दिवशी पासून उठून चालू लागलो होतो. तिथे अधिकांश रोगी मधुमेह इत्यादीने पिडीत होते. (एस्कॉर्ट हॉस्पिटल हृदय रोगा साठी प्रसिद्ध आहे). अश्या लोकांच्या जखमा ठीक व्हायला थोडा जास्ती वेळ लागतो. बाकी ऑपरेशन च्या आधी मला एवढीच कल्पना होती थोडा चिरा वैगरे लागेल. पायातून हि नसा काढल्या जातील माहिती नव्हते. अगदी हसत हसत ऑपरेशन साठी गेलो होतो. गेल्या दीड वर्षांपासून मला काही विशेष त्रास नाही आहे, थोडी थकावट लवकर येते एवढेच. बाकी माझा अनुभव आहे, अधिकांश रोगींना stant लावल्या नंतर काही वर्षांनी बायपास करावी लागते. पंतप्रधान मनमोहन सिंह यांना हि करावी लागली होती. कारण जिथे stant लागले आहे, त्याच्या मागे ब्लोकेज होण्याची संभावना असतेच.

बाप रे! किती तुम्ही सहन केलत हो.

अगदी हसत हसत ऑपरेशन साठी गेलो होतो.

हे आवडले. तुमच्या लिखाणा वरुन पण दिसत. म्हणजे तुमचा निर्मळ स्वभाव दिसतो. असेच कायम हसत रहा. ही मनापासुन शुभेच्छा!

बोका-ए-आझम's picture

21 Apr 2016 - 8:48 am | बोका-ए-आझम

_/\_

उडन खटोला's picture

20 Apr 2016 - 7:20 pm | उडन खटोला

माफ करा डॉक्टर पण माझ्या शेजारचेच उदाहरण आहे.
४५ वर्षाचा डायबेटिक पेशन्ट , डिसे. २०१४ मध्ये ३ दिवस सिव्हियर चेस्ट्पेन होते. शेवटी तिसर्या दिवशी अतिशय अस्वस्थ वाटू लागल्याने रत्नागिरीला अ‍ॅड्मिट केले.हार्ट अटॅक होता. इमर्जन्सी टीपीए इन्जेक्शन दिले. डॉक्टर्स नी सांगितले अँजिओप्लास्टी ला पर्याय नाही.
मग जवळच्या नातेवाइकानी खूप विचार विनिमय केला . पेशन्ट ची आर्थिक कुवत नव्हती . त्यामुळे नाइलाजास्तव चिलेशन थेरपी चा पर्याय निवडला. सहा महिन्यात दहा प्रायमरी व मग तीस इतर इन्जेक्शन्स चिलेशन थेरपी केली. आज दीड वर्ष होवून गेले. पेशन्ट ठणठणीत बरा असून सर्व कामे करतो.

त्यामुळे सरसकट चिलेशन थेरपी थोथान्ड आहे असे म्हणता येत नाही.

रमेश भिडे's picture

20 Apr 2016 - 7:33 pm | रमेश भिडे

माझ्या डोंबिवली तिल चुलत्यांचे उदाहरण तर आणखीनच विचित्र आहे. माझ्या दोन काकांना गेल्या वर्षी हृदयविकार detect झाला . वय अनुक्रमे 76 व 73 . दोघांनाही डायबेटीस आहेच . थोरल्याना एंजियोप्लास्टी किंवा बायपास काहीच करता येणार नाही ,असे सांगितले , तर धाकट्याना एंजियोप्लास्टी चा पर्याय सांगितला . माझा चुलतभाऊ स्वत: डॉक्टर आहे. पण आता एवितेवी वय झालेच आहे, आज ना उद्या मरायचेच आहे ,मग कशाला उगाच पैशाचा चुराडा? असे म्हणून दोघांनीही फक्त औषधे ,आयुर्वेदिक उपचार व योगा/चालणे इत्यादि सुरू ठेवले. आज दोघेही चालत फिरत असून थोरले काका या मे महिन्यात कोकणात फिरायला जाणार आहेत तर धाकट्या काकांच्या मुलाचा साखरपुडा बडोद्याला आहे , ते सतत डोंबिवली-बडोदा -कोकण फेर्‍या मारत असतात...!

