Skip to main content

सांख्य तत्वज्ञान आणि पौराणीक कथातील काही योगायोग (?)

लेखक माहितगार यांनी शनिवार, 25/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
तत्वज्ञान हा माझा अभ्यासाचा विषय नाही पण ते आपल्या पर्यंत या ना त्या मार्गाने येऊन पोहोचते, जी काही अल्प माहिती मिळते आणि स्वल्प समजते त्याच्या धाग्यावर पतंग कितीही उडवला तरी उडेल का नाही आणि उडाला तर त्याची दिशा चुकलेली नसेल याची कोणतीच ग्यारंटी नाही :) तरी सुद्धा मिपाकरांच्या धर्मास जागून पतंग उडवण्याची ही हौस भागवून घेत आहे (चुभूदेघे). भारतीय दर्शनशास्त्रात अद्वैत दर्शन हे सर्वात सुपरिचीत आहे. ते मला जिथ पर्यंत समजले त्यात हवेत उडणारे पतंग कितीही (अनेक) दिसले तरी त्यांचा सूत्रधार एकच आहे. (याला मिथ्यावादात जरा अजून ताणले जाते तुम्हाला वेगवेगळे पंतग उडताना दिसतात तो केवळ एक आभास आहे.) पण मुख्य म्हणजे दोन अथवा अनेक असे काही नसतेच सगळे एकच आहे (मग परमतत्व आणि परमेश्वर जो तो आपापल्या पद्धतीने सांगतो). मानवी इंद्रीयांना बहुतांश गोष्टी अनेक दिसत असताना, निसर्गतः दिसणारी विवीधता नाकारणे आणि जे दिसत नाही (परमतत्व) तेच सत्य आहे म्हणून सांगणे म्हणजे अद्वैत. 'अनेक नाही' हे म्हणताना अनेक हा शब्द आधी येतो तसा 'अद्वैत' शब्दोच्चार द्वैताच्या उच्चारा शिवाय जमतच नाही, त्यामुळे अद्वैत सिद्ध करण्यासाठी प्रत्येक वेळी द्वैताचा आधार घ्यावाच लागतो. त्यामुळे अद्वैती पंडितांच्या टिकेच सगळ्यात मोठ लक्ष म्हणजे द्वैत तत्वज्ञान. त्यामुळे द्वैत तत्वज्ञानाची माहिती द्वैत तत्वज्ञानाच्या समर्थकापेक्षा टिकाकारांकडूनच अधिक मिळते. कदाचित त्याच्या काळाच्या ओघात अद्वैत दर्शनाच्या पुरस्कर्त्यांची संख्या अधिक राहिली असावी. अद्वैत तत्वज्ञानाच्या उलट द्वैत तत्वज्ञान मानवी इंद्रीयांना दिसणारी निसर्गातील विवीधता सहज पणे स्विकारेल आणि जे सहजपणे दिसत नाही त्या बद्दल प्रश्नचिन्ह उभे करेल म्हणजे निसर्गातील विवीधता ही परमेश्वरावर पुर्णतया अवलंबून असणार नाही. मग हि निसर्गातील विवीधता येते कुठून तर द्वैत तत्वज्ञानात याचा उल्लेख पुरुष आणि प्रकृती असा येतो. (द्वैत तवज्ञानात प्रकृती एकच असते/असावी असे का ते मला ठाउक नाही, दुसरे द्वैतातील प्रकृती आणि पुरुष या संकल्पना मानव अथवा सजीवांपर्यंत मर्यादीत नसाव्यात चुभूदेघे) पण पुरुष अनेक म्हणजे अनेक (वेगवेगळ्या) गुणांनी बनलेले असतात आणि पुढच्या पिढीकडे आपले गुण सुपूर्त करत जातात. प्रकृती हे गूण पुढच्या पिढीकडे जातानाचे केवळ माध्यम आहे. या द्वैत तत्वज्ञानाचे अधिक वाचन केले तर ते आध्यात्माची बरीचची क्लिष्ट वळणे घेत असावे अथवा द्वैत तत्वज्ञानावर येन केन प्रकारेण खोडून काढण्यात रस असलेल्या अद्वैतींकडून त्याचे क्लिष्टता विरहीत सादरीकरण व्हावे हि आपली अपेक्षाही कदाचित चुकत असेल. हे द्वैत तत्वज्ञान आपल्या परीने सोपेकरून घेण्याचा मार्ग म्हणजे निसर्गातील घटकांना, सजीवांच्या प्रजातींना, मानवांतील प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे गूण आणि स्वभाव वैशीष्ट्ये (बाय-बर्थ) आहेत जी पुढील पिढीकडे जात राहतात. एखादे मुल अगदी लहाणपणापासून धडपडा स्वभाव दर्शवते कारण त्याचे वडील धडपडे असतात, एखादे मुल लहानपणा पासून शांतस्वभावी निघेल कारण त्यांचे वडील शांतस्वभावी असतात. आजच्या काळात आपण जाणतो की गुणसूत्रांवर जीन्सवर काही गोष्टी अवलंबून असू शकतात ज्या पुढील पिढीकडे जातात, आताच्या काळात गुणसुत्रे वडील आणि आई दोघांकडूनही येत असतात (आणि एकापेक्षा अधिक पिढ्यांकडून येत असणार) म्हणजे केवळ वडीलांवर अवलंबून नसतात हे आपण जाणतो पण द्वैत तत्वज्ञान मांडताना तत्वज्ञान मांडणार्‍याची पुरुष प्रधानता असेल का, की जी पुरुषांनाच (इमिडीएट बायलॉजीकल फादर) फक्त गुणांची वाहक समजत होती (आणि प्रत्यक्षात गुणसुत्रे आईकडूनपण येत असणार पण यातून द्वैतींपुढे तत्वज्ञान मांडण्यात वेगळीच अडचण येत असणार), द्वैती तत्वज्ञाना समोरची दुसरी अडचण मानवी स्वभाव आणि गूण अंशतः त्याच्या