Skip to main content

ओम भवती भिक्षांदेही

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 06/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : खालील लेख हा तद्दन पोरकटपणा असून त्यात कुठलीही वैचारीक मुल्ये नाहीत. खूप दिवसांनी "बाबां"कडे गेलो होतो.त्यावेळेचा किस्सा. सौदीला जाण्यापुर्वी बाबांनी. "धन्य ते संताजी धनाजी" अशी दीक्षा दिली होती.त्या दीक्षेचा थोडा-फार फायदा झाला आणि आम्ही "संताजी-धनाजी" यांच्या सहवासात वेळ काढायला लागलो.विचारांत आणि आचारात काही विशेष फरक पडला नाही.(असे आमची सौ. म्हणते...म्हणजे ते नक्कीच सत्य असेल...असे समजायला हरकत नाही.) आता बाबांना काहीतरी दक्षिणा द्यायलाच हवी. म्हणून जातांना त्यांच्यासाठी परदेशी तीर्थ घेवून गेलो.संध्याकाळचीच वेळ असल्याने बाबा घरीच होते.आज-काल बाबा संध्याकाळी बाहेर जात नाहीत. असो.... तीर्थाची बाटली बघून बाबा खूष. बाबा : अरे व्वा.एकदम योग्य वेळी बाटली आणलीस. मी : अहो, परवाच आलो.म्हटले ज्याची-त्याची वस्तू ज्याला-त्याला दिलेली उत्तम.चला निघतो मी.अजून बरीच कामे आहेत. बाबा: अरे असे कसे.चल थोडे-थोडे मद्य घेऊ. अगं, जरा २ ग्लास आणि खायला काहीतरी घेवून ये. (बाबांनी स्वतःच ग्लास भरले)) मी: तुम्ही पण ना.आता आमची बायको बोंबलणार. बाबा: शिंच्या.तू कधी पासून बायकोला घाबरायला लागलास्?आमचे ठीक आहे.वय झाले.बायकोला घाबरायलाच पाहिजे.बरे ते जावू दे. कशी काय झाली ट्रिप? काय म्हणते कं. मी: ट्रिप अजून चालू आहे.अजून ३ महिन्यांचे एक्स्टेंशन मिळाले.पुढच्या आठवड्यांत परत.सुरुवातीला त्रास झाला.पण आता जरा रुळलोय. बाबा: अरे बाबा, सुरुवातीला त्रास होतोच.पण तुला रे लेका कसला त्रास.मुंज झाली आहे ना?मग कसला त्रास. मी: आता मुंजीचा आणि ह्या सुरुवातीच्या त्रासाचा काय संबंध? तुम्ही पण ना एक नंबर "येड्याचा बाजार." (आम्ही बाबांना शिव्या देवू शकतो.इतर बाबा लोक , भक्तांना शिव्या देतात आणि आमचे बाबा, आमच्या कडून शिव्या खातात.) बाबा: फार पुर्वी माणसे रीत-भात पाळीत असत.सुताराचा मुलगा सुतार, तर लोहाराचा मुलगा लोहार.अशीच रीत होती.तशीच ब्राह्मणाच्या मुलाने ब्राह्मण व्हावे आणि असावे अशीच रीत होती. मी: हो, मग मी पण ब्राह्मणच आहे.आता मांस-मटण खात असलो आणि मद्य पीत असलो तरी. बाबा: तू रे लेका कसला ब्राह्मण्?ब्राह्मण असला असतास तर घाबरला नसतास.तुझी तर अजून मुंज पण झालेली नाही. मी: काय बाबा तुम्ही पण.मग हे जानवे काय उगाच किल्या अडकावायला ठेवले आहे का? बाबा: जानव्याचा आणि मुंजीचा काय संबंध? मी : मला काय माहीत.तुम्हीच सांगा. (बाबा आता २ पेग संपवून तिसर्‍या पेगची तयारी करत होते.) बाबा: हे बघ. जानव्याला ३ दोर आणि एक गांठ असते.ते दोर म्हणजे प्रतिके आहेत. पहिला दोर = कष्ट दुसरा दोर = संगत तिसरा दोर = आवड आणि ह्या तिन्ही गोष्टींची सांगड घालायला किंवा एकत्र मोट बांधायला म्हणून ती ब्रह्मगाठ किंवा ध्येय. ते तुमचे भटजी काय वाट्टेल ते सांगू देत.माझ्या द्रुष्टीने जानवे म्हणजे हेच.असो. चल माझा ३रा पेग संपला.आता अजून एक पेग आणि मग उठू या. मी: मला तुमचे म्हणणे अजिबात पटलेले नाही.म्हणजे आपले पुर्वज खोटे आणि तुम्ही सांगता ते सत्य. बाबा: मी कुठे म्हणालो की मी म्हणतो तेच सत्य. मी माझे ब्राह्मण कुणाला म्हणावे? ह्या बद्दल विचार मांडले,पटले तर घे नाही तर सोडून दे. मी विचार करायला लागलो, आयला, खरेच की.माणूस आधी ध्येय निवडतो.ते ध्येय गाठण्यासाठी कष्ट करतो आणि त्यासाठी मदत करणारे उत्तम मित्र-मैत्रीण जोडतो. मी: बाबा.तुमचे म्हणणे पटले मला.मग आता मी काय करू? बाबा:माझे म्हणणे पटले ना? मग आता उद्या पासून तुझ्या गळ्यांतले जानवे टाकून दे आणि हे माझे जानवे घाल. हां पण मंत्र मात्र तोच राहील. "ओम भवती भिक्षांदेही." मी: आता जाता-जाता ह्या मंत्राचा पण अर्थ सांगा. बाबा: अरे, जिथे जिथे उत्तम ज्ञानी माणसे भेटतील,त्या त्या ठिकाणी "ओम भवती भिक्षांदेही" हा मंत्र जपत उभा रहा.ज्ञानाची भिक्षा जिथून मिळेल तिथून घे.अर्जून असू देत किंवा सचिन असू देत.विनयाने ज्ञान माग आणि ज्याने ज्ञान दिले आहे त्याचा आदर राख. थोडक्यात काय तर, जानव्याचा आणि ब्राह्मणाचा संबध नसतो.जो अयूष्यभर ज्ञान मिळवत राहतो तो ब्राह्मण आणि जो मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करत नाही तो अब्राह्मण.असे माझे मत आहे.चला उठा आता.बायको बोंबलेल तूझी. =========================================================== (तर मिपाकरहो, अशा प्रकारे आमची ती संध्याकाळ पार पडली.आमची मुंज फार आधीच झाली होती पण मुंजीचे संस्कार मात्र त्या दिवशी झाले."ओम भवती भिक्षांदेही" असे म्हणत-म्हणतच आम्ही प्राण सोडणार.आम्हा २ दारुड्यांचे संभाषण तुम्ही अजिबात मनावर घेवू नका.दारू प्यायल्यावर माणसे काय वाट्टेल ते बरळतात.समाज बेवड्यांना जास्त किंमत देत नाही, तुम्ही पण देवू नका.जर चूकून-माकून पटले असेल तर, "ओम भवती भिक्षांदेही" असे म्हणत गुरू शोधा.)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3909
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