आता बोला

चौकटराजा's picture

20 Apr 2016 - 9:24 pm | चौकटराजा

मझ्या एका मित्राच्या वडीलांचे बाय पास चे ऑपरेशन १९८५ चे सुमारास झाले. त्याचा फायदा साधारण २०१२ पर्यंत झाला . पुन्हा बायपास झाले. ते आज ही हयात व बर्यापैकी हालचाल राखून आहेत. असेही उदाहरण असते.

चौकटराजा's picture

21 Apr 2016 - 5:43 pm | चौकटराजा

१९८६ चे सुमारास भारतात तरी स्टेन्ट चे तंत्र उपलब्ध नव्हते सबब त्या गृहस्थांची बायपास करावी लागली. २०१० चे सुमारास परत थोडा त्रास झाल्याने अंजिओ ग्राफी झाली. त्यात २५ टक्के हृदय चालत आहे असे कळून आले. पण वयोमान पहात सर्जरी करू नका असा सल्ला डॉ नीच दिला. आज सहा वर्शे झाली त्यांचे काम २५ टक्यावर भागले आहे. १९८६ ते २०१० या काळात ते रोज चालत असल्याने त्यांचे करोनरी चे बाजूला पर्यायी वाहिन्या निर्माण झाल्या असे डॉ चे मत आहे.

सुबोध खरे's picture

21 Apr 2016 - 10:22 am | सुबोध खरे

आपले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची दोन वेळेस बायपास शल्यक्रिया झाली आहे.
पहिली १९९० साली झाली तेंव्हा ते ५८ वर्षांचे होते. त्यानंतर ते १८ वर्षे व्यवस्थित निरोगी अवस्थेत होते. या कालावधीत ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, वित्त मंत्री आणी नंतर पंतप्रधान होते. इतकी तणावाची पदे त्यांनी हाताळली.२००९ साली दुसर्या वेळेस पंतप्रधान असताना त्यांची दुसरी बायपास शल्यक्रिया झाली तेंव्हा ते ७६ वर्षांचे होते आणी ते २०१४ पर्यंत पंतप्रधान पदावर होते.आता ते ८३ वर्षांचे असून त्यांना कोणताही त्रास नाही.
https://web.archive.org/web/20090414041423/http://www.hindu.com:80/thehi...
वयाच्या कितव्या वर्षी बायपास शल्यक्रिया करावी हे प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यावर अवलंबून आहे. मी ९१ वर्षाच्या माणसाची शल्यक्रिया होताना पाहिली आहे आणी ती व्यक्ति आपल्या पायाने चालत घरी गेलेलीहि पाहिली आहे.
याबाबत अनेक लोकांनी ९१ वयाला शल्यक्रिया करायची काय गरज आहे हा प्रश्न विचारला. यावर माझे उत्तर असे आहे. जर एखाद्या माणसाची आयुर्मर्यादा ९५ वर्षे असेल तर शेवटची चार वर्षे अंथरुणावर खितपत पडण्यापेक्षा जर माणूस चालता फिरता असेल तर त्या शल्यक्रियेचा खर्च वसूल झाला असे म्हणावे लागेल. मुंबईत नायर ( सरकारी )रुग्णालयात हा खर्च सव्वा लाख आहे.( दारिद्र्य रेषेच्या खाली असणार्या लोकांना ती फुकट आहे हिरवे कि पिवळे रेशन कार्ड असणार्यांना). एशियन हार्ट रुग्णालयात वरील माणसाने त्यासाठी साडे तीन लाख रुपये भरले होते.
माणसे युरोपची एक सहल करून येतात तेंव्हा "माणशी सव्वा ते दीड लाख रुपये दहा दिवसांसाठी" खर्च होतात मग चार वर्षांसाठी साडे तीन लाख रुपये विशेषतः जर त्या माणसाच्या "स्वकमाईचे" असतील तर खर्च करण्यात काय चूक आहे?
असो.
हा हिशेब ज्याचा त्याने करायचा आहे.