सभोवतालच्या सांस्कृतीच्या अनुभवांच्या परिणामातूनही येत असणार आणि एखाद्या मुलाचे वैशीष्ट्य जन्मजातपणे पित्याकडून आले आहे अथवा नाही आहे हे वास्तवात सांगणे कठीण आणि मुलाचे गुण पित्यावर गेले आहेत असे दाखवता नाही आले तर द्वैत तत्वज्ञानाची गफलत होऊ लागते. जेव्हा गफलत होते सिद्ध करता येत नाही तेव्हा कपोलकल्पित आधार शोधावा लागतो. पौराणिक कथांमध्ये एक कथा येते ती विश्वामित्र, जमदग्नी आणि परशुरामाच्या जन्माशी निगडीत आहे. एक 'गाधी' नावाचा क्षत्रिय राजा आणि त्याचा ब्राह्मण जावई ऋषि 'ऋचिका' यांना जेव्हा मुले व्हावयास हवीत ती गाधी राजाचा मुलगा क्षत्रीय स्वभावाचाच झाला पाहीजे आणि ऋचिकांच्या वंशातले पुढचे सर्वजण ऋषि स्वभावाचे क्षत्रियत्वाचे गुण नसलेलेच व्हावयास हवेत पण प्रत्यक्षात उलटे घडते की गाधींचा मुलगा विश्वामित्र ऋषि स्वभावी होतो आणि ऋचिकांच्या वंशात त्यांचा नातू परशुराम क्षत्रिय स्वभावी होतो. जसे गौतम बुद्धांच्या बाबतीत वडील राजा असून गौतम बुद्धांनी विरक्ती घेतली हा गौतम बुद्ध या व्यक्ती विशेषास मिळालेल्या निव्वळ बाह्य वातावरणाचा अथवा अनुभवाचा संबंध असू शकतो, क्षत्रिय पित्याचा मुलगा म्हणजे तो योद्धाच झाला पाहीजे असे नाही. तसेच विश्वामित्रानेही योद्धाच राहीले पाहिजे असे नाही. पण इथे (आधूनिक विज्ञान विश्लेषणासाठी पाठीशी नसलेल्या) द्वैतींची अडचण होते मग विश्वामित्र, जमदग्नी आणि परशुरामाच्या जन्माशी निगडीत पौराणिक कथेची रचना कशी होते पहा की गाधींना मुलगा नव्हता, त्यामुळे आपल्या सासूला क्षत्रिय स्वभावाचा मुलगा व्हावा आणि आपल्या बायकोला तपस्वी स्वभावाचा मुलगा व्हावा म्हणून ऋचिकांनी क्षत्रिय स्वभाव देणारे एक पेय आणि तपस्वी स्वभाव देणारे पेय अशी दोन पेये बनवली. पण त्यांच्या बायकोच्या अनवधानाने या पेयांची अदलाबदली झाली बायकोसाठी बनवलेले तपस्वी स्वभाववाले पेय सासूच्या वाटेला गेले आणि म्हणून विश्वामित्र तपस्वी स्वभावाचे झाले. आणि क्षत्रिय स्वभावाचे पेय ऋचिकांच्या पत्नीने पिले म्हणुन त्यांच्या घराण्यातील नंतरच्या पिढीतील परशुराम हा क्षत्रिय स्वभावाचा झाला. वस्तुतः विश्वामित्रांचे तपस्वी होणे असो अथवा परशुरामाचे युद्धकरणे असो हे परिस्थितीवशात आलेले गुण असू शकतात अथवा मागच्या पिढीकडून अगदी आईकडून आलेले ही गूण असू शकतात या दोन शक्यता मुलगा हा वडीलांसारखाच झाला पाहीजे हि अट पूर्ण करण्यास पुरे ठरत नाहीत मग अशा कथांची रचना होत असावी का ? (अर्थात उपरोक्त कथेत द्वैत तवज्ञानाचा कुठे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष उल्लेख होताना दिसत नाही.) मात्र पौराणिक कथांनुसार द्वैत (सांख्य) तत्वज्ञानाची प्रथम मांडणी कर्दमपूत्र कपिल मुनींनी केली योगायोग असा की अत्री ऋषिंची पत्नी देवी अनसुया ही कर्दमांची मुलगी म्हणजे कपिल मुनींची बहीण जिला विष्णू , ब्रह्मा महेशांच्या आशिर्वादाने तीन अवतारी पुत्र होतात त्यातील विष्णूचा अवतार असलेले दत्त हे विरक्त स्वभावी बनतात, ब्रह्माचा अवतार असलेले सोम तर महेशाचा अवतार असलेले महर्षि दुर्वास उग्र स्वभावी होतात. सांख्य तत्वज्ञ कपिल मुनी मामा असलेले दुर्वास कुंतीस जाऊन पुत्रप्राप्तीच्या संबंधाने वर देतात त्या त्या वर दात्या इश्वराच्या स्वभावाची उपलब्धता असलेली पुत्रप्राप्ती कुंतीस होते. कुंतीकडून तीच्या मुलांना द्रौपदीस पत्नी करून घेण्याच्या संबंधाने आज्ञा होते. आणि गीतेच्या 10.26 श्लोकात मीच कपिल मुनी आहे हे वेगळ्या संदर्भाने असेल पण श्रीकृष्ण सांगताना दिसतात. हा सर्व योगा योग या कथा मध्ये योगा योगानेच आला असू शकतो. (मी व्यक्तीशः पौराणिक कथांना वास्तव इतिहास मानत नाही आणि तसा इतिहास शोधणे या धाग्याचा उद्देश नाही. सांख्य तत्वज्ञानही कथांच्या माध्यमातून पोहोचवले गेले असण्याची शक्यता अभ्यासणे अजून काही पौराणिक कथा आहेत का की ज्यात सांख्य तत्वज्ञान आसपास असण्याची शक्यता असू शकेल ? हा धाग्याचा उद्देश आहे. तपशिलात कुठे चूक झाल्यास जाणकारांनी निदर्शनास आणावे मी दुरुस्त करेन. चुभू देघे)