अरे, जिथे जिथे उत्तम ज्ञानी माणसे भेटतील,त्या त्या ठिकाणी "ओम भवती भिक्षांदेही" हा मंत्र जपत उभा रहा.ज्ञानाची भिक्षा जिथून मिळेल तिथून घे.अर्जून असू देत किंवा सचिन असू देत.विनयाने ज्ञान माग आणि ज्याने ज्ञान दिले आहे त्याचा आदर राख.
+ ७९९३२९२३९०८२३०४२३०९४२३९८४९२३८४०९२३४९८२३६४२३७६४८७२३६४२३९८४६२३९८४९८ प्रचंड आवडलं हे.

"बांबां"ना व त्यांचे विचार आमच्यापर्यंत पोचवणार्‍या त्यांच्या शिष्याला धन्यवाद.

मस्त लिहिले आहे आबडले - (मुविंच्या प्रतिसादांच्या टेंपलेट मधुन एक चोरुन इकडे टाकलेला) स्पा

बाबांचे विचार तंतोतंत पटले. सध्या मुंबई पुण्यात मिपाकर कट्टे करीत आहे. आता निर्लजपणे भिक्षा मांगने कितपत जमते, भिक्षा मिळाल्यावर कळेल. ओम भवती भिक्षांदेही (दिल्ली-मुंबईच्या रिटर्न तिकीटाची भिक्षा मिळत असेल तर उत्तम) कट्ट्यासाठी. *mail1* *WRITE* *MAIL*

In reply to by विवेकपटाईत

त्यापेक्षा मीच तिथे येतो..... कारण वयाने, अनुभवाने आणि ज्ञानाने आपण माझ्या पेक्षा जास्त श्रेष्ठ आहात. शिवाय "ओम भवती भिक्षांदेही" हा गुरुमंत्र आम्हाला आहे. ज्ञान रुपी भिक्षेसाठी आम्ही जगप्रदक्षिणा करायला पण तयार आहोत...तो दिल्ली क्या चीझ़ है.....

विनयाने ज्ञान माग आणि ज्याने ज्ञान दिले आहे त्याचा आदर राख. धन्यवाद.

शेवटी हे एक "

ब्राम्हणच"

लिहु शकतो. कारण ब्रम्ह जाणतो तो ब्राम्हण आणि तुम्ही ते बरोब्ब्बर जाणलेच आहे.

कट्ट्याचे वेध सुरू झालेत. पुण्यकालाची एक तारीख ठरलीय. उरलेल्या दोन्हीसाठी वामनाची वाट पाहत आहे.ऐनवेळी कोणी झारीत घुसला नाहीतर मोक्ष आणि दानधर्म. ॐशांती शांती .