मराठी_माणूस's picture

21 Apr 2016 - 1:28 pm | मराठी_माणूस

इतकी तणावाची पदे त्यांनी हाताळली

एक शंका. तणावाचा , हृदयावर कसा परीणाम होतो ? कामात काही वेळा तणाव निर्माण होतो तो आपण टाळु शकत नाही. अशा वेळी काय करावे.

उल्का's picture

21 Apr 2016 - 2:21 pm | उल्का

डॉक्टर, तुमचा सविस्तर प्रतिसाद सकारात्मक आहे हे विशेष. शिवाय खर्चतील फरकही अधोरेखित केला आहे.
तरिही एक शन्का...

वयाच्या कितव्या वर्षी बायपास शल्यक्रिया करावी हे प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यावर अवलंबून आहे.

यशापयश त्या व्यक्तीच्या मानसिकतेवर पण अवलम्बून असते का? म्हणजे ती व्यक्ती मनाने तयार नसेल तर कुटुम्बियानी जोर देउन शस्त्र्क्रियेस भरिस घालणे (फोर्स करणे) योग्य असते का?

चंद्रनील मुल्हेरकर's picture

21 Apr 2016 - 3:11 pm | चंद्रनील मुल्हेरकर

atheronova आणि cardionova नावाच्या दोन कंपण्यांचा टाय अप झाला आहे ,त्यांचे एक औषध सध्या फेज २ ट्रायलमध्ये आहे.हे औषध ईतके परिणामकारी आहे की कोणताही ब्लॉक विरघळुण जाते .अजुन मार्केटमध्ये यायला अवकाश आहे ,पण जेव्हा हे औषध येईल तेव्हा प्लास्टी ,बायपासची गरजही उरनार नाही.interventional cardiologist बेकार होणार हे निश्चित.

उगा काहितरीच's picture

21 Apr 2016 - 6:52 pm | उगा काहितरीच

माझा असा समज (बहुधा गैरसमज ) आहे की , डॉक्टर लॉबी, औषधे तयार करणाऱ्या कंपन्या अशा प्रकारचे औषध तयार होऊ देणार नाहीत. किंवा मार्केट मधे उतरवू देणार नाहीत कारण असे केल्याने त्यांचा कोट्यवधी रुपयाचा व्यापार (जो की बायपास वगैरे करून मिळतो) बुडेल . तज्ञांचे याबाबतीत मत जाणून घ्यायला आवडेल .

बर्याच फार्मा कंपन्या असे औषध तयार करण्यासाठी झगडत आहेत परंतु कुणालाच अजून यश दृष्टीक्षेपात नाही. राहिली गोष्ट atheronova आणि cardionova यांची त्यांनी दिवाळे वाजल्याचे जाहीर केले आहे.http://www.biospace.com/News/socal-biotech-atheronova-and-its-subsidiary...
बाकी ते औषध फेज "२" पातळी वर पोहोचल्याचा दुवा मिळेल काय?
माझ्या माहितीप्रमाणे ते अजून "पहिल्या पातळीच्या" वर पोहोचलेले नाही.हे औषध खरच गुणकारी असेल तरी ते बाजारात सर्वसामान्य माणसाना परवडेल अशा किमतीत उपलब्ध होईपर्यंत कमीत कमी ८-१० वर्षे( कदाचित १५) जातील
आणि आपली भीती "डॉक्टर लॉबी, औषधे तयार करणाऱ्या कंपन्या अशा प्रकारचे औषध तयार होऊ देणार नाहीत. किंवा मार्केट मधे उतरवू देणार नाहीत " संपूर्ण निराधार आहे.
३० वर्षापूर्वी अल्सरवर शस्त्रक्रिया हा एकच अंतिम उपाय समजला जात असे. त्यावर H २ ब्लॉकर आणी नंतर PPI ( ओमेप्राझोल ० सारखी औषधे आली आणी हि सर्जरी नामशेष झाली. अशी गोष्ट अनेक शल्यक्रियांबद्दल सांगता येईल. तेंव्हा डॉक्टर लॉबी "सशक्त" आहे ई. गैरसमज काढून टाका.
"कोंबडं झाकलं तरी उजाडायच थांबत नाही".