वाचने 9614
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

माझ्या माहितीनुसार अनेक पुरुष आणि अनेक प्रकृती सांख्यांत नाही. ते एक पुरुष आणि एक प्रकृती मानतात. अद्वैतवादी विश्वाला आभास मानतात, तर सांख्य विश्वाला पुरुष-प्रकृतीचा संयोग मानतात एव्हढाच फरक असावा. प्रकृतीच्या सहाय्याने पुरुष व्यक्त होतो असे ते म्हणतात बहुधा.

In reply to by जडभरत

बरोबर, पुरुष ह्या शब्दाच्या ठिकाणी 'गुण-वैशीष्ट्य' किंवा 'स्वभाव-वैशीष्ट्य' हे शब्द ठेवल्या नंतर द्वैती फंडा समजण्यास जरासा सोपा होतो हे माझ व्यक्तीगत मत. मी लेखाच्या उत्तरार्धात काही पौराणीक कथा संदर्भांचा उल्लेख केला आहे आनन्दा म्हणतात तसे "तर सांख्य विश्वाला पुरुष-प्रकृतीचा संयोग मानतात ....." हा भाग दखल घेण्या जोगा असावा. भारतीय जनमानसापुढे द्वैतींच्या तत्वज्ञानाच सादरीकरण मुख्यत्वे अप्रत्यक्षपणे (म्हणजे मुख्यत्वे टिकेच्या माध्य्मातून) अद्वैतींनीच केल (असाव) कारण जनमानसा पर्यंत त्यांची अद्वैतींची पोच अधीक असावी. द्वैतींच्या तत्वज्ञानाचा भारतीय जनमानस साहित्य आणि संस्कृतीवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम कोणते ?

