तार
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
१४ जुलै २०१३. रात्रीची १० ची वेळ. अश्वनी मिश्रा ह्यांनी राहुल गांधीना शेवटची तार पाटवली आणी तब्बल १६३ वर्ष सेवा बजावणारी तार सेवा भारतातून कायमची बंद केली गेली. मोबाइल, whats up, sms, email, इंटरनेट असे ताज्या दमाचे खेळाडू असताना तार सेवा चालू ठेवणे तसे पण फ़ायद्याचा व्यवहार न्हवताच. कधी ना कधी तिला जावे लागणार हे स्पष्टच होते. २०११ पासून चर्चा केली गेली आणी अखेरीस १४ जुलै २०१३ ला तिचे देहावसान झाले.
अशी ही तार सेवा सुरु झाली १७९२ साली. ह्या वर्षी दूरच्या अंतरावरची टेलिग्राम सेवा सेमाफोर लाइन्स मार्फत सुरु झाली. पण इलेक्ट्रिक टेलिग्राम सुरु करण्याचे श्रेय जाते samuel morse ला. त्याने १८३७ साली अमेरिकेत इलेक्ट्रिक टेलिग्राम सेवा सुरु केली. भारतात ही सेवा १८५०-५१ साली ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीने तत्कालीन कलकत्ता आणी डायमंड हार्बर दरम्यान ३० किलोमीटरची इलेक्ट्रिक लाइन टाकून प्रायोगिक तत्वावर सुरु केली. त्यावेळी फक्त ऑफिसच्या कामासाठी तिची सुरुवात करण्यात आली होती. १८५४-५५ साली ही सेवा भारतातल्या सामान्य जनतेला उपलब्ध करून देण्यात आली. ह्या सेवेचा ब्रिटीशाना इतका फायदा झाला की लॉर्ड डलहौसीने एकदा असेही म्हटले की १८५७ च्या उठावात ब्रिटीश सत्ता टिकली ह्याचे एक मुख्य कारण होते ही टेलिग्राम सेवा. टेलिग्राममूळे त्याना त्वरीत बातम्या एकीकडून दुसरीकडे पोचवणे शक्य झाले आणी त्यानुसार सैन्याची जलद हालचाल देखील करता आली. भारतात १८५० साली सुरु झालेल्या ह्या तार सेवेची उत्तरोत्तर इतकी प्रगती होत गेली की १९८०-९० च्या काळात तर भारतात तब्बल ४५००० टेलिग्राम कार्यालये होती आणी त्यातून रोज तब्बल ६ लाखाहून जास्त तार पाठवल्या जात.
तर अशी ही तार सेवा हे आनंदाच्या, दुख्खाच्या (जास्त करून दुख्खाच्या) बातम्या आपल्या नातेवाइकान्पर्यन्त जलद गतीने पोचवण्याचे एके काळचे एकमेव साधन होते. एखाद्याच्या घरी तार आली आहे एवढे जरी समजले तरी बायकांचे हुंदके दाटून येत आनी आजूबाजूची माणसे गोळा होत. आतला मजकूर वाचायचे दूरच राहिले. कारण तार आली ह्याचा अर्थ काहीतरी वाईटच झाले असणार इतका लोकांचा विश्वास. आणी ह्या तारेतले मजकूर देखील एकदम छोटे असत. कारण तशी ही खर्चिक सेवा होती आणी बिल कमी यावे ह्यासाठी तार पाठवणारा कमीत कमी शब्द वापरले जातील हे पहायचा. ह्या तार नामक प्रकाराने आमची एकदा कशी भंबेरी उडवली होती ते आठवले.
ते साल होते १९९०. आम्ही कोकणातील कणकवली इथे स्थाईक झालो होतो आणी आमचे बाकी सर्व नातेवाईक कराड तालुक्यातील उंब्रज जवळच्या पेरले ह्या मूळ गावी राहायचे . माझे आजोबा (वडिलांचे वडील) त्या वेळी अधून मधून दम्याने खूप आजारी पडायचे. एक दिवस अचानक आमच्याच चाळीत राहणारे झेपले काका आम्हाला घरी घेऊन जायला शाळेत आले. आमच्या शिक्षकांशी काहीतरी बोलून आम्हा दोघाना घेऊन लगेच घरी परत आले. असे अचानक शाळा अर्धवट सोडून आपण घरी का चाललो आहोत ते अगोदर समजलेच नाही. घरी आलो तर आई सतत रडत होती आणी चाळीतल्या इतर बायका सांत्वन करत होत्या. मग कळले की तार आली आहे आणी आपल्याला ताबडतोब गावी जायचे आहे. 'ताबडतोब निघून या'. बस इतकाच मजकूर होता तारेत. आता नक्की काय झाले असेल म्हणून ताबडतोब निघून यायला सांगितले असेल हे माहिती करून घ्यायचे काहीच साधन न्हवते. कारण पूर्ण पेरले गावात कुणाकडेच फोन न्हवता. आणी ताबडतोब यायला सांगितले आहे ह्याचा अर्थ आजोबांचे काहीतरी वाईट झाले असणार असेच सगळ्यानी गृहीत धरले. वडिलांनी एक मारुती ओमनी ठरवून टाकली. मग आम्ही चौघे आणी ड्राईवर असे ५ जन वाटेत अक्षरश: कुठेही न थांबता गाव गाठले. पुणे - बेंगलोर महामार्ग त्यावेळी धड दोन पदरी सुद्धा न्हवता. कसे बसे संध्याकाळी गावी पोचलो आणी गाडीतून उतरताच आमचे स्वागत करायला आजोबा माझ्या लहान चुलत भावाला घेऊन हसत हसत पुढे हजर. आम्ही सगळेच आश्चर्यचकीत. (नक्की कोण गेले असेल). ड्राईवर जेमतेम १० मिनिटे बसला आणी चहा घेऊन निघून गेला. वाड्यातली सगळी माणसे गोळा झाली. असे अचानक का आलात सगळे म्हणून विचारायला. मग वडिलांनी 'ताबडतोब निघून या' अशी तार कुणी आणी का केली होती हे विचारले. त्याचे झाले होते असे की वडिलांचा लहान भाऊ घरी माझ्या आजी आजोबांशी थोडा भांडला होता. त्याला समजावून सांगावे ह्या करिता वडिलाना तार करून बोलावून घे असे आजोबांनी एकाला सांगितले. आमचे वडील सर्व भावंडांमध्ये ज्येष्ठ असल्याने त्याना कुणी अरे तुरे करत नसे. त्यामुळे तार करणार्याने देखील आदरार्थी लिहायचे म्हणून निघून या असे लिहिले. दुसरा काहीच मजकूर नसल्याने आजोबा गेले असे समजून आमची सगळ्यांची वरात गावी आली होती. मग वडिलांनी ह्या सर्व प्रकाराबद्दल सर्वाना अक्षरश: प्रचंड झापले. आणी दुसर्या दिवशीच आम्ही कणकवलीला परत आलो. आम्हाला लगेच परत बघून आता आश्चर्यचकीत व्हायची वेळ चाळीतल्या लोकांची होती. मग सगळ्याना पूर्ण प्रकार समजावून सांगितला आणी हे तार प्रकरण संपले. आजोबाही त्यानंतर २० वर्ष होते आणी २०१० साली त्यांचे निधन झाले.
प्रतिक्रिया
मस्तच!
नाही. मी अगोदर कुठेही
छानच लिहिलेय.
तारेचा घोळ
त्यातले रेग्युलर वापरले
मस्त