उगा काहितरीच's picture

21 Apr 2016 - 7:52 pm | उगा काहितरीच

आणि आपली भीती "डॉक्टर लॉबी, औषधे तयार करणाऱ्या कंपन्या अशा प्रकारचे औषध तयार होऊ देणार नाहीत. किंवा मार्केट मधे उतरवू देणार नाहीत " संपूर्ण निराधार आहे.
३० वर्षापूर्वी अल्सरवर शस्त्रक्रिया हा एकच अंतिम उपाय समजला जात असे. त्यावर H २ ब्लॉकर आणी नंतर PPI ( ओमेप्राझोल ० सारखी औषधे आली आणी हि सर्जरी नामशेष झाली. अशी गोष्ट अनेक शल्यक्रियांबद्दल सांगता येईल. तेंव्हा डॉक्टर लॉबी "सशक्त" आहे ई. गैरसमज काढून टाका.
"कोंबडं झाकलं तरी उजाडायच थांबत नाही".

ओके ! गैरसमज काढून टाकला. धन्यवाद !

सस्नेह's picture

21 Apr 2016 - 3:51 pm | सस्नेह

बायपास किंवा प्लास्टी शिवाय हृदयरोगाला पर्यायच नाही असे मत असेल तर डॉ. अभय बंग यांचे ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’ हे पुस्तक अवश्य वाचावे. त्यावरून असा निष्कर्ष काढता येतो की बायपास किंवा प्लास्टी हे तात्पुरते उपाय असून त्यायोगे हृदयरोगातून पूर्ण मुक्तता होऊ शकत नाही. मात्र जीवनशैली, योग्य आहार, पुरेसा व्यायाम आणि नियमित ध्यान यांच्या सहाय्याने हृदयरोग पूर्णपणे बरा होतो.
विशेष म्हणजे हे मत पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टीकोनातून प्रत्येक गोष्ट जोखणाऱ्या एका डॉक्टरचे आहे.

सुबोध खरे's picture

21 Apr 2016 - 8:10 pm | सुबोध खरे

स्नेहांकिता ताई
आपण म्हणता तो सल्ला ज्याला हृदयरोग अजून झालेला नाही अशा "निरोगी माणसासाठी" अतिशय "जास्त" महत्त्वाचा आहे. पण आपल्याकडे बहुसंख्य माणसांचे तहान लागल्यावर विहीर खणण्या कडे कल जास्त असतो याला काय करायचे? मिपावरच कितीतरी लोक असे आहेत ज्यांची जीवनशैली ताबडतोब बदलणे आवश्यक आहे

ज्याला हृदयविकार येण्याची शक्यता आहे त्याला बायपास किंवा प्लास्टी शिवाय ताबडतोबीचा पर्याय नाही. एकदा हृदयाचा रक्त पुरवठा सुधारला कि मग व्यायाम, जीवन्शैली सुधारणे आणी आहारावर नियंत्रण हे उपाय तर आवश्यक आहेतच. दुर्दैवाने बरीच माणसे प्लास्टी झाली आता काय "पाहिजे तितके" खाऊ शकतो म्हणून उत्साहात दुप्पट खाऊ लागतात आणी काही वर्षात( बहुतांशी ५-६ वर्षातच) परत प्लास्टी किंवा बायपास करण्याची वेळ आणतात.
एक फार महत्वाची गोष्ट बहुसंख्य माणसे विसरतात -- ते म्हणजे आपली जर ५० व्या वर्षी अन्जीयोप्लास्टी झाली असेल तर हा रोग चाळीसाव्या वर्षापासून चालू झालेला आहे. म्हणजे "आपली जीवनशैली बदलली नाही" पुढच्या दहा वर्षात हा रोग परत येईलच. पण आता आपले वय ४० नसून ५० आहे म्हणजे हा रोग आता १० ऐवजी ७ वर्षातच परत येणार आहे. आणी जितके वय वाढत जाते तितक्या लवकर रोग परत येणार आहे.
पण लक्षात कोण घेतो?