या लेखात अद्वैतवादाला निष्कारणच आरोपी केलेले आहे. वस्तुतः सांख्य तत्वज्ञान हे आता आऊटडेटेड आहे. आदि शंकराचार्यांनी उपनिषदांचा विसरून गेलेला अद्वैतवादाचा ठेवा पुन्हा जोमदारपणे समोर आणला. अनेक ठिकाणी द्वैती आणि बौद्ध यांचा विवादात पराभव केला आणि औपनिषदिक अद्वैतवाद प्रस्थापित केला. संत ज्ञानेश्वर देखील जो चिद्विलासवाद मांडतात, तो अद्वैतावरच आधारीत आहे. अगदी अलीकडे म्हणजे स्वामी विवेकानंद हेदेखील अद्वैतवादाचे कट्टर समर्थक.

In reply to by जडभरत

या दोन विभूतींवर तरी कुणी स्वार्थप्रेरीत वृत्ती किंवा अंधानुकरण असा आरोप करू शकणार नाही म्हणूनच त्यांना क्वोट केलंय.

In reply to by जडभरत

या लेखात अद्वैतवादाला निष्कारणच आरोपी केलेले आहे.
उद्देश अद्वैतवादाला आरोपी करणे नाही. लेखाचा उद्देश उत्तरार्धात नमुद द्वैत अद्वैत संकल्पनांच्या संदर्भाने कोणत्याही एका गटाकदून टिका अथवा स्पष्ट करण्यासाठी रचलेली/ वापरली गेलेली पूर्ण अथवा अर्ध कल्पित कथा असण्याची शक्यता असू शकेल का ? हि मला पडलेली शंका हा लेखाच्या उत्तरार्धात मांडली आहे आणि चर्चेचा उद्देश कथांच्या माध्यमातून नमुद केलेले योगायोग द्वैत अद्वैत संकल्पनांच्या संदर्भाने येताहेत का हे तपासून पाहीले जावेत एवढाच आहे. अर्थात उत्तरार्धा कडे जाण्या पुर्वी द्वैत आणि अद्वैत यांची अत्यंत स़ंक्षीप्त कल्पना वाचकांना यावी म्हणून या वादाचा अत्यल्प परिचय दिला आहे. अधिक मार्गदर्शना साठी तुमच्या सारखी जाणकार मंडळी आहेतच

In reply to by जडभरत

आदि शंकराचार्यांनी उपनिषदांचा विसरून गेलेला अद्वैतवादाचा ठेवा पुन्हा जोमदारपणे समोर आणला.
माझ आध्यात्मक्षेत्रीय वाचन खूप नाही त्यामुळे चुभूदेघे. संत ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद यांची शैली वैचारीक भूमिका टू द पाँईट मांडण्याची वाटते आणि मुख्य म्हणजे वाचनासाठी कुठेतरी उपलब्ध असते. आदी शंकराचार्यांनी प्रतीपक्षांना वाद विवादांमध्ये पराजीत केले असे म्हणतात. वैदीक अद्वैतावर आधारीत संकल्पनांच्या पुनरुज्जीवनाच क्रेडीट त्यांना देता येईल पण आदी शंकराचार्यांची टू द पॉईंट वैचारीक भूमिका वाचनासाठी तेवढ्या सहजपणे उपलब्ध होताना दिसत नाहीत (किंवा मला उपलब्ध झाली नसावी) शोध घेतल्यावर प्रत्येकवेळी समोर काय येत तर त्यांच्या भक्त/शिष्य गणांनी आग्रहपुर्वक (प्रचारार्थ) केलेले आदी शंकराचार्यांच्या विजयाचे दावे. द्वैतांशी द्वैतांचा पुर्वपक्ष आणि त्यांचा उत्तरपक्ष नेमका कसा मांडला हे वाचनास कुठे (सहज) उपलब्ध होताना दिसत नाही. इतर प्रतिपक्षांसोबतच्या बाबत आदीशंकराचार्यांच्या बाबत केवळ चातुर्यकथाच वाचनात येतात प्रत्यक्ष पुर्वपक्ष उत्तरपक्ष अशी केलेली मांडणी वाचनास मिळतच नाही. हे नमुद करण्याचा उद्देश आदी शंकराचार्यांबद्दल शंका घेण्याचा नाही. त्यांचे भक्त/शिष्यगणांनी आदी शंकराचार्यांची चातुर्यकथांमधून केलेली व्यक्ती पुजा समजू घेता येऊ शकते पण केवळ चातुर्यकथांवर अवलंबून राहून आदी शंकराचार्चांचे लेखन उपलब्ध करण्यात त्यांचे शिष्य/भक्त गण मागे राहतात का अशी एक शंका मनात येत राहते.

In reply to by माहितगार

हा तुमचा मुद्दा बरोबर आहे. याबाबत झालेल्या वादविवादाचे documentation झालेले नसल्यामुळे काय झाले असेल ते सांगता येत नाही. माझ्या वाचनात देखील अशा वादविवादांची वर्णने आलेली नाहीत. परंतु इतिहासकारांच्या दाखल्यानुसार त्यानंतर बौद्ध धर्माला लागलेली ओहोटी ही वैदीक धर्माचे जोरदार पुनरुत्थान झालेले असावे असे मानण्यास नक्कीच जागा आहे. तसेच विवेकानंद ग्रंथावली मधून देखील आपल्याला आदि शंकराचार्यांच्या कार्याविषयी थोडी माहिती मिळते. अर्थात कुणाचे तत्वज्ञान श्रेष्ठ किंवा कुणाचे कनिष्ठ यापेक्षा त्यातला किती भाग आपण आत्मसात करतोय हे ज्यादा महत्वाचे. स्वा. विवेकानंदांनीदेखील अनेक ठिकाणी: " शंकराचार्य बुद्धीने अतिशय श्रेष्ठ होते परंतु बुद्धांचे ह्रद्य त्याहून अतिशय विशाल होते." असेच गौरवपर उद्गार काढलेले आहेत. अद्वैत तत्वज्ञनाचा एक छोटासा भाग (दुसर्‍याचं चांगलं जरी करता नाही आलं तरी ठीक, पण किमान वाईट तरी करू नका. कारण दुसर्‍याला दिलेला प्रत्येक त्रास, अन्याय, अपमान, दु:ख, वेदना, पीडा ही आपण परमात्म्यालाच देत असतो) जरी आपण आत्मसात केला तरी जगातील आत्यंतिक दुष्टता, कपट, क्रौर्य, युद्धे, कलह कितीतरी कमी होईल.

In reply to by जडभरत

जडभरत, >> वस्तुतः सांख्य तत्वज्ञान हे आता आऊटडेटेड आहे. मला नाही वाटंत असं. कारण की योग म्हणजे सेश्वर सांख्य. योग तत्त्वज्ञान पूर्णपणे सांख्य संज्ञाप्रणालीवर (टर्मिनॉलॉजी) बेतलेलं आहे. मानवजातीच्या अंतापर्यंत योग अस्तित्वात राहणार आहे. त्यामुळे तोवर तरी सांख्य दर्शनास मरण नाही! :-) आ.न., -गा.पै.

मानवी इंद्रीयांना बहुतांश गोष्टी अनेक दिसत असताना, निसर्गतः दिसणारी विवीधता नाकारणे आणि जे दिसत नाही (परमतत्व) तेच सत्य आहे म्हणून सांगणे म्हणजे अद्वैत
मा.गा.साहेब आपणांस इंद्रियांपासून मिळणारे ज्ञान फार तुटपुंजे व विकृत असते. उदा. पांढर्या रंगातील ७ रंग वेगवेगळे न दिसणे. स्वच्छ जलाशयात पाहिले असता पाण्याचा तळ उचलल्याप्रमाणे दिसणे. अत्यंत लघु व अत्यंत दीर्घ फ्रीक्वेनसीचे ध्वनी ऐकू न येणे. त्यामुळे इंद्रीयज्ञान हाच सत्य तपासण्याचा निकष असू नये. असो खूप इंटरेस्टींग विषय मांडलात. चर्चा करायला खूप आवडेल.

In reply to by सदस्यनाम

जड म्हणत म्हणत तुम्ही लैच वर पोहोचलेले आहात की.
तुम्ही जडभरताची गोष्ट ऐकली नाही काय? जडभरत नाव घेणे ही त्यांची विनयशीलता आहे. अवांतर - चला, जर उद्या हा जडभरत आयडी काही कारणाने ब्लॉक झाला, तर त्यांच्या पुढच्या आयडीची सोय पुराणांनीच करून ठेवलेली आहे. पाडस वगैरे नाव घ्यायला हरकत नाही (ह. घ्या)

In reply to by आनन्दा

पाडस वगैरे नाव घ्यायला हरकत नाही
:) जडभरताने स्माइली टाकल्यावर आपणपण स्माईली टाकण्यास हरकत नाही म्हणून आमचा पण स्माईली !

निसर्गतः दिसणारी विवीधता नाकारणे आणि जे दिसत नाही (परमतत्व) तेच सत्य आहे म्हणून सांगणे म्हणजे अद्वैत.>>> अज्ञानामुळेच अशी अवस्था होत असते . जे सत्य आहे ते दिसत नाही आणि जे असत्य आहे ते दिसतं आपल्याला जे दिसतं , ऐकू येतं , स्पर्शाला जाणवतं तेच सत्य समजणं ह्यालाच अज्ञान म्हणतात पण पुरुष अनेक म्हणजे अनेक (वेगवेगळ्या) गुणांनी बनलेले असतात आणि पुढच्या पिढीकडे आपले गुण सुपूर्त करत जातात.>>> म्हणजे ? पुरुष म्हणजे ब्रम्ह हे गुणरहित असून प्रकृती म्हणजे सृष्टी हि गुणांनी युक्त आहे . ब्रम्ह अचल तर सृष्टी चंचल असते . (प्रकृती म्हणजे स्त्री असा बालिश अर्थ कोणीही घेवू नये ) जडभरत आपला प्रतिसाद अगदी योग्य आहे .

In reply to by तुडतुडी

पुरुष म्हणजे ब्रम्ह हे गुणरहित असून प्रकृती म्हणजे सृष्टी हि गुणांनी युक्त आहे . ब्रम्ह अचल तर सृष्टी चंचल असते.
माझे प्रश्न बालिश वाटतील पण मला खरेच कल्पना नाही म्हणून विचारतो आहे. 'पुरुष = गुणरहित ब्रह्म' हि व्याख्या सांख्यांची आहे की अद्वैतींची ? कारण खरेतर 'पुरुष = गुणरहित ब्रह्म' म्हटले की द्वैत तत्वज्ञानाचे आपोआपच अद्वैतात रुपांतरण होणार नाही का ?

'पुरुष = गुणरहित ब्रह्म' म्हटले की द्वैत तत्वज्ञानाचे आपोआपच अद्वैतात रुपांतरण होणार नाही का ?>>> अगदी बरोबर . कारण प्रकृती आभासी असते . शेवटी प्रकृतीला ब्रह्मातच विलीन व्हायचं असतं .

In reply to by तुडतुडी

आपण मांडता आहात ती अद्वैती भूमिका असावी असे वाटते आहे. (यात मला अद्वैतवादाच द्वैतवादावर अतीक्रमण :) दिसतय (ह.घ्या.)) त्यामुळे पुरुष = गुणरहित ब्रह्म' हि भूमिका सांख्यांना/द्वैतवाद्यांना मान्य आहे का ही माझी साशंकता अद्याप बाकी राहते. ~~~~

माहितगार, पुरूष म्हणजे पुरात राहतो तो. पुर म्हणजे घर. मी माझ्या घरात राहतो तर माझा देह पुरूष असून माझं घर प्रकृती आहे. आता घरात जसे आतबाहेर येजा होते तसेच माझ्या देहातही आतबाहेर देहव्यापार होतात. उदा. : आहार ग्रहण करून पारुष (=विष्ठा) बाहेर टाकणे. त्यामुळे देह हा स्वयंभू पुरूष आहे का, असा प्रश्न पडतो. या प्रश्नाचा छडा लावण्यासाठी मी माझ्या देहाच्या आत डोकावलं. तर त्यात प्राणमय कोष दिसतो आहे. तो पुरूष धरला तर अन्नमय देह आणि त्याबाहेरील घर ही प्रकृती झाली. प्राणमय कोषाचं श्वास हे अन्न आहे आणि उच्छवास हे पारुष आहे. याच रीतीने मनोमय, ज्ञानमय आणि आनंदमय कोष हे क्रमाने पुरूष होत जातात. प्राण्यांचे देहव्यापार मनुष्याप्रमाणेच असल्याने त्यांच्यातही असेच कोष असावेत असा निष्कर्ष निघतो. मात्र माणसाला जसं कर्मस्वातंत्र्य आहे तसं प्राण्यांना नाही. यावरून माणसाच्या या आनंदमय कोषास कर्माचं अधिष्ठान देणारा एखादा आंतरिक पुरूष मानावा लागतो. हाच तो सुप्रसिद्ध आत्मन्. आत्मा हा परा (=अल्टिमेट) पुरूष आहे. त्यापल्याड कोणीही पुरूष नाही. मात्र या चिरंतन सत्याचा अनुभव घेतांना देहभान विसरलं जातं (का आणि कसं होतं माहीत नाही). आणि अनुभव घेणारा ब्रह्मांडमय होऊन जातो. म्हणून 'अयम् आत्मा ब्रह्म' म्हंटलं गेलं आहे. आता तुमचा प्रश्न पाहूया : >> 'पुरुष = गुणरहित ब्रह्म' हि व्याख्या सांख्यांची आहे की अद्वैतींची ? माझ्या मते अद्वैतींची असावी. कारण की १. सांख्य दर्शनात ईश्वर नाही. २. 'पुरुष = गुणरहित ब्रह्म' हे अनुभवायचं सत्य आहे. सांख्यात वर्णन (=description) आहे. योगात प्रत्यक्ष क्रियेवर (=execution) भर आहे. मी यांतला तत्ज्ञ नाही. त्यामुळे चूकभूल देणेघेणे! :-) आ.न., -गा.पै.

श्री. माहीतगार यांनी पहिल्यांदीच माझा अभ्यास नाही हे सांगितले हे बरे झाले.त्यामुळे (१) अ आणि ब या दोन व्यक्तींना निराळे माणारे ते द्वैत तत्वज्ञान; (२) द्वैत व सांख्य तत्वज्ञाने एकच, (३) पुरुष हा गुणांनी युक्त असतो, (४) "पुरुष" पुढच्या पिढीत "गुण" सुपूर्त करतो, (५) वगैरे बरीच ..... विधाने स्विकार्य नाहीत म्हणावयास हरकत नाही.. प्रथम कोणतेच तत्वज्ञान माणुस "अ" व माणुस "ब" यांतील फरकाकडे लक्ष देत नाही. तो तत्वज्ञानाचा विषयच नव्हे. सांख्य हे अति-पुरातन तर मध्वाचार्यांचे द्वैत हे वैष्णव तत्वज्ञान त्या नंत्रर शेकडो वर्षांनतरचे. सांख्यांचा पुरुष हा गुणातीत, अलिप्त आहे. तो सृष्टीतील कोणत्याही घडामोडीत भाग घेत नाही.त्यांमुळे (४) बादच. सांख्यांनी त्रिगुण प्रकृतीशी जोडले आहेत सांख्य तत्वज्ञानाची तोंडओळख ४-५ दिवसांत देतो. ब‍र्याच जणांचे बरेच प्रश्न सुटण्यास मदत होईल (आता ही गंभीर चर्चा बाजूला ठेवून गंमत म्हणून, गंमत म्हणूनच, पुढील टिपणी.. (अ) "तत्वज्ञान हा माझा अभ्यासाचा विषय नाही पण ते आपल्या पर्यंत या ना त्या मार्गाने येऊन पोहोचते," याचा आणि प्रा.निरन्जनदास. यांच्या अभ्यासू लेखांचा काही संबंध नाही ना ? (ब) अहमदाबादला जेव्हा एखादा तरूण पतंग उडवतो तेव्हा त्याचे लक्ष जास्त करून शेजारच्या गच्चीतील पतंग उडवणार्‍या तरुणीकडेच असते, तसे श्री माहीतगार यांचे लक्ष विश्वामित्र-परशुराम या मामा भाच्यांच्या गोष्टीकडे जास्त व दर्शनांकडे कमी असे तर झाले नसावे नां ? (क) विश्वामित्र-मेनका यांच्या मुलीकडे पाहिले तर तिने तरी आपल्या "अप्सरा" आईचे बरेचसे "गुण" उचललेले दिसतात, काय" शरद

In reply to by शरद

प्रथम कोणतेच तत्वज्ञान माणुस "अ" व माणुस "ब" यांतील फरकाकडे लक्ष देत नाही. तो तत्वज्ञानाचा विषयच नव्हे. असहमत. अद्वैत दर्शन तर यच्चयावत जड व चैतन्य पदार्थ हे एका परब्रह्माचाच विलास आहे हे स्पष्ट करणेसाठी धडपडते.

In reply to by शरद

आमचा पतंग उडेल का याची शंका होतीच ती बरोबर निघाली. अद्वैताची ओळख जशी चटकन होते तसे सांख्यचे होत नसावे. सांख्य तत्वज्ञानाची सुरवातीचे दोनचार ओळीचे वाचन झाले की ते मला क्लिष्ट वाटून ते सहसा प्रत्येकवेळी मी ते मध्येच सोडून दिले आहे. सांख्य तत्वज्ञानाची तोंडओळख आपल्याकडून होण्यासाठी वाट पहातो. बाकी उर्वरीत प्रश्नांची उत्तरे देतो.
(अ) "तत्वज्ञान हा माझा अभ्यासाचा विषय नाही पण ते आपल्या पर्यंत या ना त्या मार्गाने येऊन पोहोचते," याचा आणि प्रा.निरन्जनदास. यांच्या अभ्यासू लेखांचा काही संबंध नाही ना ?
भारतीय तत्वज्ञान पौराणिक कथासूत्रातून पोहोचते असे वाटते म्हणून ABCD हे ABCD च आहे का A1BCD किंवा ABC1D असे दोन ओळींच्या मध्ये अजून काही वाचता येते हे शोधण्याचा प्रयत्न सॉर्ट ऑफ revisiting narratives हा उद्देश. revisiting narratives स्वरुपाचे धागे काढण्याचा जुना मानस होता(आहे)च पण ते उशीराने पतंगाची दिशा न चुकू देता काढले असते. प्रा.निरन्जनदासांशी revisiting narratives साठी पॅरलेल वेळ साधणे बरे पडेल म्हणून लवकर सुरवात केली त्यामुळे अप्रत्यक्ष संबंध आहे हे खरे ;)
(ब) अहमदाबादला जेव्हा एखादा तरूण पतंग उडवतो तेव्हा त्याचे लक्ष जास्त करून शेजारच्या गच्चीतील पतंग उडवणार्‍या तरुणीकडेच असते, तसे श्री माहीतगार यांचे लक्ष विश्वामित्र-परशुराम या मामा भाच्यांच्या गोष्टीकडे जास्त व दर्शनांकडे कमी असे तर झाले नसावे नां ?
revisiting narratives हा मुख्य उद्देश आहे, रोख शेजारच्या गच्चीवर जे आहा आहा म्हणून दाखवले जात आहे ते खरेच आहा आहा आहे का ? किंवा त्या कथासूत्रांचे मूळ अजून कुठे आहे ? शैव वैष्णवांनी त्यांच्या त्यांच्या कथांची जशी रचना करून घेतली तशी सांख्यांनीही करून घेतली आहे अथवा होती का हे पहाण्याचा प्रयत्न अर्थात प्रयत्नाचा पाया चुकला तर पुढचा प्रयत्न फसू शकतो हे ओघाने आलेच. दर्शनांकडे लक्ष कमी झाले असे स्वच्छ दिसतेच. (क) विश्वामित्र-मेनका यांच्या मुलीकडे पाहिले तर तिने तरी आपल्या "अप्सरा" आईचे बरेचसे "गुण" उचललेले दिसतात, काय" :) ळोळ जीनेस है !

सांख्य तत्वज्ञान आणि पौराणीक कथातील काही योगायोग
>>> गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः। या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिःसृता।। अवांतर : जडभरत हा माझा डु आयडी नाही =))

कृष्ण हा "गोपाल" असल्याने कवीने अशी कल्पना केली की कृष्ण ह्या गवळ्याने उपनिषदरुपी गाईंचे दूध काढले, ते दूध म्हणजे गीता. गीतेत सर्व उपनिषदांमधील चांगली मते एकत्र करावयाचा प्रयत्न केला आहे. (त्यामुळे कित्येक वेळीं उलटसुलट विचार आले आहेत असे वाटते) हाच धागा घेऊन प्रगोंनी दिलेल्या संदर्भात कवी म्हणतो आहे गीता ही सुगीता आहे., तुला इतर शास्त्रग्रंथ वाचावयाची,तेथील चर्चांचा अभ्यास करावयाची गरजच काय ?भगवानाने आपल्या मुखकमलातून सांगितलेली गीता तुझ्याकरिता पुरेशी आहे. शरद

In reply to by शरद

करेक्ट सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दन:। पार्थो वत्स: सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् ।। ____________________/\_______________________

त्यामुळे पुरुष = गुणरहित ब्रह्म' हि भूमिका सांख्यांना/द्वैतवाद्यांना मान्य आहे का ही माझी साशंकता अद्याप बाकी राहते.>> सांख्य म्हणजे द्वैतवाद असं आहे का ? कारण माझ्या माहिती प्रमाणे सांख्य तत्वज्ञानात शरीराचं फोलपण , त्याचं विनाशी असणं आणि आत्मा किवा चैतन्याचं अविनाशीपण ह्यावर भर दिला आहे . द्वैत / अद्वैत ह्याविषयी काही सांख्य तत्वज्ञानात सांगितलंय असं मला तरी माहित नाही . कृपया अधिक माहिती द्यावी